“ऐनपूरच्या सरदार पटेल महाविद्यालयात कायद्याचे ज्ञान आणि शिस्तीचे महत्त्व” या विषयांवर मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न

0

Loading

ऐनपूर: येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालयात समान संधी केंद्र आणि विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने “भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा कायदा, भारतीय साक्ष अधिनियम” या विषयांवर मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कायद्याचे ज्ञान आणि त्याचा योग्य उपयोग याबाबत जनजागृतीसाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
     कार्यशाळेची सुरुवात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे.बी. अंजने होते. तर विशेष मार्गदर्शक म्हणून निंभोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) मा. हरिदास बोचरे आणि विशेष सहाय्यक सरकारी वकील मा. ॲड. विक्रम शेळके उपस्थित होते.
     एपीआय हरिदास बोचरे यांनी कायद्याच्या बदलत्या स्वरूपावर मार्गदर्शन केले. त्यांनी सायबर गुन्हेगारी, भ्रमणध्वनी विषयक कायदे, तसेच सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे याबाबत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. “तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसोबतच त्याचा गैरवापरही होत आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने सतर्क राहून कायद्याचे पालन करणे गरजेचे आहे,” असे त्यांनी नमूद केले.
        कार्यशाळेतील प्रमुख मार्गदर्शक ॲड. विक्रम शेळके यांनी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा कायदा, भारतीय साक्ष अधिनियम याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. त्यांनी लहान मुलांवरील अत्याचार प्रतिबंधक ‘पोक्सो’ कायदा, स्त्री सक्षमीकरणासाठीचे विविध कायदे, तसेच भारतीय समाजातील कायद्याचे महत्त्व उदाहरणांसह समजावून सांगितले.
     “कायद्याची भीती न बाळगता त्याचे योग्य ज्ञान आणि पालन करणे ही काळाची गरज आहे. शिस्तीने वागणे हे समाजाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आहे,” असे ॲड. शेळके यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. जे.बी. अंजने यांनी “कायद्याचे पालन हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कायद्याच्या अंमलबजावणीमुळे समाजात शिस्त आणि सुरक्षितता टिकून राहते. महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थी कायद्याचे ज्ञान स्वतः घेतल्यावरच समाजात ते पसरवू शकतो,” असे सांगत कळकळीचे आवाहन केले.
      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समान संधी केंद्राचे समन्वयक प्रा. एस. पी. उमरीवाड यांनी केले. आभारप्रदर्शन विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. हेमंत बाविस्कर यांनी व्यक्त केले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस.एन. वैष्णव, डॉ. जे.पी. नेहेते, डॉ. व्ही.एन. रामटेके, प्रा. अक्षय महाजन, डॉ. एस.ए. पाटील, प्रा. प्रदीप तायडे, प्रा. केतन बारी, डॉ. पी.आर. गवळी आणि श्रेयस महाजन यांनी विशेष मेहनत घेतली.
     कार्यक्रमाला ऐनपूर गावाचे सरपंच अमोल महाजन, तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष काशीनाथ पाटील यांनी हजेरी लावून विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
      कार्यशाळेला एकूण ९७ विद्यार्थी उपस्थित होते. या विद्यार्थ्यांनी मार्गदर्शकांच्या भाषणातून कायद्याची माहिती मिळवून समाजात जागरूकता पसरवण्याचा निर्धार केला.
      कार्यशाळेच्या माध्यमातून कायद्याचे ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम अतिशय यशस्वी ठरला. “कायद्याची भीती न बाळगता त्याचे पालन करणे, समाजात शिस्तीचे वर्तन आणि सुरक्षिततेचा प्रसार करणे,” हा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here