संतप्त जनसमुदाय, तणावपूर्ण वातावरण आणि पोलिसांची संयमी भूमिका; गिरडच्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी पाचोरा पोलिसांनी दाखवली परिपक्वतेची परीक्षा

Loading

पाचोरा : एखादी दुर्दैवी घटना घडते, त्यानंतर भावना अनावर होतात, प्रश्न उपस्थित होतात, आरोप-प्रत्यारोप सुरू होतात आणि अशा वेळी प्रशासनाच्या एका चुकीच्या निर्णयामुळे संपूर्ण वातावरण पेट घेऊ शकते. मात्र गिरड येथील तरुण रविंद्र संजय मोरे (कोळी) यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत पाचोरा पोलीस प्रशासनाने दाखविलेली संयमशीलता, संवेदनशीलता आणि समन्वयाची भूमिका ही सर्वांसाठी अभ्यासाचा विषय ठरावी अशीच होती. भडगाव तालुक्यातील गिरड हे गाव केवळ भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे नाही, तर सामाजिक ऐक्याचे प्रतीक म्हणून पंचक्रोशीत ओळखले जाते. या गावाची सर्वात मोठी ओळख म्हणजे येथील नागरिक जाती, धर्म, पंथ किंवा राजकीय विचारांच्या चौकटीत न अडकता गावाच्या हितासाठी एकदिलाने उभे राहतात. रक्ताच्या नात्यांपेक्षाही गावाशी असलेले भावनिक नाते अधिक मजबूत असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. जरी प्रशासकीयदृष्ट्या हे गाव भडगाव तालुक्यात येत असले तरी येथील नागरिकांचे बहुतांश व्यवहार, रोजगार, व्यापार, शिक्षण आणि दैनंदिन संपर्क पाचोरा शहराशी जोडलेले आहेत. त्यामुळे पाचोरा आणि गिरड यांच्यातील संबंध हे केवळ भौगोलिक नसून भावनिक आणि सामाजिक पातळीवरही घट्ट आहेत. अशा गावातील एका होतकरू तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची माहिती समोर येताच गावभर शोककळा पसरली. सुरुवातीला दुःख व्यक्त करणारे नागरिक नंतर सत्य समोर यावे आणि संबंधित घटनेचा निष्पक्ष तपास व्हावा या मागणीसाठी एकत्र आले. परिस्थिती एवढी वेगाने बदलली की काही तासांतच पाचोरा पोलीस ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक जमा झाले. विशेष म्हणजे या जमावात केवळ पुरुष नव्हते तर महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक आणि विविध समाजघटकांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. झुंज वृत्तपत्र आणि ध्येय निश्चयचे संपादक संदीप महाजन यांनी घटनास्थळी आणि पोलीस ठाणे परिसरात उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना एक महत्त्वाचा मुद्दा अधोरेखित केला. त्यांच्या निरीक्षणानुसार, हा केवळ एका कुटुंबाचा किंवा एका गावाचा प्रश्न राहिलेला नव्हता, तर न्यायव्यवस्थेवर आणि तपास प्रक्रियेवर असलेल्या लोकांच्या विश्वासाचीही परीक्षा होती. भावनिक वातावरणातही कायद्यावर विश्वास ठेवणे आणि सत्य बाहेर येण्याची वाट पाहणे हेच समाजहिताचे असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले. दोन दिवसांपर्यंत सुरू असलेल्या या घडामोडींमध्ये वातावरण अनेकदा तणावपूर्ण बनले. काही ठिकाणी भावनांचा उद्रेक होत होता, तर काही जणांकडून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. अशा परिस्थितीत एखाद्या अधिकाऱ्याने कठोर भूमिका घेतली असती, पोलीस बळाचा वापर केला असता किंवा आक्रमक पवित्रा स्वीकारला असता तर परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता नाकारता आली नसती. मात्र याच टप्प्यावर पाचोरा पोलीस प्रशासनाची खरी कसोटी लागली आणि त्यांनी ती यशस्वीरित्या पार पाडली. उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहन साहेब आणि पोलीस निरीक्षक राहुल पवार साहेब यांनी सुरुवातीपासूनच परिस्थितीकडे केवळ कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नाच्या दृष्टीने न पाहता मानवी भावनांच्या दृष्टिकोनातून पाहिले. संतप्त नागरिकांची मानसिकता समजून घेणे, त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे, कोणतीही