![]()
राजकारण हे समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे, असं म्हटलं जातं. पण हे सत्य कृतीत उतरवणं हे प्रत्येकाच्या शक्तीबाहेरचं असतं. मात्र काही व्यक्तिमत्त्वं आणि कुटुंबं आपल्या सामाजिक भूमिकेतून, निःस्वार्थ सेवाभावातून आणि स्पष्ट नेतृत्वशैलीतून समाजात अशी ओळख निर्माण करतात की, त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात ही सुद्धा एक विचारांचा ध्वजवंदन ठरते. पिंपळगाव हरेश्वर येथे राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त पार पडलेल्या मंदिर स्वच्छता व महाआरती कार्यक्रमाच्या निमित्ताने याचे प्रत्यंतर पुन्हा एकदा आले. भारतीय जनता पक्षात नुकताच प्रवेश केलेल्या वाघ परिवाराने पाचोरा येथे आल्यानंतर अवघ्या काही तासांतच आपली बांधिलकी, कृतीशीलता आणि संघटनशीलता स्पष्ट करत पिंपळगावात एका उदाहरणवत सामाजिक सहभागाचे दर्शन घडवले. या उपक्रमात वाघ परिवाराचे प्रमुख सदस्य, पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ, यांनी स्वतः भाजपाचे स्थानिक पदाधिकारी यांच्या समावेत मंदिर स्वच्छतेच्या कार्यात सहभाग घेतला वाघ परिवाराचा भारतीय जनता पक्षात प्रवेश ही काही केवळ औपचारिक घटना नव्हती. हा प्रवेश एका सामाजिक विचाराने, जनसंपर्काच्या बळावर आणि सामाजिक बदलाच्या संकल्पनेवर आधारित होता. वाघ कुटुंब हे गेल्या अनेक वर्षांपासून पाचोरा तालुक्यातच नव्हे जिल्ह्याच्या राजकारणात राजकीय,शैक्षणिक, सहकारी आणि ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात सक्रिय असून, नानासाहेब संजय वाघ हे माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्यासोबत त्या कार्याचा चेहरा मानले जातात.ज्या दिवशी मुंबई येथे दिलीप भाऊ वाघ यांचा भाजप पक्षप्रवेश झाला त्यानंतर पाचोरा येथे परतल्यावर काही तासातच पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर मंदिर स्वच्छता अभियानात जुन्या भाजप कार्यकर्त्यांसमवेत सहभाग घेतला. केवळ व्यासपीठावर भाषणं करण्याऐवजी त्यांनी श्रमदानातून जनतेशी नाळ जोडली. या कृतीतून त्यांनी जनतेपुढे एक असा आदर्श मांडला की, राजकारणात फक्त सत्ता मिळवणे हा उद्देश नसून, सेवाभाव, सामाजिक समर्पण आणि आध्यात्मिक मूल्यांचा प्रसार हाच खरा हेतू असावा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन असलेले नानासाहेब संजय वाघ हे शिक्षण क्षेत्रातले एक सशक्त आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या विविध शाळांमध्ये केवळ भौतिक सुविधा नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला. त्यांनी शाळा म्हणजे चार भिंती आणि शिक्षक एवढाच दृष्टिकोन झुगारून संस्थेच्या कार्यपद्धतीत प्रगत दृष्टिकोन आणला. त्यांची भाषाशैली अत्यंत समंजस,अभ्यास वृत्ती पण ठाम असते. पिंपळगावच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी अतिशय प्रेरणादायी विचार मांडले – “राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्त आपण सेवा आणि श्रद्धेच्या मार्गाने पुढे जात आहोत. आज मंदिराची स्वच्छता करताना मला जाणवलं की, आपण समाजात स्वच्छतेसारखे सकारात्मक विचारही रुजवले पाहिजेत. भारतीय जनता पक्षात प्रवेश हा माझ्यासाठी व वाघ परिवारासमवेत आमच्या कार्यकर्त्यांसाठी केवळ राजकीय पाऊल नाही, तर समाज परिवर्तनाच्या मार्गावर एक सामूहिक चाल आहे.”