![]()
पाचोरा – शहराच्या शैक्षणिक आणि सामाजिक इतिहासात आपले योगदान ठळकपणे नोंदवून ठेवणारे दिनेश वसंतराव पाटील (डी. व्ही. पाटील सर) Mo. 9420109477 हे श्री गो. से. हायस्कूलच्या किमान कौशल्य विभागातून तब्बल ३४ वर्षे ३ महिने अखंड, निष्ठावंत आणि प्रामाणिक सेवा बजावून दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. तीन दशकांहून अधिक काळ त्यांनी विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत, शाळेच्या सर्वांगीण प्रगतीत आणि तांत्रिक शिक्षणाच्या बळकटीकरणात दिलेले योगदान केवळ एका शिक्षकापुरते मर्यादित न राहता आदर्श मार्गदर्शक, शिस्तप्रिय कार्यकर्ता आणि समाजाशी नाते जपणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवणारे आहे. त्यामुळे त्यांची सेवानिवृत्ती ही केवळ वैयक्तिक टप्प्याची समाप्ती नसून संस्थेच्या इतिहासातील एक भावनिक आणि गौरवशाली पर्व ठरत आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी ठीक १० वाजता श्री गो से हायस्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभाला संस्थेचे अध्यक्ष तथा मा.आ. दिलीपभाऊ वाघ, संस्थेचे चेअरमन संजयनाना वाघ, सेक्रेटरी ॲड महेशदादा देशमुख, व्हॉइस चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी, शालेय चेअरमन खलिलदादा देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेवअण्णा महाजन आणि मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ संपन्न होणार आहे. संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या, शिक्षकवर्गाच्या आणि कर्मचाऱ्यांच्या साक्षीने होणारा हा सोहळा डी. व्ही. पाटील सरांच्या प्रदीर्घ सेवेला कृतज्ञतेने नमन करणारा ठरणार आहे. डी. व्ही. पाटील सरांचे बालपण पाचोरा येथील रंगारी गल्लीमध्ये गेले असून त्या परिसरातील साधेपणा, कष्टाची सवय आणि सामाजिक बांधिलकीची भावना याच वातावरणात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी झाली. पुढे त्यांचे वास्तव्य गांधी चौक येथे झाले. प्राथमिक शिक्षण त्यांनी सु. भा. पाटील विद्यामंदिर येथे घेतले, तर दहावीपर्यंतचे शिक्षण श्री गो. हायस्कूलमध्ये पूर्ण केले. विद्यार्थी जीवनातच त्यांनी शिस्त, अभ्यासू वृत्ती आणि तांत्रिक विषयांची विशेष ओढ जोपासली. पुढे स्थापत्य विषयात पदविका पूर्ण करून त्यांनी व्यावसायिक शिक्षणाची ठोस पायरी गाठली. शिक्षणानंतर दोन वर्षे त्यांनी बाहेरील कंत्राटी कामे तसेच प्लॅनिंगची कामे करत प्रत्यक्ष बांधकाम क्षेत्रातील अनुभव मिळवला आणि नियोजन, गुणवत्ता व जबाबदारी यांचे महत्त्व प्रत्यक्ष कामातून आत्मसात केले. २० नोव्हेंबर १९९१ रोजी त्यांनी श्री गो. से. हायस्कूलमध्ये किमान कौशल्य विभागात बिल्डिंग मेंटेनन्स या अभ्यासक्रमासाठी पूर्ण वेळ निदेशक म्हणून रुजू होऊन आपल्या सेवेला सुरुवात केली. त्या काळात किमान कौशल्य विभाग हा विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख आणि कौशल्याधारित शिक्षण देणारा अत्यंत महत्त्वाचा विभाग होता. पाटील सरांनी केवळ अभ्यासक्रम शिकवण्यापुरते स्वतःला मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या मनात कामाची शिस्त, आत्मविश्वास, स्वावलंबन आणि व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण करण्यावर भर दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी तांत्रिक कौशल्य आत्मसात करून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या आणि समाजात सन्मानाने आपले स्थान मिळवले. शाळेतील विविध बांधकाम, देखभाल आणि तांत्रिक कामांमध्येही त्यांनी आपले ज्ञान वापरून संस्थेला योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्या सेवाकाळात त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकापुरते ज्ञान न देता प्रत्यक्ष कामातून शिकण्याची संधी दिली आणि बिल्डिंग मेंटेनन्स या विषयातून बांधकामाची मूलतत्त्वे, देखभाल व्यवस्थापन, सुरक्षिततेचे नियम, नियोजनाची शिस्त आणि गुणवत्तेचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या मनात ठसवले. शिस्तप्रिय पण माणुसकीची ऊब जपणारे शिक्षक अशी त्यांची ओळख असून विद्यार्थ्यांच्या अडचणी असोत वा सहकाऱ्यांचे प्रश्न, ते नेहमी शांतपणे ऐकून योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करत. डी. व्ही. पाटील सरांचे एक विशेष आणि महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे