![]()
पाचोरा – शहरातील हनुमानवाडी, गो.से. हायस्कूल, शिंदे हायस्कूल आणि पुनगाव रोड या मार्गावर गेल्या महिनाभरापासून रात्रीच्या वेळी वाळू वाहतूक करणाऱ्या ओव्हरलोड डंपर वाहनांचे अक्षरशः थैमान सुरू आहे. रात्री 9.30 पासून पहाटे 6 वाजेपर्यंत या मार्गावर डंपरची अखंड परेड सुरू असते. वेग, आवाज आणि धुळीचे साम्राज्य एवढे वाढले आहे की नागरिकांच्या घरांची खिडकी थरथरते, भिंतींवर कंपन जाणवतात, आणि झोप तर दूर, शांततेचा क्षणही मिळत नाही. काही रहिवाशांनी सांगितले, “दररोज रात्री डंपरचा असा गडगडाट होतो की, जणू आपल्या घराखाली रेल्वे जातेय. सकाळपर्यंत डोळ्यांना झोपच लागत नाही.” या डंपरचे ओव्हरलोड वजन पाहून कोणाच्याही अंगावर काटा येईल. एका ट्रकवर पंधरा ते वीस टनांपेक्षा जास्त वाळू भरली जाते, आणि त्यातून लाखोंचा बेकायदेशीर नफा मिळतो. दिवसाढवळ्या तपासणी टाळण्यासाठी संपूर्ण व्यवहार रात्रीच्या अंधारात केला जातो. त्यामुळे सकाळी या मार्गांवर वाळू सांडून पडलेली असते. रस्त्यावरून चालताना असे वाटते जणू काही रस्त्यावर वाळूचीच पेरणी करण्यात आली आहे. ही वाळू दुचाकी आणि सायकलस्वारांसाठी सापळा ठरते. छोट्या अडथळ्यावरसुद्धा वाहनांचा तोल जातो आणि अपघात होतात. विशेष म्हणजे या मार्गावरून दररोज गो.से. हायस्कूल, शिंदे हायस्कूल आणि पुनगाव परिसरातील शेकडो विद्यार्थी शाळा व कॉलेजकडे जातात. त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. एका विद्यार्थ्याने सांगितले, “सकाळी रस्ता ओलांडताना भीती वाटते. वाळू सांडलेली असल्याने दुचाकी घसरते, आणि मागून येणाऱ्या डंपरचा वेग पाहून जीव भांड्यात येतो.” तरीही, कोणत्याही अधिकाऱ्याने या मार्गावर प्रत्यक्ष पाहणी केली नाही, ही बाब सर्वात धक्कादायक आहे. रात्रीच्या वेळी शहराच्या शांततेत होणारा या डंपरचा गडगडाट नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतोय. प्रचंड धूळ उडाल्यामुळे दमा, डोळ्यांची जळजळ आणि श्वसनाचे त्रास वाढले आहेत. वृद्ध आणि लहान मुले सर्वाधिक त्रस्त झाली आहेत. नागरिक सांगतात, “रात्री झोप लागत नाही. मुलांना अभ्यास करता येत नाही. खिडक्या बंद करून बसलं तरी धुळीचा त्रास कमी होत नाही. सकाळी उठल्यावर अंगावर वाळूचे कण दिसतात. हा भाग जणू खाणीच्या काठावर असल्यासारखा वाटतो.” रहिवाशांनी तहसील कार्यालय आणि पोलीस ठाण्याला अनेक वेळा लेखी तक्रारी दिल्या, पण परिणाम शून्य. प्रशासनाने एकदाही ठोस कारवाई केली नाही. नागरिकांचा संशय आहे की, प्रशासन आणि ठेकेदारांमध्ये काहीतरी “देऊन-घेऊन” करार झालेला दिसतो. म्हणूनच, लोक तिखट भाषेत म्हणतात, “जर हे सगळं देऊन-घेऊन चालत असेल, तर दिवसा सगळं बिनधास्त चालू द्या; पण निदान रात्रीच्यावेळी आमच्या निद्राभंगाचा सौदा तरी करू नका. आम्हाला शांत झोप हवी, बाकी देवाणघेवाणचं राजकारण तुम्ही सांभाळा.” या प्रकरणातील सर्वाधिक खेदजनक बाब म्हणजे काही नागरिकांनी या वाहतुकीचे स्पष्ट CCTV फुटेज व व्हिडिओ पुरावे जमा केले आहेत. रात्रीच्या वेळी एकामागोमाग एक डंपर कसे शहराच्या मार्गावरून जातात, वाळू सांडतात, आणि पुन्हा रिकामे परत येतात हे सर्व फुटेजमध्ये दिसते.