![]()
पाचोरा – शहराच्या सहकार क्षेत्रात विश्वास, पारदर्शकता आणि माणुसकीच्या मूल्यांवर उभा राहिलेला एक भक्कम स्तंभ म्हणजे संत नरहरी महाराज नागरी सह. पतसंस्था मर्या., पाचोरा. २००१ साली सुरू झालेला हा प्रवास आज २५ वर्षे पूर्ण करून 20 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता रौप्य महोत्सव साजरा होणार आहे. या प्रवासात केवळ आर्थिक प्रगती नव्हे, तर सामाजिक बांधिलकी, ग्राहकांप्रती आपुलकी आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन या गुणांमुळे या संस्थेने वेगळे स्थान निर्माण केले आहे. “नरहरी म्हणे देवा, तुझी सेवा करीन, हातात सोनं घेऊन अंतरी नाम धरीन” या संत नरहरी महाराजांच्या अभंगातील विचाराप्रमाणे व्यवहार आणि भक्ति यांचा सुंदर समन्वय या संस्थेच्या कार्यातून स्पष्टपणे जाणवतो. ही पतसंस्था उभी राहण्यामागे सोनार समाजातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित व्यक्तींनी घेतलेले प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कष्ट, त्यांचे दूरदृष्टीचे नेतृत्व आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक घडवण्याची जिद्द हे प्रमुख घटक ठरले. मात्र या संस्थेचे खरे वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीपासून स्वीकारलेली समतेची भूमिका. कर्ज वाटप असो किंवा व्यवहारांची उलाढाल, कधीही जात, धर्म, पंथ किंवा सामाजिक स्तर याचा विचार न करता प्रत्येक ग्राहकाला समान संधी देण्यात आली. ही भूमिका केवळ घोषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्यक्ष कामकाजात उतरवली गेली, हेच या संस्थेच्या विश्वासार्हतेचे मूळ कारण ठरले. “सोनाराचे काम जरी, अंतरी विठ्ठल ध्यानी, नरहरी म्हणे तेथे पावन होते जीवनी” या संत नरहरी महाराजांच्या अभंगातील भावनेप्रमाणे व्यवसाय करत असतानाही अंतःकरणातील शुद्धता आणि सेवाभाव या संस्थेच्या कार्यपद्धतीत सातत्याने दिसून येतो. या समतोल आणि निष्पक्ष कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव अनेकांना आला असून यात प्रामुख्याने साप्ताहिक झुंज व ध्येय न्यूजचे संपादक संदीप महाजन म्हणजे माझा स्वतःचा अनुभव विशेष उल्लेखनीय आहे. माझा देशमुखवाडी भागात निवास असताना या संस्थेसोबत सर्वाधिक मोठ्या प्रमाणात मी आर्थिक व्यवहार केले असून माझ्या अनुभवानुसार या पतसंस्थेत माझा सर्वाधिक टर्नओव्हर होता आणि कधीही कोणत्याही प्रकारचा भेदभाव जाणवला नाही. प्रत्येक वेळी सन्मानाने आणि विश्वासाने व्यवहार पूर्ण करण्यात आले, असा माझा अनुभव संस्थेच्या कार्यसंस्कृतीचे स्पष्ट चित्र उभे करतो. पतसंस्थेच्या यशामागे केवळ आजचे चेअरमन, व्हाईस चेअरमन किंवा विद्यमान संचालक मंडळ नाही, तर गेल्या २५ वर्षांत वेळोवेळी बदललेल्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांचे योगदान व सोनार समाजातील ज्ञात-अज्ञात व्यक्तींचे योगदान तितकेच महत्त्वाचे आहे. संस्थेच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेकांनी चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि संचालक म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या आणि प्रत्येकाने आपल्या कार्यकाळात प्रामाणिकपणे व दूरदृष्टीने काम करत संस्थेच्या प्रगतीत मोलाची भर घातली. त्यामुळे आज दिसणारी यशाची उंची ही कोणत्याही एका व्यक्तीची नसून सर्वांच्या सामूहिक सोनार समाजाच्या परिश्रमांची फलश्रुती आहे. विद्यमान चेअरमन विष्णु (बापू) महादू सोनार, व्हाईस चेअरमन सुरेश (नाना) रूपचंद देवरे तसेच संचालक मंडळाने संस्थेच्या प्रगतीचा वेग कायम ठेवत नवे मानदंड निर्माण केले आहेत, परंतु त्यांनीही पूर्वसुरींनी घालून दिलेल्या भक्कम पायावरच पुढील