Home Dhyeya News Special विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून यशाच्या शिखरावर पोहोचावे – नानासाहेब संजय वाघ यांचे...

विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून यशाच्या शिखरावर पोहोचावे – नानासाहेब संजय वाघ यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

0
313

Loading

पाचोरा – येथील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला योग्य दिशा देण्यासाठी “तयारी स्पर्धा परीक्षांची” या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने करण्यात आले होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांना विविध शासकीय सेवा, प्रशासनातील संधी, व स्वतःच्या करिअर घडविण्याच्या अनंत शक्यतांविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी भूषविले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अत्यंत प्रेरणादायी विचार मांडले. आपल्या भाषणात नानासाहेब वाघ म्हणाले की, “विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखल्या पाहिजेत आणि त्या क्षमतांच्या बळावर स्वतःला सिद्ध केले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक विलक्षण ऊर्जा, जिद्द आणि कर्तृत्व दडलेले असते, केवळ त्या गुणांना योग्य दिशा देण्याची आवश्यकता असते.” ते पुढे म्हणाले, “आजच्या काळात करिअरच्या विविध संधी विद्यार्थ्यांसमोर खुले आहेत. केवळ डॉक्टर, इंजिनिअर किंवा प्राध्यापक होणेच जीवनाचे उद्दिष्ट नसून, या व्यतिरिक्त देखील अनेक क्षेत्रांत प्रगतीची दारे उघडी आहेत. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून त्या दिशेने सातत्यपूर्ण मेहनत घ्यावी. नोकरी लागल्यानंतरही थांबू नये, तर आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी कसा करता येईल, याचा विचार करून समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा.” नानासाहेब वाघ यांनी पुढे सांगितले की, “तळागाळातील विद्यार्थ्यांना राष्ट्रसेवेच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण सर्वांनी जबाबदारीने प्रयत्न करायला हवेत. आपल्या गावाचा, कुटुंबाचा आणि संस्थेचा अभिमान वाढवणाऱ्या यशस्वी विद्यार्थ्यांची आवश्यकता देशाला आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी संस्था आणि महाविद्यालयाचा संपूर्ण परिवार नेहमीच पाठीशी उभा असून, कुठलीही अडचण येऊ नये म्हणून संस्थेकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी असते.” या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र चिंचोले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, “ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षा, विशेषतः यूपीएससी व एमपीएससीसारख्या प्रशासकीय परीक्षांबाबत अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांच्यासमोर असलेल्या संधी त्यांच्या पर्यंत पोहोचत नाहीत. ही दरी भरून काढण्यासाठी अशा कार्यक्रमांची गरज आहे.” प्रा. चिंचोले यांनी यशस्वी विद्यार्थ्यांची उदाहरणे देत प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या. दीपक कुमार या विद्यार्थ्याचे उदाहरण देताना ते म्हणाले की, “दिल्लीमध्ये चहाच्या टपरीवर काम करणारा दीपक कुमार याने अपार कष्ट घेत आयएएस झाल्याने त्याचा प्रवास प्रेरणादायी ठरतो.” त्यांनी एरंडोल तालुक्यातील ताडेबामणे गावचे राजेश पाटील यांचे उदाहरण दिले. “एकेकाळी पाव विकणारा हा तरुण सध्या आयएएस अधिकारी म्हणून देशसेवा करत आहे,” असे सांगून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या जिद्दीचे कौतुक केले. त्यांनी कमलेश पारेख, रमेश घोलप आणि अन्सार शेख यांसारख्या विद्यार्थ्यांचेही उल्लेख केले, जे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून आले असूनही आयएएस परीक्षा उत्तीर्ण होऊन आज देशासाठी महत्त्वाची कामगिरी बजावत आहेत. तसेच अरुणीमा सिन्हा या विद्यार्थिनीचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, “रेल्वे अपघातात पाय गमावलेल्या अरुणीमाने शारिरीक मर्यादा झुगारून जगातील सर्वोच्च शिखरे सर केली आणि माऊंट एव्हरेस्टवर भारताचा झेंडा फडकावून देशाचे नाव उज्ज्वल केले.” प्रा. चिंचोले यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आपली आर्थिक परिस्थिती, शारीरिक अपंगत्व, किंवा सामाजिक मर्यादा ही आपल्याला थांबवू शकत नाहीत, जर मनात दृढ निश्चय असेल आणि दिशादर्शक योग्य मार्गदर्शन मिळाले तर कोणत्याही अडथळ्यावर मात करता येते.” या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासाहेब व्ही.टी जोशी, संचालक आप्पासाहेब सतीश चौधरी, माजी प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले यांची उपस्थिती लाभली. सर्व मान्यवरांनी आपल्या उपस्थितीत कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले आणि विद्यार्थ्यांना अभ्यास, स्पर्धा परीक्षा, करिअर नियोजन या सर्व बाबींमध्ये मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष प्रा. सी.एन. चौधरी यांनी केले. त्यांनी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाचे उद्दिष्ट स्पष्ट करताना सांगितले की, “आम्ही केवळ भूतकाळातील विद्यार्थी म्हणून नव्हे तर वर्तमान आणि भविष्यकालीन पिढीसाठी देखील काम करत आहोत. आपल्या अनुभवातून नव्या पिढीला योग्य दिशा देणे ही आमची जबाबदारी आहे.” कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन डॉ. जे. डी. गोपाळ यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अँडव्होकेट महेश पवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून सहकार्य केले. हा कार्यक्रम केवळ एक व्याख्यान सत्र नव्हता, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा, त्यांना त्यांच्या ध्येयाच्या दिशेने प्रेरित करणारा आणि वास्तवाशी जोडणारा एक प्रभावी उपक्रम होता. विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन आपल्या जीवनातील संघर्षांवर मात करत यशाच्या शिखराकडे वाटचाल करावी, हीच अपेक्षा सर्व मान्यवरांनी व्यक्त केली. शिक्षण ही केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नसून समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. ही जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे आणि त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून देणे हे अशा कार्यक्रमांचे मोलाचे वैशिष्ट्य ठरते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!