रंगार गल्लीतील कट्ट्यावरून विधानसभेच्या केंद्रबिंदूपर्यंतचा विश्वासाचा प्रवास : स्वीय सहाय्य राजेंद्र पाटील (राजूभाऊ) यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

0

Loading

पाचोरा – तात्कालीन आमदार स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्यावर उद्योगाचा कामाचा व्याप प्रचंड वाढत चालल्याने त्यांना आमदार या नात्याने ग्राउंड लेव्हलवरील सर्वसामान्य लोकांशी सातत्याने संपर्क ठेवणे व त्यांच्या दैनंदिन कामांकडे वैयक्तिक लक्ष देणे प्रत्यक्षात कठीण होत गेले होते. जनतेच्या प्रश्नांचा पसारा मोठा होता, विकासकामांची जबाबदारी वाढत होती आणि राजकीय तसेच प्रशासकीय आघाड्यांवर निर्णयांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. अशा काळात लोकप्रतिनिधी म्हणून प्रत्येक गाव, प्रत्येक वाडी-वस्तीपर्यंत प्रत्यक्ष पोहोचणे शक्य होत नव्हते. याच काळात स्वतःला निष्ठावंत समजणाऱ्या काही चौकटी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी थेट संपर्कात राहून इतर सामान्य शिवसैनिकांना त्या संपर्कापासून दूर ठेवत होत्या. संघटनेतील कार्यकर्त्यांचा आवाज वरपर्यंत जाऊ नये, सामान्य कार्यकर्त्यांच्या अडचणी थेट नेतृत्वापर्यंत पोहोचू नयेत, अशी परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण केली जात होती. सहकार्य करण्याऐवजी तात्यासाहेबांच्या कामात अडथळे निर्माण करणे, गैरसमज पसरवणे, चुकीची माहिती देणे आणि संघटनात्मक पातळीवर अडचणी वाढवणे, असेच या चौकटींचे कामकाज बनले होते. या पार्श्वभूमीवर तात्यासाहेबांनी किशोर आप्पा पाटील यांना शिवसेनेत अधिक सक्रियपणे पुढे आणले. मात्र जनतेच्या अपेक्षा आणि वास्तव परिस्थिती वेगळीच दिशा दाखवत होती. अल्पावधीतच किशोर आप्पा पाटील युवकांच्या गळ्यातील ताईत बनले. त्यांच्या कामाची पद्धत, सर्वसामान्यांशी थेट संवाद, प्रश्न समजून घेण्याची शैली आणि निर्णयक्षम नेतृत्व यामुळे त्यांनी तरुणांसह सर्व स्तरांतील लोकांचा विश्वास संपादन केला आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून पाचोरा नगरपालिकेच्या नेतृत्वस्थानी विराजमान झाले. एका बाजूला आमदार स्व. तात्यासाहेब आर. ओ. पाटील यांच्या जबाबदाऱ्या आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच्या नगरपालिकेच्या वाढत्या कामांचा व्याप, या दुहेरी जबाबदाऱ्यांमुळे प्रत्येक नागरिकाला थेट न्याय देणे आपल्याला एकट्याला शक्य नाही, अशी स्पष्ट जाणीव किशोर आप्पा पाटील यांना होऊ लागली. नागरिकांची कामे वेळेत व्हावीत, कोणालाही वाऱ्यावर सोडले जाऊ नये आणि प्रशासन व जनता यांच्यात समन्वय राहावा, यासाठी विश्वासू, प्रामाणिक आणि जनतेशी थेट नाळ जोडणारा स्वीय सहाय्यक असावा, असा विचार पुढे आला. कोण योग्य ठरेल, याची सखोल पडताळणी व पाहणी सुरू झाली. अनेक नावांवर चर्चा झाली, अनेक व्यक्तींच्या कार्यपद्धतीचा विचार झाला, मात्र अखेरीस चर्चाअंती रंगार गल्लीतील राजूभाऊ हेच या भूमिकेसाठी सर्वार्थाने योग्य असल्याचे निश्चित झाले. कारण त्यांच्याकडे पद नव्हते, सत्ता नव्हती, मात्र जनतेचे दुःख समजून घेण्याची क्षमता, शिवसेनेप्रती निष्ठा आणि प्रामाणिक काम करण्याची तयारी होती. त्यानंतर रंगार गल्लीतील कट्ट्यावर, म्हणजेच मोरभुवनच्या ओट्यावर बसणाऱ्या राजूभाऊंना तेथून थेट उठवून तत्कालीन नगराध्यक्ष किशोर आप्पा पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणून सक्रिय करण्यात आले आणि येथूनच त्यांच्या सार्वजनिक कार्यातील जबाबदारीचा नवा अध्याय सुरू झाला. पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघाचे हॅट्रिक आमदार किशोर आप्पा पाटील यांचे स्वीय सहाय्यक म्हणून आज राजेंद्र पाटील म्हणजेच सर्वांचे लाडके राजूभाऊ ओळखले जातात. नाव जरी राजू असले तरी नावाप्रमाणेच त्यांचे मन राजासारखे मोठे आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूजचे संपादक संदीप महाजन व परिवाराच्या वतीने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देताना त्यांच्या