विद्यार्थ्याच्या अपघातानंतर तत्काळ कृती; रात्रीच खड्डे बुजवून जय बारावकर यांचा आदर्श पुढाकार

0

Loading

पाचोरा – शहरातील श्री गो से हायस्कूलच्या कॉर्नर परिसरात गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरील खड्डे व वर आलेल्या सळईंमुळे नागरिकांचे, विशेषतः विद्यार्थ्यांचे, जीव धोक्यात आले होते. या ठिकाणी वारंवार अपघात होत असून वाहनांची चाके सळईंमध्ये अडकणे, सायकलस्वार घसरून पडणे, दुचाकीस्वार जखमी होणे अशी परिस्थिती नित्याची बनली होती. पावसाळ्यानंतरही या रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने समस्या अधिकच गंभीर झाली होती. काल शाळा सुटण्याच्या वेळी या धोकादायक रस्त्यावरून जात असताना एका विद्यार्थ्याच्या सायकलचे चाक वर आलेल्या सळईमध्ये अडकले आणि त्याचा अपघात झाला. सुदैवाने मोठी जीवितहानी टळली, मात्र ही घटना रस्त्याच्या विद्यमान स्थितीचे विदारक वास्तव समोर आणणारी ठरली. त्याच सुमारास डीवायएसपी ऑफिसकडून मार्गक्रमण करत असताना पाचोरा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष किशोर बारवकर यांचे सुपुत्र जय बारावकर त्या ठिकाणी आले. त्यांनी अपघाताची संपूर्ण वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहिली आणि स्थानिक नागरिकांशी संवाद साधून रस्त्यावरील धोका लक्षात घेतला. विशेष म्हणजे नगरपालिका सकाळी उघडेल, तक्रार करू आणि मग काम होईल असा क्षणाचाही विचार न करता जय बारावकर यांनी तात्काळ निर्णय घेत रात्री सुमारे अकराच्या सुमारास स्वतःच्या मालकीचे खड्डे बुजवण्याचे साहित्य त्या ठिकाणी आणले, मजूर मागवले आणि धोकादायक खड्डे तसेच वर आलेल्या सळईंच्या परिसरात त्वरित दुरुस्तीचे काम करून घेतले. अंधारातही सुरक्षिततेची काळजी घेत, वाहतूक विस्कळीत होऊ न देता, आवश्यक ठिकाणी खड्डे बुजवून मार्ग सुकर करण्यात आला. या तत्परतेमुळे रात्रीच रस्त्यावरील तातडीचा धोका दूर झाला आणि विद्यार्थ्यांसह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. सामाजिक जाणीव व जबाबदारीची भावना दाखवत केलेल्या या उपक्रमाबद्दल जय बारावकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. नागरिक, पालक आणि वाहनचालकांनी त्यांच्या तत्काळ कृतीचे कौतुक केले असून अपघातानंतर नव्हे तर अपघात टाळण्यासाठी केलेली कृती महत्त्वाची असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ही दुरुस्ती तात्पुरती असली तरी भुयारी मार्ग ते गो से हायस्कूल या संपूर्ण पट्ट्यावर रस्त्याचे कायमस्वरूपी नूतनीकरण किंवा किमान शास्त्रशुद्ध दुरुस्ती तातडीने व्हावी अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त केली जात आहे. शाळा परिसर असल्याने येथे सकाळ-संध्याकाळ विद्यार्थ्यांची मोठी वर्दळ असते, त्यामुळे रस्ता सपाटीकरण, योग्य डांबरीकरण, सळई पूर्णपणे काढून सुरक्षित बांधकाम तसेच आवश्यक ठिकाणी इशारा फलक व गतीमर्यादा राबवाव्यात अशी मागणी होत आहे. या घटनेमुळे पाचोरा नगरपालिका प्रशासनानेही रस्त्यांच्या देखभालीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली असून नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असताना तक्रारींची प्रतीक्षा न करता नियमित पाहणी, वेळेवर दुरुस्ती आणि शाळा परिसरात विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. एकीकडे जय बारावकर यांचा हा आदर्श पुढाकार नागरिकांसाठी दिलासा देणारा ठरला असला तरी दुसरीकडे नगरपालिकेनेही याची दखल घेऊन संपूर्ण रस्त्याचे नूतनीकरण त्वरित हाती घ्यावे अशी ठाम अपेक्षा पाचोरा शहरातून पुढे येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here