Home Blog Page 105

“इन्कम टॅक्स विभागात मराठी तरुणांना डावलण्याचा डाव?- खा अरविंदभाई सावंत

0

Loading

मुंबई – सध्या केंद्र सरकारच्या विविध खात्यांमध्ये भरती प्रक्रियेत महाराष्ट्रातील स्थानिक उमेदवारांवर होणाऱ्या अन्यायाच्या प्रकरणाने पुन्हा एकदा उघड रूप घेतले आहे. यंदा ‘इन्कम टॅक्स’ विभागाच्या मुंबई विभागात एकूण १२०० पदांवर भरती पार पडली, परंतु धक्कादायक बाब म्हणजे या भरतीत फक्त महाराष्ट्रातील केवळ ३ उमेदवारांना पात्र ठरवण्यात आले. उर्वरित ११९७ उमेदवार गुजरात व इतर राज्यांतील आहेत. या घटनाक्रमामुळे महाराष्ट्रात प्रचंड संतापाची लाट उसळली असून, केंद्रातील मराठी उमेदवारांप्रती हे चाललेले कारस्थान असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.
या घटनेला गंभीर घेत उबाठा सेनेचे खासदार अरविंदभाई सावंत यांनी थेट लोकसभा सभागृहात आवाज उठवला. “ही केवळ निव्वळ भरती प्रक्रिया नाही, तर मराठी तरुणांची संभाव्य सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती रोखण्याचा नियोजित कट आहे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी असूनही, त्या कार्यालयातील भरतीत स्थानिकांना डावलले जाते, हे लाजिरवाणे व दुर्दैवी आहे,” असे खासदार सावंत यांनी ठणकावून सांगितले.
सभागृहात त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांनी संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांमध्ये अस्वस्थता निर्माण केली आहे. विशेष म्हणजे ‘स्थानिकांना प्राधान्य’ या भूमिकेवर वर्षानुवर्षे बोलणाऱ्या सत्ताधारी पक्षांनी या प्रश्नावर मौन बाळगले आहे, हेही चिंतेचे आणि संशयास्पद आहे.
या भरती प्रक्रियेत गुजरातमधून सुमारे ७५० उमेदवार निवडले गेले असून उर्वरित ४५० पेक्षा अधिक इतर राज्यांमधील आहेत. मुंबई ही देशाच्या आर्थिक राजधानीच्या नावाने ओळखली जाते आणि इन्कम टॅक्स विभागाचा सर्वात मोठा कार्यालयही येथेच आहे. अशा वेळी येथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे स्थानिक भाषेवरील प्रभुत्व, सांस्कृतिक समज आणि नागरिकांशी संवाद कौशल्य अत्यंत महत्त्वाचे असते. परंतु गुजरातसह इतर राज्यांतील उमेदवार येथे येऊन कार्यभार स्वीकारत असल्याने, एकूणच कार्यपद्धतीत दुराव्याची भावना निर्माण होत आहे.
राज्यात अनेकदा स्थानिक तरुणांसाठी नोकर्‍या राखीव ठेवाव्यात, या मागणीचा सूर उमटत असतो. मात्र केंद्रीय खात्यांच्या भरतीत ‘राष्ट्रीय एकात्मता’च्या नावाखाली संपूर्ण देशभरातून भरती होत असल्याचे कारण पुढे केले जाते. पण अशा भरतीत एखाद्या राज्यातीलच इतक्या मोठ्या संख्येने उमेदवार पात्र ठरणे आणि स्थानिक उमेदवारांचा दारुण पराभव होणे, ही निश्चितच निष्पक्ष भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे.
खासदार अरविंदभाई सावंत यांनी भरतीमधील असंतुलनाचा निषेध करताना स्पष्ट शब्दात सांगितले की, “अफझलखान, औरंगजेब, कबर, वाघ्या कुत्र्याची समाधी किंवा दिशा सालियनसारख्या भंपक विषयांमध्ये मराठी जनतेला गुंतवून ठेवलं जातं. या सगळ्या प्रकरणांचा हेतू म्हणजे मराठी समाजाला भ्रमित ठेवून त्यांच्या मुख्य प्रश्नांपासून लक्ष हटवणं. मराठी तरुणांना बेरोजगारीच्या दलदलीत लोटून, त्यांच्या भविष्याची राखरांगोळी केली जात आहे.”
त्यांनी विचारले, “काय चाललंय हे लक्षात येत नाहीये का? उठावं लागेल! जागं व्हा आणि या कारस्थानांना उधळून लावा. याचा बंदोबस्त न झाल्यास, महाराष्ट्रातील प्रत्येक तरुणाच्या भविष्यात अंध:कार येणार आहे.”
तज्ज्ञांच्या मते, भरती प्रक्रियेचा संपूर्ण तपशील सार्वजनिक व्हावा, हे आवश्यक आहे. परीक्षेतील भाषा, केंद्रांची नेमणूक, निकाल प्रक्रियेत पारदर्शकता, गुणांकन निकष यावर तपासणी व्हावी. विशेषतः मुंबईसारख्या शहरातील भरतीसाठी स्थानिक भाषेचा आधारभूत निकष असावा, असा ठाम आग्रह बऱ्याच संघटनांकडून मांडला जात आहे.
आजवर महाराष्ट्राच्या मातीतून अनेक प्रज्ञावान आणि कार्यक्षम अधिकारी घडले. पण सध्याच्या यंत्रणेमध्ये महाराष्ट्रातील तरुणांवर होणारे हे दुर्लक्ष, राजकीय नेतृत्वाच्या असंवेदनशीलतेचेही द्योतक मानले जात आहे. काही राज्ये आपापल्या तरुणांसाठी जागा राखून ठेवतात, प्रयत्नशील राहतात; मात्र महाराष्ट्रात असे धोरण वा रक्षणकर्ते नेमके कुठे आहेत, असा सवाल समाजमन विचारू लागले आहे.
दिशा सालियन प्रकरण, औरंगजेबाच्या कबरीचे वाद, गडकोटांच्या समाधी वादांमधून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न सातत्याने दिसून येतात. ‘ही सगळी कारस्थाने मराठी जनतेच्या मूलभूत प्रश्नांपासून लक्ष हटवण्यासाठी आहेत,’ असा आरोप अरविंदभाई सावंत यांनी सभागृहात केला आहे. ‘राज्यघटनेत दिलेल्या हक्कांचा, संधीच्या समानतेचा असा बिघडवलेला अर्थ लावला जात असेल तर लोकशाहीचा अर्थच मोडीत निघतो’, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
भरती प्रक्रियेत अपात्र ठरलेले महाराष्ट्रातील अनेक उमेदवार म्हणाले, “आम्ही भरपूर तयारी केली, कोचिंग घेतली, परीक्षा दिली. पण निकालात आमचं नावही नाही. आम्ही काय गुन्हा केला होता का? स्थानिक असूनही आम्हाला बाजूला सारलं जातं. ही केवळ अन्याय नव्हे, ही आमच्या स्वाभिमानावरची ठिणगी आहे.”
खासदार सावंत यांच्या वक्तव्यानंतर काही युवा संघटना, विद्यार्थी संघ, सामाजिक कार्यकर्ते या मुद्यावर आंदोलनाची तयारी करत आहेत. एकंदरित ही भरती केंद्रशासकीय संस्था असूनही, पारदर्शकता व न्याय्यतेचा अभाव अधोरेखित करणारी आहे. राजकीय पक्षांनी यावर तात्काळ भूमिका स्पष्ट करून, या भरती प्रक्रियेच्या चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमावी, अशी मागणी केली जात आहे.
इन्कम टॅक्स विभागाच्या भरती प्रकरणाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, मराठी तरुणांच्या वाट्याला संधीपेक्षा संघर्षच अधिक येतो. ‘न्यायासाठी लढणं’ ही त्यांची नियती ठरत आहे. अशा वेळी यंत्रणांवर आणि सत्ताधाऱ्यांवर प्रश्न विचारणे, ही काळाची गरज आहे. अन्यथा काळ लोटेल, संधीही लोटून जाईल, पण प्रश्न राहतीलच – ‘मराठी माणसाचा वाटा नेमका आहे तरी कुठे?’

