भव्य तिरंगा रॅलीने पाचोराचा परिसर देशभक्तीच्या जयघोषाने दणाणला

0

Loading

पाचोरा – शहरात आज सकाळी देशभक्तीचा अद्वितीय जल्लोष पाहायला मिळाला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने “ऑपरेशन सिंदूर”च्या ऐतिहासिक यशाच्या निमित्ताने तसेच भारतीय स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून काढण्यात आलेली भव्य तिरंगा रॅली शहरभरात उत्साह, आनंद आणि अभिमानाची लहर निर्माण करून गेली. पहलगाम येथे घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 26 निर्दोष नागरिकांचा बळी गेल्यानंतर भारतीय लष्कराच्या शूर जवानांनी आणि भारत सरकारने अत्यंत धाडसाने “ऑपरेशन सिंदूर” ही मोहिम राबवून पाकिस्तानला ठोस प्रत्युत्तर दिले. या मोहिमेत अनेक जवानांनी शौर्याने लढत वीरमरण पत्करले. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि विजयाचा उत्सव साजरा करण्यासाठी भारतभर भाजपाच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. पाचोरा येथील तिरंगा रॅलीची सुरुवात एम. एम. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून सकाळी नेमक्या साडेआठ वाजता झाली. सुरुवातीपासूनच रॅलीत उत्साह ओसंडून वाहत होता. रॅलीमध्ये एम. एम. महाविद्यालय, श्री गो. से. हायस्कूल, कै. पी. के. शिंदे विद्यालय, नवीन माध्यमिक विद्यालय अशा शहरातील प्रमुख शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले. गणवेशातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, हातात तिरंगा, चेहऱ्यावर देशभक्तीचा उजाळा आणि घोषणांनी भारावलेले वातावरण पाहून रॅली एक वेगळेच दृश्य साकार करत होती. रॅलीला सुरुवात होताच “भारत माता की जय”, “वंदे मातरम्”, “वीर जवान तुझे सलाम” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शहरातील नागरिकांनी रॅलीला मोठा प्रतिसाद देत रस्त्याच्या कडेला उभे राहून सहभागींचे स्वागत केले. धर्मवीर छत्रपती संभाजी चौक, भडगाव रेल्वे भुयारी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मार्गक्रमण करत रॅली पुढे सरकली. रॅलीदरम्यान वातावरणात तिरंग्यांची उधळण आणि देशभक्तीपर गीतांचा गजर सुरू होता. अनेक विद्यार्थिनींनी भारत मातेची वेशभूषा परिधान केली होती, ज्यामुळे रॅलीत एक वेगळाच रंग भरला. रॅलीचे अंतिम ठिकाण होते हुतात्मा स्मारक. तिथे पोहोचल्यावर भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पूजनाचा मान पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, पिटीसीचे व्हाईस चेअरमन नानासाहेब विलास जोशी, गिरणाई पतसंस्थेचे चेअरमन सतीशबापू शिंदे, सतीशआप्पा चौधरी, किशोर संचेती, भाजप शहराध्यक्ष दीपक माने, व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष कांतीलालभाऊ जैन, रमेशशेठ वाणी, अनिल पाटील, डॉ. अनिल देशमुख, वीरेंद्र चौधरी, वासुदेवआण्णा महाजन, अशोक मोरे, विठ्ठल महाजन तसेच इतर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. पूजनावेळी उपस्थित सर्वांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आणि त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले. रॅलीच्या आयोजनात शिस्त आणि नियोजन यांचा उत्तम मिलाफ पाहायला मिळाला. संपूर्ण मार्गावर पोलिसांनी चौख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस निरीक्षक राहुल पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरक्षा व्यवस्था सुरळीत पार पडली. पत्रकार, विविध माध्यमांचे प्रतिनिधी, स्थानिक छायाचित्रकार रॅलीचे क्षण टिपण्यासाठी हजर होते. ही रॅली केवळ “ऑपरेशन सिंदूर”च्या विजयाचा उत्सव नव्हती, तर ती भारताच्या ऐक्याची, शौर्याची आणि देशभक्तीची सशक्त घोषणा होती. शाळा-महाविद्यालयांतील तरुणाईपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच वयोगटातील लोकांनी उत्स्फूर्त सहभाग देऊन एकतेचा संदेश दिला. सहभागी विद्यार्थ्यांनी व पालकांनी एकमुखाने सांगितले की अशा उपक्रमांमुळे देशाविषयीची निष्ठा आणि जबाबदारीची जाणीव वाढते. संपूर्ण शहरातून आज एकच संदेश गेला – “जवानांच्या त्यागाचे स्मरण ठेवून आपण सर्वजण देशाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध राहू.” रॅलीच्या यशस्वी आयोजनामुळे पाचोरा शहरात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. तिरंग्याच्या साक्षीने, घोषणांच्या गजरात आणि देशभक्तीच्या लाटेत ही रॅली हुतात्मा स्मारकात संपन्न झाली, मात्र तिचा उत्साह आणि अभिमान नागरिकांच्या मनात दीर्घकाळ घर करून राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here