शैक्षणिक व सामाजिक सेवेस समर्पित हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व – नानासाहेब शांताराम चौधरी सर

गिरड (ता. भडगाव) या जळगाव जिल्ह्यातील एका लहानशा खेडेगावात १ जून १९५८ रोजी जन्मलेल्या शांताराम सुकदेव चौधरी सर यांचा जीवनप्रवास हा संघर्ष, मेहनत, शिक्षण व समाजसेवेचा आदर्श घालून देणारा आहे. एका सर्वसामान्य शेतमजुराच्या घरात जन्मलेले चौधरी सर यांचे बालपण अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गेले. घरात अठराविश्व दारिद्र्य, वडिलांचे लहानपणीच निधन, आणि या सगळ्यांत त्यांच्या मातोश्री – स्वर्गीय रुखमाबाई चौधरी यांनी अत्यंत धैर्याने संपूर्ण कुटुंबाचा आधार घेतला. अशा परिस्थितीत तीन मुली आणि दोन मुलांना शिक्षित करण्याचा महान कार्यभाग त्या मातोश्रींनी पार पाडला, ज्यामुळे शांताराम चौधरी सर यांना शिक्षणाची गंगा लाभली.
श्री नानासाहेब शांताराम चौधरी सर यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण गिरड येथील ‘जवाहर हायस्कूल’मध्ये झाले. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर आर्थिक अडचणी, गरिबी, संसाधनांचा अभाव या गोष्टी आडव्या येत असतानाही त्यांनी शिक्षणाची गाठ सोडली नाही. अकरावी आणि बारावीचे शिक्षण पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी बी.ए. पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण ‘आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, पाचोरा’ येथे यशस्वीरित्या पूर्ण केले. उच्चशिक्षणासाठी त्यांनी प्रताप महाविद्यालय, अमळनेर येथून अर्थशास्त्र विषयात एम.ए. ही पदवी घेतली. त्यानंतर लातूर येथे जाऊन बी.एड. पूर्ण केले.
एम.ए., बी.एड. झाल्यानंतर त्यांनी आपल्या मातृसंस्थेतच – श्री गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे उपशिक्षक म्हणून कार्यारंभ केला. याच संस्थेत त्यांनी तब्बल तीस वर्षे सेवा करताना शिक्षक म्हणून केवळ अध्यापन नव्हे तर संस्कार, नेतृत्व, मार्गदर्शन या सर्व अंगांनी विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवले. अध्ययन व अध्यापनाच्या माध्यमातून त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांचे जीवन उजळवले. जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन केले. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात स्थान निर्माण करणे ही बाब चौधरी सरांनी आपल्या कृतीतून सिद्ध केली आहे.
विद्यालयीन कारकिर्दीत सांस्कृतिक विभागप्रमुख म्हणून त्यांनी १५ वर्ष कार्य केले. या कालखंडात वकृत्व, निबंध, वादविवाद, नृत्य, फॅन्सी ड्रेस अशा विविध स्पर्धांच्या आयोजनातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सादरीकरण कौशल्य, विचारप्रवृत्ती आणि नेतृत्वगुण विकसित करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. त्यांच्या प्रेरणेमुळे शाळेला अनेक जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय पारितोषिके मिळाली.
२००३ मध्ये संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष, आमदार आणि मार्गदर्शक स्वर्गीय आप्पासाहेब ओंकार नारायण वाघ यांनी श्री नानासाहेब शांताराम चौधरी सर यांना शिक्षक प्रतिनिधी संचालक म्हणून जबाबदारी दिली. पुढे नानासाहेब संजय वाघ यांच्या नेतृत्वात त्यांनी संचालक मंडळात कार्य केले. या काळात शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्राधान्य दिले. वरिष्ठ श्रेणीसाठी लागणारे ठराव, पदोन्नती, सोयीस्कर बदली अशा विविध समस्यांचे निवारण संस्थेच्या माध्यमातून करण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले. शिक्षकांचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी नेहमी पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि कर्मठ निष्ठा ठेवली.
शैक्षणिक कार्यासोबतच श्री नानासाहेब शांताराम चौधरी सर सामाजिक कार्यातही सक्रिय राहिले आहेत. पाचोरा शहर तेली समाज संस्थेचे ते पाच वर्षे संचालक आणि २०२२ पासून सचिव पदावर कार्यरत आहेत. समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना मदत करणे, हे उपक्रम त्यांनी मनापासून राबवले. त्यांच्या प्रयत्नामुळे समाजात शैक्षणिक जागृती वाढली आहे.
श्री नानासाहेब शांताराम चौधरी सर हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे तालुका अध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष, तसेच नाशिक विभागीय उपाध्यक्ष म्हणून कार्यरत राहिले आहेत. शिक्षकांच्या समस्या मांडण्यासाठी, मागण्या मान्य करून घेण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषद कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने, उपोषणे केली, निवेदने दिली. आजही ते सामाजिक संघटनांमध्ये कार्यरत आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र ग्राहक पंचायत – तालुकाध्यक्ष, माऊली बहुउद्देशीय जेष्ठ नागरिक संघ – सहसचिव, माजी विद्यार्थी संघ, एम.एम. कॉलेज पाचोरा – सहसचिव, पाचोरा शहर तेली अध्यक्ष अशी पदे त्यांनी भूषवली आहेत.
शैक्षणिक जीवनात वेळोवेळी काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या कर्तृत्वासमोर नमते घेतले असून दिलगिरी व्यक्त करत माफी मागितल्याच्या घटना ही त्यांच्या कार्याच्या परिणामकारकतेचे द्योतक आहेत. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने शिक्षक म्हणून, समाजसेवक म्हणून आणि नेतृत्वकर्त्या व्यक्तिमत्त्व म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
श्री नानासाहेब शांतारामचौधरी सर यांचे कुटुंब शिक्षणप्रेमी आहे. त्यांच्या पत्नी सौ सुनीता चौधरी यांनीही त्यांच्या कार्यात पाठिंबा दिला असून त्यांची मुले मुलगी कुमारी ऋतुशा व मुलगा मोहित हे बी. कॉम्प्युटर, एमबीए पूर्ण करून पुणे येथे अभियंता म्हणून कार्यरत आहेत. मुलांमध्ये संस्कार, विचार आणि आत्मविश्वासाचे बीज त्यांनी लहानपणापासूनच पेरले.
श्री नानासाहेब शांताराम सर नेहमी सकारात्मक विचारांचा पुरस्कार करतात. “नेहमी चांगले विचार करा, आपले नेहमी चांगलेच होईल,” हा त्यांचा जीवनमंत्र आहे. आजच्या काळात अशा विधायक विचारसरणीचे नेतृत्व करणारे शिक्षक आणि समाजसेवक फार दुर्मिळ झाले आहेत.
आज १ जून रोजी श्री नानासाहेब शांताराम चौधरी सर यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, आणि निरंतर सामाजिक योगदानासाठी शुभेच्छा. ईश्वर त्यांना दीर्घायुष्य आणि अजूनही समाजासाठी, शिक्षणासाठी कार्य करण्याचे सामर्थ्य देवो, हीच प्रार्थना.

शब्दांकन
श्री संदीप महाजन, पत्रकार
संपादक – झुंज ध्येय न्यूज चैनल, पाचोरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here