लखनौने खंडीत केली गुजरातची विजयी; सुपरजायंट्सचा चौथा विजय

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : लखनौ सुपरजायंट्सने आयपीएल-२०२५ मध्ये गुजरात टायटन्सचा सहा विकेट्सने पराभव करून विजयी घोडदौड थांबवली. सलग चार सामने जिंकल्यानंतर गुजरातने एकाना स्टेडियममध्ये प्रवेश केला होता, जिथे यजमान संघाने आपली सर्व मेहनत वाया घालवली. पुन्हा एकदा एडेन मार्कराम आणि निकोलस पूरन यांनी लखनौच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने सहा विकेट्स गमावून १८० धावा केल्या. लखनौने हे लक्ष्य १९.३ षटकांत पूर्ण केले. या हंगामात लखनौचा हा चौथा विजय आहे. गुजरातचा हा या हंगामातील दुसरा पराभव आहे.
लखनौचा स्टार सलामीवीर मिचेल मार्श या सामन्यात खेळत नव्हता. त्याच्या जागी कर्णधार पंतने मार्करामसोबत सलामीची जबाबदारी स्वीकारली. तथापि, स्थान बदलल्यानंतरही पंत मोठी खेळी खेळू शकला नाही. सातव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाने त्याला वॉशिंग्टन सुंदरकडून झेलबाद केले. यानंतर, पूरनने येताच वादळ निर्माण केले आणि स्फोटक फलंदाजी केली. दुसरीकडे, मार्कराम देखील वेगाने धावा काढत होता.
मार्करामने त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते. यानंतर तो आणखी फक्त आठ धावा जोडू शकला आणि बाद झाला. मार्करामने ३१ चेंडूत नऊ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५८ धावा केल्या. कृष्णाने त्याला बाद केले. त्याच्या जाण्यानंतर, पूरण थांबला नाही आणि वेगाने खेळत राहिला. १३ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर चौकार मारून पूरनने आपले अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक झळकावल्यानंतर पूरनही बाद झाला. रशीद खानने त्याला बाद केले. त्याने ३४ चेंडूत ६१ धावांची खेळी केली ज्यामध्ये त्याने एक चौकार आणि सात षटकार मारले. 
मार्कराम आणि पूरनच्या जाण्यानंतर संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी आयुष बदोनीवर आली आणि त्याने हे काम खूप चांगल्या प्रकारे पार पाडले. तो शेवटपर्यंत खेळपट्टीवर उभा राहिला आणि संघाला विजय मिळवून दिल्यानंतरच तो परतला. डेव्हिड मिलरनेही त्याला चांगली साथ दिली. १९ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर मिलरला बाद करून सुंदरने सामन्यात उत्साह आणण्याचा प्रयत्न केला. मिलरने सात धावा केल्या. शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी सहा धावा हव्या होत्या. पहिल्या चेंडूवर अब्दुल समदने एक धाव घेतली. बदोनीने दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. बदोनी २८ धावांवर नाबाद राहिला. 
एके काळी गुजरात सहजपणे २०० धावांचा टप्पा ओलांडेल असे वाटत होते. कर्णधार गिल आणि सुदर्शन यांनी मोठ्या धावसंख्येचा पाया रचला होता. दोघांनी मिळून पहिल्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली. या हंगामात गुजरातची पहिल्या विकेटसाठी ही सर्वात मोठी भागीदारी आहे. १३ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर, आवेश खानने गिलचा डाव संपवून ही भागीदारी भेदली. गिलने ३८ चेंडूत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ६० धावा केल्या.
पुढच्याच षटकात साईही तंबूमध्ये परतला. त्याला रवी बिश्नोईने बाद केले. त्याने ३७ चेंडूत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ५६ धावा केल्या.
दोन्ही सलामीवीरांच्या जाण्यानंतर गुजरातची धावगती मंदावली आणि संघ २०० च्या जवळही पोहोचू शकला नाही. जोस बटलर १६ धावा, वॉशिंग्टन सुंदर दोन आणि शेरफेन रदरफोर्ड २२ धावा काढून बाद झाला. एकेकाळी गुजरातचा स्कोअर १२ षटकांत एकही विकेट न गमावता १२० धावा असा होता. यानंतर, त्याने शेवटच्या आठ षटकांत फक्त ६० धावा केल्या आणि सहा विकेट गमावल्या. शाहरुख खान ११ धावा करून नाबाद राहिला. राहुल तेवतियाला खातेही उघडता आले नाही.

