![]()
पाचोरा – राज्यभर धावणाऱ्या स्लीपर कोच लक्झरी बसमधून प्रवास हा सुरक्षित, आरामदायी आणि नियमबद्ध असावा अशी प्रवाशांची अपेक्षा असते. मात्र अलीकडच्या काळात या अपेक्षांनाच तडा देणारा गंभीर आणि धोकादायक प्रकार सर्रास घडताना दिसत आहे. अनेक स्लीपर कोच लक्झरी बसच्या डिक्कीमध्ये थेट दुचाकी वाहने टाकून “लगेज”च्या नावाखाली वाहतूक केली जात आहे. हा प्रकार केवळ बेकायदेशीरच नाही, तर थेट प्रवाशांच्या जीवाशी खेळणारा आहे. याआधीच देशात व राज्यात स्लीपर कोच लक्झरी बसला आग लागण्याच्या एक नव्हे तर अनेक घटना घडलेल्या आहेत. काही ठिकाणी शॉर्टसर्किट, काही ठिकाणी इंजिनातील बिघाड, तर काही ठिकाणी ज्वलनशील साहित्यामुळे भीषण अपघात झाले आहेत. अशा पार्श्वभूमीवर आता जर डिक्कीमध्ये पेट्रोल असलेली दुचाकी वाहनेच ठेवली जात असतील, तर उद्या एखाद्या वाहनातून स्पार्किंग होऊन संपूर्ण लक्झरी बसने पेट घेतला, तर त्याची जबाबदारी नेमकी कोण घेणार, हा प्रश्न गंभीरपणे उपस्थित होत आहे. मोटार वाहन कायदा आणि केंद्रीय मोटार वाहन नियमांनुसार प्रवासी वाहनांमध्ये कोणत्या स्वरूपाचे सामान वाहता येईल याबाबत स्पष्ट तरतुदी आहेत. प्रवासी बस ही पॅसेंजर ट्रान्सपोर्ट व्हेईकल या वर्गात मोडते आणि अशा वाहनांमध्ये ज्वलनशील, धोकादायक किंवा जीवितास धोका निर्माण करणारे साहित्य वाहून नेण्यास स्पष्ट मनाई आहे. दुचाकी वाहनांमध्ये पेट्रोल, बॅटरी, वायरिंग यासारखे घटक असतात, जे कोणत्याही क्षणी आग लागण्यास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे अशी वाहतूक कायद्याच्या दृष्टीनेही गंभीर गुन्ह्याच्या श्रेणीत येते. विशेष म्हणजे अनेक लक्झरी बस या टप्पा वाहतूक करण्यासाठी अधिकृत परवानाधारक नसताना देखील सर्रासपणे प्रवाशांना मध्येच उतरवणे-चढवणे तसेच वाटेतूनच दुचाकी, जड सामान किंवा इतर माल भरून घेण्याचे प्रकार सुरू आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार परवान्यात नमूद केलेल्या अटींचे उल्लंघन केल्यास संबंधित वाहनाचा परवाना रद्द करणे, दंड आकारणे किंवा वाहन जप्त करण्याची तरतूद आहे, मात्र प्रत्यक्षात या नियमांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. या संपूर्ण प्रकारामागे काही मोजक्या पैशांचा लालच कारणीभूत असल्याचे उघड आहे. दुचाकी वाहतूक केल्यास मालकांना अतिरिक्त उत्पन्न मिळते आणि चालक-वाहकांनाही काही रक्कम हाताशी पडते, मात्र या काही हजार रुपयांच्या फायद्यासाठी शेकडो प्रवाशांचे जीव धोक्यात घालण्याचा अधिकार कुणी दिला, हा प्रश्न आहे. अपघात घडल्यास जबाबदारी टाळण्यासाठी आम्हाला माहिती नव्हती किंवा डिक्की चालकाच्या ताब्यात होती अशा सबबी दिल्या जातील, पण प्रत्यक्षात लक्झरी बसचे मालक, चालक आणि संबंधित वाहतूक यंत्रणा हे सर्वच या प्रकाराला जबाबदार ठरतात. कायदेशीरदृष्ट्या पाहता मोटार वाहन कायद्याच्या तसेच परवाना अटींचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईची तरतूद आहे आणि अपघात घडल्यास निष्काळजीपणामुळे जीवितास धोका निर्माण केल्याबाबत गुन्हेही दाखल होऊ शकतात. तरीदेखील तपासणी, धाडी आणि कारवाईचा अभाव असल्याने असे प्रकार बिनधास्त सुरू आहेत. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा विषय अत्यंत गंभीर असून स्लीपर कोचमध्ये प्रवासी झोपेत असतात, आग लागल्यास वेळेवर बाहेर पडण्याची संधीही कमी असते. अशा परिस्थितीत डिक्कीमध्ये ठेवलेली दुचाकी ही चालती बॉम्ब ठरू शकते. त्यामुळे प्रशासन, प्रादेशिक परिवहन अधिकारी, एस.टी. महामंडळ अधिकारी,वाहतूक पोलीस आणि अग्निशमन विभाग यांनी संयुक्तपणे कठोर तपासणी मोहीम राबवणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या लक्झरी बसवर दंडात्मक कारवाई, परवाना रद्द करणे आणि गुन्हे दाखल करणे ही ठोस पावले उचलली गेली, तरच अशा जीवघेण्या प्रकारांना आळा बसेल. आज प्रश्न एवढाच आहे की उद्या एखादी दुर्घटना घडल्यावर चौकशी समित्या, अहवाल आणि आश्वासनांपुरतेच हे प्रकरण मर्यादित राहणार की वेळेतच कठोर कारवाई करून प्रवाशांचे जीव वाचवले जाणार, कारण काही पैशांच्या लालचापोटी सुरू असलेल्या या धोकादायक वाहतुकीला आत्ताच रोखले नाही तर त्याची किंमत निरपराध प्रवाशांना आपल्या जीवाने चुकवावी लागू शकते.






ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






