‘नीलम मिसळ’चा थंड पाण्याचा माणुसकीचा घोट : कै. दिलीप मराठे यांचे सामाजिक भान आजही कायम

0

पाचोरा – शहर हे केवळ व्यापार, शिक्षण आणि सांस्कृतिक चळवळींसाठी ओळखले जात नाही, तर येथील काही नावे अशी आहेत, ज्यांनी आपली सेवा, आपले विचार आणि कार्याच्या माध्यमातून समाजाच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे. अशाच व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते – पाचोरा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष कै. दिलीप मराठे. & कैलासशेठ मराठे यांनी सार्वजनिक जीवनात आपली जबाबदारी प्रामाणिकपणे निभावत स्व. दिलीपशेठ यांनी अनेक वर्षे राजकारणात आणि समाजकारणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांचा राजकीय प्रवास जितका ठाम आणि स्पष्ट होता, तितकीच त्यांची वैयक्तिक व पारिवारिक परंपरा देखील समाजाभिमुख होती. आज त्यांचे पुतणे आणि कुटुंबीय त्यांची ही परंपरा ‘नीलम हॉटेल’च्या माध्यमातून जपताना दिसून येतात.
छत्रपती शिवाजी महाराज चौकात वसलेले ‘नीलम हॉटेल’ हे केवळ एक खाद्यगृह नसून पाचोऱ्याच्या खाद्यसंस्कृतीचे अविभाज्य अंग बनले आहे. या ठिकाणी मिळणारी मिसळ, रस्सावडा, गरमागरम भजी, कुरकुरीत कचोरी आणि विविध नाश्त्यांचे पदार्थ यांची चव इतकी खास असते की एकदा चाखले की पुन्हा पुन्हा या हॉटेलला भेट द्यावीशी वाटते. ग्राहक वर्गाचा ओघ दिवसेंदिवस वाढतच असून, खवय्यांसाठी हे निलम हॉटेल म्हणजे एक खाद्ययात्रेचे प्रमुख स्थान झाले आहे. मात्र, या सर्व व्यवसायिक यशाच्या पलीकडे एक मोठी सामाजिक जाणीवदेखील दिसून येते — आणि ती म्हणजे ग्राहकांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी थंड पाण्याची मोफत उपलब्धता.
सध्या उन्हाच्या झळा अंगाची लाहीलाही करतात. तापमान प्रचंड वाढल्याने पिण्याच्या पाण्याची मागणी वाढलेली आहे. मात्र अनेक भागात सार्वजनिक पाणपोया बंद अवस्थेत आहेत. नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे किंवा देखभाल अभावी त्या ‘दृष्टीआड आणि शिळोप्याच्या’ विषय बनलेल्या आहेत. या पाण्याच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर मराठे कुटुंबीयांनी एक आदर्श निर्माण केला आहे. ‘नीलम हॉटेल’मध्ये आलेल्या प्रत्येक ग्राहकाच्या टेबलवर स्वतंत्र थंड पाण्याचा जार ठेवण्यात आलेला आहे. यामुळे कोणत्याही व्यक्तीस पाणी विचारण्याची किंवा वेटरची वाट पाहण्याची गरज राहत नाही. विशेष म्हणजे हेच पाणी नुसते ग्राहकांपुरतेच मर्यादित न ठेवता, हॉटेल बाहेरून येणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी सुद्धा खुले ठेवण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक हा पाचोऱ्यातील एक अत्यंत गजबजलेला भाग आहे. दुपारच्या वेळेस येथे रस्त्यावरून चालणाऱ्यांची संख्या मोठी असते. या गर्दीच्या वेळी कित्येक वेळा नागरिकांना तहान लागते, परंतु आसपास पाण्याची उपलब्धता नसते. हे ओळखून ‘नीलम हॉटेल’च्या प्रवेशद्वारावर थंड पाण्याचा मोठा जार ठेवण्यात आला असून ‘पिण्याचे पाणी’ अशी स्पष्ट सूचना लावण्यात आली आहे. त्यामुळे कोणताही भेद न ठेवता, कोणतेही आर्थिक शुल्क न घेता पाण्याचा थंड घोट घेण्यासाठी अनेक जण येथे थांबतात. हे दृश्य म्हणजे केवळ सेवा नाही, तर माणुसकीचा खरा अर्थ काय असतो याचे सजीव उदाहरण आहे.
