पूरग्रस्तांना दिलासा देणारी स्वामी समर्थ सेवा मार्गाची परंपरा — चंद्रकांत दादांच्या हस्ते मदत वितरण, रक्तदान व आरोग्य शिबिर यशस्वी संपन्न

0

Loading

पाचोरा, दि. 8 ऑक्टोबर 2025 — “जिथे सर्व अमर्थ, तिने फक्त स्वामी समर्थ” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या सेवेकऱ्यांनी पुन्हा एकदा मानवीतेचे उदात्त उदाहरण घालून दिले. पाचोरा शहरातील स्वामी लॉन्स येथे आयोजित भव्य पूरग्रस्त मदत वितरण सोहळा, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर आणि मोफत औषध वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या उपक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे गुरुपुत्र आदरणीय श्री. चंद्रकांत दादा मोरे यांच्या शुभहस्ते पूरग्रस्तांना मदत वाटपाचे आयोजन करण्यात आले होते. पाचोरा तालुका आणि शहरासह कडेवडगाव, गहूले, पिंपरी, सार्वे, शिंदाड या गावांतील एकूण 477 पूरग्रस्त परिवारांना स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे आवश्यक जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या सेवाभावी कार्यामागे दादांच्या प्रेरणेने झपाटलेल्या सेवेकऱ्यांचा अथक प्रयत्न जाणवत होता. पूराच्या भीषण परिणामांनंतर जनतेच्या पुनर्वसनासाठी सेवा मार्गाने केलेले हे योगदान निःसंशयपणे सामाजिक संवेदनशीलतेचे उत्तम उदाहरण ठरले. या उपक्रमादरम्यान शासकीय रक्तपेढीच्या सहकार्याने आयोजित रक्तदान शिबिराला भाविक सेवेकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. एकूण 35 सेवेकऱ्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली बांधिलकी व्यक्त केली. विशेष म्हणजे या शिबिरात महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदवून पुरुषांपेक्षा जास्त रक्तदान करून समाजात प्रेरणादायी संदेश दिला. कार्यक्रमाच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप शिबिर देखील घेण्यात आले, ज्याचा लाभ 500 हून अधिक नागरिकांनी घेतला. कार्यक्रमाचे उद्घाटन आदरणीय चंद्रकांतदादा मोरे, जगदीश बापू सोनार, केंद्र प्रतिनिधी सौ. रेखाताई पाटील, आणि श्री. दत्ताभाऊ सोनार यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाले. कार्यक्रमाच्या प्रारंभी पाचोरा विभागात सुरू असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचा — रक्तदान शिबिरे, मोफत आरोग्य तपासणी, पूरग्रस्तांना मदतकार्य, शाळा व गाव स्वच्छता अभियान, बालसंस्कार व कृषी मेळावे, नदी स्वच्छता अभियान, दिवाळी फराळ व ब्लॅंकेट वाटप — सविस्तर आढावा प्रा. मनीष बाविस्कर यांनी उपस्थितांना दिला. त्यांच्या माहितीमुळे स्वामी समर्थ सेवा मार्गाची सर्वसमावेशक सामाजिक कार्यसंस्कृती अधोरेखित झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अत्यंत प्रभावीपणे श्री. सुवर्णसिंग राजपूत सर यांनी केले. वातावरणात भक्तिभाव आणि सेवाभावाचा संगम जाणवत होता. या प्रसंगी श्री. जगदीश बापू सोनार यांच्या सोन्या-चांदीच्या भव्य शोरूमचे उद्घाटन देखील आदरणीय दादासाहेब मोरे यांच्या हस्ते करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमास एक वेगळे औचित्य प्राप्त झाले. यावेळी श्री. राजेंद्र पंडित पाटील यांचा कोरोना काळातील उल्लेखनीय रुग्णसेवा