![]()
अमळनेर — येथून गलवाडेकडे जाणाऱ्या राज्य मार्ग क्र. ६ वरील मुंदडा नगर २ परिसरात गंभीर स्वरूपाचा खड्डा पडल्याने नागरिकांचे आरोग्य आणि जीवित सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संदीप घोरपडे यांच्या नेतृत्वाखालील अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना सादर केलेल्या निवेदनाद्वारे या खड्ड्याची तातडीने दुरुस्ती करण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे.
राज्य मार्ग क्र. ६ हा अमळनेर शहर आणि गलवाडे, झाडी, भरवस, लोन पंचम, एकलहरे, शहापूर अशा अनेक गावांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे. या मार्गावरून दररोज हजारो प्रवासी शाळा-महाविद्यालये, बाजारपेठा, कार्यालये, दवाखाने, शेती व्यवसायासाठी ये-जा करत असतात. तसेच अमळनेर आगाराच्या बसगाड्याही याच मार्गावरून शिंदखेडा, नरडाणा, दोंडाईचा, बेटावदकडे जातात. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक दिवसेंदिवस वाढत आहे.
मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मुंदडा नगर २ च्या पुढे, श्री. केले सरांच्या घराजवळील वळणावर एक मोठा खड्डा पडलेला असून, गेल्या काही दिवसांत वाळवाच्या व अवकाळी पावसामुळे या खड्ड्याचा आकार आणखी वाढलेला आहे. खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना त्याचा अंदाज न लागता अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. दुचाकी, चारचाकी, शाळेच्या वाहने आणि रुग्णवाहिका यांना या ठिकाणी तारेवरची कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. काही अपघातांच्या घटना नुकत्याच घडल्याचाही नागरिकांनी उल्लेख केला आहे.
या रस्त्याचे १० वर्षांसाठी देखभाल व दुरुस्तीचे कंत्राट ठेकेदाराला दिलेले असूनही प्रत्यक्षात कुठलीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा निष्काळजीपणा असून ठेकेदाराकडून तत्काळ योग्य ती दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत ठेकेदारावर कारवाईची मागणी केली आहे.
सदर निवेदनाची त्वरित दखल न घेतल्यास विभागीय कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.
सदर निवेदनाद्वारे काँग्रेसने प्रशासनासमोर स्पष्ट संदेश दिला आहे की, “रोजच्या प्रवासात रस्त्यांवर जीव धोक्यात येणं हा काही भाग्याचा प्रसंग नसून प्रशासनाच्या हलगर्जीपणाचं दुष्परिणाम आहे.” काँग्रेसने रस्त्यावर नागरिकांना वाचवण्याऐवजी केवळ फायली ढकलणाऱ्या यंत्रणांवरही टीका केली आहे.
या निवेदनात संदीप घोरपडे यांच्यासह या निवेदनावर बी के सुर्यवंशी
भागवत गुरुजी शरद पाटील भूषण निकम
मनोज पाटील गोपाल बडगुजर यु पि पाटील
प्रताप नगराज पाटील
तूषार संदानशिव यांच्यासह तालुक्यातील अनेक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, NSUI व इतर घटक संघटनांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदर समस्या केवळ स्थानिक नसून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरत आहे.
सामान्य नागरिकांचे मतही याबाबत ठाम असून, रस्त्याच्या देखभालीत हलगर्जीपणा झाल्यास तो प्रशासनाचा गंभीर अपयश ठरेल. काही नागरिकांनी तर सोशल मीडियावर खड्ड्याचे फोटो शेअर करून प्रशासनाच्या कार्यक्षमतेचा समाचार घेतला आहे. विनोदी भाष्यांमधूनही त्यांनी प्रशासनाच्या ढिसाळपणावर उपरोधिक टीका केली आहे.
या पार्श्वभूमीवर, प्रशासनाने तातडीने जागे होणे गरजेचे आहे. एकीकडे राज्यभर रस्ते सुधारण्याच्या घोषणा होत असताना दुसरीकडे असे धोकादायक खड्डे अजूनही दुरुस्त न होणे म्हणजे शासकीय यंत्रणेच्या वचनबद्धतेवरच प्रश्न निर्माण करणारे आहे. सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा परिस्थितीत ठेकेदार व प्रशासनाला जबाबदार धरून तातडीने उपाययोजना करणे ही वेळेची गरज आहे.
तसे न झाल्यास, जनतेचा रोष प्रचंड स्वरूपात उफाळून येईल, आणि त्याचे पडसाद केवळ रस्त्यावर नव्हे तर निवडणुकांमध्येही उमटतील, असा स्पष्ट इशारा काँग्रेसच्या या निवेदनाने प्रशासनाला दिला आहे. त्यामुळे आता संपूर्ण अमळनेर तालुक्याचे लक्ष आहे ते — प्रशासन या निवेदनाची किती गांभीर्याने दखल घेते आणि किती लवकर ठोस कृती करते
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.





