गटारीतून साचलेली समस्या – पाचोऱ्यात बांधकामामुळे नाले तुंबले; नागरिक त्रस्त, पालिकेकडे तातडीच्या उपायांची मागणी

Loading

पाचोरा – शहरातील गटारी आणि नाले व्यवस्थापन ही नेहमीच महत्त्वाची बाब राहिली आहे. पावसाळा जवळ येत असतानाच्या या काळात पाचोरा नगरपालिकेने विविध भागांतून नाले सफाईची मोहीम हाती घेतली असून, काही ठिकाणी ती समाधानकारक रित्या पारही पडली आहे. मात्र, शहरातील काही प्रभागांमध्ये नागरिकांच्या दुर्लक्षामुळे पुन्हा एकदा गटारीत गाळ साचण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता या भागातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून, त्यांनी पालिकेच्या मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्याकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.
अलीकडेच पाचोरा नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने, विभाग प्रमुख तुषार नकवाल यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली, मार्केट परिसर व काही रहिवासी भागातील गटारींमधील साचलेला गाळ व मलबा जेसीबीच्या सहाय्याने काढून टाकण्यात आला होता. त्या कामाची सर्व स्तरांतून स्तुतीही झाली. मात्र, या उपक्रमानंतर काही दिवसांतच अचानक आलेल्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा गटारीतील गाळ वाहून येण्यास सुरुवात केली. परिणामी, ज्या ठिकाणी सफाई झाली होती, तेथेच पुन्हा पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे.
या स्थितीमागे केवळ निसर्ग कारणीभूत नाही, तर मानवी निष्काळजीपणाही तितकाच जबाबदार आहे. तो म्हणजे घराच्या दुरुस्ती व नवीन बांधकाम करणाऱ्या नागरिकांनी घरकामात वापरलेली वाळू, माती, सिमेंटचे तुकडे, प्लास्टरचा मलबा तसेच गटारीच्या तोंडाशी पडलेली झाडांची फांदी यांचा योग्य प्रकारे निपटारा केलेला नाही. परिणामी, हे सर्व साहित्य पावसामुळे गटारीत वाहून जाऊन पुढच्या बाजुला साचले आहे. ही बाब इतकी गंभीर आहे की, या गाळामुळे मार्केटपासून गो.से.हायस्कूल परिसरापर्यंतच्या दोन्ही बाजुच्या नाल्यात मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण झाला आहे. साई प्रोव्हिजन स्टोअरपासून ते गो.से.हायस्कूलच्या नाल्यापर्यंत साचलेला मलबा आणि झाडांच्या अडथळ्यांमुळे सांडपाणी व पावसाचे पाणी योग्य मार्गाने वाहून जाण्याऐवजी परिसरात साचू लागले आहे.
या परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांची झोप उडाली आहे. अनेक वेळा यामुळे दुर्गंधी निर्माण होते, डासांची उत्पत्ती वाढते आणि पावसात पाणी घरात शिरण्याचा धोका अधिकच गंभीर होतो. मागील वर्षाचा पावसाळ्यातील अनुभव लक्षात घेता सदरचे पाणी थेट DYSP साहेब यांचा बंगला व ऑफिस तसेच मेहरबान न्यायालय आवारात तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते याशिवाय श्री गो से हायस्कूलमध्ये जाणे येण्यासाठी तर रस्ता राहिला नव्हता परिणामतः लहान मुले, वृद्ध व आजारी लोकांसाठी ही समस्या अधिक त्रासदायक ठरते.
विशेष बाब म्हणजे, ज्या भागात ही समस्या आहे त्या भागात नियमित सफाई कर्मचारी दिसत नाहीत. गटार कर्मचारी नियमितपणे उपस्थित राहत नसल्याची तक्रार आहे. गटारीची सतत निगा राखणे आवश्यक असताना पालिकेचे गटार सफाई कर्मचाऱ्यांकडे लक्ष कमी झाल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. अशा वेळी अचानक आलेल्या पावसामुळे संपूर्ण मेहनत वाया गेल्याचे चित्र नागरिकांच्या डोळ्यासमोर आहे.नागरिकांच्या तक्रारीनुसार बांधकाम करणाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे. सार्वजनिक रस्त्यावर किंवा गटारीजवळ बांधकाम साहित्य टाकणे हे केवळ अन्यायकारकच नाही तर कायद्यानेही दंडनीय आहे. पाचोरा नगरपालिकेने अशा बांधकामकर्त्यांना तातडीने नोटीस बजावून त्यांच्या मलब्याची त्वरित विल्हेवाट लावावी, व त्याचा खर्च दंडासह संबंधितांकडून वसूल करण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी एक लेखी निवेदन तयार करून पाचोरा नगरपालिकेचे मा. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांच्याकडे सादर केले असून, त्यामध्ये त्यांनी खालील गोष्टींची मागणी केली आहे:

  1. मार्केटपासून साई प्रोव्हिजन स्टोअर ते गो.से.हायस्कूलच्या नाल्यापर्यंत साचलेल्या गाळाची व बांधकाम मलब्याची तातडीने सफाई करण्यात यावी.
  2. झाडांच्या तुटलेल्या फांद्या व अडथळा निर्माण करणारा साठा हटवण्यात यावा.
  3. संबंधित बांधकामकर्त्यांना नोटीस बजावून त्यांच्याकडून उर्वरित मलबा उचलून घेण्याची कार्यवाही करावी.
  4. या परिसरात दररोज नियमितपणे गटारी सफाई कर्मचारी नेमण्यात यावा.
  5. येणाऱ्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर या भागाला विशेष प्राधान्याने तपासले जावे.
    या निवेदनामध्ये असेही स्पष्ट करण्यात आले आहे की, न पा प्रशासक एकदा का गटारी स्वच्छ करतात किंवा त्यासाठी प्रयत्न करतात, तरीही जर इतरांच्या निष्काळजीपणामुळे पुन्हा गाळ साचत असेल, तर त्यास जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. नगरपालिकेने बांधकाम परवानगी देताना नियमांचे काटेकोर पालन होत आहे का याचे निरीक्षण करावे, अशी सूचनाही यात आहे.तरी देखील संबंधित लोक त्याचे पालन करत नाहीत
    पाचोरा नगरपालिकेचे मा. मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक सकारात्मक उपक्रम राबवले असून, नागरिकांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना आशा आहे की, सदर निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभाग तातडीने हालचाल करेल आणि परिसरातील गटारी पुन्हा एकदा स्वच्छ करण्यात येतील.
    या प्रकरणातून एक बाब स्पष्ट होते की, नागरिक, प्रशासन आणि बांधकाम व्यावसायिक या तिघांनीही आपापली जबाबदारी समजून घेतली पाहिजे. कारण गटारी स्वच्छ असतील तरच आरोग्यदायी परिसराची हमी दिली जाऊ शकते. अन्यथा वर्षानुवर्षे असाच त्रास होत राहील आणि त्यातुन डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढू शकते.
    संपूर्ण शहरासाठी ही एक जागरूकतेची घंटा आहे – केवळ गटारी सफाई पुरेशी नाही, तर नागरिकांनीही आपली कर्तव्ये पार पाडत नियम पाळले, तरच ‘स्वच्छ पाचोरा, आरोग्यदायी पाचोरा’ हे ध्येय प्रत्यक्षात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here