![]()
पाचोरा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा ध्यास घेतलेल्या पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या वतीने पुन्हा एकदा उल्लेखनीय उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या संचलित श्री गो.से. हायस्कूलच्या MCVC विभागाने टीम प्लस एच.आर. सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय रोजगार भरती मेळाव्याला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात तब्बल 122 विद्यार्थ्यांची मुलाखतीद्वारे निवड झाल्याने संस्थेच्या कार्याची पुन्हा एकदा प्रभावी छाप उमटली आहे. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेली एक अग्रगण्य संस्था म्हणून ओळखली जाते. केवळ शैक्षणिक गुणवत्तेवर भर न देता विद्यार्थ्यांना कौशल्याधारित शिक्षण, रोजगाराभिमुख प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष उद्योग क्षेत्राशी जोडण्याचे काम संस्था सातत्याने करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयोजित करण्यात आलेला हा रोजगार मेळावा विद्यार्थ्यांसाठी संधीचे दालन उघडणारा ठरला. या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, व्हॉइस चेअरमन नानासाहेब व्ही. टी. जोशी, शालेय समिती चेअरमन खलीलदादा देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन अण्णासाहेब वासुदेव महाजन, टीम प्लस एच.आर. प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक बाळकृष्ण मुळे, जेष्ठ संचालक प्रकाश पाटील, भागवत महापुरे सर, प्राचार्य एन. आर. पाटील सर, उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील सर, किमान कौशल विभाग प्रमुख प्रा. मनीष बाविस्कर सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर सागर थोरात सर आणि रुपेश पाटील सर यांनी सादर केलेल्या स्वागत गीताने वातावरण प्रसन्न झाले. प्रास्ताविक करताना प्रा. मनीष बाविस्कर यांनी या रोजगार मेळाव्याचा उद्देश स्पष्ट केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठ्या शहरांमध्ये जाऊन रोजगार शोधण्याची गरज भासू नये, त्यांना स्थानिक पातळीवरच संधी उपलब्ध व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रसंगी बाळकृष्ण मुळे यांनी संबंधित कंपन्यांविषयी सविस्तर माहिती देत विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील संधींचे मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील चार वर्षांत नामांकित विद्यापीठातून पदवी शिक्षण घेत असताना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे. यामुळे शिक्षण आणि रोजगार यांचा समन्वय साधत विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक सक्षम होणार आहे. चेअरमन संजय नाना वाघ यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना मेहनत, प्रामाणिकपणा आणि कौशल्य यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी मिळविणे पुरेसे नाही, तर प्रत्यक्ष काम करण्याची तयारी आणि कौशल्य विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे. संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अशा संधी उपलब्ध करून देणे हीच खरी समाजसेवा असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. या रोजगार मेळाव्यात छत्रपती संभाजीनगर व पुणे येथील चार नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता. मुलाखतीच्या प्रक्रियेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरमहा 15 ते 18 हजार रुपये विद्या वेतनासह विविध सुविधा देण्यात येणार आहेत. यामध्ये मेडिकल लाभ, कॅन्टीन सुविधा, बस सुविधा, विमा संरक्षण अशा अनेक सोयींचा समावेश आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होत शिक्षण पूर्ण करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या मेळाव्यात पाचोरा, भडगाव, नगरदेवळा, शेंदुर्णी, नेरी आदी भागातील MCVC व आयटीआय शाखेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये रोजगाराबाबत निर्माण झालेली जाणीव आणि उत्साह याचे हे प्रतीक मानले जात आहे. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शरद माथुरवैश्य सर, वैशाली भदाणे मॅडम, जितेंद्र पाटील, गौरव सोनवणे, संजय मलिक, विजय महाजन, नितीन, जावेद यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या समन्वयातून संपूर्ण कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला. यावेळी जयश्री वाघ मॅडम, मनोज राऊळ सर, संजय पाटील सर, शैलेश शेळके सर, महाले सर, कदम सर, सुरवाडे सर, हितेंद्र देवरे सर, बोरसे सर, किरण पाटील सर, अहिरे सर, वैशाली बोरकर मॅडम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोरसे सर यांनी उत्कृष्टरीत्या केले, तर आभार प्रदर्शन शरद माथुरवैश्य सर यांनी व्यक्त केले. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था व श्री गो.से. हायस्कूल हे केवळ शिक्षण देणारे केंद्र न राहता विद्यार्थ्यांच्या भविष्यास आकार देणारे मार्गदर्शक केंद्र म्हणून कार्य करत आहेत. अशा प्रकारचे रोजगाराभिमुख उपक्रम राबवून संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नव्या संधींचे दालन उघडत आहे. शिक्षणासोबतच रोजगाराची हमी देणारे हे प्रयत्न निश्चितच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून, भविष्यातही संस्था अशाच उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील तरुणांना सक्षम बनवेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
