वाटचाल अधिक सक्षम केली आहे हे तेवढेच महत्त्वाचे आहे. सातत्य, पारदर्शकता आणि विश्वास या मूल्यांची परंपरा अखंड राखण्यात सर्वच काळातील नेतृत्वाने समान योगदान दिले आहे. यासोबतच व्यवस्थापक, अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचे योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे. श्रीपाल सुगनचंद गौड (मॅनेजर), विवेक नारायण कानडे (कॅशियर) आणि जितेंद्र हिम्मत पाटील (शिपाई) या कर्मचारी वर्गाने आपल्या दैनंदिन कामातून संस्थेचा चेहरा अधिक उजळवला आहे. ग्राहकांना वेळेत सेवा देणे, त्यांच्या हसतमुख अडचणी समजून घेणे आणि त्यांचे समाधान करणे ही केवळ जबाबदारी नसून त्यांनी ती आपली कर्तव्यभावना मानली आहे. “जिथे प्रामाणिक श्रम, तिथेचि देवाचे घर” या संत नरहरी महाराजांच्या विचाराशी सुसंगत असे कार्य येथे सातत्याने दिसून येते. बँक किंवा पतसंस्थेची खरी ओळख ही तिच्या ग्राहकांच्या समाधानातूनच ठरते आणि या पतसंस्थेत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपुलकीची वागणूक मिळते हीच तिची खरी ताकद आहे. व्यवहारातील पारदर्शकता आणि सेवाभाव यामुळे ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ झाला असून हीच बाब संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगतीचे मूळ कारण ठरली आहे. संस्थेने स्थापनेपासून आजपर्यंत ०% एन.पी.ए., ०% थकबाकी, सतत ‘अ’+ दर्जाचा ऑडिट, सातत्यपूर्ण नफा आणि दरवर्षी लाभांश वाटप अशी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. उत्तर महाराष्ट्रात २००६ साली ऑडिट वर्ग ‘अ’ +मिळवणारी एकमेव पतसंस्था म्हणूनही तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र तर सोडा परंतु पाचोरा न्यायालयात देखील या संस्थेचे कर्ज वसुली अथवा चेक बाउन्स प्रकरणी एकही केस नाही ही कौतुकास्पद बाब आहे याला मूळ कारण म्हणजे या बँकेत फक्त योग्य व्यवहार बघितला गेला राजकारण जोपासले गेले नाही आणि या संस्थेतील एकाही संस्था सदस्यांनी किंवा संचालकांनी मीटिंग भत्ता घेतला नाही किंवा या संस्थेची निवडणूकच झाली नाही एवढा एकोपा या ठिकाणी दिसून येतो सहकार्यातून समृद्धी हा विचार केंद्रस्थानी ठेवून संस्थेने केवळ आर्थिक व्यवहार मर्यादित न ठेवता समाजातील सर्व घटकांना जोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे ही संस्था आर्थिक सेवेसोबत सामाजिक एकात्मतेचे प्रतीक बनली आहे. रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मा. किशोर आप्पा पाटील (आमदार, पाचोरा-भडगाव) अध्यक्षस्थानी राहणार असून मा. ओमप्रकाशजी वादाप्पा काका कोयते, मा. दादासो शशिकांत साळुंखे, मा. गौतमजी बलसाने, मा. दादासो दिलीप रामू पाटील, मा. मेहबूब आर. डी. जैन, मा. महेश कासार यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे आणि या कार्यक्रमातून संस्थेच्या २५ वर्षांच्या प्रवासाचा गौरव होणार आहे. आजच्या बदलत्या काळात अनेक संस्था स्पर्धेत टिकून राहण्यासाठी संघर्ष करत असताना संत नरहरी महाराज नागरी सह. पतसंस्थेने सातत्य, समता आणि सेवाभाव या मूल्यांच्या बळावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही संस्था केवळ आर्थिक व्यवहारांची नाही तर विश्वास आणि माणुसकीची उभी केलेली परंपरा आहे आणि भूतकाळातील नेतृत्व, वर्तमानातील कार्यतत्परता आणि भविष्याकडे पाहणारी दूरदृष्टी यांच्या संगमातून ही पतसंस्था पुढील काळातही यशाची नवी शिखरे गाठेल याबद्दल कोणतीही शंका नाही कारण जिथे प्रत्येकाचे योगदान मान्य केले जाते आणि प्रत्येकाला समान संधी दिली जाते तिथेच खरी प्रगती घडत असते.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
































