![]()
पाचोरा – शहरातील हिंदू स्मशानभूमी ही धार्मिक, सामाजिक आणि मानवी संवेदनांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची जागा असून या ठिकाणाचे आधुनिकीकरण करून अंतिम संस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, हा विधायक आणि दूरदृष्टीपूर्ण हेतू कार्यसम्राट आमदार किशोर आप्पा पाटील यांनी ठेवला. त्यांच्या पुढाकाराने तब्बल चार कोटी रुपयांच्या जवळपास निधी उपलब्ध करून अत्याधुनिक, सर्वस्वयुक्त आणि आदर्श स्वरूपाची स्मशानभूमी उभारण्यात आली होती. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न सोडवून नागरिकांसाठी एक उत्कृष्ट सुविधा उपलब्ध करून देणे हे आमदार किशोर पाटील यांच्या कार्याचा सकारात्मक आणि कौतुकास्पद भाग मानला जातो. परंतु या सर्व सुविधांची नियमित देखभाल करण्याची जबाबदारी नगरपालिका प्रशासनावर असून स्वच्छता, विद्युत रोषणाई, पंखे, पाण्याचा पुरवठा, परिसरातील स्वच्छता, अंतर्गत मार्गांची दुरुस्ती अशा अत्यावश्यक बाबींबाबत अपेक्षित ती दक्षता घेतली जात नसल्याचे आज प्रकर्षाने लक्षात आले. आजच्या एका अंत्यविधीदरम्यान स्मशानभूमीत वीज नसणे, पंखे बंद असणे, स्वच्छतेचा अभाव, पाण्याची अनुपलब्धता, लोक अक्षरशः जार आणुन आपले काम भागवत आहे याचा प्रत्यक्ष अनुभव बघायला मिळाला यात तुटलेली बाके, उखडले पेवर ब्लॉक आणि कचऱ्याचे ढीग अशी दयनीय परिस्थिती नागरिकांना अनुभवास आली. अशा संवेदनशील क्षणी मृतात्म्यास अखेरचा निरोप देण्यासाठी आलेल्या कुटुंबीयांना व उपस्थित नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागणे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचे नागरिकांनी सांगितले. नागरिकांचे मत आहे की आमदार किशोर आप्पा पाटील यांनी भविष्यातील गरज ओळखून मोठ्या निधीतून स्मशानभूमीचे आधुनिकीकरण केले, परंतु त्या सुविधांची योग्य ती देखभाल न झाल्यास त्यांच्या प्रयत्नांचा मूळ हेतूच व्यर्थ ठरू शकतो. काम निर्माण करून देणारा नेता पुढे पाहतो, परंतु त्या कामाची जबाबदारी पार पाडणारे प्रशासन जर निष्क्रीय राहिले, तर विकासाचा उद्देश अपूर्ण राहतो, अशी भावना जनतेत निर्माण झाली आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून विद्युत दुरुस्ती, पाणीपुरवठा सुधारणा, परिसर सुशोभीकरण आणि एकूणच व्यवस्थापन दुरुस्त करून स्मशानभूमी पुन्हा कार्यक्षम करण्यासाठी ठोस पावले उचलावीत अशी नागरिकांकडून जोरदार मागणी होत आहे. आमदार किशोर पाटील यांनी उभारून दिलेल्या या आदर्श आणि महत्त्वपूर्ण सुविधेचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना अखेरच्या क्षणी तरी निर्विघ्न मिळाला पाहिजे, हीच आज सर्वांची अपेक्षा आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.