हॉटेल चालवताना व्यवसायिक दृष्टीकोन ही आवश्यक बाब असतेच, पण या व्यवसायात माणुसकी आणि सामाजिक भान जपणं हे अधिक महत्त्वाचं ठरतं. मराठे परीवारातील सदस्य विक्की हेच तत्व पाळत ग्राहकांसोबत नागरिकांच्या गरजांचीही काळजी घेतात. या निर्णयामागील प्रेरणा विचारली असता, त्यांनी सांगितले की, “पाण्याची तहान ही सर्वात मूलभूत गरज आहे. उन्हातान्हात एखाद्याला एखादा घोट थंड पाणी मिळालं, तर त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अवर्णनीय असतो. आम्ही हे कर्तव्य म्हणून नव्हे, तर माणूस म्हणून करत आहोत. आणि हीच आमच्या कुटूंबियांची शिकवण आहे”
आजच्या काळात अनेकदा आपल्या सोयीसाठी, आपल्या व्यवसायासाठी लोक समाजाचे भले विसरतात. पण पाचोऱ्यात ‘नीलम हॉटेल’ ही एक अशी जागा आहे जिथे माणुसकी अजूनही जिवंत आहे. अलीकडच्या काळात अनेक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्समध्ये पाण्याची विक्री केली जाते, पाण्याच्या बाटल्यांवर जादा पैसे घेतले जातात. मात्र इथे पाणी केवळ एक सेवा म्हणून नव्हे, तर मानवतेचा धर्म म्हणून मोफत पुरवले जात आहे.
या उपक्रमाबाबत पाचोऱ्याचे स्थानिक नागरिकही विशेष कौतुक करत आहेत. “ह्या दिवसांत तहान लागली तरी रस्त्यात थांबून पाणी मिळणं कठीण झालं आहे. पण नीलम हॉटेलसमोर गेलं की थांबून पाणी प्यायला मिळतं. तेही थंड! आणि कुणी काही विचारत नाही. खूप समाधान वाटतं,” असे अनेकांनी सांगितले. काही ज्येष्ठ नागरिकांनी तर हे कार्य ‘नित्य सेवा’ म्हणून गौरवले आहे.हॉटेलमध्ये दररोज शेकडो ग्राहक नाश्त्याकरिता येतात. सकाळी सात वाजल्यापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत हा हॉटेल व्यवसाय सुरु असतो. मिसळ व रस्सावडा हे इथले मुख्य आकर्षण असून त्यांच्या जोडीला कधी कचोरी, कांदाभजी, बटाटावडा अशा पारंपरिक पदार्थांची रेलचेल असते. परंतु ही खाद्यसेवा जशी महत्त्वाची आहे, तशीच ही ‘पाण्याची सेवा’ आता हॉटेलच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनली आहे.सध्याच्या काळात समाजात पाचोरा शहरात बोगस पत्रकार, त्यांच्यासोबत एका पत्रीकेवर न बोलता जाणारे विशेष म्हणजे मटणाचे जेवण असले तर तब्बल एक दिवस आधी उपाशी राहणारे पोटभरू रिकामटेकडे त्यांच्या हॉटेलवर तासंतास बसून राहतात ग्राहकांना त्रास देताना दिसतात. त्यांच्यासारख्या पोटभरुंना डावलून ‘नीलम हॉटेल’मध्ये मात्र जबाबदारीने आणि शांततेने हे कार्य सुरू आहे. ही जबाबदारी केवळ व्यवसायपुरती नाही, तर एक व्यापक सामाजिक बांधिलकी आहे. अनेक ठिकाणी ‘CSR’ (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) अंतर्गत अशा सेवा दाखवण्याचा प्रयत्न होतो, पण इथे कोणताही गवगवा न करता ही जबाबदारी वर्षानुवर्षे निभावली जात आहे.
‘नीलम हॉटेल’ आणि मराठे कुटुंबीयांनी आज केवळ आपल्या हॉटेलचे नाव नाही, तर आपल्या परिवाराच्या मूल्यांचा वारसा आणि पाचोऱ्याच्या सामाजिक चेहऱ्याची उजळणी केली आहे. त्यांच्या या सेवाकार्याची नोंद स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था आणि इतर व्यापाऱ्यांनी सुद्धा घेण्याची गरज आहे. समाजोपयोगी उपक्रम राबवण्याच्या दृष्टिकोनातून हे उदाहरण इतरांना सुद्धा प्रेरणा देणारे ठरावे.
शेवटी एवढेच म्हणता येईल की, उन्हाच्या झळा असोत किंवा समाजाच्या उदासीनतेची सावली, ‘नीलम हॉटेल’मधील पाण्याचा एक थंड घोट आणि मिसळचा एक गरम घास अनेकांच्या मनात एकच विचार जागवतो — “माणुसकी अजूनही जिवंत आहे!”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here