![]()
पाचोरा –देशात युद्धजन्य परिस्थितीचे सावट असताना, प्रत्येक नागरिक देशप्रेमाने ओतप्रोत भरलेला आहे. सीमेवरील सैनिकांसाठी समाजातील अनेक लोक स्वतःहून आपली आरक्षित तिकिटं देऊन मदतीचा हात पुढे करत आहेत. परंतु अशा संवेदनशील काळातसुद्धा काही लाचार, बेजबाबदार अनधिकृत व्यक्ती आपली माणुसकी विकून केवळ पैशासाठी देशाच्या रक्षणासाठी झटणाऱ्या जवानांची सुद्धा लुबाडणूक करत आहेत.
पाचोरा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर बसविण्यात आलेल्या रेल्वे तिकिट एजंट संदर्भात यापूर्वीही अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. या एजंटकडून वाजवीपेक्षा जास्त रक्कम आकारली जात असल्याची गंभीर माहिती पत्रकार संदीप महाजन यांच्या माध्यमातून समोर आली होती. विशेषतः मतिमंद विद्यार्थ्यांना आणि गरजू प्रवाशांना अधिकच त्रास देण्याचा प्रकार याआधीही उघडकीस आला होता. पत्रकार संदीप महाजन यांच्या तक्रारीनंतर आरपीएफ दलाने तात्काळ कारवाई करत या अनधिकृत एजंटवर गुन्हा दाखल केला होता. ही कारवाई संपूर्ण शहरात कौतुकाचा विषय ठरली होती.
पण तरीही या एजंटच्या मनात भीती निर्माण झाली नसल्याचे दिसून येते. कारण काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा त्याच अनधिकृत एजंटने भारतीय केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (CISF) जवान प्रदीप बाविस्कर यांची खुलेआम फसवणूक केली आहे. पिंपरी सार्वे येथील राहणारे जवान प्रदीप बाविस्कर यांना त्यांच्या सेवास्थळी तातडीने परतण्याचा आदेश मिळाल्यानंतर त्यांनी रेल्वे प्रवासासाठी तिकिट काढण्याचा प्रयत्न केला. या घाईच्या परिस्थितीत पाचोऱ्यातील अनधिकृत एजंटकडे त्याने मदतीची विनंती केली. मात्र देशसेवेसाठी जाणाऱ्या या जवानाचा मोबदला या एजंटने तब्बल 1600 रुपयांची लुबाडणूक करून दिला.
सैनिक प्रदीप बाविस्कर यांनी पत्रकार संदीप महाजन यांच्याशी संवाद साधताना सांगितले की, संबंधित एजंटने IRCTC चा तिकीट बुकिंग आयडी बेकायदेशीरपणे वापरत त्यांच्या नावाने तिकीट काढण्याचे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात कोणतेही तिकीट न देता सैनिकाची फसवणूक करण्यात आली. इतकेच नाही तर संबंधित एजंटने या जवानाचा मोबाईल नंबर ब्लॅकलिस्टमध्ये टाकला आणि त्याच्या कोणत्याही फोन किंवा संवादाला प्रतिसाद दिला नाही.
आज देशाची परिस्थिती गंभीर आहे. सीमारेषेवर तणाव आहे. सरकारकडून प्रत्येक जवानाला आदेश देण्यात आले आहेत की, तो आपल्या युनिटमध्ये तातडीने हजर व्हावा. त्यामुळे अनेक सैनिक आपल्या घरी असताना जे काही साधन उपलब्ध असेल त्याद्वारे प्रवास करत आहेत. देशभरात तिकीटांच्या रांगेत सर्वसामान्य नागरिक स्वतःहून सैनिकांना प्राधान्य देत आहेत, त्यांच्यासाठी आपल्या जागा रिकाम्या करत आहेत, काही जण तर स्वतःची आरक्षित सीट देऊन सैनिकांना बसवतात – ही आहे खरी देशभक्ती! पण याचवेळी हे अनधिकृत एजंट मात्र याच सैनिकांना लुबाडून स्वतःचे खिसे भरत आहेत.
याप्रकरणी पत्रकार संदीप महाजन यांनी पुन्हा एकदा सक्रिय भूमिका घेतली असून संबंधित एजंटच्या विरोधात पुन्हा कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी सांगितले की, “याआधीही याच एजंटविरोधात तक्रार करून आरपीएफच्या माध्यमातून गुन्हा दाखल केला होता. आता पुन्हा एकदा देशसेवेसाठी निघालेल्या जवानाशी फसवणूक झाल्याचे समजल्यावर याचा गंभीरपणे पाठपुरावा करू
या प्रकरणावरुन आणखी एक बाब समोर आली आहे की, या एजंटकडून सतत असेच प्रकार घडत आहेत. तात्काल आरक्षणाच्या नावाखाली गरजू व्यक्तींकडून वाजवीपेक्षा अधिक रक्कम आकारली जाते, तरीही तिकीट दिले जात नाही, काही वेळा बोगस पावत्या दिल्या जातात.विशेष म्हणजे, या एजंटकडे अधिकृत रेल्वे एजन्सीची परवानगी देखील नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे.
हे सर्व प्रकार पाहता रेल्वे प्रशासन, आरपीएफ आणि स्थानिक पोलीस यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. शहरात असे अनधिकृत एजंट जर उघडपणे कार्यरत असतील, तर सामान्य प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. देशासाठी झटणाऱ्या सैनिकांनाही जर या ठिकाणी लुटले जात असेल, तर हे पूर्ण समाजासाठी लाजिरवाणं आहे.
या प्रकरणाची अधिक सखोल चौकशी होण्यासाठी आणि याला कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी पत्रकार संदीप महाजन यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तक्रार दिली आहे.
यावेळी राजकीय ,सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि पत्रकार संघटनांनी देखील या प्रकारणी दखल घेणे गरजेचं आहे भारतीय सैनिकांबाबत समाजात प्रचंड आदर असून, त्यांना कोणताही त्रास देणं म्हणजे देशद्रोहाचं पातकच म्हणावं लागेल
शेवटी एकच प्रश्न –
जेव्हा देशासाठी लढायला जाणाऱ्या वीर सैनिकालाही तिकीट एजंटकडून लुबाडलं जातं ही विषवल्ली किती खोलवर मुळं रोवली असती?
आज वेळ आहे की, अशा एजंटांविरोधात कठोर कारवाई करून समाजात एक उदाहरण निर्माण व्हावं. आणि सैनिकाला मदत करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





