घाटकोपर गोळीबार परिसरातील अत्यंत गरीब कुटुंबातील ऋतुजा गाडगेची जिद्द यशस्वी; MSF मध्ये भरती होऊन आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण

0

Loading

मुंबई – येथून पाचोरा येथे सेवाग्राम एक्स्प्रेसने प्रवास करत असताना एका साध्या पण अत्यंत प्रेरणादायी कुटुंबाची ओळख झाली आणि त्यांच्या आयुष्यातील संघर्ष, जिद्द व स्वप्नपूर्तीची कहाणी मनाला स्पर्श करून गेली. रेल्वेच्या एसी डब्यात समोर बसलेले एक कष्टकरी कुटुंब प्रथमदर्शनी इतर प्रवाशांसारखेच वाटले; मात्र काही क्षणांच्या संवादानंतर त्यांच्या आयुष्यातील हालाखीची परिस्थिती, कष्ट आणि मुलीच्या यशाचा अभिमान यामागची खरी कथा समोर आली. एसी डब्यातील थंडीमुळे त्या कुटुंबातील महिलेने स्वतःला पांघरून घेतले होते. सहज संवाद सुरू झाल्यानंतर त्या ताईंनी हसत सांगितले की, “आमचा हा आयुष्यातील पहिलाच एसी प्रवास आहे.” त्यांच्या बोलण्यात साधेपणा होता, पण चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता. विशेष म्हणजे त्या कुटुंबातील आईच्या चेहऱ्यावर मुलीच्या यशाचा अभिमान आणि समाधान स्पष्ट जाणवत होते. त्या कुटुंबातील कर्ते व्यक्ती भाऊ गणपत गाडगे असून त्यांचे मूळ गाव कळस, तालुका पारनेर, जिल्हा नगर आहे. त्यांचे वडील गणपतभाऊ भगवंत गाडगे हे हातगाडीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. अत्यंत गरीब परिस्थितीत त्यांनी संसार उभा केला. कष्ट, प्रामाणिकपणा आणि संघर्ष यांच्या जोरावर त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. सध्या भाऊ गणपत गाडगे हे दादर येथे एका पतसंस्थेत नोकरी करत असून मुंबईत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. या कुटुंबातील आईचे नाव माया गाडगे आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि भविष्यासाठी खंबीरपणे उभे राहून संघर्ष केला. घरात आर्थिक परिस्थिती अत्यंत मर्यादित असतानाही त्यांनी कधीही हार मानली नाही. उलट मुलांना मोठे स्वप्न पाहण्याची आणि ते पूर्ण करण्यासाठी झटण्याची प्रेरणा दिली. आज गाडगे कुटुंब मुंबईतील घाटकोपर येथील गोळीबार परिसरात राहते. अत्यंत साध्या आणि मर्यादित परिस्थितीत राहूनही या कुटुंबाने कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर जीवनातील अनेक संकटांना तोंड दिले आहे. संवाद सुरू असतानाच त्यांच्या मोबाईलची रिंग वाजली. त्या रिंगटोनमध्ये “स्वामी समर्थ” यांचे नामस्मरण ऐकू आले. चर्चेतून पुढे समजले की संपूर्ण गाडगे परिवार स्वामी समर्थांचे सेवेकरी असून त्यांच्या भक्तीतूनच त्यांना जीवनातील प्रत्येक संकटावर मात करण्याची प्रेरणा मिळते. या प्रवासामागील कारण विचारले असता त्यांनी सांगितले की ते मुंबईहून नागपूरकडे जात आहेत. कारण त्यांच्या आयुष्यातील एक अत्यंत अभिमानाचा क्षण आता येणार होता. गाडगे दांपत्याला दोन मुले असून त्यापैकी मोठा मुलगा आणि लहान मुलगी ऋतुजा गाडगे आहे. ऋतुजाने बी.कॉम. पर्यंत शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर तिच्या मनात एकच स्वप्न होते—पोलीस दलात भरती होण्याचे. गरीब घरातील परिस्थिती, मर्यादित साधने आणि अनेक अडचणी असूनही ऋतुजाने आपले स्वप्न सोडले नाही. उलट ती अधिक जिद्दीने त्या दिशेने वाटचाल करत राहिली. पहाटे लवकर उठणे, नियमित धावणे, ग्राउंडवर सराव करणे हा तिचा नित्यक्रम झाला होता. ऊन, पाऊस, वारा यांचा कधीही विचार न करता ती दररोज सराव करत असे. घाटकोपरच्या गोळीबार परिसरातील नागरिक देखील तिच्या या मेहनतीचे कौतुक करत असत. अनेक वेळा परिसरातील लोक तिच्या आई-वडिलांना म्हणत, “तुमची ऋतुजा खूप मेहनत करत आहे. एक दिवस ती नक्कीच गणवेश परिधान करून तुमच्या कुटुंबाचे आणि आपल्या परिसराचे नाव उज्वल करेल.” ऋतुजाने नायगाव येथे झालेल्या परीक्षेत सहभाग घेतला. त्या परीक्षेनंतर काही दिवसांनी भाऊबीजच्या दिवशी तिच्या मोबाईलवर आनंदाची बातमी आली—तिची MSF (महाराष्ट्र सुरक्षा दल) मध्ये भरती झाली होती. तो क्षण गाडगे कुटुंबासाठी आयुष्यातील अविस्मरणीय ठरला. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर त्यांच्या कष्टाचे फळ मिळाले होते. दिनांक 26 जानेवारीपासून ऋतुजाला नागपूर येथे प्रशिक्षणासाठी जावे लागले. आपल्या आई-वडिलांचा आशीर्वाद घेऊन ती नागपूरला रवाना झाली. कठोर प्रशिक्षण, शिस्त आणि मेहनतीच्या माध्यमातून तिने आपले प्रशिक्षण पूर्ण केले. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात तिचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून आता ती अधिकृतपणे सेवेत दाखल होणार आहे. उद्या गणवेश परिधान करून आपली मुलगी आपल्या समोर उभी राहील आणि आपल्याला सॅल्यूट करेल, या विचारानेच तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटले होते. अत्यंत गरीब परिस्थितीतून, हातगाडी व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातून, घाटकोपरच्या गोळीबार परिसरातील साध्या घरातून निघालेली ही मुलगी आज महाराष्ट्र सुरक्षा दलात दाखल झाली आहे. या यशामागे तिची अथक मेहनत, आई-वडिलांचे संस्कार आणि माया गाडगे यांची खंबीर जिद्द हा सर्वात मोठा आधार ठरला. ऋतुजा गाडगेची ही यशोगाथा केवळ एका कुटुंबाची कथा नसून संघर्ष, जिद्द आणि स्वप्नपूर्तीचे प्रेरणादायी उदाहरण आहे. अत्यंत गरीब परिस्थितीतही जर मनात जिद्द असेल आणि मेहनतीवर विश्वास असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नसते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे घाटकोपर गोळीबार परिसरातील ऋतुजा गाडगे होय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here