पक्षनिष्ठा, संघर्ष आणि जनसंपर्काची पावती; अॅड. अविनाश भालेराव यांच्याकडे जळगाव जिल्हा काँग्रेसची धुरा

Loading

जळगाव : राजकारणात पद मिळविण्यापेक्षा ते आपल्या कर्तृत्व, निष्ठा, संघर्ष आणि सातत्यपूर्ण जनसंपर्काच्या बळावर मिळविणे अधिक महत्त्वाचे मानले जाते. अशाच जिद्दी, संयमी आणि संघटनात्मक प्रवासातून पुढे आलेले अॅड. अविनाश भालेराव यांनी आज जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षपदाचा पदभार स्वीकारत आपल्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण टप्पा गाठला. महाविद्यालयीन जीवनात एनएसयूआयच्या माध्यमातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदापर्यंत पोहोचला असून, कार्यकर्त्यांच्या मेहनतीला आणि पक्षनिष्ठेला मिळालेला हा सन्मान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. जळगाव येथील काँग्रेस भवनात आयोजित पदग्रहण सोहळा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अॅड. संदीप भैय्या पाटील यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी अॅड. संदीप भैय्या पाटील यांच्या हस्ते अॅड. अविनाश भालेराव यांनी जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. या प्रसंगी माजी आमदार रमेश विठ्ठल चौधरी, प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्रसिंह पाटील, ज्येष्ठ नेते व माजी शहर जिल्हाध्यक्ष डॉ. अर्जुन भंगाळे, काँग्रेस सेवा दलाचे सरचिटणीस विनोद कोळपकर, प्रदेश सरचिटणीस मुक्ती हारुण नदवी, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रवीण सुरवाडे, माजी जिल्हाध्यक्ष राजीव दादा पाटील, सुरेश पाटील, शहर जिल्हाध्यक्ष श्यामकांत तायडे, अमळनेर अध्यक्ष गोकुळ आबा बोरसे, जळगाव ग्रामीणचे अध्यक्ष मनोज चौधरी, पारोळा तालुकाध्यक्ष पिरण अनुष्ठान, एरंडोल तालुका अध्यक्ष सुनील पाटील, विजय महाजन, सुभाष पवार, एससी विभागाचे जिल्हाध्यक्ष अॅड. कैलास शेळके, भुसावळ नगरसेवक अहमद कुरेशी आणि जळगाव ग्रामीणचे माजी तालुकाध्यक्ष सुभाष पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अॅड. अविनाश भालेराव यांचा राजकीय प्रवास हा नव्या पिढीतील कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी मानला जात आहे. विद्यार्थी संघटनांमधून नेतृत्व विकसित करताना त्यांनी अनेक चढ-उतार अनुभवले. संघटनेची कामे, आंदोलनांमधील सहभाग, पक्षाच्या विचारधारेप्रती असलेली निष्ठा आणि जनसंपर्काची सातत्यपूर्ण परंपरा यामुळे त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनात स्वतंत्र स्थान निर्माण केले. संघर्षमय वाटचालीत अनेक अडथळे आले, परंतु कोणत्याही परिस्थितीत पक्षाशी असलेली बांधिलकी ढळू दिली नाही. त्यामुळेच आज त्यांच्यावर जिल्ह्याच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचे अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून नमूद केले. या सोहळ्यात अमळनेर शेतकरी संघात निवडून आलेले सुरेश दादा पाटील, प्राध्यापक श्याम पवार आणि धनगर आण्णा पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. ए. जी. भंगाळे, राजीव पाटील, विनोद कोळपकर, मुक्ती हारुण नदवी, प्रवीण सुरवाडे, योगेंद्रसिंह पाटील आणि श्यामकांत तायडे यांनी मार्गदर्शन करताना काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी एकजुटीची आवश्यकता अधोरेखित केली. अध्यक्षीय भाषणात अॅड. संदीप भैय्या पाटील यांनी अॅड. अविनाश भालेराव यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना पक्षनिष्ठा आणि सातत्यपूर्ण संघटनात्मक काम हेच त्यांच्या निवडीमागील प्रमुख कारण असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला सोबत घेऊन पक्ष विस्ताराचे काम अधिक प्रभावीपणे होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नूतन जिल्हाध्यक्ष अॅड. अविनाश भालेराव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना पक्षाने दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ही केवळ पदाची जबाबदारी नसून हजारो कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची संधी असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील प्रत्येक तालुका, शहर आणि ग्रामीण भागात संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. एनएसयूआयपासून युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवा दल आणि विविध आघाड्यांपर्यंत संघटना बळकट करण्यासाठी नियोजनबद्ध काम केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचविण्यासोबतच युवकांना नेतृत्वाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर भर राहील, असेही त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस बाबा देशमुख यांनी केले, तर प्रस्तावना शहर जिल्हाध्यक्ष श्यामकांत तायडे यांनी मांडली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माजी सभापती इस्माईल भाई फकीरा, राहुल बाहेती, श्रीधर चौधरी, नदिम काझी, अंकुश कटारे, नितीन सूर्यवंशी चौधरी, विजय वाणी, विजय कोसोदे, दीपक सोनवणे, प्रदीप सोनवणे, जाकीर बागवान, राहुल भालेराव, विशाल पवार, पाचोर्‍याचे युवक काँग्रेसचे शकील इब्राहिम, वाडीलाल राठोड, राहुल मोरे, अल्ताफ खान, गिरीश पाटील तसेच अमळनेर महिला काँग्रेसच्या छायाताई कोरडे, मीराताई सोनवणे, अर्चनाताई गाढे, मीनाक्षीताई जावळे, लीलाताई सोनवणे, अरुणाताई पाटील आणि प्रतिभाताई सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला जळगाव जिल्ह्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी आणि काँग्रेसप्रेमी उपस्थित होते. संघटनात्मक एकजूट, नव्या नेतृत्वावरील विश्वास आणि आगामी काळातील राजकीय आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी या सर्वांचा प्रत्यय या सोहळ्यातून आला. एका दलित चळवळीतील युवकाने विद्यार्थी संघटनेपासून सुरू केलेला संघर्षमय प्रवास जिल्हाध्यक्षपदापर्यंत पोहोचल्याने अनेक तरुण कार्यकर्त्यांसाठी नवी प्रेरणा निर्माण झाली आहे. निष्ठा, संयम, सातत्य आणि जनतेशी असलेली बांधिलकी याच्या बळावर कोणताही कार्यकर्ता पक्षात सर्वोच्च स्थान प्राप्त करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणून अॅड. अविनाश भालेराव यांच्या निवडीकडे पाहिले जात आहे. कार्यक्रमाच्या शेवटी जगदीश गाडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here