गेली दहा वर्षे सत्तेच्या पायरीवर नसलेली व्यक्ती अजूनही मुख्य प्रवाहामधून बाजूला पडलेली नाही. पुर्णवेळ राजकारण करणारी मंडळी नावासमोर सत्ता आणि पद नसले तर जगूच शकत नाहीत अशा परीस्थीतीत या व्यक्तीने स्वतःच्या नावाला सत्ताकेंद्र बनवले आहे ‘शरद पवारसाहेब’. दिल्ली-मुंबई-बेळगाव-कोल्हापुर-सांगली-सातारा-पुणे हा सलग सहा दिवसांचा दौरा आहे. वयाचा उल्लेख आता न केलेलाच बरा. सकाळी सहाला हातामध्ये पेपर ते रात्री दहापर्यंत भरगच्च कार्यक्रम. पवारसाहेबांचे एक वैशिष्ट आहे, जवळपास दहा वर्षे झाले त्यांच्याकडे कोणतेही सत्तेतील पद नाही परंतू तरीही त्यांच्या दैनंदिनीतला फिरता रंगमंच आणि मानाची खुर्ची अजूनही शाबूत आहे. मागेपुढे पत्रकारांचा राबता आहे. रस्त्याच्या दुतर्फा चाहते आहेत आणि अगदी दहा ते दहा हजारांपर्यंत रोजचा थेट संपर्क आहे. विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, सरकार पक्षाचे नेते रात्रंदिवस प्रचाराचा अजेंडा घेऊन फिरू लागलेले असताना पवारसाहेब मात्र अजूनही पुर्णपणे ईलेक्शन मोडवर आलेले नाहीत. गेल्या आठवडाभरात पवारसाहेबांनी कोल्हापुरमधली समरजित घाटगेंचा पक्षप्रवेश आणि वादळी सभा सोडली तर एकही जाहीर राजकीय कार्यक्रम केलेला नाही. मग बेळगाव ते सातारा जवळपास चाळीस विधानसभा मतदारसंघांच्या भागात फिरताना पवारसाहेबांनी काय केले असावे?
बेळगावात स्व. अर्जूनराव घोरपडे यांचा जन्मशताब्दी कार्यक्रम.
कोल्हापुरमध्ये ‘महाराष्र्ट दिनमान’ वर्तमानपत्राचा प्रकाशन कार्यक्रम, डाॅ. ए. डी. शिंदे सभागृहाचे उदघाटन, छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट आॅफ बिझिनेस अॅन्ड एज्युकेशन रिसर्च ट्रस्ट यांच्या ‘आनंदभवन आॅडिटोरीयम’ या बहुउद्देशीय इमारतीचे लोकार्पण, जेष्ठ विचारवंत डाॅ. भारत पाटणकर यांचा अमृतमहोत्सवी सत्कार समारंभ हे जाहीर कार्यक्रम. मागील महिण्यात अचानकपणे आग लागून बेचिराख झालेल्या ऐतिहासीक केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट देऊन स्वतःच्या खासदार फंडामधून तातडीने १ कोटी रुपयांचा निधी नाट्यगृहाच्या पुनर्निर्मीतीसाठी वर्ग केला. कोल्हापुरच्या सामाजीक जडणघडणीत अमुल्य योगदान असलेल्या राजेघाटगे परीवाराची भेट आणि दुसरीकडे जेष्ठ इतिहास लेखक-विचारवंत डाॅ. जयसिंगराव पवार यांच्या घरी सदिच्छा भेट. सोबतच सलग दोन दिवस स्थानिक पत्रकारांसोबत वार्तालाप. दोन दिवसात हजारो लोकांबरोबर थेट भेटीगाठी आणि संवाद.
कोल्हापुर आटपून काल सकाळी स्व. यशवंतराव चव्हाणसाहेबांचे जन्मगाव देवराष्र्टे येथे स्मृतींना अभिवादन करुन सांगलीत स्व. पतंगराव कदम यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारलेल्या पुतळ्याचे अनावरण आणि “लोकतीर्थ स्मारकाचा” लोकार्पण सोहळा. दुपारनंतर सातारा जिल्हातील माण-खटाव भागामधील निढळ या खेडेगावी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीचे उदघाटन आणि ग्रामस्थांसोबत संवाद.
याला म्हणतात ८०% समाजकारण आणि २०% राजकारण. वरच्या प्रत्येक कार्यक्रमाचे आयोजक वेगवेगळे आहेत, जागा वेगळ्या आहेत, विषय वेगवेगळे आहेत, समोर बसणारे प्रेक्षक वेगळे आहेत, भाषणांचे विषय वेगळे आहेत फक्त माणूस एकच आहे ‘शरद पवार’. समाजातील प्रत्येक घटकाला आपल्या व्यासपीठावर ते मानाच्या स्थानी हवे असतात. त्यांचा व्यासंग, अभ्यास आणि उपस्थिती ही सामाजीक भूक भागवणारी असते. त्यांचा साचा लवचीक आहे. ते राजकारणी नक्कीच आहेत परंतू जनतेला राजाश्रय देण्याची त्यांच्याएवढी चांगली प्रवृत्ती कोणाजवळही नाही. शरद पवार या नावाची सामाजीक उंची खुप मोठी आहे. सांस्कृतीक चळवळीला त्यांचा मोठा आधार आहे. संकटकाळात शेवटचा पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते. या राज्याच्या आणि देशाच्या जडणघडणीत त्यांचे अमुल्य योगदान आहे. सत्तेच्या खुर्चीचा मोह त्यांनी कधीही दाखवला नाही म्हणून आजही दर दुसर्या मैलावर त्यांच्यासाठी मानाची खुर्ची तयार असते. जगणे एवढे व्यस्त असावे जगणे एवढे समृद्ध असावे..!( सोशल मीडियाव्दारे प्राप्त झाले योग्य व सत्य वाटले म्हणून ध्येय न्युजने प्रसारीत केले )
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.