पाचोरा तालुक्यातील पंप व दुचाकी चोरीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची यशस्वी कारवाई, पिंपळगाव पोलीस मात्र ‘कुंभकर्णी’ झोपेत?

0

Loading

पाचोरा –( झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज प्रतिनिधी – धनराज पाटील, बॅनर Mo. 9922614917) पाचोरा तालुका व परिसरात गेल्या काही महिन्यांपासून शेतकऱ्यांना सतावणाऱ्या पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार चोरीच्या घटनांनी आता एक निर्णायक वळण घेतले आहे. या चोरीप्रकरणाचा छडा लावत जळगाव जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने एक अत्यंत महत्त्वाची कारवाई केली असून, यामध्ये चोरी करणाऱ्या चक्क तीन सदस्यीय टोळीला अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्या ताब्यातून तब्बल १७ पाणबुडी मोटारी व चार चोरीच्या मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या सर्व घटनांचा थेट संबंध शेतकऱ्यांच्या शेती व्यवहारांशी असून, आरोपी हे पाचोरा तालुक्यातील पिंपरी येथील असल्याचे उघड झाले आहे.
ही सर्व कारवाई पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गुन्हा क्रमांक ८५/२०२५, भारतीय दंड विधान कलम ३७९ (२) अन्वये दाखल गुन्ह्याच्या तपासातून समोर आली. सदर गुन्ह्यामध्ये एका शेतामधून रात्रीच्या सुमारास पाणबुडी इलेक्ट्रीक मोटार चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोलीस हवालदार लक्ष्मण पाटील, पो.ना. रणजित जाधव, पोकॉ जितेंद्र पाटील, पोकॉ भुषण पाटील, चा.पो.ह. भारत पाटील यांच्या सहभागाने हे पथक तयार झाले.
गोपनीय बातमीदारामार्फत स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, सचिन बापुराव पाटील (वय २९, रा. पिंपरी, ता. पाचोरा) याने त्याच्या साथीदारांसह पाणबुडी मोटारी चोरल्या आहेत. पथकाने तात्काळ सचिन पाटील याच्या घरावर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. विचारपुशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली आणि आपल्या साथीदारांची नावे देखील उघड केली. भगवान लक्ष्मण पाटील आणि राहुल त्र्यंबक पाटील (दोघेही रा. पिंपरी) यांच्यासह त्यांनी मिळून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या गुन्हा क्रमांक ८५/२०२५ आणि ११५/२०२२ या दोन प्रकरणांमध्ये एकूण १७ पाणबुडी मोटारी चोरल्याचे उघड झाले.
पोलीस पथकाने पुढील कारवाई करत या दोघांनाही अटक केली आणि चौकशीत त्यांनीही चोरी केलेल्या मोटारींची कबुली दिली. त्यांनी चोरी केलेल्या मोटारी दाखवून दिल्या व त्या पोलिसांनी हस्तगत केल्या. या साऱ्या चोरीच्या घटना शेतकऱ्यांच्या शेती पंपाशी संबंधित असल्यामुळे यातून त्यांच्यावर मोठा आर्थिक बोजा निर्माण झाला होता.
या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा तपशील समोर आला की, याच टोळीने पाचोरा शहर व तालुक्यातून चार मोटार सायकली चोरल्याचे देखील स्वीकारले. या चारही गाड्या त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत. या संदर्भात पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्रमांक ७९/२०२५, १०१/२०२५ आणि १४६/२०२५ भारतीय दंड विधान कलम ३७९ नुसार दाखल करण्यात आले होते.
या सर्व कारवायांमुळे स्थानिक गुन्हे शाखेची कार्यक्षमता पुन्हा एकदा जनतेसमोर आली आहे. गुन्हे उघडकीस आणताना त्यांनी दाखवलेली तत्परता, काटेकोर योजना आणि प्रामाणिक कार्यशैली प्रशंसनीय आहे. परंतु या यशस्वी कारवाईमुळे एक अत्यंत गंभीर आणि विचारप्रवृत्त करणारा प्रश्न समोर येतो, तो म्हणजे – या गुन्ह्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी असलेल्या पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनने या प्रकरणांकडे इतक्या दिवस दुर्लक्ष का केले?
या सर्व चोरीच्या घटना पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात घडल्या होत्या. परंतु स्थानिक गुन्हे शाखेला हे गुन्हे उघडकीस आणावे लागले, ही बाब नक्कीच धक्कादायक आणि विचार करण्यास लावणारी आहे. शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी करपली, पंप चोरीला गेले, अनेकांना नुकसान सहन करावे लागले – तरीही स्थानिक पोलीस ‘कुंभकर्णी झोपेत’ होते का? की त्यांना या चोरीमागील वास्तविक टोळीची माहिती असूनही त्यांनी कोणत्या ‘इतर हेतूने’ दुर्लक्ष केले, असा प्रश्न निर्माण होतो.
सामाजिक पातळीवर यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, असा आरोप केला जात आहे की, पिंपळगाव पोलीस स्टेशन फक्त अवैध व्यवसायांच्या हप्ते गोळा करण्यापुरतेच कार्यरत आहे काय? वाळू तस्करी, गुटखा विक्री, सट्टा-जुगार, क्लबचे अनैतिक व्यवहार अशा अनेक गैरकृत्यांकडे स्थानिक पोलिसांचे अघोषित ‘डोळेझाक धोरण’ कायम असून, शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा जनसामान्यांच्या मालमत्तेचे संरक्षण हे त्यांच्यासाठी दुय्यम ठरत आहे, अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे.
हा गंभीर मुद्दा संपूर्ण पोलिस यंत्रणेवरच नव्हे तर प्रशासनाच्या विश्वासार्हतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. पोलीस ठाण्याचा मुख्य उद्देश गुन्हे रोखणे, नागरीकांच्या मालमत्तेचे संरक्षण करणे, समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे असताना, जर तेच पोलीस आपल्या कार्यक्षेत्रात घडणाऱ्या चोरीसारख्या गंभीर गुन्ह्यांकडे दुर्लक्ष करत असतील, तर त्याला दुसरे नाव ‘दायित्वच्युती’ असेच देता येईल.
अशा वेळी, स्थानिक गुन्हे शाखेने दाखवलेली तत्परता आणि निष्ठा एकप्रकारे आदर्श ठरत आहे. त्यांनी या गुन्ह्यांचा तपशीलवार तपास करत केवळ आरोपी पकडले नाहीत, तर चोरी गेलेल्या बहुमूल्य वस्तू हस्तगत करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. हे कार्य खर्‍या अर्थाने ‘जनतेचे पोलीस’ म्हणून नावारूपाला येणारे आहे.
या पार्श्वभूमीवर, जिल्हा पोलीस अधीक्षक व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पिंपळगाव पोलीस स्टेशनच्या निष्क्रियतेची स्वतंत्र चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक स्तरावरून जोर धरू लागली आहे. अन्यथा, पोलीस खात्यावरील जनतेचा विश्वास डळमळीत होण्यास वेळ लागणार नाही.
सदर आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यांच्याकडून आणखी किती गुन्ह्यांचा शोध लागतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकरी वर्ग, व्यापारी व नागरिकांना या कारवाईमुळे दिलासा मिळाला आहे. मात्र ही कारवाई म्हणजे समस्या सुटली असे नव्हे, तर अशा प्रकारच्या घटनांचा पुनरावृत्ती थांबवण्यासाठी यंत्रणांनी जाणीवपूर्वक सातत्याने कार्यरत राहणे आवश्यक आहे.
या कारवाईचा मुख्य संदेश असा – गुन्हा कितीही योजनाबद्ध असो, सत्याला आणि कायद्याला दडपता येत नाही, फक्त त्याच्या पाठपुराव्याची आणि प्रामाणिक तपासाची गरज असते.

बाबासाहेबांची जयंती साजरी न करणाऱ्या CBSE शाळेला संतप्त पालकांचा इशारा; झुंज व ध्येय न्यूजकडे तक्रार

