पोलीस अधिकारी सत्तेच्या स्नेहभोजनात, पत्रकार उपेक्षेच्या कडेला; पाचोऱ्यात पत्रकारितेचे आत्मचिंतन आवश्यक

0

Loading

पाचोरा – जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते गणेशोत्सव मंडळांचे बक्षीस वितरण समारंभ पाचोरा शहरात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन औपचारिकतेने, शिस्तबद्धतेने आणि पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत करण्यात आले होते. सार्वजनिक उत्सवांमध्ये शिस्त, सामाजिक भान आणि प्रशासनाचा सहभाग दाखविण्याच्या उद्देशाने अशा कार्यक्रमांचे महत्त्व निर्विवाद आहे. पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्या नंतर बातमी मध्ये नांव टाकू नका किंवा बदल करा असे प्रकार घडत होते आता तर थेट पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्याची बातमीच लपवली जाते ती का? आणि कोणासाठी व कोणाच्या हितासाठी हा संशोधनाचा विषय आहे मात्र सध्याची  गंभीर बाब म्हणजे बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमानंतर जे दृश्य समोर आले, त्याने पाचोरा शहर व तालुक्यातील पत्रकारितेच्या प्रतिष्ठेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. बक्षीस वितरण संपल्यानंतर उपस्थित मंडळांचे पदाधिकारी आणि अवघे मोजके सहा ते सात पत्रकार इतकीच संख्या असताना, पत्रकारांना स्पष्ट शब्दांत “आता जाण्यास हरकत नाही” असे सांगण्यात आले.( तरी सुद्धा काही बाईटच्या लालचेने तिथेच घुटमळत होते त्यांना सुद्धा जेवा म्हटले नाही हा भाग वेगळा) परंतु हे शब्द केवळ औपचारिक नव्हते, तर पत्रकारांच्या भूमिकेची, कष्टांची आणि लोकशाहीतील त्यांच्या स्थानाची अवहेलना करणारे होते. कार्यक्रम संपल्यानंतर पत्रकारांना निरोप देण्यात आला, मात्र त्याच ठिकाणी उपस्थित पोलीस पाटील आणि (महिला पोलीस पाटील यांचे पती ) यांच्यासाठी स्नेहभोजनाचा स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे समोर आले. हा भेदभाव केवळ भोजनापुरता मर्यादित नव्हता, तर तो मानसिकतेचा, प्राधान्यक्रमांचा आणि सत्ताकेंद्रित संस्कृतीचा आरसा दाखवणारा होता. सार्वजनिक कार्यक्रमात बातमीदार म्हणून उपस्थित असलेले पत्रकार हे केवळ पाहुणे नसतात, तर त्या कार्यक्रमाची माहिती समाजापर्यंत पोहोचवणारे महत्त्वाचे दुवे असतात, तरीही त्यांना दुय्यम वागणूक देण्यात आली ही बाब चिंताजनक आहे. या घटनेमुळे एक प्रश्न प्रकर्षाने पुढे येतो, तो म्हणजे प्रशासन आणि काही अधिकारी आर्थिकदृष्ट्या गब्बर होत असताना काही पत्रकार मात्र लाचारी वृत्तीने किंवा परिस्थितीपुढे झुकत तर नाहीत ना? पत्रकारांच्या जिवावर बातम्या उभ्या राहतात, प्रशासनाची प्रतिमा उजळते किंवा मलीन होते, पण त्याच पत्रकारांना सन्मानाची वागणूक देण्याची वेळ आली की दुर्लक्ष केले जाते. शुद्ध शाकाहारी स्नेहभोजन ही केवळ पोटभर जेवणाची बाब नसून तो सन्मानाचा, समावेशकतेचा आणि परस्पर आदराचा प्रतीकात्मक संकेत असतो. त्या स्नेहभोजनातून पत्रकारांना वगळले जाणे म्हणजे अप्रत्यक्षपणे “तुमची गरज एवढ्यापुरतीच” असा संदेश देण्यासारखे आहे. पाचोरा तालुक्यातील पत्रकारांसाठी ही घटना आत्मचिंतनाची वेळ आहे. पत्रकारांनी आपली एकजूट, आपला आत्मसन्मान आणि आपली व्यावसायिक प्रतिष्ठा यांचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. अवैध धंद्याशी निगडीत सोडून स्वाभिमानी पत्रकार स्वतःच जर अशा उपेक्षेला गप्प बसून स्वीकारत असतील, तर भविष्यात प्रशासनाकडून अधिक आदर अपेक्षित ठेवणे अवघड ठरेल. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेचा पाया स्वाभिमानावर उभा असतो. तो स्वाभिमान सवलतींनी, निमंत्रणांनी किंवा स्नेहभोजनांनी विकत घेण्याचा विषय नाही, पण किमान सन्मानाची वागणूक मिळणे ही अपेक्षा गैर नाही. या घटनेत पोलीस पाटील आणि महिला पोलीस पाटील यांच्या पती यांच्यासाठी स्नेहभोजन आयोजित होणे आणि पत्रकारांना दूर ठेवणे, यामागील मानसिकता अधिक गंभीर आहे. शासनाच्या मानधन तत्वावर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना प्राधान्य आणि माहिती देणाऱ्या पत्रकारांना दुय्यम स्थान, हा विरोधाभास समाजाला काय संदेश देतो? प्रशासन आणि माध्यमे यांचे नाते परस्परावलंबी आहे. एकमेकांचा सन्मान राखूनच हे नाते मजबूत राहू शकते, मात्र अशा घटनांमुळे प्रशासनाची संवेदनशीलता आणि पत्रकारांची एकजूट दोन्हीवर प्रश्नचिन्ह उभे राहते. या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील पत्रकार संघटनांनी आणि स्वतंत्र पत्रकारांनी एकत्र येऊन स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे. कोणत्याही कार्यक्रमात पत्रकारांना मानहानीकारक वागणूक दिली गेल्यास ती सामूहिकपणे निषेध म्हणुन नोंदवली गेली पाहिजे. पत्रकारांची उपस्थिती केवळ फोटो काढण्यासाठी किंवा बातमी छापण्यासाठी नसून लोकशाहीतील पारदर्शकता टिकवण्यासाठी आहे, हे प्रशासनानेही समजून घेतले पाहिजे. शेवटी “स्नेहभोजनाची लायकी सुद्धा गमावली” ही भावना केवळ एका कार्यक्रमापुरती मर्यादित न ठेवता ती पत्रकारितेच्या आत्मपरीक्षणाची सुरुवात ठरावी, हीच अपेक्षा असून स्वाभिमान जपणारी, निर्भीड आणि एकसंध पत्रकारिता हीच अशा उपेक्षेला योग्य उत्तर देऊ शकते, असे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.

सॅल्युट स्वाभिमानी तरुण भारतच्या पत्रकारीतेला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here