![]()
पाचोरा – तालुक्यातील महसूल विभागात उघडकीस आलेल्या तब्बल सव्वा कोटी रुपयांच्या अनुदान घोटाळ्याला आता कायदेशीर व गुन्हेगारीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. शासनाच्या योजना आणि शेतकऱ्यांचा हक्काचा पैसा यामध्ये झालेल्या फसवणुकीमुळे शेतकरी वर्गामध्ये तीव्र संताप उसळला आहे. आंदोलक संदीप महाजन यांनी याविरोधात आमरण उपोषणासह आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाला तातडीने हालचाल करावी लागली, आणि अखेर हा गुन्हा जळगाव येथील आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला. सन 2022 ते 2024 या कालावधीत पाचोरा तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार घडून आला. तत्कालीन महसूल सहाय्यक अमोल सुरेश भोई यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गणेश हेमंत चव्हाण याच्यासोबत संगनमत करून शासनाच्या महसुलाचा अपहार केला. असे तहसील विभागाच्या प्राथमिक तपासात समोर आले की 2022-23 मध्ये 122 आणि 2024-25 मध्ये 225 अशा एकूण 347 व्यक्तींच्या नावाने खोटे अभिलेख तयार करून नैसर्गिक आपत्ती अनुदान वितरित करण्यात आले. जुन ते ऑक्टोबर 2022 मधील पंचनाम्यांचे अभिलेख खोट्या स्वरूपात तयार करून त्यावर बनावट शिक्के व सह्या करण्यात आल्या. इतकेच नव्हे तर तहसीलदार यांचे लॉगिन आयडी व पासवर्डचा अनधिकृत वापर करून शासकीय संगणकीय प्रणालीत प्रवेश केला गेला, ज्यामुळे गंभीर सुरक्षाभंग उघड झाला. या प्रकरणातील सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे एमपीएससी, यूपीएससी तसेच पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची वैयक्तिक कागदपत्रे या फसवणुकीत वापरण्यात आली. आधारकार्ड, पॅनकार्ड आणि बँक पासबुक यांच्या आधारे शेतकरी अनुदानाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. या कागदपत्रांचा वापर कसा झाला, ती आरोपींपर्यंत कशी पोहोचली आणि निधी पुढे कुठे वळविला गेला, हे अद्याप तपासाचा महत्त्वाचा मुद्दा आहे. प्राथमिक तपासानुसार आरोपी अमोल भोई यांनी संगनमताने शासनाचा ₹1,20,13,517/- इतका निधी अपहार केला आहे, ज्यामध्ये गणेश हेमंत चव्हाण याचा सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा तपास सुरुवातीला तहसील विभागाने केला. परंतु या तपासामध्ये पूर्ण पारदर्शकता राहिलेली नाही, अशी शंका शेतकरी आंदोलक श्री महाजन यांनी व्यक्त केली आहे. आरोपी मध्ये तहसील कार्यालयातील तहसीलदार, अधिकारी, सर्कल, तलाठी तसेच CSC सेंटरचे हस्तक यांना सोयीस्करपणे बाजूला सारले गेले असून फक्त दोन व्यक्तींवर दोषारोप ठेवण्यात आले. त्यामुळे हा तपास एकतर्फी व संशयास्पद ठरतो याच कारणामुळे 2019-20 पासूनच्या सर्व प्रकरणांची चौकशी व्हावी, तसेच शिक्षण घेत असलेल्या युवकांची दिशाभूल करून त्यांना फसविणाऱ्या रॅकेटचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी आजही संदीप महाजन यांची कायम आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 428/2025 नोंदविण्यात आला असला तरी सदरचा गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग झाल्यानंतर प्र. उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाने चौकशी सुरू केली आहे. दरम्यान दोन्ही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केले आहेत. गणेश हेमंत चव्हाण यांच्या अर्जावर 9 सप्टेंबर रोजी सुनावणी होऊन पुढील तारीख 12 सप्टेंबर निश्चित झाली आहे, तर अमोल सुरेश भोई यांच्या अर्जावर 11 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. या घोटाळ्यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर संदीप महाजन यांनी 1 सप्टेंबर रोजी प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. होते या मागण्यांची गंभीर दखल आमदार किशोरआप्पा पाटील यांनी तातडीने घेऊन प्रांताधिकारी भुषण अहिरे, तहसीलदार विजय बनसोडे व पोलीस निरीक्षक राहुलकुमार ।पवार यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. मागण्या मान्य झाल्याने महाजन यांनी उपोषण मागे घेतले. मात्र, ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी 11 सप्टेंबर रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला. महाजन यांच्या आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे प्रशासन व पोलिस यंत्रणा सावध झाली. अवघ्या 24 तासांत गुन्हा आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला. तरीदेखील आंदोलक संदीप महाजन यांना या संदर्भात अधिकृत पत्र दिले गेले नव्हते. अखेरीस 10 सप्टेंबर रोजी तहसीलदार विजय बनसोडे यांनी पत्राद्वारे महाजन यांना माहिती दिली व आत्मदहन टाळण्याचे आवाहन केले. यानंतर महाजन यांनी आपला निर्णय तात्पुरता स्थगित केला. महाजन यांनी स्पष्ट केले की, आर्थिक गुन्हा शाखेतर्फे पारदर्शक तपास होऊन दोषींविरुद्ध आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच शेतकरी व विद्यार्थ्यांना न्याय मिळणार आहे. त्यांनी शेतकऱ्यांना एकजुटीने पुढे येण्याचे आवाहन केले आहे. मे जिल्हा सत्र न्यायालय व मे औरंगाबाद उच्च न्यायालयात पिडीत शेतकऱ्यांच्या बाजूने विनामूल्य खाजगी वकिलांची फळी उभी राहणार असून, यासाठी शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची आर्थीक मदत न घेता फक्त प्रतिज्ञापत्रे व सह्या अत्याआवश्यक आहेत. या घोटाळ्यामुळे महसूल विभागावरचा विश्वास कमी झाला असून, सर्वसामान्य जनतेत संभ्रम व संताप आहे. शेतकरी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी संदीप महाजन यांनी दिलेला लढा आज शेतकऱ्यांच्या संघर्षाचे प्रतीक बनला आहे. या प्रकरणाचा तपास 2019-20 पासून सखोल होऊन संपूर्ण रॅकेट उघडकीस येणे, दोषींना कठोर शिक्षा मिळणे आणि शेतकऱ्यांचा पैसा परत मिळणे हीच जनतेची व शेतकऱ्यांची आजची मुख्य अपेक्षा असुन यासाठी माझा लढा व सातत्य पाठपुरावा सुरूच राहणार असल्याचे शेतकरी आंदोलक संदीप महाजन यांनी सांगितले
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






