पाचोरा महसूल यंत्रणेची तत्परता: अवकाळी संकटातही जनतेच्या सेवेसाठी सज्ज

0

पाचोरा –तालुका आणि परिसरात मागील अनेक वर्षांत कधीही न अनुभवलेले अवकाळी तुफानी वादळ, विजेचा कडकडाट आणि मुसळधार पावसाचे संकट दि.11जूनच्या संध्याकाळी अचानक कोसळले. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसानाचा सामना करावा लागला. या नैसर्गिक संकटाच्या पार्श्वभूमीवर प्रांत अधिकारी भूषण अहिरेसाहेब आणि तहसीलदार विजय बनसोडेसाहेब यांनी नेतृत्व करत महसूल विभागाची यंत्रणा रात्रीपासूनच युद्धपातळीवर कामाला लावली. या तातडीच्या कारवाईमुळे प्रशासनाच्या कर्तव्यपरायणतेचा एक आदर्श ठेवल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.
दिवस संपताना सायंकाळी अचानक आलेल्या गडगडाट वादळाने शहर आणि परिसरात अक्षरशः थैमान घातले. तासाभरात आकाश काळवंडले, गार वाऱ्याच्या झोतांनी झाडे उन्मळून पडली, काही ठिकाणी पत्रे उडाली, तर विजेचा कडकडाट इतका भीषण होता की अनेक ठिकाणी जनतेने घरात दिवा लावून देवपूजा केली.
या भयावह आपत्तीत नागरिकांच्या घरांचे, शेतांतील उभ्या पिकांचे, फळबागांचे, जनावरांच्या गोठ्यांचे, विद्युत वाहिन्यांचे, रस्त्यांचे, सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशा अराजक आणि गोंधळाच्या वातावरणात प्रांत अधिकारी भूषण अहिरेसाहेब आणि तहसीलदार विजय बनसोडेसाहेब यांनी वरीष्ठांच्या आदेशाची वाट न पाहता व कोणताही विलंब न करता महसूल विभागाच्या सर्व यंत्रणेला त्वरित अलर्ट केले. मध्यरात्रीच त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पाहणीसाठी तयारी सुरू केली. पहाटे उजाडायच्या आधीच पाचोरा तालुक्यातील विविध भागांत तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार यांच्यासह संपूर्ण महसूल यंत्रणा सज्ज झाली होती.
वादळामुळे संपूर्ण शहरात वीज पुरवठा खंडित झाला होता. मोबाईल टॉवर बंद पडल्यामुळे संपर्काची साधनेही जवळजवळ ठप्प झाली होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत महसूल कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून, चंद्रप्रकाशात आणि हातातील टॉर्चच्या मदतीने नुकसानग्रस्त भागांची पहाणी व मदत कार्य सुरू ठेवले. ही सेवा म्हणजे केवळ काम नव्हे, तर एक सामाजिक बांधिलकी होती.
या संकटात प्रांत अधिकारी भूषण अहिरे साहेब आणि तहसीलदार विजय बनसोडे साहेब हे स्वतः आपत्तीग्रस्त गावांमध्ये उतरले. त्यांनी पहाटेपासून न थकता विविध भागांची पाहणी केली, नागरिकांची माहिती घेतली, तातडीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. त्यांच्या उपस्थितीने महसूल कर्मचाऱ्यांमध्ये नवी ऊर्जा संचारली. अनेकांनी या अधिकाऱ्यांचे ‘फील्डमध्ये येणे’ हे वाखाणण्यासारखे असल्याचे नमूद केले.
महसूल विभागाने गावनिहाय विशेष पथके तयार करून नुकसानग्रस्त शेतांमध्ये, घरांमध्ये, शाळांमध्ये आणि गोठ्यांमध्ये जाऊन पाहणी केली. संबंधित तलाठ्यांनी डिजिटल फोटोंसह अहवाल तयार करण्याचे निर्देश पाळून ‘ई-पंचनामा’ प्रणालीच्या माध्यमातून माहिती संकलित करणे सुरू केले आहे आज-उद्या संध्याकाळपर्यंत अनेक प्राथमिक अहवाल तयार करण्यात येऊन तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे
वादळामुळे ज्या गावांमध्ये विजेचे खांब कोसळले, झाडे रस्त्यावर पडली, तिथे महसूल विभागाने महावितरण, वनविभाग, नगरपरिषद, आणि पोलिस प्रशासनाशी समन्वय साधून मार्ग मोकळा केला. हा समन्वय हीच या यंत्रणेची कामगिरी अधिक परिणामकारक बनवत होती. महसूल विभागाची तत्काळ आणि लोकाभिमुख कृती पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अनेक शेतकऱ्यांनी अशा प्रकारच्या संकटात प्रशासनाने पहिल्यांदाच एवढ्या वेगाने प्रतिसाद दिला असल्याचे नमूद केले. “अम्हाला वाटलं नुकसान गेला म्हणून काहीच होणार नाही, पण तहसीलदारसाहेब स्वतः येऊन पाहणी केली, फोटो घेतले, तेव्हा वाटलं की शासन खऱ्या अर्थाने सोबत आहे,” असे एक शेतकरी म्हणाला.
या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाच्या कार्यवाहीची माहिती ‘ध्येय न्यूज’सह इतर स्थानिक मीडियांनी दिल्यानंतर सोशल मीडियावर प्रशंसांचे मेघ गर्जन करू लागले.
“प्रांत अधिकारी अहिरे साहेब आणि तहसीलदार बनसोडे साहेब यांच्यासारखे अधिकारी असल्यामुळेच जनता निर्धास्त आहे,” अशा प्रतिक्रिया व्हायरल झाल्या. काहींनी तर फोटो शेअर करत महसूल कर्मचाऱ्यांना ‘आपत्तीतील देवदूत’ असे संबोधले.
या घटनांनंतर प्रांत कार्यालयात आढावा बैठक घेऊन अशा अनपेक्षित आपत्तींच्या वेळी अधिक कार्यक्षमतेने काम करता यावे यासाठी काही पुढाकार ठरवण्यात आले स्थानीक ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच यांच्याशी ‘आपत्ती पूर्व तयारी’वर नियमित बैठक.
‘ध्येय न्यूज’चे प्रतिनिधी विविध ठिकाणी महसूल यंत्रणेच्या कामकाजावर बारकाईने लक्ष ठेवून होते. प्रत्यक्ष पाहणी करताना अधिकारी व कर्मचारी जे पावसात भिजत, चिखलात चालत, घराघरांत पोहोचत होते – ते पाहून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, ती म्हणजे हे केवळ सरकारी कर्तव्य नव्हे, तर जनतेबद्दल असलेली जबाबदारीची जाणीव दिसुन आली.या अवकाळी तुफानाने जनतेला मोठा धक्का दिला असला, तरी महसूल विभागाच्या प्रामाणिक आणि तत्काळ प्रतिसादामुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना जागृत झाली.
प्रांत अधिकारी भूषण अहिरेसाहेब आणि तहसीलदार विजय बनसोडेसाहेब यांच्या नेतृत्वाखालील महसूल यंत्रणा ही नुकसानीच्या स्थळी ठिकठिकाणी पोहोणारी ‘जनतेच्या दु:खात सहभागी होणारी’ यंत्रणा आहे, हे या प्रसंगात स्पष्ट झाले. त्यामुळेच या विभागाचे मनापासून आभार मानणे ही सर्वसामान्यांची नैतिक जबाबदारी आहे.
ध्येय न्यूज & झुंज वृत्तपत्र परिवारातर्फे – पाचोरा महसूल विभागास सलाम!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here