संघर्षमय, निष्ठावंत आणि लोकाभिमुख कार्यप्रवासाकडे कृतज्ञतेने पाहिले जाते. राजूभाऊंची ओळख आज 24×7 जनतेसाठी तत्पर असलेल्या स्वीय सहाय्यकाची असली, तरी हा प्रवास कोणत्याही सवलतीतून किंवा शिफारसीतून मिळालेला नाही. त्यांच्या आयुष्याची सुरुवात रंगार गल्लीतील एक साधा शिवसैनिक म्हणून झाली. त्या काळात पद, अधिकार किंवा सत्तेच्या परिघाशी दूरदूरपर्यंत संबंध नसताना त्यांनी शिवसेनेच्या विचारांवर ठाम राहून प्रामाणिकपणे काम केले. लोकांमध्ये मिसळून त्यांच्या अडचणी समजून घेणे, गरजूंच्या पाठीशी उभे राहणे, सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासनाच्या उंबरठ्यावर ठामपणे उभे राहणे आणि रंजले-गांजले यांना दिलासा देण्यासाठी धडपडणे, हीच त्यांची ओळख होती. याच मातीतील गुणांमुळे पुढे त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. स्वीय सहाय्यक म्हणून काम करताना राजूभाऊंनी कधीही पदाचा दुरुपयोग केला नाही. त्यांच्या अंगी असलेली प्रामाणिकता, निष्ठा आणि स्पष्टवक्तेपणा हे गुण अधिक ठळकपणे समोर आले. काम होईल तर होईल असे ठामपणे सांगणे आणि काम का होणार नाही हेही तितक्याच संयमानं व समजूतदारपणे सांगणे, हा त्यांचा मोठा गुण ठरला. भूलथापा न देता वस्तुस्थिती मांडणे, लोकांना खोटी आश्वासने न देता योग्य दिशा दाखवणे आणि प्रशासनाशी समन्वय राखत कामे मार्गी लावणे, या तिन्ही बाबींमध्ये त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. किशोर आप्पा पाटील यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळापासून ते आजच्या हॅट्रिक आमदारकीपर्यंत राजूभाऊ अखंडपणे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत, यामागे कोणताही संधीसाधूपणा किंवा स्वार्थ नाही, तर केवळ आणि केवळ निष्ठा, प्रामाणिकपणा आणि सातत्य आहे. अनेक चढ-उतार, राजकीय बदल, सत्तांतराचे वारे आणि विरोधकांकडून होणारी टीका, या सगळ्या काळात त्यांनी आपली भूमिका बदलली नाही. जनतेचे काम हेच सर्वोच्च कर्तव्य मानून त्यांनी आपले दैनंदिन आयुष्य आखले. राजूभाऊंच्या कार्यशैलीची खासियत म्हणजे ते सर्व स्तरांतील लोकांशी समान आदराने वागतात. गरीब असो वा श्रीमंत, कार्यकर्ता असो वा अधिकारी, प्रत्येकाशी संवाद साधताना त्यांची भाषा संयमी, नम्र आणि आश्वासक असते. त्यामुळेच लोकांचा त्यांच्यावर प्रचंड विश्वास आहे आणि हाच विश्वास त्यांच्या यशाचा खरा पाया ठरला आहे. अनेकदा प्रशंसेपेक्षा टीका अधिक मिळते, गैरसमज निर्माण होतात, तरीही राजूभाऊंनी कधीही मनात कटुता ठेवली नाही. काम योग्य असेल तर ते टिकेल, या तत्त्वावर त्यांनी आजवरची वाटचाल केली आहे. आजच्या धावपळीच्या आणि बदलत्या राजकारणात, जिथे पदे बदलतात, भूमिका बदलतात आणि नाती तुटतात, तिथे राजूभाऊंची स्थिरता, सातत्य आणि निष्ठा विशेष ठरते. ते केवळ स्वीय सहाय्यक नाहीत, तर आमदारांच्या कार्याचा एक विश्वासू दुवा आहेत—जनता, पक्ष आणि प्रशासन यांच्यातील. याच दुव्यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागले, अनेक गरजूंना दिलासा मिळाला आणि अनेक विकासकामांना गती मिळाली. वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा दिवस नसतो, तर समाजाने दिलेल्या विश्वासाचे आणि जबाबदारीचे स्मरण करून देणारा दिवस असतो. राजूभाऊंसाठी हा दिवस त्यांच्या आजवरच्या कार्याची पावती ठरतो. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा निष्ठेची, प्रामाणिकपणाची आणि लोकसेवेची साक्ष देतो. आजही ते पूर्वीप्रमाणेच साधेपणाने काम करत आहेत—नावात राजू असले तरी मन राजासारखे मोठे ठेवून. 2 मार्च या वाढदिवसाच्या निमित्ताने झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूज परिवाराच्या वतीने राजेंद्र पाटील म्हणजेच राजूभाऊ यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि लोकसेवेच्या या पवित्र वाटचालीत नवनवीन यश मिळो, हीच सदिच्छा. जनतेसाठी अखंड कार्यरत राहणाऱ्या या विश्वासाच्या व्यक्तिमत्त्वाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here