0

Loading

पाचोरा – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे सामाजिक न्याय, समता, लोकशाही आणि संविधान मूल्यांचा साजरा करण्याचा दिवस असतो. प्रत्येक शिक्षणसंस्थेने या दिवशी विद्यार्थ्यांना बाबासाहेबांचे विचार आणि कार्याची ओळख करून देणे ही केवळ परंपरा नव्हे, तर मूलभूत सामाजिक जबाबदारी आहे. परंतु पाचोरा शहरातील एका नामांकित CBSE पॅटर्नच्या शाळेने यंदा १४ एप्रिल २०२५ रोजी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे समोर आले असून, यामुळे एका सजग आणि संतप्त पालकाने झुंज वृत्तपत्र व ध्येय न्यूज कार्यालयात थेट तक्रार पाठवत संबंधित शाळांवर रोष व्यक्त केला आहे.विषय जास्त वादग्रस्त होऊ नये म्हणून मुद्दाम शाळेचे नाव या बातमीत नमूद केले नाही परंतु या पालकाने पाठवलेल्या तक्रारीमध्ये स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, “शाळांमध्ये वर्षभर अनेक महापुरुषांचे जन्मदिवस, पुण्यतिथ्या, वेशभूषा स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा, सायंटिफिक वाचन, प्रार्थना गीत अशा विविध उपक्रमांद्वारे साजरे केले जातात.किंबहुना त्याची पूर्व सूचना अधिकृत Pdf व्दारे पालकांच्या ग्रुप वर दिली जाते मात्र 14 एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती संदर्भात एक एक ओळची देखील सूचना नाही यावेळी नेहमी प्रमाणे दोन दिवस आधी विद्यार्थ्यांना सूचना न देता बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत मात्र जाणूनबुजून मौन बाळगले जाते, ही बाब केवळ लज्जास्पदच नव्हे तर अन्यायकारक आहे.”
सदर पालकाने आपल्या निवेदनात आक्रोशपूर्ण शब्दांत असा सवाल केला आहे की, “शाळा फक्त निवडक महापुरुषांसाठीच आहे का? बाबासाहेब आंबेडकर यांना दुर्लक्षित करण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?”
या प्रखर निषेधाच्या निवेदनात पुढे लिहिले आहे की, “ हे तेच बाबासाहेब आंबेडकर आहेत, ज्यांना लहानपणी अस्पृश्यतेचा अनुभव येत होता. त्यांना पाण्याचा हक्क नाकारला जात होता. शाळेत कोपऱ्यात उभं राहून शिक्षण घेणारे बाबासाहेब पुढे जगातल्या सर्वोच्च विद्यापीठांमधून शिक्षण घेऊन भारताचा संविधानकार & भारत रत्न झाले. पण आजच्या काळात पाचोरा शहरातील एका इंग्रजी माध्यम शाळांमध्ये बाबासाहेबांच्या जयंतीचा उच्चारही होत नसल्याचं पाहून हे शिक्षण आणि मूल्यशिक्षण दोन्ही अधोगतीला गेलेले दिसते.”
मेसेज व्दारे पाठवलेल्या तक्रारीत पालकाने सांगितले की, बाबासाहेब आंबेडकर हे इतिहासाचे नव्हे, तर वर्तमान आणि भविष्याचे अधिष्ठान आहेत. त्यांचे विचार विद्यार्थी व समाजापर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक शाळेचे कर्तव्य आहे. जर ही जबाबदारी शाळा पार पाडत नसतील, तर पालकांनी आवाज उठवावा, हेही त्यांनी ठामपणे नमूद केले आहे.
सदर निवेदनात पुढे असेही स्पष्ट इशारा दिला आहे की, “जर यापुढेही बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाणार नसेल, तर पालक & आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत. समाजमाध्यमांपासून ते शैक्षणिक मंडळांपर्यंत, आणि आवश्यक असल्यास कायदेशीर पातळीवरसुद्धा याविरोधात आवाज उठवण्यात येईल.”
या पार्श्वभूमीवर पाचोरा शहरातील शासकीय अधिकाऱ्यांनी, तसेच संबंधित शैक्षणिक संस्थेने जी ‘सीबीएसई’च्या नावाने प्रतिष्ठेचा टेंभा मिरवते त्यांनी वेळीच आत्मपरीक्षण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. संविधानाची आणि राष्ट्रपुरुषांच्या स्मृतींची जाणीवपूर्वक उपेक्षा करणे हे शिक्षणाच्या मूलभूत तत्त्वांशी प्रतारणा आहे, असा ठाम सूर पालकांच्या रोषातून उमटत आहे.
या प्रकरणाकडे शाळा प्रशासन, शिक्षण विभाग यांच्याकडून गांभीर्याने लक्ष देणे अपेक्षित असून, भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी अधिक स्पष्ट, सर्वसमावेशक आणि समतावादी उपक्रम राबवावेत, अशी संतप्त मागणी सर्वसामान्य पालकांकडून पुढे येत आहे.

पाचोरा-जामनेर ब्रॉडगेज प्रकल्पाला गती; अशोका बिल्डकॉनच्या ५६८ कोटींच्या कामाला मान्यता