वास्तुशास्त्राविषयी त्यांचा सखोल, अभ्यासपूर्ण आणि अनुभवसंपन्न अभ्यास होय. दीर्घकाळाच्या अभ्यासातून, निरीक्षणातून आणि प्रत्यक्ष कामातून त्यांनी या विषयात प्राविण्य मिळवले असून त्यामुळे त्यांना केवळ पाचोरा तालुका किंवा जळगाव जिल्ह्यातूनच नव्हे तर संपूर्ण भारतातील विविध भागांतून वास्तुशास्त्र मार्गदर्शनासाठी सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात येते. निवासी घरे, धार्मिक स्थळे, सामाजिक केंद्रे तसेच संस्थात्मक इमारती याबाबत त्यांचे मार्गदर्शन अनेकांना दिशादर्शक ठरले आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्या वडिलांच्या कार्याचा खोल प्रभाव असून त्यांचे वडील व्ही. डी. पाटील साहेब यांनी पाचोरा नगरपालिकेत सब ओव्हरसीअर म्हणून काम करताना पाचोरा पाणीपुरवठा योजना, के. टी. वेअर प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांसारखी अनेक महत्त्वाची विकासकामे यशस्वीरीत्या पूर्ण केली. सार्वजनिक कामांमधील प्रामाणिकपणा, गुणवत्तेची जाणीव आणि जबाबदारीची भावना हीच मूल्ये डी. व्ही. पाटील सरांनी आपल्या सेवेतही कायम जपली. डी. व्ही. पाटील सरांच्या या यशस्वी आणि स्थिर जीवनप्रवासामागे त्यांच्या सौभाग्यवती सौ. भावना यांचा मोलाचा, न बोलता दिसणारा पण सदैव जाणवणारा सहभाग आहे. देविदास चिंधु राजहंस यांची कन्या असलेल्या सौ. भावना यांच्याशी ४ मार्च १९९४ रोजी डी. व्ही. पाटील सरांचा विवाह झाला आणि त्या दिवसापासून सौ. भावना यांनी पाटील सरांच्या प्रत्येक सुख-दुःखात, चढ-उतारांत आणि जबाबदाऱ्यांच्या वाटचालीत पावलावर पाऊल ठेवत अर्धांगिनी म्हणून खंबीर साथ दिली. कुटुंब, सेवा, समाज आणि अध्यात्म या सर्व स्तरांवर पाटील सरांची वाटचाल सुकर करण्यामध्ये सौ. भावना यांचे योगदान अतिशय मोलाचे आणि आधारस्तंभ ठरणारे आहे. विशेष बाब म्हणजे डी. व्ही. पाटील सर ज्या संस्थेत शिक्षण घेतले, त्याच संस्थेत त्यांनी आयुष्याची सेवा बजावली, ही एक दुर्मीळ आणि अभिमानास्पद बाब असताना त्यांच्या मातोश्री सुलभाआई यांचे वडील चिंधू सुपडू दलाल म्हणजेच सर्वांचे परिचित दलाल गुरुजी हे सुपडू भादु पाटील विद्यामंदिर या शाळेचे संस्थापक मुख्याध्यापक होते, अशी शैक्षणिक परंपरा लाभलेले हे कुटुंब असल्याने ज्ञान, संस्कार आणि शिक्षण यांचे बीज पिढ्यानपिढ्या रुजलेले दिसून येते. शासकीय सेवेसोबतच त्यांनी सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले असून श्री स्वामी समर्थ पाचोरा केंद्राचे काम महाराजांच्या आशीर्वादाने योग्य नियोजनासह त्यांनी मार्गदर्शन करून पूर्णत्वास नेले, तसेच पिंपळगाव हरेश्वर येथील केंद्र आणि शिंदाड व नगरदेवळा केंद्राची कामेही त्यांच्या देखरेखीखाली वास्तुशास्त्राच्या नियमानुसार यशस्वीरीत्या पार पडली असून इतर काही केंद्रांची कामेही आजही त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहेत. कौटुंबिक जीवनातही त्यांनी आदर्श निर्माण केला असून मोठा मुलगा कौस्तुभ हा B.E. Civil, M.E. (Structure) शिक्षण पूर्ण करून ‘अवध इंजिनिअर्स अँड डेव्हलपर’ ही स्वतंत्र फर्म यशस्वीपणे चालवत आहे तर दुसरा मुलगा वेंकटेश हा B.Tech. Agri. Engineer आणि MBA असून कृषी व व्यवस्थापन क्षेत्रात कार्यरत आहे. ३४ वर्षे ३ महिने इतक्या प्रदीर्घ सेवाकाळात डी. व्ही. पाटील सरांनी संस्थेच्या उभारणीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आपले सर्वस्व दिले असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे कार्यरत आहेत, हीच त्यांच्या आयुष्यभराच्या सेवेला मिळालेली खरी पावती आहे. सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे आयुष्य समाजाभिमुख आणि सक्रिय राहणार असून वास्तुशास्त्राविषयी मार्गदर्शन, आधुनिक पद्धतीने शेती, समाजकार्य आणि अध्यात्माकडे अधिक वळणे असे त्यांचे पुढील मानस आहेत. सेवानिवृत्ती म्हणजे कार्य थांबणे नसून नव्या वाटचालीची सुरुवात आहे, हे त्यांच्या जीवनप्रवासातून स्पष्ट होत असून त्यांच्या प्रदीर्घ, निष्ठावंत आणि प्रेरणादायी सेवेला मानाचा मुजरा करताना झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूजचे संपादक संदीप महाजन व त्यांच्या परिवाराच्या वतीने डी. व्ही. पाटील सरांचे पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, समाधान आणि आनंदाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.







