“अस्थी विसर्जन न जलात… तर जीवनदायी वृक्षात – स्व. शंकरराव चौधरी यांच्या स्मृतीला संस्कारांचा सजीव अंजन!” – गणेशअण्णा परदेशी (माजी नगराध्यक्ष- भडगाव न पा )

Loading

भडगाव – शहरातील एक आदर्श, निष्ठावान, कार्यनिष्ठ आणि समाजशील व्यक्तिमत्त्व, मा. नगरसेवक मनोहरभाऊ चौधरी यांचे पिताश्री स्व. शंकर राघो चौधरी (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने दि. ४ मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता शांत निधन झाले. त्यांच्या निधनाने चौधरी कुटुंबीयांप्रमाणेच भडगाव शहरासह पंचक्रोशीतील सर्वच समाजबांधवांना हळहळ वाटत आहे. त्यांचा दशक्रिया विधी १३ मे रोजी, तर गंधमुक्ती व उत्तरकार्याचा कार्यक्रम १६ मे रोजी नियोजित असून, त्या दिवशी एक नवा सामाजिक आदर्श घालून देणारा उपक्रमही चौधरी परिवाराच्या वतीने राबविण्यात येणार आहे.
स्वर्गीय शंकर राघो चौधरी — ज्यांना आप्पासाहेब या नावाने समस्त पंचक्रोशीत ओळखले जात होते — हे फक्त एक शासकीय कर्मचारी नव्हते. त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज मंडळात सेवा बजावताना आपल्या कर्तव्यात कधीही कसूर केली नाही, पण याहीपलीकडे जाऊन त्यांनी आपल्या जीवनात दुग्ध व्यवसाय, समाजसेवा आणि कुटुंब संस्कार यांचा त्रिवेणी संगम साधला. एकीकडे नोकरीचे काटेकोर पालन, तर दुसरीकडे पहाटे ४ वाजता उठून गावातील लोकांसाठी दुधाचा पुरवठा हे त्यांचे दशकांपासूनचे नित्यकर्म होते. त्यांच्या जीवनशैलीत एक विलक्षण शिस्त होती. कोणतीही विश्रांती न घेता, कधीही थकवा न दर्शवता, त्यांनी केवळ आपलेच नव्हे, तर अनेकांच्या आयुष्याचा प्रवास सुकर केला. सरकारी नोकरी करताना ज्या गावाला वीजपुरवठा व्हावा यासाठी त्यांनी अनेक वेळा स्वतःची सुट्टी खर्च करून, पावसात, उन्हात, वादळात काम केले. अनेक गरजू आणि गरीब कुटुंबांच्या घरात त्यांनी स्वतःहून जाऊन वायरिंग केले, फ्यूज सुधारले, आणि घर उजळवले — तेही कधी मोबदल्याची अपेक्षा न ठेवता.
त्यांचं आयुष्य केवळ कर्तव्यनिष्ठेपुरतं मर्यादित नव्हतं, तर त्यांनी आपल्या कुटुंबाला सांभाळताना ‘कर्तव्य + संवेदना + सेवा’ यांचा आदर्श घालून दिला. त्यांनी केवळ कुटुंब सांभाळलं नाही, तर त्यांचं घडवणं, शिक्षण, सुसंस्कार आणि आत्मविश्वास देणं — हे कार्यही निष्ठेने पार पाडलं. त्यांच्या चार अपत्यांमध्ये दोन मुलगे आणि दोन कन्यांचा समावेश असून सर्वांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा आदर्श घेत आपल्या जीवनात यश प्राप्त केलं आहे. त्यांचे ज्येष्ठ पुत्र मा. नगरसेवक मनोहर शंकर चौधरी हे आज भडगाव शहराच्या राजकारणात सामाजिक जाणिवेचे भान बाळगणारे आणि अत्यंत मदतीस तत्पर म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या वडिलांचा वारसा जपत समाजकार्य, आधुनिक व्यवसाय व्यवस्थापन आणि सामान्यांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून दिले आहे. त्याचबरोबर त्यांचे दुसरे पुत्र प्रा. प्रेमचंद शंकर चौधरी यांनी शिक्षक म्हणून कार्य करताना विद्यार्थ्यांमध्ये संस्कार रुजविण्याचे कार्य सुरु ठेवले आहे. त्यांच्या कन्यांनी देखील आपल्या वडिलांचे संस्कार, आत्मभान आणि सहकार्य यांचा प्रभाव घेत, उच्च