पाचोरा – शहर व तालुक्यासह परिसरात संपूर्ण जिल्ह्यात गेल्या काही तासापुर्वी अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे, तुफानी वादळ, गारपीट व वीजेच्या कडकडाटामुळे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत शहरी भागांसह ग्रामीण भागांतील प्रत्येक गाव प्रभावित झाले असून, शेती, घरे, जनावरे, विद्युतवाहिन्या, झाडे, शाळा इत्यादींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही बाब अत्यंत दु:खद आणि चिंताजनक असून अनेक शेतकरी आणि सामान्य नागरिक सध्या तणावाखाली आहेत. या नुकसानीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, काहींचे उभे पीक वाया गेले आहे, घरांचे छप्पर उडाले आहे तर काही ठिकाणी झाडे कोसळून जीवितहानीचाही धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांची भावना अत्यंत उद्विग्न असून, शासनाकडून तात्काळ मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये अनेक वेळा मीडिया प्रतिनिधींवर विविध गावांतील घटना सविस्तरपणे कव्हर करण्याची अपेक्षा केली जाते. मात्र वास्तव पाहता प्रत्येक गावात जाऊन, प्रत्येक नागरिकाच्या नुकसानीचा स्वतंत्र वृत्तलेख तयार करणे हे अत्यंत वेळखाऊ, श्रमसाध्य व कधी कधी अशक्यप्राय कार्य आहे. एकीकडे वेळेचा अभाव, दुसरीकडे साधनांची मर्यादा आणि तिसरीकडे सर्वत्र होणाऱ्या नुकसानीचे सामूहिक स्वरूप लक्षात घेता ध्येय न्युज व झुंज वृत्तपत्राने यावेळी “कॉमन” स्वरूपात एकत्रित माहितीवर आधारित विनामूल्य बातमी प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे.
कॉमन स्वरूपातील बातमी म्हणजे संपूर्ण तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील नुकसानाच्या एकत्रित चित्रणावर आधारित लेख. यात स्थानिकांची भावना, शेतकऱ्यांचे मत, प्रशासनाच्या हालचाली व संभाव्य मदतीच्या बाबतीत अपेक्षा अशा सर्व गोष्टी सामाविष्ट केलेल्या असतात. त्यामुळे नागरिकांनी प्रत्येक गावाची स्वतंत्र बातमी नसल्याने नाराज न होता, सामूहिक भावनेने या प्रकाराकडे पाहावे अशी अपेक्षा आहे.
अनेकदा नागरिकांच्या मनात ही अपेक्षा असते की, त्यांच्या नुकसानीबाबत बातमी प्रसिद्ध झाली की शासन लक्ष देईल.या अशाने काही भुरट्या पत्रकारांना पैसे देऊन आपल्या बातम्या लावायला सांगतात मात्र यापेक्षा अधिक महत्त्वाची बाब म्हणजे, संबंधित विभागाच्या पंचनाम्याच्या प्रक्रियेत स्वतः सक्रीय सहभाग घेणे. शेतकऱ्यांनी व नागरिकांनी पंचनाम्यासाठी गावात येणाऱ्या महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर स्वतः उपस्थित राहून आपले नुकसान सविस्तरपणे दाखवणे अत्यावश्यक आहे. प्रशासनाला नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनाम्याचे अहवाल हेच अत्यावश्यक आणि अधिकृत आधार असतात. केवळ बातमी प्रसिद्ध झाली म्हणून किंवा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून सरकारी मदत मिळणार नाही व मिळतच नाही त्यामुळे प्रत्येकाने नुकसान नोंदवून घेण्यासाठी सजग राहणे, कोणतीही बाब दुर्लक्षित न करता तिची योग्य ती नोंद अधिकाऱ्यांकडून करून घेणे, आवश्यक कागदपत्रे तयार ठेवणे ही अत्यावश्यक बाब आहे.
अशा संकटकाळात फक्त पत्रकारितेवर, बातमीवर किंवा राजकीय हस्तक्षेपावर अवलंबून न राहता नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतः पुढे येऊन प्रशासनाशी थेट संपर्कात राहणे गरजेचे आहे. स्थानिक तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, मंडल अधिकारी, सरपंच, कृषी अधिकारी, प्रांताधिकारी इत्यादी संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्कात राहून आपली नुकसान भरपाईची प्रक्रिया वेळेत पूर्ण होईल याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
नागरिकांनी सजग राहण्याबरोबरच प्रशासनाची जबाबदारीही कमी होत नाही. महसूल व कृषी विभागाने वेळेवर सर्व गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची व नागरिकांची नोंद करून घेणे, पंचनामे वेळेत तयार करणे व शासनाला अहवाल सादर करणे हे त्यांचे कर्तव्य आहे. यामध्ये कोणतीही ढिलाई, विलंब अथवा पक्षपातीपणा झाल्यास नागरिकांचा रोष ओढवू शकतो. हे देखील शासकीय यंत्रणेला चांगल्या प्रकारे माहित आहे या आपत्तीमधून बाहेर पडण्यासाठी केवळ बातम्या, पोस्ट, व्हायरल व्हिडिओ अथवा प्रतिक्रिया यावर विसंबून राहून चालणार नाही. नागरिकांनी स्वतःहून प्रशासनाच्या प्रत्येक टप्प्यावर सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे. पत्रकारांनी आपापल्या परीने मोठ्या क्षेत्राची माहिती एकत्र करून वस्तुनिष्ठ बातमी प्रसिद्ध केल्याने ती एक दस्तऐवज ठरते. मात्र त्याचवेळी मदत मिळवण्यासाठी पंचनाम्यात प्रत्यक्षपणे उपस्थित राहणे आणि आपल्या हक्कासाठी शासकीय यंत्रणेसमोर शांत, संयमी व प्रभावीपणे आपली बाजू मांडणे हीच खरी गरज आहे. शेवटी, ही नैसर्गिक आपत्ती असून तिचा सामना एकजुटीने, सजगतेने आणि सकारात्मक दृष्टिकोनातूनच करता येईल. शासन, प्रशासन, माध्यमे आणि नागरिक या सर्व घटकांनी एकमेकांचा सन्मान राखत कार्य केल्यासच आपत्तीचे सावट दूर होऊन पुनर्बांधणीची प्रक्रिया सुरळीत होऊ शकेल.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.