0

Loading

पाचोरा – ( झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज प्रतिनिधी – धनराज पाटील, बॅनर Mo. 9922614917)  पाचोरा ते जामनेर दरम्यान प्रस्तावित ब्रॉड गेज रेल्वे मार्गाच्या प्रतिक्षेत असलेल्या हजारो नागरिकांसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक ठरला आहे.12 एप्रील 2025 रोजी केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाने या बहुप्रतिक्षित प्रकल्पासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून अशोका बिल्डकॉन लिमिटेड या नामांकित कंपनीला तब्बल ५६८.८६ कोटी रुपयांची निविदा मंजूर केली आहे. या निविदेमार्फत पाचोरा-जामनेर दरम्यान ५३ किमीच्या अंतरातील संपूर्ण सिव्हिल वर्क – अंडरब्रिज, ओव्हरब्रिज, लहान मोठे पूल, रस्ते, पथवे, तसेच पाचोरा यार्ड व यार्डमधील रस्त्यांचे काम अशोका बिल्डकॉन कंपनीला सुपूर्द करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकल्पासाठी ३० महिन्यांची मुदत निश्चित करण्यात आली असून, या कालावधीत हे सर्व सिव्हिल काम पूर्ण करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे सर्व सिव्हिल काम पूर्ण झाल्यानंतरच या मार्गावर प्रत्यक्ष रेल्वे ट्रॅक पूर्ण करून रेल्वे सुरू करण्यात येणार आहे.
अशोका बिल्डकॉन लिमिटेड ही देशातील अव्वल दर्जाची इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी असून, रोड व हायवे प्रकल्पांपासून रेल्वे, ऊर्जा व शहरी विकास क्षेत्रात आपला ठसा उमटवलेला आहे. या प्रकल्पातही अशोका बिल्डकॉनने सर्वात कमी किंमत (Lowest Bidder) सादर केली होती. परिणामी त्यांच्याकडे हा प्रकल्प सोपविण्यात आला असून त्यांनी गुणवत्तापूर्ण व वेळेत काम पूर्ण करण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाला दिले आहे.
या निविदेतील एक महत्त्वाचा भाग म्हणजे केवळ मार्गाची रुंदीकरणाची कामेच नव्हे तर संपूर्ण सिव्हिल स्ट्रक्चर – म्हणजेच अंडरपास, ब्रिजेस, ड्रेनेज सिस्टिम, सिग्नलिंगच्या दृष्टीने आवश्यक असलेले स्ट्रक्चरल फाउंडेशन्स आणि यार्ड डेव्हलपमेंट – हे सर्व या टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे. या टप्प्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ट्रॅक टाकण्याचे, विद्युतिकरणाचे व सिग्नलिंगचे काम सुरू होईल.
या प्रकल्पासाठी गेली अनेक वर्षे पाचोरा-जामनेर ब्रॉड गेज रेल्वे कृती समितीने विविध माध्यमांतून, राजकीय पातळीवर व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करत सतत प्रयत्नशील होती. त्यांच्या या सातत्यपूर्ण संघर्षाचेच हे फलित मानले जात आहे. या कृती समितीचे अनेक पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, वंचित भागातील ग्रामस्थ, उद्योजक, शेतकरी, विद्यार्थी यांच्या सह वेळोवेळी आंदोलन, निवेदनं, पत्रकार परिषदांद्वारे हा प्रश्न केंद्रस्थानी ठेवला होता.
कृती समितीच्या प्रतिनिधींनी जळगाव जिल्ह्याचे खासदार, रेल्वे मंत्री, राज्यातील पालकमंत्री वेळेप्रसंगी थेट दिल्ली गाठून संबंधितांशी वेळोवेळी संवाद साधत या मार्गाच्या गरजेबाबत ठोस मुद्दे मांडले. अनेक वेळा तांत्रिक बैठकांमध्ये, दिल्ली व मुंबई येथे जाऊन या प्रकल्पाचे फायदे मांडण्यात आले. परिणामी आता या महत्त्वाच्या टप्प्याला या मार्गाने गाठले आहे.
