“कार्यकर्त्यांच्या आईची तब्येत कळताच दौरा थांबवला”; तावडे परिवारासाठी रोहितदादा पवारांचा जिव्हाळ्याचा स्पर्श

Loading

पाचोरा – मोठी पदे, मोठमोठी भाषणे आणि गाजावाजा करणारे अनेक नेते दिसतात; मात्र एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरातील वेदना समजून घेऊन त्याच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी स्वतःचा व्यस्त दौरा थांबवणारे नेतृत्व फार कमी पाहायला मिळते. पाचोरा दौऱ्यादरम्यान रोहितदादा पवार यांनी दाखवून दिलेली ही संवेदनशीलता अनेकांच्या मनाला स्पर्शून गेली असून, त्यांच्या कार्यशैलीतील माणुसकीचा पैलू पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. दुपारची वेळ होती. अचानक झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूजचे संपादक संदीप महाजन यांना रोहित दादा पवार यांच्या कार्यालयातून फोन आला. “उद्या दादा हेलिकॉप्टरने पाचोरा येथे येत आहेत आणि पुढे गोंडगाव येथे जाणार आहेत, आपणही त्यांच्या समवेत यावे,” असा निरोप देण्यात आला. क्षणभर विश्वासच बसत नव्हता. तब्बल तीन वर्षांपूर्वी झालेला एक छोटासा संपर्क आजही रोहित दादा पवार यांच्या लक्षात असेल, हीच बाब आश्चर्यचकित करणारी होती. राजकारणात रोज हजारो लोक भेटतात, अनेक चेहरे समोरून जातात; परंतु त्यामधील एखाद्या व्यक्तीला ओळखून पुन्हा संपर्क साधणे, हे त्यांच्या स्मरणशक्तीपेक्षा अधिक त्यांच्या माणुसकीचे दर्शन घडवणारे होते. त्या दिवशी पाचोरा येथील श्री एम एम महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर रोहित दादा पवार यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. हेलिकॉप्टरचा आवाज परिसरात घुमू लागला आणि काही क्षणांतच वातावरणात उत्साह संचारला. मात्र आगमनानंतर दादांनी दाखवलेला साधेपणा उपस्थितांच्या मनाला भिडणारा होता. कोणताही दिखावा नाही, कोणतीही कृत्रिमता नाही; उलट प्रत्येकाशी आत्मीयतेने संवाद साधत त्यांनी संपूर्ण वातावरण आपलेसे करून टाकले. विशेष म्हणजे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय पदाधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी अनेकांची नावे थेट उच्चारली. पक्षाच्या संघटनात्मक घडामोडी, स्थानिक प्रश्न, गावपातळीवरील अडचणी आणि कार्यकर्त्यांच्या भावना यांची त्यांनी बारकाईने माहिती घेतली. एखाद्या नेत्याने केवळ मंचावर भाषण करून निघून जाण्यापेक्षा प्रत्यक्ष परिस्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करणे, हीच त्यांची खरी ताकद असल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त होत होती. यानंतर रोहितदादा पवार गोंडगाव येथे बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेची माहिती घेण्यासाठी रवाना झाले. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता. अनेक राजकीय व्यक्तींनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिल्या रोहित दादा पवार यांनी संयमित भूमिका घेत पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी कोणतीही टीका-टिप्पणी न करता, “आपल्या स्तरावरून जे काही शक्य असेल ती मदत केली जाईल,” अशी भूमिका घेतली. संवेदनशील विषयावर प्रसिद्धीपेक्षा माणुसकीला प्राधान्य देणारी त्यांची भूमिका अनेकांच्या मनात घर करून गेली. गोंडगाव येथील भेटीनंतर पुढील दौरा सुरू असतानाच चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निष्ठावंत