जालना शेतकरी अनुदान घोटाळ्यांचा धक्कादायक उलगडा २२ तलाठी आणि ६ जणांवर गुन्हा दाखल – पाचोऱ्यात काय होणार?

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदानातील गंभीर घोटाळा उघड झाल्याने संपूर्ण तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा बेकायदेशीरपणे इतरांच्या खात्यात वळवून हडप केल्याचे धक्कादायक वास्तव प्रकाशझोतात आल्याने प्रशासन हादरले आहे. या प्रकरणावर पत्रकार संदीप दामोदर महाजन यांनी आवाज उठवला असून, दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास ते १ सप्टेंबर २०२५ पासून पाचोरा प्रांताधिकारी कार्यालयासमोर अन्न-पाणी त्याग आमरण उपोषण सुरू करण्याच्या निर्धारावर ठाम आहेत. सन २०२३-२४ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पाचोरा तालुक्यातील तब्बल ५२,६८९ शेतकऱ्यांची शेती बाधित झाली होती. या नुकसानीसाठी शासनाने ७० कोटी १६ लाख ५३ हजार २४० रुपयांचे अनुदान मंजूर केले. मात्र हे अनुदान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवताना महसूल विभागातील काही कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याचे उघड झाले. चौकशीत असे समोर आले की तब्बल ३९ शेतकऱ्यांच्या सुमारे १४ लाख ५० हजार रुपयांची रक्कम परस्पर इतरांच्या खात्यात वळवण्यात आली होती. प्रशासनाने याबाबत संबंधित कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावल्या असून आतापर्यंत केवळ ४ लाख ६३ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे. मात्र, पत्रकार महाजन यांनी ठामपणे सांगितले आहे की, “हा प्रकार थेट गुन्हा असून त्याची चौकशी SIT किंवा आर्थिक गुन्हा शाखेकडून (EoW) व्हायलाच हवी.” घोटाळा उघड झाल्यानंतर काही संबंधितांनी ज्या शेतकऱ्यांच्या नावाने अनुदानाची रक्कम चुकीच्या खात्यात वर्ग झाली होती, त्या शेतकऱ्यांकडे जाऊन “आम्हाला ती रक्कम मिळाली आहे” अशा आशयाचे लेखी कागद घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या प्रकारावर महाजन यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. दरम्यान, जालना जिल्ह्यातील अनुदान घोटाळा हा राज्यातील सर्वात मोठा प्रकार मानला जात आहे. सन २०२२ ते २०२४ दरम्यान झालेल्या अनुदान वितरणात महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी कोट्यवधींचा अपहार केला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ९ ऑगस्ट २०२५ रोजी दौऱ्यादरम्यान तपासाचे आदेश दिल्यानंतर हा घोटाळा उघड झाला. महत्त्वाचे म्हणजे, या प्रकरणी जालना जिल्ह्यातील अंबड पोलिस ठाण्यात २२ तलाठी आणि ६ जणांवर गुन्हा दाखल करून सदरचा तपास थेट आर्थिक गुन्हा शाखेकडे (EoW) वर्ग करण्यात आला आहे. आरोपींवर गुन्हा नोंदवून तपास उच्च पातळीवर नेल्याने सत्य उघड होऊ लागले आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार संदीप महाजन यांनी स्पष्ट केले की, “जालना येथे तलाठी आणि इतरांवर गुन्हे दाखल होऊन तपास EoW कडे वर्ग करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर जर पाचोऱ्यातही गुन्हा दाखल होऊन तपास EoW कडे वर्ग झाला, तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल. अन्यथा केवळ नोटिसा व वसुली पुरेसे नाही.” आत्तापर्यंत १४ लाख ५० हजारांचा गैरव्यवहार समोर आला असला तरी, प्रत्यक्षात हा घोटाळा कोट्यवधी रुपयांचा असण्याची शक्यता आहे. प्रत्येक गावच्या चावडीवर शेतकऱ्यांची नावे व मिळालेली रक्कम जाहीर केली गेली, तर मोठा स्फोट होईल, असा इशारा पत्रकार महाजन यांनी दिला आहे. या घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाचोरा प्रांताधिकारी व तहसीलदार सोमवारी पत्रकार परिषद घेणार आहेत. माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी देखील मंत्रालयात जाऊन मंत्री गिरीशभाऊ महाजन व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ही व्यथा मांडण्याची तयारी दाखवली आहे. जालना आणि पाचोरा हे दोन्ही प्रकरणे शेतकऱ्यांच्या हक्कावर डल्ला टाकणारी आहेत. जालना येथील धर्तीवर पाचोऱ्यातही गुन्हा दाखल होऊन तपास EoW कडे गेला, तरच दोषींवर कारवाई होईल आणि शेतकऱ्यांचा विश्वास परत येईल. अन्यथा हा घोटाळा कोट्यवधींचा असून, तो राज्यभरातील शेतकऱ्यांच्या न्यायलढ्यातील एक निर्णायक टप्पा ठरू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here