दुबईत अडकलेल्या भारतीय पर्यटकांसाठी संकटमोचक ठरले गिरीशभाऊ महाजन : तत्परता, संवेदनशीलता आणि मानवतेचा अनोखा अनुभव

0

Loading

पाचोरा – फेब्रुवारी महिन्यात CARE Insurance कंपनीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्ससाठी भारतातील विविध राज्यांमधून सुमारे ३५० प्रतिनिधी दुबई येथे गेले होते. त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील ३१ जणांचा समावेश होता. या प्रतिनिधींमध्ये माझी पत्नी शितल संदीप महाजन तसेच CARE कंपनीतील सहकारी व त्यांच्या कुटुंबीयांचाही सहभाग होता. कामानिमित्त आयोजित या कॉन्फरन्ससोबत दुबईतील विविध पर्यटनस्थळांना भेट देण्याची संधी मिळाल्यामुळे ही सहल सर्वांसाठी आनंददायी आणि संस्मरणीय ठरली. दुबईतील भव्य वास्तू, अत्याधुनिक व्यवस्था आणि पर्यटन स्थळांचा अनुभव घेत असताना सर्वांचे वातावरण उत्साहपूर्ण होते. ठरलेल्या नियोजनानुसार २ मार्च रोजी सर्वांनी भारतात परतण्याचा कार्यक्रम आखला होता. मात्र १ मार्च रोजी अचानक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने अनेक विमानसेवा रद्द करण्यात आल्या आणि विमान वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे दुबईतील अनेक भारतीय पर्यटक परतीच्या प्रवासासाठी अडकून पडले. दुबईतील फेस्टिवल सिटी परिसरात अनेक पर्यटक थांबले होते. परकीय भूमीत अडकून पडल्यामुळे अनिश्चितता आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. भारतातील कुटुंबीयांनाही परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्या मनात काळजी वाढली होती. याच वेळी महाराष्ट्र राज्याचे मंत्री नामदार गिरीशभाऊ महाजन यांनी पुढाकार घेत दुबईमध्ये अडकलेल्या पर्यटकांशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला. परिस्थितीची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ दुबईतील जळगाव जिल्ह्यातील पर्यटकांशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधत त्यांच्या सुरक्षिततेची चौकशी केली. पर्यटक सुरक्षित आहेत का, राहण्याची व जेवणाची व्यवस्था योग्य आहे का, कोणाला काही अडचण आहे का, याची त्यांनी आत्मीयतेने विचारपूस केली. त्यांच्या शब्दांमधील आत्मीयता आणि दिलासा दुबईमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी मोठा आधार ठरला. दुसऱ्या दिवशीही त्यांनी पुन्हा संपर्क साधून परिस्थितीची माहिती घेत “काळजी करू नका, लवकरच तुम्हाला सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” असे आश्वासन दिले. त्यांच्या या शब्दांमुळे दुबईमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. त्यांनी माझ्यासह इतर पर्यटकांच्या कुटुंबीयांशीही संपर्क साधून त्यांना धीर दिला आणि सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती दिली. या संपूर्ण प्रक्रियेत गिरीशभाऊ महाजन यांचे निकटवर्तीय माजी आमदार दिलीपभाऊ वाघ तसेच पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ हे देखील माझ्याशी सतत संपर्कात राहून माहितीची देवाणघेवाण करत होते. तसेच या विषयावर नामदार गिरीशभाऊ महाजन यांची गृहमंत्री अमितभाई शहा यांच्याशीही चर्चा झाल्याची माहिती देण्यात आली. या प्रयत्नांमुळे दुबईमध्ये अडकलेल्या पर्यटकांपैकी तब्बल २५१ जणांना दि. ६ मार्च रोजी सुरक्षितपणे भारतात परत आणण्यात यश आले. त्यामध्ये माझी पत्नी शितल संदीप महाजन हिचाही समावेश आहे. अजून काही पर्यटक होते  त्यांना सुद्धा 7 मार्च रोजी सुरक्षितपणे आणण्यात आले दरम्यान CARE Insurance कंपनीनेही आपल्या सर्व प्रतिनिधींची जबाबदारीने काळजी घेत दुबईमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उत्तम व्यवस्था केली आहे. राहण्यापासून जेवणापर्यंत सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून कंपनीचे अधिकारी सातत्याने पर्यटकांच्या संपर्कात आहेत. या संपूर्ण प्रसंगातून संकटाच्या काळात संवेदनशील नेतृत्व, समन्वय आणि माणुसकीचा आधार किती महत्त्वाचा असतो याचा अनुभव सर्वांना आला. योग्य वेळी मिळालेला दिलासा आणि प्रयत्नांमुळे दुबईमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून लवकरच परमेश्वर कृपेने सर्वजण आपल्या मायभूमीत परततील, अशी आशा व्यक्त होत आहे.- जय माता दी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here