व तळागाळातील कार्यकर्ते तसेच माजी पंचायत समिती सभापती नितीन तावडे यांच्या मातोश्री माजी जिल्हा परिषद सदस्य सुशीलाबाई तावडे या श्रीनिवास हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याची माहिती रोहितदादा पवार यांना मिळाली. व्यस्त दौरा, वेळेचे बंधन आणि पुढील कार्यक्रम निश्चित असतानाही त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आपल्या नियोजनात बदल केला आणि थेट हॉस्पिटलकडे रवाना झाले. पाचोरा येथील श्रीनिवास हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी सुशीलाबाई तावडे यांच्या प्रकृतीची आत्मीयतेने विचारपूस केली. हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर नरेशदादा गवांदे यांच्याकडून त्यांनी त्यांच्या तब्येतीबाबत सविस्तर माहिती घेतली. रुग्णालयातील वातावरण त्या क्षणी पूर्णपणे भावनिक झाले होते. राजकीय दौऱ्यावर आलेला एक मोठा नेता अचानक हॉस्पिटलमध्ये येऊन एका कार्यकर्त्याच्या आईची विचारपूस करतो, तिचा आशीर्वाद घेतो, तिच्या प्रकृतीची चिंता व्यक्त करतो; हा प्रसंग उपस्थित प्रत्येकाच्या मनाला स्पर्शून गेला. सुशीलाबाई तावडे यांनीही रोहितदादा पवार यांच्याशी प्रेमाने संवाद साधत त्यांना आशीर्वाद दिले. त्या वेळी कोणताही राजकीय आविर्भाव नव्हता, ना माध्यमांसाठी केलेली औपचारिकता; तर एका कुटुंबाच्या दुःखात सहभागी होणारा संवेदनशील माणूस दिसत होता. कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा आणि त्यांच्याविषयीची आत्मीयता हीच खरी राजकारणातील ताकद असते, याची जाणीव या प्रसंगातून प्रकर्षाने झाली. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार सुनील भुसारा, जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, प्रदेश सरचिटणीस एजाज मलिक, जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप खोडपे, अजहर खान, अन्वर खाटीक तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. हॉस्पिटलमधील भेटीनंतर नितीन तावडे आणि इतर कार्यकर्त्यांशी रोहित दादा पवार यांनी दिलखुलास चर्चा केली. राजकारण, समाजकारण, स्थानिक प्रश्न, तरुणांचे प्रश्न आणि संघटनात्मक काम यावर त्यांनी मनमोकळा संवाद साधला. या संपूर्ण दौऱ्यात एक गोष्ट सातत्याने जाणवत होती — रोहित दादा पवार हे फक्त राजकीय नेते म्हणून वावरत नाहीत, तर ते माणसे जोडणारे नेतृत्व आहे. कार्यकर्त्यांच्या घरातील परिस्थिती लक्षात ठेवणे, त्यांच्या अडचणींमध्ये सहभागी होणे, दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभे राहणे आणि त्यांना मानसिक आधार देणे, ही त्यांची शैली अनेकांना भावणारी ठरली. आजच्या राजकारणात अनेकदा कार्यकर्त्यांचा वापर केवळ गर्दीसाठी केला जातो, अशी टीका होत असते. मात्र पाचोरा दौऱ्यात रोहित दादा पवार यांनी दाखवून दिले की कार्यकर्ता हा फक्त राजकीय यंत्रणेचा भाग नसतो, तर तो कुटुंबातील सदस्यासारखा असतो. म्हणूनच तावडे परिवाराच्या भेटीदरम्यान उपस्थित अनेकांच्या डोळ्यांत भावनिक समाधान दिसून आले. राजकारणात लोकप्रियता भाषणांनी मिळू शकते; पण लोकांच्या मनात कायमची जागा निर्माण होते ती अशा संवेदनशील कृतींमुळेच. पाचोरा आणि गोंडगाव दौऱ्यातील रोहित दादा पवार यांची ही माणुसकी जपणारी भूमिका अनेकांच्या स्मरणात दीर्घकाळ राहणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here