समीक्षावाङ्मयाच्या उज्वल परंपरेचा सन्मान : प्राचार्य डॉ. किसनराव पाटील स्मृतीप्रित्यर्थ वाङ्मय पुरस्कारांचे वितरण ७ जून रोजी पुण्यात

पुणे – मराठी वाङ्मय क्षेत्रातील अभ्यासू, संशोधक, समीक्षक आणि विद्यार्थीप्रिय साहित्यिक म्हणून ख्यात पावलेले जळगाव येथील प्राचार्य डॉ. किसनराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय व खानदेश स्तरीय वाङ्मय पुरस्कार यंदा शनिवार दि. ७ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे येथील माधवराव पटवर्धन सभागृहात प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्कारांचे वितरण अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि नामवंत साहित्यिक भारत सासणे यांच्या शुभहस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. आर. एस. माळी असतील. यावेळी साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि.दा. पिंगळे हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
प्राचार्य डॉ. किसनराव पाटील हे केवळ एक समीक्षक नव्हते, तर समीक्षक म्हणून वाङ्मयविवेकाचा धांडोळा घेणारे, विचारशील, सर्जनशील आणि संशोधक वृत्तीचे व्यक्तिमत्त्व होते. साहित्य, समीक्षा, शिक्षण आणि चिंतन यांच्या चौकटीत त्यांचे कार्य लक्षणीय राहिले. त्यांच्या या महान योगदानाची स्मृती जागवण्यासाठी आणि त्यांच्या प्रेरणेतून नव्या पिढीला साहित्यप्रेमाचा वसा देण्यासाठी त्यांच्या माजी विद्यार्थ्यांनी ‘प्राचार्य डॉ. किसनराव पाटील ज्ञानपरंपरा’ या नावाने एक प्रेरणादायी चळवळ उभी केली आहे. ही ज्ञानपरंपरा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा पाचोरा-जामनेर यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी विभिन्न वाङ्मयप्रकारांतील नावाजलेल्या आणि सर्जनशील ग्रंथांना हे पुरस्कार दिले जातात. प्रत्येक वर्षी आलटून पालटून कथा, कादंबरी, कविता, बालसाहित्य, समीक्षा अशा वाङ्मयप्रकारांचा विचार करून मान्यवर ग्रंथांचे सन्मानपूर्वक गौरव करण्यात येतो. सन २०२१ पासून सुरू झालेली ही परंपरा आता राज्यभरातील साहित्यविश्वात मानाचे स्थान मिळवून आहे.
यंदा समीक्षा या वाङ्मयप्रकारासाठी सन २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या ग्रंथांचा विचार करण्यात आला. पुरस्कारांचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे : रोख ११,००० रुपये, स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ या पुरस्कारासाठी नांदेड येथील डॉ. सुरेश सावंत यांच्या बालसाहित्यातील नवे काही या ग्रंथाची निवड करण्यात आली आहे. सावंत हे मराठी बालसाहित्य क्षेत्रातील ख्यातनाम लेखक, समीक्षक व अभ्यासक आहेत. त्यांच्या अभ्यासपूर्ण दृष्टिकोनातून बालसाहित्याच्या नव्या प्रवाहांचा सखोल वेध घेणाऱ्या या ग्रंथाने समीक्षाक्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्याचप्रमाणे यवतमाळ येथील डॉ. अनंता सूर यांच्या साहित्य, समाज आणि विचारधारा या ग्रंथालाही राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार असून, हा पुरस्कार वरील दोघांना विभागून दिला जाणार आहे. डॉ. सूर हे सामाजिक दृष्टिकोनातून साहित्यातील विचारप्रवाहांचा सूक्ष्मपणे शोध घेणारे समीक्षक म्हणून ओळखले जातात.
खानदेश स्तरीय पुरस्कार,रोख ५,००० रुपये,स्मृतीचिन्ह,शाल व श्रीफळ,या विभागासाठी जळगाव येथील डॉ. प्रकाश सपकाळे यांच्या समीक्षा विवेक या ग्रंथाची निवड झाली आहे. डॉ. सपकाळे हे बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा चिकित्सक अभ्यास करणारे आणि समीक्षेच्या पारंपरिक चौकटीतून नव्या धारणांचा शोध घेणारे समीक्षक म्हणून प्रसिद्ध आहेत.त्याचबरोबर साक्री येथील डॉ. नरेंद्र बापूजी खैरनार यांच्या मंचीय कवितेचा स्वरूपशोध या अभ्यासपूर्ण ग्रंथालाही खानदेश स्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे. या दोघा साहित्यिकांना हा पुरस्कार विभागून प्रदान केला जाईल.पुरस्कारांची प्रतिष्ठा वाढवणारी परंपरा २०२१ साली सुरू झालेल्या या पुरस्कार परंपरेत आतापर्यंत खालील साहित्यिकांचा गौरव करण्यात आला आहे : २०२१ – कथा वाङ्मय : मनोहर सोनवणे (पुणे), युवराज पवार ,२०२२ – कविता : पवन नालट (अमरावती), लतिका चौधरी (नंदूरबार), ऊषा हिंगोणेकर (जळगाव),२०२३ – कादंबरी : ज्ञानेश्वर जाधवर (पुणे), विलास मोरे (एरंडोल),२०२४ – बालसाहित्य : वीरभद्र मिरेवाड (नांदेड), प्रशांत असणारे (अकोला), चंद्रकांत भंडारी (जळगाव), सौ. नीता शेंडे (पाचोरा),या परंपरेतून साहित्याच्या विविध प्रांतातील नवविचार, सृजनशीलता आणि चिंतनशीलतेला उभारी देण्याचे काम सातत्याने होत आहे.या पुरस्कार समारंभाचे संयोजन महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाखा पाचोरा-जामनेर यांच्यातर्फे करण्यात आले आहे. पुरस्कार समारंभात उपस्थित राहण्याचे आवाहन पाचोरा शाखेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. वासुदेव वले व प्राचार्य डॉ. किसनराव पाटील ज्ञानपरंपरेचे प्रतिनिधी डॉ. अशोक कौतिक कोळी यांनी साहित्यप्रेमी, अभ्यासक, संशोधक, शिक्षक, विद्यार्थी आणि मराठी वाङ्मय क्षेत्रातील मान्यवरांना केले आहे. समीक्षावाङ्मय हे मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे आणि विचारपूस करणारे अंग आहे. या अंगातील उत्तम ग्रंथांचे आणि अभ्यासकांचे सन्मानपूर्वक गौरव करून ‘प्राचार्य डॉ. किसनराव पाटील वाङ्मय पुरस्कार’ मराठी वाङ्मय क्षेत्रातील एक उज्ज्वल दीपवत ठरले आहेत. ही परंपरा मराठी साहित्याला केवळ गौरव नव्हे, तर भविष्याच्या वाटचालीसाठी आधारस्तंभ ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here