प्रतिक्रिया न देता संवाद कायम ठेवणे आणि प्रत्येकाला न्याय मिळेल असा विश्वास देणे, या भूमिकेमुळे जमावाचा विश्वास प्रशासनावर कायम राहिला. दुसरीकडे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते साहेब यांनी देखील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने पाचोरा येथे हजेरी लावली. वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती ही स्वतःमध्ये नागरिकांसाठी आश्वासक ठरली. जिल्हा पोलीस यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचा संदेश त्यामुळे गेला. संभाव्य तणाव लक्षात घेऊन पाचोरा लगतच्या विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांनाही सज्ज ठेवण्यात आले. मात्र या संपूर्ण काळात कुठेही शक्तीप्रदर्शन करण्यात आले नाही. त्याऐवजी परिस्थिती समजून घेण्यावर आणि संवादावर भर देण्यात आला. जळगाव येथून शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह पाचोऱ्यात आणण्यात आला तेव्हा वातावरण आणखी भावनिक झाले. दुःख, संताप आणि अस्वस्थता यांचा मिलाफ झाल्याने उपस्थित नागरिकांची प्रतिक्रिया अधिक तीव्र होत होती. अनेक जण वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करत होते. अशा परिस्थितीत कोण कोणाशी बोलत आहे, कोण काय सुचवत आहे आणि पुढे काय घडू शकते याचा अंदाज लावणेही कठीण झाले होते. तरीदेखील पोलीस प्रशासनाने अत्यंत संयम राखत प्रत्येक घटकाला समजून घेण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे फिर्यादी आणि नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना आपले म्हणणे मांडण्याची पूर्ण संधी देण्यात आली. संबंधित कुटुंबीयांनी ज्या प्रकारे आपली बाजू मांडली, त्यानुसार फिर्याद नोंदवून घेण्यात आली. केवळ आश्वासने देण्यावर प्रशासन थांबले नाही तर फिर्यादीत नमूद करण्यात आलेल्या व्यक्तींविरुद्ध तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात आली. त्यामुळे संतप्त नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास निर्माण झाला आणि परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येऊ लागली. आता या प्रकरणाचा पुढील टप्पा अधिक महत्त्वाचा आहे. मृत्यूमागील नेमके कारण काय, ही आत्महत्या होती की त्यामागे अन्य काही परिस्थिती होती, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल रेकॉर्ड, डिजिटल पुरावे, फॉरेन्सिक अहवाल, प्रत्यक्षदर्शींची साक्ष आणि इतर तांत्रिक बाबी यांचा सखोल अभ्यास करूनच सत्य समोर येणार आहे. तपास यंत्रणेसमोर आता मोठे आव्हान आहे. कारण एका बाजूला मृत व्यक्तीच्या कुटुंबाला न्याय मिळण्याची अपेक्षा आहे, तर दुसऱ्या बाजूला कायद्याच्या चौकटीत राहून निष्पक्ष तपास करणेही तितकेच आवश्यक आहे. रविंद्र संजय मोरे (कोळी) हा युवक आज या जगात नाही, ही वस्तुस्थिती बदलता येणार नाही. मात्र त्याच्या मृत्यूमागील सत्य बाहेर येणे, दोषी असतील त्यांना शिक्षा होणे आणि जे व्यक्ती निर्दोष असतील अशा व्यक्तींना देखील न्याय मिळणे हीच समाजाची अपेक्षा आहे. झुंज वृत्तपत्र आणि ध्येय निश्चयचे संपादक संदीप महाजन यांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, अशा संवेदनशील प्रकरणांमध्ये भावनेपेक्षा पुरावे, संशयापेक्षा सत्य आणि दबावापेक्षा कायदा अधिक महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे या प्रकरणाचा निष्कर्ष केवळ तपासातूनच समोर येऊ शकतो. या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर पाचोरा पोलीस प्रशासनावर मोठी जबाबदारी आली आहे. आतापर्यंत दाखविलेला संयम, संवेदनशीलता आणि परिपक्वता पाहता नागरिकांनीही तपास यंत्रणेवर विश्वास व्यक्त केला असून आता सर्वांचे लक्ष पुढील तपासाच्या निष्कर्षाकडे लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here