ग्रामीण भागातील SBI शाखेचा जिव्हाळ्याचा चेहरा; जारगाव शाखेतील सेवाभावाने ग्राहक भारावले

Loading

पाचोराआजच्या धावपळीच्या आणि तांत्रिक युगात बँकिंग सेवा अधिक वेगवान झाल्या असल्या तरी अनेक ठिकाणी ग्राहकांना अजूनही असहकार्य, उडवाउडवीची उत्तरे आणि औपचारिक वागणूक अनुभवायला मिळते. मात्र पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील भारतीय स्टेट बँक शाखेत चित्र याच्या अगदी उलट पाहायला मिळते. ग्रामीण भागातील ही शाखा आज अनेक ग्राहकांसाठी केवळ आर्थिक व्यवहाराचे केंद्र न राहता विश्वास, आपुलकी आणि माणुसकी जपणारी संस्था म्हणून ओळख निर्माण करत आहे. जारगाव SBI शाखेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सन्मानाने वागवले जाते. शाखा व्यवस्थापक संगीता शिंदे मॅडम, जेस्ट कॅशियर सुनील महाजन, चेतन वाकुडसर, जयदिपभाऊ कोळी यांच्यासह संपूर्ण SBI परिवार ग्राहकांशी अत्यंत नम्रतेने संवाद साधताना दिसतो. ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणावर शेतकरी, ज्येष्ठ नागरिक, महिला बचत गट, मजूर वर्ग आणि अल्पशिक्षित नागरिक या शाखेशी जोडलेले आहेत. त्यामुळे येथे फक्त व्यवहार पूर्ण करणे एवढ्यावर काम मर्यादित राहत नाही, तर प्रत्येकाला समजून घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याची मानसिकता जपली जाते. विशेष म्हणजे शहरातील SBI मुख्य शाखेमध्ये अनेक ग्राहकांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने काही ग्राहकांनी खासगी बँकांकडे वळण्याचा मार्ग स्वीकारला. अनेकांनी HDFC बँकेकडे खाते स्थलांतरित केले, तर काहींनी विवेकानंद SBI शाखा आणि जारगाव SBI शाखेची निवड केली. त्यामुळे जारगाव शाखेवर ग्राहकांचा वाढता ताण स्पष्टपणे जाणवतो. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणावर ग्राहकवर्ग येत असूनही येथील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर कधीही त्रासिकपणा दिसून येत नाही. उलट प्रत्येकाला संयमाने सेवा देण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असतो. या शाखेतील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे जगदीश तुकाराम पाटील. माजी सैनिक असलेले जगदीश पाटील यांची नियुक्ती सुरक्षा रक्षक म्हणून असली तरी प्रत्यक्षात ते ग्राहक सेवेत पूर्णवेळ कार्यरत असल्याचे चित्र रोज पाहायला मिळते. शाखेत प्रवेश करणाऱ्या अनेक ग्रामीण ग्राहकांना फॉर्म कसे भरायचे, स्लिप कशी लिहायची, कागदपत्रांची पूर्तता कशी करायची याबाबत अडचणी येतात. अशावेळी जगदीश पाटील कोणतीही कुरकुर न करता प्रत्येकाला शांतपणे मार्गदर्शन करतात. अनेक वेळा वृद्ध, अशिक्षित किंवा घाबरलेल्या ग्राहकांसाठी ते स्वतःहून फॉर्म भरून देतात, कागदपत्रांची मांडणी करून देतात आणि संबंधित खिडकीपर्यंत त्यांना पोहोचवतात. त्यांचा हा सेवाभाव पाहून अनेक ग्राहक भारावून जातात. सुरक्षा रक्षक म्हणून केवळ दारात उभे राहण्यापेक्षा ग्राहकांचा वेळ वाचवणे, त्यांची भीती कमी करणे आणि बँकेतील प्रक्रिया सोपी करून सांगणे हे काम ते अत्यंत आत्मीयतेने करताना दिसतात. माजी सैनिक म्हणून देशसेवेचा जो संस्कार त्यांच्या अंगी आहे, तोच आज ग्राहक सेवेतून प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे अनेक ग्राहक त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करताना दिसतात. जारगाव SBI शाखेची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे येथे ग्रामीण ग्राहकांना कधीही कमी लेखले जात नाही. अनेकदा मोठ्या बँकांमध्ये ग्रामीण भागातील लोकांशी तुच्छतेने वागले जाते, मात्र येथे प्रत्येक व्यक्तीला समान सन्मान दिला जातो. त्यामुळेच या शाखेविषयी लोकांमध्ये आत्मीयता निर्माण झाली आहे. ग्राहकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसणे हीच या शाखेच्या कार्यपद्धतीची खरी पावती ठरत आहे. आज डिजिटल बँकिंगच्या युगात मानवी स्पर्श हरवत चालल्याची भावना अनेकदा व्यक्त केली जाते. मात्र जारगाव SBI शाखेने सेवाभाव, संयम आणि माणुसकीच्या बळावर वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाखेतील अधिकारी, कर्मचारी आणि सुरक्षा रक्षक यांचा एकत्रित समन्वय पाहता ही शाखा ग्रामीण भागासाठी आदर्श बँकिंग सेवेचे उदाहरण ठरत आहे. ग्राहकांना केवळ व्यवहार न देता विश्वास देणारी ही शाखा भविष्यातही अशाच सेवाभावाने कार्यरत राहो, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here