कार्याबद्दल दादांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. तसेच रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा सुद्धा सत्कार करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. सेवा मार्गाच्या प्रत्येक उपक्रमात दिसणारी संघटित कार्यपद्धती, शिस्त आणि नि:स्वार्थ सेवा भाव यामुळे उपस्थित नागरिक भारावून गेले. पूरग्रस्तांना मदत वितरण आणि रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी राहुल बावचे सर, गजेंद्र चौधरी सर, संकेत बोरसे सर, अंबालाल पवार सर, सुभाष दादा पाटील, किरण वाणी, तेजस देव, चेतन पवार, जितेंद्र देवरे, अक्षय सिनकर, बबलू वाणी, विश्वजीत सर, ज्ञानेश्वर चौधरी, विष्णू भाऊ, दुष्यंत सर, लक्ष्मण सिनकर सर, ठाकरे सर आणि विकास पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या प्रयत्नांमुळे प्रत्येक घटक वेळेत आणि सुरळीत पार पडला. पाचोरा मेळावा यशस्वी व्हावा म्हणून गिरीश दुसाने, हर्षल चित्ते, अविष्कार वाणी, सुधीर महाजन सर, गणेश कापुरे दादा, ललित चित्ते, वेदांत पवार, रवींद्र पाटील (मामा), मयूर सोनवणे, सार्थक देव, गौरव, उज्वल पाटील सर यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्यांच्यासह कुमारी योगिता, कुमारी अंकिता, कुमारी जानवी, कुमारी टिना सिनकर, तसेच महिला सेवेकऱ्यांमध्ये सौ. विद्या पाटील, सौ. ज्योती पाटील, सौ. जयश्रीताई ढवळे, सौ. कीर्ती ताई येवले, सौ. भोसले ताई, सौ. रुपाली ताई पाटील, सौ. आशाताई पाटील, सौ. सविता धस ताई, सौ. जयश्री पाटील, सौं. कल्पनाताई परदेशी, सौ. लताताई सिनकर, सौ. वंदना चित्ते, सौ. कविता चित्ते, सौ. हर्षदा चित्ते, अवीता ताई पाटील यांच्या योगदानामुळे हा उपक्रम अधिक भव्य आणि यशस्वी झाला. महिलांच्या सहभागामुळे या सेवेचे स्वरूप अधिक प्रभावी आणि सर्वसमावेशक झाले. या दिवशी जळगाव, चाळीसगाव, भडगाव, शेंदुर्णी, कडेवडगाव, खडकदेवळा, तारखेडा, गाळण, बिल्दी, जारगाव, वाडी, शेवाळे, कुऱ्हाड, पाहाण, परधाडे, कासोदा, शिंदाड, साजगाव, गिरड ओझर, मांडकी, भातखंडे, नगरदेवळा, पिंपळगाव थडीचे, गोंदेगाव, पळाशी, बनोटी अशा अनेक सेवा केंद्रांतील सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला जिल्हास्तरीय स्वरूप प्राप्त झाले. या उपक्रमात उपस्थित सर्व सेवेकऱ्यांनी ‘गाव तेथे केंद्र, घर तेथे सेवेकरी’ या ब्रीदवाक्याची प्रचीती दिली. पूरग्रस्तांना दिलासा देणे असो वा रक्तदानाद्वारे जीवदान देणे — स्वामी समर्थ सेवा मार्गाने प्रत्येक वेळेस ‘सेवा हीच साधना’ या तत्त्वाची प्रचिती दिली आहे. कार्यक्रमाच्या अखेरीस राष्ट्रगीताने सांगता झाली. वातावरणात स्वामी नामाचा गजर घुमत असताना प्रत्येक सेवेकऱ्याच्या डोळ्यांत समाधानाचे आणि भक्तिभावाचे अश्रू होते. “माळ कशी जपायची, नियम कसे पाळायचे” या गुरुवचनांचा अर्थ त्या क्षणी प्रत्येकाने अंतर्मनाने अनुभवला. जसे जळगावचे सोने देशभर प्रसिद्ध आहे, तसेच या भूमीवरील सोनेरी मनाचे सेवेकरी आजही मानवतेच्या सेवेची परंपरा जपत आहेत. हा उपक्रम म्हणजे केवळ सामाजिक मदत नव्हे, तर अध्यात्म आणि समाजसेवेचा अद्भुत संगम होता — जो प्रत्येक सेवेकऱ्याच्या कृतीतून प्रकट झाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here