हरियाणातील राष्ट्रीय अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेसाठी हर्षवर्धन चौधरीची महाराष्ट्र संघात निवड

Oplus_16777216

Loading

जळगाव – धानोरा येथील युवा क्रिकेटपटू हर्षवर्धन चौधरी याने आपल्या उत्तम खेळगुणांद्वारे राज्याच्या यशात मोलाचा वाटा उचलण्यास सुरुवात केली असून, त्याची नुकतीच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि नाशिक क्रिकेट असोसिएशनमार्फत हरियाणा – पानिपत येथे होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली आहे. ही बाब जळगाव जिल्ह्यासाठी आणि धानोरा सारख्या ग्रामीण भागासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या विशेष प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसो गुलाबरावजी पाटील यांचे स्वीय सहाय्यक नवलसिंगराजे पाटील यांनी जळगाव येथे खास सत्कार समारंभाचे आयोजन करून हर्षवर्धन चौधरीचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी पाटील यांनी चौधरी याच्या खेळगुणांची प्रशंसा करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विशेष बाब म्हणजे नवलसिंगराजे पाटील यांनी या स्पर्धेसाठी आवश्यक असलेल्या सर्व आर्थिक खर्चाची स्पॉन्सरशिप घेत उदयोन्मुख खेळाडूला प्रोत्साहन देण्याचा आदर्श निर्माण केला आहे.या कार्यक्रमाला दोडे गुर्जर संस्थानचे अध्यक्ष चंद्रशेखरदादा पाटील, त्रिमूर्ती कॉलेजचे चेअरमन मनोजबापू पाटील तसेच माही पाटील हे मान्यवरही उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत झालेला हा सत्कार सोहळा हा केवळ एका खेळाडूचा गौरव नव्हता, तर हा ग्रामीण भागातील नवोदित युवकांच्या क्रीडाविकासासाठी दिलेला सशक्त संदेश होता.हर्षवर्धन चौधरी याच्या क्रिकेट क्षेत्रातील या यशामागे त्याचा सातत्याने घेतलेला सराव, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचा पाठिंबा आणि स्थानिक पातळीवरील संस्थांची साथ यांचा मोठा वाटा आहे. लहानशा गावातून येणारा हा युवा खेळाडू आपल्या जिद्दीने मोठ्या स्पर्धेत स्थान पटकावतोय, ही बाब इतर अनेक युवकांना प्रेरणादायी आहे. विशेषतः ग्रामीण भागातील युवकांसाठी ही एक दिशा देणारी घटना ठरत आहे.नवलसिंगराजे पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “आजच्या युगात तरुणांनी खेळासोबत शिक्षणातही प्रगती करणे आवश्यक आहे. राज्यात आणि देशात खेळांच्या माध्यमातून पुढे जाण्याच्या असंख्य संधी आहेत. अशा वेळी ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य मार्गदर्शन, सुविधा आणि आर्थिक पाठबळ मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हर्षवर्धनसारख्या मेहनती युवकांना मदत करणे ही माझी सामाजिक जबाबदारी समजून मी स्वतः पुढाकार घेतला आहे.”हर्षवर्धन चौधरी याच्या निवडीमुळे जळगाव जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात एक नवा आत्मविश्वास निर्माण झाला आहे. जिल्हा स्तरावर काम करणाऱ्या क्रिकेट अकॅडमी, प्रशिक्षक व खेळाडू यांच्यासाठी ही निवड एक प्रेरणा आहे. हर्षवर्धनच्या या यशामुळे त्याच्या पुढील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधींचा मार्ग मोकळा झाला आहे.यावेळी चंद्रशेखर दादा पाटील यांनी सांगितले की, “गावपातळीवरून राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणं ही सोपी गोष्ट नाही. हर्षवर्धनने त्याच्या कष्टाने ही कामगिरी साधली आहे. त्याचा हा प्रवास ग्रामीण भागातील इतर अनेक युवकांसाठी दीपस्तंभ ठरेल यात शंका नाही.”मनोज बापू पाटील यांनी आपल्या मनोगतात नमूद केलं की, “आज ग्रामीण भागातील खेळाडू प्रामाणिक सराव व आत्मविश्वासाच्या जोरावर राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत. हर्षवर्धनसारख्या खेळाडूंना संस्थात्मक पाठबळ मिळाल्यास ते देशासाठीही खेळू शकतील.हर्षवर्धनने सत्कारानंतर आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “ही निवड माझ्यासाठी खूप मोठी जबाबदारी आहे. मला मिळालेल्या संधीचे सोने करणे हेच माझं ध्येय आहे. नवलसिंगराजे पाटील यांनी मला दिलेली आर्थिक मदत आणि प्रोत्साहन हे मला अधिक प्रेरणादायी वाटते. त्यांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या संधींना अधिक बळ मिळाले आहे.क्रिकेट क्षेत्रात पुढे जाण्यासाठी ग्रामीण खेळाडूंना भेडसावणाऱ्या अडचणी – दर्जेदार प्रशिक्षणाची कमतरता, आर्थिक पाठबळाची मर्यादा, व्यासपीठाचा अभाव – या सर्व गोष्टींवर मात करत हर्षवर्धनसारख्या खेळाडूंनी मिळवलेलं यश हे केवळ वैयक्तिक नव्हे, तर संपूर्ण जिल्ह्यासाठी गौरवाची बाब ठरत आहे हर्षवर्धन चौधरीने याआधी जिल्हा व विभागीय पातळीवरील अनेक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून त्याच्या फलंदाजीतील सुस्पष्टता, तंत्रशुद्ध खेळ आणि मैदानावरील सकारात्मक ऊर्जा ही त्याच्या यशाची प्रमुख कारणे आहेत. प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापन यांच्यासह खेळाडू मित्रांनीही त्याच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे.या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये स्थानिक क्रीडाप्रेमी नागरिकांनीही सहभाग घेत हर्षवर्धनला शुभेच्छांचा वर्षाव केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते त्याला पुढील स्पर्धेसाठी किट, बूट, जर्सी यांचे संच प्रदान करण्यात आले. या सोहळ्यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली – ग्रामीण भारतातही प्रचंड क्षमतेचे खेळाडू आहेत, फक्त त्यांना योग्य संधी व मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे. नवलसिंगराजे पाटील यांच्यासारखे लोकप्रतिनिधी जर पुढाकार घेत राहिले, तर हर्षवर्धनसारखे अनेक हिरो उदयाला येतील आणि महाराष्ट्रच नव्हे तर भारताला जागतिक पातळीवर गौरव मिळवून देतील.हर्षवर्धन चौधरीच्या यशाला केवळ क्रीडाक्षेत्रात मर्यादा नाही तर त्याच्या मागे असलेल्या समर्पणाची, कष्टाची आणि चिकाटीची ही कथा आजच्या तरुणाईला एक संदेश देणारी आहे – की स्वप्न मोठी असावी, पण त्यासाठी प्रयत्न त्याहून मोठे असावेत!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here