कॉपीमुक्त परीक्षेच्या दबावावर मात करत श्री.गो.से.हायस्कूलचा दैदिप्यमान विजय

Loading

पाचोरा : बदलत्या शैक्षणिक व्यवस्थेत विद्यार्थ्यांसमोर उभ्या राहणाऱ्या आव्हानांना धैर्याने सामोरे जात पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.गो.से.हायस्कूलने यंदाच्या एस.एस.सी. परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून घेतले आहे. राज्य शासनाने यंदा प्रथमच अत्यंत कडक आणि पूर्णपणे कॉपीमुक्त परीक्षा पद्धती लागू केल्याने विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीपासूनच मोठी मानसिक भीती निर्माण झाली होती. परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, व्हिडिओ चित्रीकरण, कठोर देखरेख आणि प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणारी यंत्रणा कार्यरत करण्यात आली होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र अशा कठीण आणि दबावपूर्ण परिस्थितीतही श्री.गो.से.हायस्कूलने विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावत केवळ निकालातच नव्हे तर आत्मविश्वासाच्या परीक्षेतही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. विद्यालयाचा यंदाचा निकाल ८७.२० टक्के लागला असून ४६१ विद्यार्थ्यांपैकी ४०२ विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. विशेष म्हणजे ८१ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन करत विद्यालयाच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. विद्यालयातील ललित बळवंत आंबेकर याने ९४.६० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. हर्षल शैलेंद्र चौधरी याने ९३.४० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला तर मोहित गणेश पाटील ९२ टक्के गुणांसह तृतीय स्थानी राहिला. स्वरूप अशोक राठोड याने ९१ टक्के गुण मिळवत चतुर्थ क्रमांक पटकावला तर खुशी मनोहर सोनवणे हिने ९० टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळवला. यंदाची परीक्षा केवळ विद्यार्थ्यांच्या ज्ञानाची नव्हे तर त्यांच्या मानसिक ताकदीचीही कसोटी ठरली. परीक्षेला अवघा एक महिना शिल्लक असताना शासनाने कठोर कॉपीमुक्त धोरण लागू केल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली होती. अनेक विद्यार्थ्यांनी “इतक्या कडक वातावरणात परीक्षा कशी द्यायची?” असा प्रश्न उपस्थित केला होता. पालकांमध्येही चिंता वाढली होती. मात्र अशा वेळी श्री.गो.से.हायस्कूल प्रशासनाने अत्यंत संवेदनशील भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू केले. संस्थेचे चेअरमन नानासो. संजय ओंकार वाघ यांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करण्यावर विशेष भर दिला. “कॉपी नव्हे तर आत्मविश्वास हेच यशाचे खरे शस्त्र आहे,” हा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आला. मुख्याध्यापक एन.आर. पाटील (ठाकरे), उपमुख्याध्यापक आर.एल. पाटील तसेच पर्यवेक्षकांनी वेळोवेळी शिक्षकांच्या बैठका घेत परीक्षा पद्धतीतील बदल विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. केवळ अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर न थांबता विद्यार्थ्यांच्या मानसिक तयारीलाही तितकेच महत्त्व देण्यात आले. विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमधील वातावरणाची सवय व्हावी म्हणून शाळेत सराव परीक्षा घेण्यात आल्या. प्रत्येक वर्गात शिस्तबद्ध वातावरण तयार करण्यात आले. वेळेचे नियोजन, प्रश्नपत्रिका हाताळण्याची पद्धत, उत्तरपत्रिकेतील मांडणी, मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास यावर शिक्षकांनी स्वतंत्र मार्गदर्शन केले. अनेक विद्यार्थी सुरुवातीला तणावाखाली होते. काहींना भीतीमुळे अभ्यासात लक्ष केंद्रित करणे कठीण जात होते. अशा विद्यार्थ्यांशी शिक्षकांनी वैयक्तिक संवाद साधत त्यांना प्रेरित केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कठोर परीक्षा पद्धती ही मोठी मानसिक परीक्षा मानली जात होती. मात्र श्री.गो.से.हायस्कूलने विद्यार्थ्यांना “भीतीवर मात करून प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर यश मिळवता येते” हे प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले. विद्यालयातील शिक्षकांनी दिवस-रात्र मेहनत घेत विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयात सक्षम बनवले. अभ्यासातील अडचणी दूर करण्यासाठी अतिरिक्त तास, पुनरावृत्ती वर्ग आणि सराव चाचण्यांचे नियोजन करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत गेला आणि परीक्षेच्या वेळी ते स्थिर मनाने प्रश्नपत्रिकेला सामोरे गेले. या यशामागे केवळ विद्यार्थ्यांची मेहनत नाही तर संपूर्ण संस्थेची एकजूट आणि नियोजनबद्ध कार्यपद्धती महत्त्वाची ठरली. अध्यक्ष भाऊसो. दिलीप ओंकार वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा कायम राखली आहे. मानस सचिव दादासो. ॲड. महेश देशमुख, व्हॉइस चेअरमन नानासो. व्ही.टी. जोशी, शालेय समिती चेअरमन दादासो. खलील देशमुख, तांत्रिक विभाग चेअरमन अण्णासो. वासुदेव महाजन यांनीही विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शाळेच्या शैक्षणिक वाटचालीला बळ दिले. विद्यालयातील पर्यवेक्षिका ए.आर. गोहिल, पर्यवेक्षक आर.बी. बांठिया, पर्यवेक्षक महेश कौंडिण्य, किमान कौशल्य विभाग प्रमुख मनीष बाविस्कर, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांसाठी घेतलेली मेहनत यंदाच्या निकालातून स्पष्ट दिसून आली. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देत त्याला अभ्यासात मागे राहू न देण्याचा प्रयत्न करण्यात आला. आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाच्या बळावर मोठे यश मिळवू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे श्री.गो.से.हायस्कूलचा यंदाचा निकाल ठरला आहे. कॉपीमुक्त परीक्षेच्या नव्या युगात अनेक शाळांचे निकाल घसरले असताना श्री.गो.से.हायस्कूलने मिळवलेले यश हे केवळ गुणांचे यश नसून शिस्त, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण व्यवस्थेचा विजय मानला जात आहे. या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून पालकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे. कठीण परिस्थितीतही योग्य मार्गदर्शन, सकारात्मक विचार आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या जोरावर कोणतेही आव्हान पेलता येते, हा संदेश श्री.गो.से.हायस्कूलने संपूर्ण समाजासमोर प्रभावीपणे ठेवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here