Home Dhyeya News Special अध्यात्ममार्गाचा दीप मालवला: चंदू गुरुजी यांना अंतिम निरोप!

अध्यात्ममार्गाचा दीप मालवला: चंदू गुरुजी यांना अंतिम निरोप!

0
578

Loading

पाचोरा – शहराच्या धार्मिक व आध्यात्मिक वर्तुळातील एक तेजस्वी तारा आज मालवला… ज्योतिषशास्त्र, वेदशास्त्र, कर्मकांड, पारंपरिक पूजा विधी व धर्ममार्गदर्शन या क्षेत्रात तब्बल साडे सहा दशके अखंड सेवा देणारे चंद्रकांत वसंत जोशी उर्फ चंदू गुरुजी (वय ८४, रा. कोंडवाडा गल्ली, पाचोरा) यांचे वृद्धापकाळाने आज, दिनांक १८ जून २०२५ रोजी पहाटे १:४१ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण पाचोरा शहरात हळहळ व्यक्त होत असून, अध्यात्म क्षेत्रातील एक युग संपल्याची भावना भाविकांमध्ये दिसून येत आहे.
चंदू गुरुजी हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्याने त्रस्त होते. अखेर वृद्धापकाळामुळे त्यांनी अखेरचा श्वास आपल्या कोंडवाडा गल्लीतील राहत्या घरी घेतला. त्यांच्या अंत्ययात्रेची निघण्याची वेळ आज दुपारी २ वाजता निश्चित करण्यात आली असून यांची अंत्ययात्रा कोंडवाडा गल्ली राहते घर पांचाळेश्वरनगर येथून निघणार आहे. गुरुजींच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर, नातेवाईकांवर तसेच शहरातील धार्मिक कार्यात सहभागी होत आलेल्या असंख्य भक्तगणांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
चंदू गुरुजी यांचे पाचोरा-भडगाव तालुक्यातच नव्हे तर उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात एक अत्यंत मान्यवर व आदरणीय नाव त्यांनी आपल्या आयुष्याचे तब्बल ६५ वर्षे देवधर्माच्या कार्याला समर्पित केली.
विवाह, मुंज, वास्तुशांत, सत्यनारायण पूजा, श्राद्धकर्म, नवग्रह शांती, नवचंडी, ग्रहशांती आदी पूजाविधी त्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडले. त्यांच्या मुखातील वेदस्वर आणि मंत्रोच्चाराचा अद्वितीय ठसा श्रोत्यांच्या मनावर कोरला जात असे.
चंदू गुरुजी केवळ पूजाविधी करणारे कर्मकांडविशारद नव्हते, तर त्यांनी प्रत्येक शंका घेऊन येणाऱ्या व्यक्तीच्या मनोव्यथा समजून घेतल्या. त्यांच्या कडे आलेला प्रत्येक जण समाधान आणि सकारात्मकता घेऊनच परत जात असे. त्यांनी नव्हे तर पिढ्यानपिढ्या त्यांच्या मार्गदर्शनावर अवलंबून असलेले असंख्य भक्तगण पाचोरा, भडगाव, जामनेर, बोदवड, एरंडोल, जळगाव, सोयगाव व परिसरातून त्यांच्या भेटीला यायचे.
त्यांच्या बोलण्यातली समजूतदार भाषा, प्रगल्भता आणि अनुभवी दृष्टिकोनामुळे समाजात त्यांच्याविषयी विलक्षण आदर होता. कित्येकांनी आपल्या आयुष्यातील अडथळे त्यांच्या सल्ल्याने दूर केल्याची अनेक उदाहरणे आहेत.
चंदू गुरुजींच्या पश्चात त्यांच्या तीन मुले, सुना, नातवंडे, दोन भाऊ, वहिनी असा मोठा परिवार आहे. पाचोरा शहरातीलच रहिवाशी व भारत देशात व विदेशात प्रख्यात राजकीय , शासकीय, तसेच विशेष प्राख्यात सेलिब्रेटीचे ज्योतिष विशारद गजानन जोशी गुरुजी यांचे ते काका होते. वडिलोपार्जित परंपरेचा वारसा त्यांनी केवळ जपला नाही तर नव्या पिढीपर्यंत पोहोचवला. त्यांनी आपल्या मुलांनाही धर्म, शास्त्र, श्रद्धा आणि सेवा यांचे महत्त्व दिले.
गेल्या अनेक दशकांमध्ये चंदू गुरुजींनी केवळ धार्मिक विधी नव्हे, तर समाजप्रबोधनही साधले. नवसाचे विधी, वास्तुशांतीसाठी येणाऱ्या कुटुंबांना त्यांनी अंधश्रद्धांपासून दूर ठेवत विज्ञानाधिष्ठित अध्यात्माचे मार्गदर्शन दिले.
त्यांच्या हातून झालेली प्रत्येक पूजा हा भक्तांसाठी एक आध्यात्मिक अनुभव ठरायचा. मंत्रोच्चाराचे परिणाम अनुभवणारे अनेक शेकडो लोक त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी येत आहेत.
पाचोरा शहराला अध्यात्म, संस्कृती आणि धर्मशास्त्राचा मार्ग दाखवणारा दीपस्तंभ आता निघून गेला आहे. परंतु त्यांच्या शिकवणीचा प्रकाश त्यांच्या शिष्यांद्वारे, कुटुंबीयांद्वारे आणि भक्तगणांद्वारे पुढील पिढ्यांमध्ये नक्की पोहचत राहील.आज दिनांक १८ जून रोजी दुपारी २ वाजता त्यांच्या राहत्या घरी – कोंडवाडा गल्ली, पाचोरा येथून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. अनेक धार्मिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक, राजकीय नेते आणि वडिलोपार्जित भक्त परिवार त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
चंदू गुरुजींचा शांत, संयमी, श्रद्धेचा आणि ज्ञानाचा प्रवास आज संपला. परंतु त्यांच्या स्मृती, त्यांचे शब्द, त्यांचे पूजाविधी आणि ज्योतिष मार्गदर्शन अजूनही हजारो मनांत चिरंतन जिवंत आहेत. चंदू गुरुजींच्या परिवाराच्या दुःखात झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूज परिवार सह संपादक संदीप महाजन सहभागी आहे
ओम् शांती।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!