काही नागरिकांनी सांगितले की, “ध्येय अकॅडमी”च्या दालनात या सर्व वाहतुकीचे CCTV रेकॉर्ड जतन करून ठेवलेले आहेत. पण प्रशासनाला दाखवून काही उपयोग नाही, कारण अधिकारी आणि ठेकेदारांचे नाते सर्वश्रुत आहे. जे अधिकारी कारवाईसाठी पुढे येतात, त्यांची बदली होते, आणि बाकीचे शांत बसतात. दुसरीकडे, नागरिकांमध्ये अशीही चर्चा आहे की काही लेखणीचे शिलेदार, म्हणजेच पत्रकारितेशी संबंधित काही मंडळी, ठेकेदारांकडून मिळणाऱ्या सन्मानपत्र, जाहिराती आणि पुरस्कार विक्री सोहळा करीता देणग्यांच्या बदल्यात ही माहिती गप्प ठेवतात. त्यामुळे नागरिक म्हणतात, “आम्ही पुरावे देऊ तरी कोणत्या माध्यमाला विश्वास ठेवायचा? बातमी छापली जाईल की पुरस्कारासाठी गप्प राहतील?” या संशयामुळे नागरिकांकडून प्रशासनाला थेट पुरावे देण्याची हिंमतही होत नाही. शहरातील परिस्थिती अशी झाली आहे की, सामान्य नागरिकांना प्रशासन, पत्रकारिता आणि ठेकेदार या तिघांवरही विश्वास राहिलेला नाही. दिवसेंदिवस वाढणारी वाळू वाहतूक, रात्रीचा गोंधळ, आणि प्रशासनाचे मौन — या तिहेरी आघाडीमुळे पाचोऱ्याची शांतता अक्षरशः उडाली आहे. एकेकाळी शैक्षणिक आणि न्यायिक केंद्र म्हणून ओळखले जाणारे हे शहर आता डंपरच्या आवाजाने दणाणले आहे. रात्री नागरिकांच्या घरात दिवे बंद असले तरी रस्त्यावर इंजिनांचा गर्जना आणि धुळीच्या ढगांमुळे हा भाग धुरकट झाल्यासारखा दिसतो. प्रशासनाच्या दृष्टीने हा प्रश्न केवळ वाहतुकीचा नाही, तर जनतेच्या मानसिक आरोग्याचा, सामाजिक सुरक्षिततेचा आणि प्रशासनावरील विश्वासाचा आहे. एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले, “पूर्वी रात्री या रस्त्यांवर चालताना वाऱ्याचा गारवा मिळायचा, आता त्या जागी वाळूचे वादळ आणि डंपरचा गडगडाट मिळतो. प्रशासन फक्त कागदावर सक्रिय आहे, प्रत्यक्षात काहीच नाही. लोक त्रस्त झालेत, पण ऐकणारा कोणी नाही.” या सर्व प्रकारांमुळे नागरिकांच्या मनात प्रशासनाविषयी तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. लोक म्हणतात की, महसूल व पोलीस यंत्रणांनी जर लवकरच ठोस कारवाई केली नाही, तर आम्हीच रस्त्यावर उतरून या वाहतुकीला अडवू. या परिस्थितीत शहरातील तरुण आणि समाजसेवकही सज्ज आहेत. आता ही लढाई फक्त वाळूविरुद्ध नाही, तर अन्याय आणि निष्क्रिय यंत्रणेच्या विरोधात आहे. पाचोऱ्याच्या नागरिकांची सहनशीलता संपत चालली आहे. एका बाजूला ठेकेदारांचा नफा आणि प्रशासनाचे मौन, आणि दुसऱ्या बाजूला जनतेचा त्रास — या असमतोल व्यवस्थेचा अंत होणे आवश्यक आहे. जर प्रशासनाने तत्काळ कारवाई केली नाही, तर पुढील काळात पाचोऱ्यातील नागरिकांच्या आक्रोशाचा आवाज नक्कीच राज्यभर ऐकू येईल.
क्रमशः – पुढील भागात : गिरणा नदीत पाणी असूनही अनधिकृत सर्रास बोटींचा वापर करून होत असलेला वाळू उपसा, प्रशासनाचे मौन आणि माफियांचा खेळ
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





