आदिवासी विकासासाठी शिक्षणाची किल्ली : पीएम–उषा अंतर्गत पाचोरा महाविद्यालयात प्रभावी कार्यशाळा

0

Loading

पाचोरा – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत व पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथे पीएम–उषा योजनेच्या माध्यमातून “ट्रायबल कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, कौशल्य विकास आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती पोहोचवणे हा या कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील होते तर उद्घाटक म्हणून पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजयजी वाघ उपस्थित होते. उद्घाटनपर भाषणात नानासाहेब संजयजी वाघ यांनी आदिवासी समाजाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना विविध शासकीय योजना, शैक्षणिक संधी आणि आधुनिक सुविधा यांची माहिती देणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. शिक्षणाच्या माध्यमातूनच आदिवासी युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन ते स्वावलंबी बनू शकतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. शिरीष पाटील यांनी आदिवासी समाजासाठी केंद्र व राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेतला आणि शिक्षण, आरोग्य, रोजगार व कौशल्य विकास या क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या संधींचा योग्य वापर करण्याचे आवाहन केले. कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात प्रा. के. एफ. पवार, प्रकल्प समन्वयक, पीएम–उषा सॉफ्ट कॉम्पोनन्ट, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी “आदिवासी युवकांचा शाश्वत विकास” या विषयावर मार्गदर्शन करताना युवकांनी शिक्षणासोबत कौशल्याधारित प्रशिक्षण व स्वयंरोजगाराकडे वळावे, असे सांगितले. दुसऱ्या सत्रात डॉ. विशाल पराते, यू.वाय.सी.टी. सिनेट मेंबर, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी “आदिवासी नेते आणि त्यांचे योगदान” या विषयावर व्याख्यान देत आदिवासी समाजाच्या इतिहासातील व वर्तमानातील नेतृत्वाचे महत्त्व स्पष्ट केले. तिसऱ्या सत्रात प्रा. के. के. वळवी, एम.जे. महाविद्यालय, जळगाव यांनी “आदिवासी समाजाची दिशा व दशा” या विषयावर सविस्तर विचार मांडले तर प्रा. डॉ. दीपक मराठे, उपप्राचार्य, र. ना. भडगाव महाविद्यालय, भडगाव यांनी “सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट” या विषयावर व्याख्यान देत संवाद कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि रोजगारक्षमतेचे महत्त्व अधोरेखित केले. या कार्यशाळेत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. डब्ल्यू. एस. वले, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील, प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ, प्रा. एस. टी. सूर्यवंशी, कार्यशाळा समन्वयक डॉ. एस. बी. तडवी, सहसमन्वयक डॉ. वाय. बी. पुरी, सहसमन्वयक आर. बी. वळवी, डॉ. शारदा शिरोळे, प्रा. शरद पाटील, प्रा. अतुल पाटील, प्रा. स्वप्निल भोसले, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. अमित गायकवाड तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. के. एस. इंगळे यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. माणिक पाटील यांनी केले. एकूणच पीएम–उषा अंतर्गत आयोजित या कार्यशाळेमुळे आदिवासी समाजाच्या विकासासाठी शिक्षण व कौशल्य विकासाचे महत्त्व अधोरेखित झाले असून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यात ही कार्यशाळा उपयुक्त ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here