वैभव महाजन यांनी शब्दांनी ठोकलं पाकिस्तानला : ‘ऑपरेशन सिंदूर’ कवितेला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

Loading

जळगाव – २२ जून २०२५ रोजी ‘काव्यकलश’ या नाशिक येथील प्रतिष्ठित साहित्य मंचाच्या आयोजनात IMR कॉलेज, जळगाव येथे पार पडलेल्या कवी संमेलन व सन्मान सोहळ्यात देशभक्तिपर आशय असलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या प्रभावी कवितेने उपस्थित श्रोत्यांच्या मनात राष्ट्रभक्तीची तीव्र जाणीव निर्माण केली. ही कविता सादर करणारे उत्राण (ता. एरंडोल) येथील युवा कवी वैभव प्रभाकर महाजन यांनी आपल्या तीव्र भावनांनी व सशक्त शब्दशक्तीने संपूर्ण सभागृह भारावून टाकले. त्यांच्या या कवितेला स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून, या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
‘काव्यकलश’ साहित्य मंचाने आयोजित केलेले हे कवी संमेलन अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरले. एकीकडे विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि वैयक्तिक आशयाच्या कविता मंचावर सादर होत होत्या, तर दुसरीकडे वैभव महाजन यांच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या कवितेने श्रोत्यांच्या हृदयात देशप्रेमाचे स्फुलिंग चेतवले. त्यांच्या कवितेतील एका ओळीत “जय हिंद कोई नारा नहीं – वो रणघोष है,
जिसकी गूंज से दुश्मन की फौजे कांपती हैं”
अशा शब्दप्रभावाने संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारून गेले. उपस्थित रसिकांच्या उत्स्फूर्त टाळ्यांनी सभागृह दुमदुमून गेले.
वैभव महाजन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की ही कविता त्यांनी भारतीय सैन्याच्या वीर जवानांना समर्पित केली आहे. सीमेवर सतत सजग राहून भारतमातेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीरांच्या साहसाची आणि त्यागाची ही कविता असताना, ती सादर करताना महाजन स्वतःही भावनाविवश झाले होते. त्यांनी सांगितले की
“हे शब्द माझे नाहीत, हे शब्द माझ्या मातृभूमीसाठी झटणाऱ्या जवानांचे आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही कविता म्हणजे त्यांच्या शौर्याचे कवच आहे.”
त्यांच्या आवाजातला जोश, शब्दातील वजन आणि देशभक्तीची अस्खलित भावना यांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी जेष्ठ साहित्यिका सौ. इंदिरा जाधव उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी सेवानीवृत्त प्रशासकीय अधिकारी यशवंत हिराबाई पगारे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मा. मदनराव कुलकर्णी यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. स्वागताध्यक्ष कवी व लेखक मा. सुधीर महाजन यांनीही आपल्या विचारांनी कार्यक्रमाला भारदस्त दिशा दिली.
कवी संमेलनाचे प्रमुख आयोजक युवा व्याख्याते श्री सुशीलकुमार शिंदे यांनी सर्व कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करत संपूर्ण संमेलन सुरळीत पार पाडले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले, “देशभक्तीची भावना नव्या पिढीत रुजवणारे कवी म्हणजे आपले खरे संस्कृतिक रक्षक आहेत.”
‘ऑपरेशन सिंदूर’ या कवितेच्या शीर्षकातच देशभक्ती आणि मातृभूमीच्या रक्षणाची जाणीव साकारलेली आहे. यामध्ये भारताच्या सैनिकी सर्जिकल स्ट्राईकचे प्रतीकात्मक वर्णन, जवानांचे पराक्रम, शत्रू राष्ट्रावरील कठोर प्रतिउत्तर, आणि देशवासीयांचे अभिमानाचे भाव हे सर्व परत परत उमटतात. काही निवडक ओळी ज्या श्रोत्यांना मनात खोलवर भिडल्या “ना हम झुकेंगे, ना पीछे हटेंगे,
आँख में आँख डाल, दुश्मन को कुचल देंगे…”
अशा ओळींसह उपस्थितांमध्ये थरार निर्माण झाला होता. या ओळी केवळ शब्द नव्हत्या, तर त्या भारताच्या अभिमानाचे स्फुलिंग होत्या.
वैभव महाजन हे केवळ एक कवी नाहीत, तर एक जागृत नागरिक म्हणून आपल्या कवितांद्वारे सामाजिक प्रश्न, युवकांचे भान, राष्ट्रप्रेम, आणि ग्रामीण जीवनाचे वास्तव समोर ठेवत असतात. त्यांच्या लिखाणात सामाजिक जाणीवेची प्रगल्भता आणि राष्ट्रभक्तीचा पिंड स्पष्टपणे जाणवतो.
‘ऑपरेशन सिंदूर’ याआधीही विविध साहित्य कट्ट्यांवर चर्चेत होती, मात्र जळगावच्या या संमेलनाने तिच्या परिणामकारकतेला व्यापक व्यासपीठ दिले. वैभव महाजन यांचा मंचावरील सादरीकरणाचा आत्मविश्वास, शुद्ध उच्चार, आणि ओजस्वी शैली यामुळे

श्रोते भारावून गेले.
‘ऑपरेशन सिंदूर’ या कवितेस दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देत आयोजकांनी वैभव महाजन यांचा गौरव सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन केला. हा क्षण उत्राण गावासाठी, एरंडोल तालुक्यासाठी, आणि संपूर्ण खान्देश साहित्य क्षेत्रासाठी तसेच गुर्जर समाज बांधवासाठी अभिमानास्पद होता.
वैभव महाजन यांचा हा गौरव होताच त्यांचे एरंडोल-पाचोरा परिसरातील साहित्यिक, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये, आणि विविध राजकीय-सामाजिक क्षेत्रांतील व्यक्तींनी अभिनंदनाचा वर्षाव केला. सोशल मिडियावरही ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल कौतुकाचे वादळ उसळले आहे
“शब्दांनी शत्रूवर घाव घालणारा कवी म्हणजे वैभव महाजन. त्यांच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कवितेने भारतमातेच्या भूमीवरचा अभिमान जागवला,” असे मत अनेकांनी व्यक्त केले.
सध्या देशात अनेक दिशाहीन मनोरंजनप्रवृत्तींचा जोर असताना, अशा कवितांचा आणि साहित्यिकांचा उदय हा समाजासाठी सकारात्मक ऊर्जा देणारा आहे. कवी संमेलनात ‘ऑपरेशन सिंदूर’ सादर होणं हे केवळ एक स्पर्धा नव्हे, तर ती देशभक्तीची साहित्यिक चळवळ होती, असं मत आयोजक मंडळाने नोंदवलं.
‘ऑपरेशन सिंदूर’ ही केवळ एक कविता नाही, तर ती आधुनिक भारतातील तरुणाची राष्ट्रासाठीची ओळख आहे. शब्दांमधून सर्जिकल स्ट्राईकचा आवाज उमटवणाऱ्या वैभव महाजन यांचं यश हे साहित्यक्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरत आहे.
आज देशात अनेक युवा कवी आहेत, पण देशासाठी झिजणाऱ्या, लढणाऱ्या जवानांना शब्दरूपात मानवंदना देणारे फार थोडे आहेत — आणि त्या थोडक्यांपैकी एक नाव आज उमटतंय — वैभव प्रभाकर महाजन.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here