शिक्षण घेतले आणि आपल्या संसारात यशस्वीपणे स्थिरावले. या मुलीही आपल्या वडिलांच्या प्रत्येक जबाबदारीत खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या. या सगळ्या गोष्टींमधून अप्पासाहेब शंकरराव चौधरी यांची एक उत्तम ‘पिता’ म्हणून असलेली भूमिका स्पष्ट होते. स्व. आप्पासाहेब शंकरराव चौधरी यांनी समाजासाठी राबवलेल्या अनेक कार्यांपैकी सर्वाधिक स्तुत्य बाब म्हणजे त्यांचं सुसंस्कृत विचार आणि मूल्यांचा वारसा पुढे नेण्यावर असलेला विश्वास. त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या अस्थींचं विसर्जन जलप्रवाहात न करता, भडगाव नगरपालिकेच्या ऑक्सिजन पार्क परिसरात नियोजित विपश्यना केंद्राजवळ वड, पिंपळ आणि उंबर या तीन पवित्र वृक्षांच्या मुळाशी त्यांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात येणार आहे. या वृक्षांची संपूर्ण जबाबदारी आणि संगोपनही चौधरी कुटुंबाच्या वतीनेच पार पडणार आहे. या अनोख्या निर्णयामुळे चौधरी कुटुंबीयांनी केवळ पर्यावरण रक्षणाचे भान जपलेले नाही, तर एक आदर्श पायंडा पाडला आहे की, आपल्या प्रिय व्यक्तीच्या आठवणी कायम ठेवण्यासाठी नैसर्गिक व सकारात्मक उपायही शक्य आहेत. पंचक्रोशीत या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक जण या संकल्पनेने प्रेरित होऊन अशा प्रकारचे पर्यावरणाभिमुख स्मृतीचिन्ह पुढे राबविण्याच्या विचारात आहेत.
स्व अप्पासाहेब शंकरराव चौधरी यांचा जीवनप्रवास केवळ त्यांच्या कुटुंबापुरता मर्यादित नव्हता. गावातील प्रत्येक मोठ्या सण-उत्सवात, गणेशोत्सवात, धार्मिक कार्यक्रमांत आणि सामाजिक प्रसंगात त्यांची उपस्थिती ही अत्यंत सकारात्मक उर्जा देणारी असायची. त्यांच्या सल्ल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जायचा नाही. गावातील वयोवृद्ध आणि तरुण वर्गात एक आदराचे स्थान त्यांनी मिळवले होते.त्यांचा स्वभाव अत्यंत सौम्य, नम्र, पण ठाम होता. त्यांनी जीवनात कोणतीही तक्रार न करता, कोणत्याही परिस्थितीत हसतमुख राहून जगण्याचा संदेश दिला. त्यांनी समाजातील भेदाभेद पुसून टाकत सर्वांशी समता, स्नेहभाव आणि आपुलकीने वागण्याचे तत्त्व आयुष्यभर पाळले.
चौधरी परिवारातील सदस्यांची श्रद्धा, संस्कार आणि कृतज्ञता त्यांच्या स्मृतीस अर्पण करताना दिसते. त्यांच्या जाण्यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. ते फक्त एक वडील नव्हते, ते एक प्रेरणास्रोत होते, एक कार्यकर्ते होते, एक शिक्षक होते आणि समाजाला मार्ग दाखवणारे दीपस्तंभ होते. नामदेव राघो चौधरी
तुकाराम राघो चौधरी
नारायण राघो चौधरी
मनोहर शंकर चौधरी (मा. नगरसेवक)
प्रा. प्रेमचंद शंकर चौधरी
समस्त चौधरी परिवार, भडगाव हे आप्पा साहेबांच्या जाण्याने चौधरी कुटुंबासाठी अपूरणीय पोकळी निर्माण झाली आहे पण त्यांच्या संस्कारांची पायाभरणी इतकी भक्कम आहे की, त्यांचा वारसा, त्यांचे विचार आणि त्यांच्या आठवणी चौधरी कुटुंबासह संपूर्ण भडगावकरांच्या मनात अखंडपणे जिवंत राहतील.
आप्पासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली! –
शब्दांकन – गणेशअण्णा परदेशी
( मा. नगराध्यक्ष भडगाव नगरपालिका)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here