या प्रकल्पामुळे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा व जामनेर या दोन्ही तालुक्यांसह परिसरातील अनेक सलग्न गावांना मोठा फायदा होणार आहे. या मार्गावरून सुरू होणाऱ्या प्रवासी व मालवाहतूक सेवेचा उपयोग स्थानिक उद्योगांना, शेतीमाल वाहतुकीला आणि पर्यटनवाढीसाठी होणार आहे. पाचोरा हे मध्य रेल्वेच्या मुंबई-भुसावळ मार्गावरील महत्त्वाचे स्टेशन असल्यामुळे जामनेरकडे ब्रॉड गेज जोडणी झाल्यास हा संपूर्ण परिसर विकासाच्या नव्या दिशेने वाटचाल करेल.
शेती उत्पादन, कापूस, सोयाबीन, डाळी, कांदा, मका, केळी यासारख्या शेतमालाचे थेट ट्रान्सपोर्टेशन यामुळे शक्य होईल. शिवाय व्यापारी ,विद्यार्थ्यांना व कामगारांना प्रवासाचे जलद, सुरक्षित व स्वस्त साधन उपलब्ध होईल. पर्यटनवाढीला चालना मिळेल, रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, स्थानिक व्यापाऱ्यांना नव्या बाजारपेठा खुल्या होतील.आता या ५३ किमी मार्गावरील सिव्हिल वर्क पूर्ण झाल्यानंतरच ट्रॅक टाकणे सुरू होणार असल्याने नागरिकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत. काहींना वाटते की संपूर्ण प्रकल्प लवकर पूर्ण व्हावा, तर काहीजण या प्रगतीबाबत समाधानी आहेत. मात्र, हे लक्षात घेणे आवश्यक आहे की अशा प्रकारचे मोठे प्रकल्प अनेक प्रशासकीय, पर्यावरणीय व तांत्रिक टप्प्यांतून जात असतात.
Railway EPC (Engineering, Procurement, and Construction) मॉडेलनुसार हे काम हाती घेतले जात असून अशोका बिल्डकॉनसारख्या तज्ज्ञ कंपनीकडे जबाबदारी देण्यात आल्यामुळे कामाची गती, गुणवत्ता आणि वेळेचे भान यासंदर्भात अपेक्षा अधिक आहेत.गेल्या काही वर्षांपासून केंद्र सरकारकडून रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्पांना विशेष गती दिली जात आहे. विशेषतः उत्तर महाराष्ट्रातील दुर्लक्षित प्रकल्प, जुन्या मीटर गेज मार्गांचे ब्रॉड गेज रूपांतर, नवीन जोडमार्ग, स्थानिक संपर्कवाढीच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली जात आहे.या पृष्ठभूमीवर पाचोरा-जामनेर मार्गाचे काम हाती घेण्यात येणे, ही सकारात्मक आणि दूरगामी परिणाम देणारी घडामोड आहे. भविष्यात या मार्गावरील प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होईल आणि त्याचा सामाजिक-आर्थिक विकासावर निश्चितच मोठा परिणाम होईल.पाचोरा-जामनेर ब्रॉड गेज रेल्वे मार्गाच्या दृष्टीने आजचा दिवस ऐतिहासिक मानला जाऊ शकतो. अशोका बिल्डकॉनला मिळालेल्या ५६८ कोटींच्या कामाच्या माध्यमातून या प्रकल्पाला प्रत्यक्ष स्वरूप लाभणार आहे. कृती समितीचा संघर्ष, लोकप्रतिनिधींचा पाठिंबा, स्थानिकांचा विश्वास आणि केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची सकारात्मक भूमिका – या सर्वांचा संगम या टप्प्यावरून स्पष्ट दिसून येतो.आता केवळ काम वेळेत, गुणवत्तेने व पारदर्शकतेने पूर्ण होणे अपेक्षित आहे. या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी रेल्वे प्रशासन, ठेकेदार संस्था, स्थानिक नागरिक व प्रशासनाने संयुक्तपणे सहकार्य केल्यास पाचोरा-जामनेर रेल्वे मार्ग उत्तम उदाहरण ठरेल आणि भविष्यातील इतर प्रकल्पांसाठी मार्गदर्शक ठरेल.

