![]()
पाचोरा – तालुक्यातील नांद्रा परिसरातील माहेजी येथील गिरणा नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशाच्या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. कुरंगी गट क्रमांक ६ शेजारील नदीपात्रात रात्रीच्या अंधारात जेसीबीच्या सहाय्याने शेकडो डंपर, टिपर व ट्रॅक्टरद्वारे वाळू उपसा व वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले आहे. महसूल प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे हा प्रकार बिनधास्त सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना तालुकाप्रमुख विनोद मिकन तावडे यांनी तहसीलदार पाचोरा यांच्याकडे अधिकृत तक्रार अर्ज सादर करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी असूनही प्रशासनाविरोधात उघडपणे आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने या प्रश्नाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. “नदीपात्रातील अवैध वाळू उपसा तातडीने थांबवला नाही तर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा त्यांनी दिला आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, महसूल विभागाला अनेक वेळा लेखी व तोंडी सूचना देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी, वाळू माफियांचे मनोबल वाढले असून ते निर्भयपणे नैसर्गिक संपत्तीची लूट करत आहेत. या प्रकारामुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याबरोबरच नदीपात्राची रचना बदलण्याचा धोका निर्माण झाला आहे. या अवैध उपशामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेवरही परिणाम होत आहे. पोलीस व लष्कर भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवकांना वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांकडून त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. काही युवकांनी तक्रार केल्यानंतर त्यांना धमक्या देण्यात आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कुरंगी, माहेजी आणि वरसाडे या गावांमधून नांद्रा येथील हायस्कूलमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढला असून पालकवर्गात चिंता व्यक्त होत आहे. तसेच नांद्रा बसस्थानक परिसरात रात्री उशिरापर्यंत वाळू माफियांचा वावर वाढल्याने गोंधळ, भांडणे व शस्त्रांचा वापर होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी मांडल्या आहेत. या अवैध वाळू उपशाचा परिणाम पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवरही होत असून नांद्रा, कुरंगी, माहेजी, आसनखेडा, बांबरुड (राणीचे), लासगाव, सामनेर, दहिगाव, डोकळखेडा, वरसाडे, वेरूळी, दुसखेडा व परधाडे या गावांच्या पाणीपुरवठ्यावर भविष्यात गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रश्नाची दखल घेत स्थानिक आमदार किशोर आप्पा पाटील यांनी अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला होता. काही वृत्तपत्रांमध्येही या संदर्भातील बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, पाचोर्यात निर्माण झालेल्या कृत्रिम गॅस टंचाईच्या प्रश्नाकडेही लक्ष वेधले जात आहे. नागरिकांना दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेत अडचणी निर्माण होत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेना तालुकाप्रमुख विनोद मिकन तावडे यांनी या प्रश्नातही ठोस पावले उचलून संबंधित यंत्रणेला जबाबदार धरण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे. एकीकडे अवैध वाळू उपशामुळे पर्यावरण व नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आली असताना, दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंच्या कृत्रिम टंचाईमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या दोन्ही गंभीर प्रश्नांवर तातडीने कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात आणणे प्रशासनासाठी अत्यावश्यक बनले आहे. अन्यथा नागरिकांच्या रोषाचे आंदोलनात रूपांतर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.