त्यांच्या या मनोगतातून समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि भारतीय परंपरेप्रती असलेली निष्ठा स्पष्ट जाणवते. त्यांच्या नेतृत्वात पक्षाला विचारशील, अभ्यासू आणि संयमी कार्यकर्त्यांची मोठी ताकद मिळेल, याबाबत कोणतीही शंका नाही. या कार्यक्रमात उपस्थित असलेले भाजप जिल्हा उपाध्यक्ष मधु भाऊ काटे हे देखील कार्यकर्त्यांमध्ये एक प्रेरणास्थान मानले जातात. त्यांनी आपल्या छोटेखानी भाषणात वाघ कुटुंबाच्या प्रवेशाचं आणि तत्काळ कृतीशील सहभागाचं कौतुक करताना म्हटलं, “आजकाल अनेकजण पक्षात प्रवेश घेतात, पण समाजाशी नाळ जोडणं आणि सर्वांना सोबत घेऊन प्रत्यक्ष कृती करणे हे फार थोड्यांच्याच अंगी असतं. माजी आमदार दिलीपभाऊ वाघ व नानासाहेब संजय वाघ यांचं नेतृत्व, त्यांचा दृष्टिकोन आणि त्यांचा संयमी स्वभाव हे भाजपसाठी एक नवा ऊर्जा स्रोत ठरेल. त्यांच्या अनुभवाचा पक्षाला निश्चितपणे लाभ होईल.”मधु भाऊ काटेंच्या या शब्दांनी केवळ कौतुकच व्यक्त केलं नाही, तर संपूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना नव्या नेतृत्वाच्या स्वागतासाठी तयार केलं. या संपूर्ण कार्यक्रमाचा केंद्रबिंदू होता – राजमाता अहिल्याबाई होळकर यांचा जीवन आदर्श. स्वच्छता, भक्ती, सेवा, शिस्त, समाजकल्याण आणि स्त्रीशक्तीचा प्रेरणादायी इतिहास या साऱ्यांचा संगम त्यांच्या कार्यातून घडलेला आहे. पिंपळगावमधील मंदिर स्वच्छता, महाआरती आणि महिला कार्यकर्त्यांचा सक्रीय सहभाग यामध्ये त्यांचा आदर्श स्पष्टपणे प्रतिबिंबित झाला. कार्यक्रमात महिलावर्ग, युवक, ग्रामस्थ, कार्यकर्ते आणि गावातील जेष्ठ मंडळींच्या उपस्थितीने एकात्मतेचे दर्शन घडले. या साऱ्या घडामोडींमध्ये वाघ परिवाराच्या पक्षप्रवेशाची औपचारिकता नव्हे, तर त्यांच्या प्रवेशाची “चिंतनशील सुरुवात” पाहायला मिळाली.वाघ कुटुंबाचा भाजपमध्ये प्रवेश ही घटना एका ठराविक गावापुरती मर्यादित राहिलेली नाही. ती एक व्यापक संदेश घेऊन आली आहे – की राजकारण ही जर लोकसेवेची दिशा असेल, तर त्याची सुरुवात प्रत्यक्ष समाजात उतरून करावी लागते. मतपेढ्या आणि घोषणा यापेक्षा अधिक प्रभावी असतो तो जनतेतला विश्वास. आणि वाघ कुटुंबाने, विशेषतः नानासाहेब संजय वाघ यांनी, या विश्वासाचं बीज पहिल्याच दिवशी पेरलं आहे. राजकारणात प्रवेश करताच मंदिरात स्वच्छता आणि आरती – हा काही लोकांना “प्रचाराचा प्रयत्न” वाटू शकतो. पण अशा कृतींचं विश्लेषण केवळ बाह्यदृष्टीने केल्यास त्यातला सखोल भावार्थ उमगणार नाही. हाच तर अहिल्याबाईंचा मार्ग होता – कृती, संस्कार आणि समर्पण पिंपळगाव हरेश्वर येथील या कार्यक्रमामुळे वाघ कुटुंबाच्या नेतृत्वाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते, स्थानिक भाजपचे जुने व वाघ परिवारासोबत भाजपात नवीन आलेले कार्यकर्ते, महिला मंडळ, युवक मंडळ आणि ग्रामस्थ यांचा एकत्र सहभाग हा केवळ एक कार्यक्रम नव्हता – ती एक चळवळ होती. वाघ कुटुंब आता केवळ सहकारी शिक्षण क्षेत्रात नव्हे, तर राजकारणातही एक जबाबदार आणि विचारशील उपस्थिती म्हणून आपली भूमिका निभावेल, अशी आशा आहे. लोकशाही प्रक्रियेतील सक्रिय सहभाग आणि विचाराधारित कृती यांचा आदर्श तयार करत, वाघ कुटुंब भारतीय जनता पक्षाच्या तालुका पातळीवर नव्हे तर जिल्हास्तरावरही एक महत्त्वाचा स्तंभ ठरेल, याबाबत आता कुठलाही प्रश्न उरलेला नाही.





