सत्कार व सन्मानाचा अविस्मरणीय क्षण : मा. न्यायाधीश जी. बी. औंधकर यांचा निरोप समारंभ

0

Loading

पाचोरा – निःपक्ष, सत्यनिष्ठ व न्यायी दृष्टिकोन ठेवून आपली कारकीर्द न्याय क्षेत्रात घडवणारे आणि पाचोरा न्यायालयात आपल्या कामगिरीने आदरयुक्त ठसा उमठवणारे मा. दिवाणी न्यायाधीश श्री. जी. बी. औंधकर यांची बदली झाल्याने त्यांना निरोप देण्यासाठी पाचोरा येथील दिवाणी तथा फौजदारी न्यायालयात एका अत्यंत सन्मानपूर्वक समारंभाचे आयोजन करण्यात आले. हा समारंभ केवळ औपचारिकतेपुरता मर्यादित राहिला नसून, त्यामध्ये अनेक भावनांनी ओथंबलेली आपुलकी, स्नेह, कृतज्ञता आणि आठवणींचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला.या निरोप समारंभाचे अध्यक्षस्थानी मा. दिवाणी न्यायाधीश एस. व्ही. निमसे हे होते. यावेळी सह न्यायाधीश जी. एस. बोरा, सरकारी अभियोक्ता हटकर मॅडम, सरकारी वकील मिलिंद येवले, मीना सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमास न्यायालयीन कर्मचारी, वकिली मंडळी, पोलीस कर्मचारी आणि विविध विभागांतील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत पारंपरिक पद्धतीने झाली. मा. औंधकर साहेबांचे औक्षण करण्यात आले, त्यानंतर त्यांच्या कपाळी तिलक लावून स्वागताचा मान देण्यात आला. त्यांच्या पत्नींसह उपस्थित राहिलेल्या औंधकर कुटुंबियांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन मा. न्यायाधीश निमसे साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा क्षण संपूर्ण उपस्थितांमध्ये एक वेगळाच सन्मानाचा आणि स्नेहभावाचा ठसा उमटवणारा ठरला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मा. औंधकर यांच्या कार्यकाळातील विविध अनुभव, त्यांच्या स्वभावातील सौम्यपणा, प्रगल्भ विचारशैली आणि कामातील काटेकोरपणा यावर प्रकाश टाकला. कु. दक्षता पाटील, दीपक पाटील, स्वप्निल पाटील, रवींद्र पाटील, उमेश महाजन, संदीप जगताप, चंद्रकांत नाईक, अमित दायमा, उल्हास महाजन, मिलिंद येवले, सौ. औंधकर मॅडम तसेच मा. न्यायाधीश बोरा मॅडम यांनी आपले मनोगत मांडताना अनेक आठवणींना उजाळा दिला.आपला सत्कार स्वीकारताना मा. न्यायाधीश जी. बी. औंधकर यांनी अत्यंत नम्रतेने आणि कृतज्ञ भावनेने उपस्थित सर्वांचे आभार मानले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “पाचोरा न्यायालयात काम करताना मला ज्या प्रकारे सहकार्य, प्रेम, आदर आणि आपुलकी मिळाली, ती माझ्या आयुष्यातील अमूल्य संपत्ती आहे. तुमच्या स्नेहाने हा निरोप समारंभ माझ्यासाठी एक खास आणि हृदयस्पर्शी भेट बनली आहे. श्री. निमसे साहेब, बोरा मॅडम आणि इथल्या न्यायालयीन कुटुंबातील सर्व सदस्यांचा मी मन:पूर्वक आभारी आहे. तुमच्या आठवणी कायम माझ्या स्मरणात राहतील.”या भाषणादरम्यान संपूर्ण सभागृहात एक भावनिक वातावरण तयार झाले होते. औंधकर साहेबांच्या संयमी, सजग आणि सहृदयी नेतृत्वाच्या अनेक आठवणी सर्वांच्या चेहऱ्यावर उमटत होत्या.यानंतर अध्यक्षीय भाषणात मा. न्यायाधीश एस. व्ही. निमसे साहेब यांनी औंधकर साहेबांविषयी अत्यंत आदरपूर्वक व प्रशंसात्मक उद्गार काढले. “श्री. औंधकर हे केवळ एक न्यायाधीश नव्हते, तर ते आपल्या शिस्तप्रियतेने, काटेकोर न्यायविवेकबुद्धीने आणि सहृदयतेने सर्वांचे मन जिंकणारे नेतृत्व होते. त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला, सहकाऱ्याला आपल्या कुटुंबाचा भाग मानले आणि त्यांचे मार्गदर्शन सर्वांनाच प्रेरणादायी राहिले आहे. त्यांच्यामुळे अनेकांना नव्या ऊर्जा, नवे मार्ग मिळाले. आपण सर्व