सत्कार व सन्मानाचा अविस्मरणीय क्षण : मा. न्यायाधीश जी. बी. औंधकर यांचा निरोप समारंभ

0

Loading

पाचोरा – निःपक्ष, सत्यनिष्ठ व न्यायी दृष्टिकोन ठेवून आपली कारकीर्द न्याय क्षेत्रात घडवणारे आणि पाचोरा न्यायालयात आपल्या कामगिरीने आदरयुक्त ठसा उमठवणारे मा. दिवाणी न्यायाधीश श्री. जी. बी. औंधकर यांची बदली झाल्याने त्यांना निरोप देण्यासाठी पाचोरा येथील दिवाणी तथा फौजदारी न्यायालयात एका अत्यंत सन्मानपूर्वक समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा समारंभ केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित राहिला नसून, त्यामध्ये अनेक भावनांनी ओथंबलेली आपुलकी, स्नेह, कृतज्ञता आणि आठवणींचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला.या निरोप समारंभाचे अध्यक्षस्थानी मा. दिवाणी न्यायाधीश एस. व्ही. निमसे हे होते. यावेळी सह न्यायाधीश जी. एस. बोरा, सरकारी अभियोक्ता हटकर मॅडम, सरकारी वकील मिलिंद येवले, मीना सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास न्यायालयीन कर्मचारी, वकिली मंडळी, पोलीस कर्मचारी आणि विविध विभागांतील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत पारंपरिक पद्धतीने झाली. मा. औंधकर साहेबांचे औक्षण करण्यात आले, त्यानंतर त्यांच्या कपाळी तिलक लावून स्वागताचा मान देण्यात आला. त्यांच्या पत्नींसह उपस्थित राहिलेल्या औंधकर कुटुंबियांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन मा. न्यायाधीश निमसे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा क्षण संपूर्ण उपस्थितांमध्ये एक वेगळाच सन्मानाचा आणि स्नेहभावाचा ठसा उमटवणारा ठरला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मा. औंधकर यांच्या कार्यकाळातील विविध अनुभव, त्यांच्या स्वभावातील सौम्यपणा, प्रगल्भ विचारशैली आणि कामातील काटेकोरपणा यावर प्रकाश टाकला. कु. दक्षता पाटील, दीपक पाटील, स्वप्निल पाटील, रवींद्र पाटील, उमेश महाजन, संदीप जगताप, चंद्रकांत नाईक, अमित दायमा, उल्हास महाजन, मिलिंद येवले, सौ. औंधकर मॅडम तसेच मा. न्यायाधीश बोरा मॅडम यांनी आपले मनोगत मांडताना अनेक आठवणींना उजाळा दिला.आपला सत्कार स्वीकारताना मा. न्यायाधीश जी. बी. औंधकर यांनी अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञ भावनेने उपस्थित सर्वांचे आभार मानले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “पाचोरा न्यायालयात काम करताना मला ज्या प्रकारे सहकार्य, प्रेम, आदर आणि आपुलकी मिळाली, ती माझ्या आयुष्यातील अमूल्य संपत्ती आहे. तुमच्या स्नेहाने हा निरोप समारंभ माझ्यासाठी एक खास आणि हृदयस्पर्शी भेट बनली आहे. श्री. निमसे साहेब, बोरा मॅडम आणि इथल्या न्यायालयीन कुटुंबातील सर्व सदस्यांचा मी मन:पूर्वक आभारी आहे. तुमच्या आठवणी कायम माझ्या स्मरणात राहतील.”या भाषणादरम्यान संपूर्ण सभागृहात एक भावनिक वातावरण तयार झाले होते. औंधकर साहेबांच्या संयमी, सजग आणि सहृदयी नेतृत्वाच्या अनेक आठवणी सर्वांच्या चेहऱ्यावर उमटत होत्या.यानंतर अध्यक्षीय भाषणात मा. न्यायाधीश एस. व्ही. निमसे साहेब यांनी औंधकर साहेबांविषयी अत्यंत आदरपूर्वक व प्रशंसात्मक उद्गार काढले. “श्री. औंधकर हे केवळ एक न्यायाधीश नव्हते, तर ते आपल्या शिस्तप्रियतेने, काटेकोर न्यायविवेकबुद्धीने आणि सहृदयतेने सर्वांचे मन जिंकणारे नेतृत्व होते. त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला, सहकाऱ्याला आपल्या कुटुंबाचा भाग मानले आणि त्यांचे मार्गदर्शन सर्वांनाच प्रेरणादायी राहिले आहे. त्यांच्यामुळे अनेकांना नव्या ऊर्जा, नवे मार्ग मिळाले. आपण सर्व भाग्यवान आहोत की, आपल्याला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी लाभली,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अभिजित दायमा यांनी अतिशय ओघवत्या शैलीत केले. उपस्थित मान्यवरांची ओळख, त्यांच्या आठवणींचा प्रवास आणि कार्यक्रमातील प्रत्येक टप्पा त्यांनी अत्यंत नेटकेपणाने सादर केला. आभार प्रदर्शन चारुशीला पाटील यांनी करताना संपूर्ण न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे, निमंत्रितांचे व सर्व आयोजकांचे आभार मानले.या समारंभाची यशस्वी तयारी आणि नियोजन यामध्ये सहा. अधीक्षक नितीन मोरे, संदीप भोंडे, किशोर अत्रे, पोलीस कर्मचारी आबा पाटील, विकास सूर्यवंशी, राजेंद्र पाटील, दीपक पाटील तसेच न्यायालयातील इतर कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांचे संयोजन, समन्वय आणि प्रत्येक बारकाव्याकडे दिलेले लक्ष पाहता, संपूर्ण समारंभ अत्यंत शिस्तबद्ध, सुसंगत आणि भावपूर्ण झाला.सदर समारंभ केवळ निरोपाचा नव्हता, तर तो त्यांच्या कार्याला आणि मोलाच्या योगदानाला दिलेली कृतज्ञतेची आणि गौरवाची मानवंदना होती.”एका गुणवंत न्यायाधीशाच्या कार्याला, त्यांच्या विचारांना आणि त्यांनी दिलेल्या शिकवणींना. यावेळी उपस्थित प्रत्येकजण हे मान्य करत होता की, मा. औंधकर साहेबांचा सल्ला, मार्गदर्शन आणि माणुसकीने भरलेले वर्तन कायम सर्वांच्या स्मरणात राहील.पाचोरा न्यायालयाच्या परिसरातून एक अत्यंत सज्जन, समंजस, ज्ञानवान आणि कर्तव्यनिष्ठ न्यायाधीश निरोप घेत असताना प्रत्येकाच्या मनात त्यांच्या कार्याविषयी अभिमान होता, आणि त्यांच्या आगामी प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षावही. न्यायालयाच्या या स्नेहसंवादाने आणि भावनांनी भरलेल्या वातावरणात हा निरोप समारंभ केवळ कार्यक्रम न राहता, एक संस्मरणीय पर्व ठरला.यातून पुढे येणाऱ्या अधिकारीवर्गाला, कर्मचारीवर्गाला आणि न्याय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकाला एक प्रेरणादायी उदाहरण मिळाले आहे की, कार्यातील प्रामाणिकता, सहृदयता आणि लोकाभिमुखता यांचा संगम असलेले व्यक्तिमत्त्व केवळ प्रशासकीय व्यवस्थेत नव्हे, तर मानवी नात्यांतही आपले स्थान अढळपदावर निर्माण करू शकते.या भावपूर्ण कार्यक्रमाचा शेवट उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात झाला. उपस्थित सर्वांनी पुढील वाटचालीसाठी मा. औंधकर साहेब व त्यांच्या कुटुंबाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या आठवणी मनात साठवून एक सुंदर निरोप दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here