भाग्यवान आहोत की, आपल्याला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी लाभली,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अभिजित दायमा यांनी अतिशय ओघवत्या शैलीत केले. उपस्थित मान्यवरांची ओळख, त्यांच्या आठवणींचा प्रवास आणि कार्यक्रमातील प्रत्येक टप्पा त्यांनी अत्यंत नेटकेपणाने सादर केला. आभार प्रदर्शन चारुशीला पाटील यांनी करताना संपूर्ण न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे, निमंत्रितांचे व सर्व आयोजकांचे आभार मानले.या समारंभाची यशस्वी तयारी आणि नियोजन यामध्ये सहा. अधीक्षक नितीन मोरे, संदीप भोंडे, किशोर अत्रे, पोलीस कर्मचारी आबा पाटील, विकास सूर्यवंशी, राजेंद्र पाटील, दीपक पाटील तसेच न्यायालयातील इतर कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांचे संयोजन, समन्वय आणि प्रत्येक बारकाव्याकडे दिलेले लक्ष पाहता, संपूर्ण समारंभ अत्यंत शिस्तबद्ध, सुसंगत आणि भावपूर्ण झाला.सदर समारंभ केवळ निरोपाचा नव्हता, तर तो त्यांच्या कार्याला आणि मोलाच्या योगदानाला दिलेली कृतज्ञतेची आणि गौरवाची मानवंदना होती.”एका गुणवंत न्यायाधीशाच्या कार्याला, त्यांच्या विचारांना आणि त्यांनी दिलेल्या शिकवणींना. यावेळी उपस्थित प्रत्येकजण हे मान्य करत होता की, मा. औंधकर साहेबांचा सल्ला, मार्गदर्शन आणि माणुसकीने भरलेले वर्तन कायम सर्वांच्या स्मरणात राहील.पाचोरा न्यायालयाच्या परिसरातून एक अत्यंत सज्जन, समंजस, ज्ञानवान आणि कर्तव्यनिष्ठ न्यायाधीश निरोप घेत असताना प्रत्येकाच्या मनात त्यांच्या कार्याविषयी अभिमान होता, आणि त्यांच्या आगामी प्रवासासाठी शुभेच्छांचा वर्षावही. न्यायालयाच्या या स्नेहसंवादाने आणि भावनांनी भरलेल्या वातावरणात हा निरोप समारंभ केवळ कार्यक्रम न राहता, एक संस्मरणीय पर्व ठरला.यातून पुढे येणाऱ्या अधिकारीवर्गाला, कर्मचारीवर्गाला आणि न्याय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकाला एक प्रेरणादायी उदाहरण मिळाले आहे की, कार्यातील प्रामाणिकता, सहृदयता आणि लोकाभिमुखता यांचा संगम असलेले व्यक्तिमत्त्व केवळ प्रशासकीय व्यवस्थेत नव्हे, तर मानवी नात्यांतही आपले स्थान अढळपदावर निर्माण करू शकते.या भावपूर्ण कार्यक्रमाचा शेवट उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात झाला. उपस्थित सर्वांनी पुढील वाटचालीसाठी मा. औंधकर साहेब व त्यांच्या कुटुंबाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या आठवणी मनात साठवून एक सुंदर निरोप दिला.

“डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा उत्सव – समाजाच्या वर्गणीतील विश्‍वासातून उभारलेला वैचारिक सोहळा!”

0

Loading

पाचोरा–( झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज प्रतिनिधी – धनराज पाटील, बॅनर Mo. 9922614917) “स्वतःला कमी समजू नका, शिकून पुढे जा आणि समाज घडवा” हे महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनसूत्र
वर्षानुवर्षे डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन युवा फाउंडेशन यांच्या वतीने
पाचोरा शहरात नवचैतन्याने पसरवले जात आहे. त्याच प्रेरणेने, यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त पाचोऱ्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन युवा फाउंडेशन यांच्या वतीने एक आगळावेगळा, प्रेरणादायी आणि समतेचा उत्सव आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव १३ आणि १४ एप्रिल २०२५ रोजी दरवर्षीप्रमाणेच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणार असून, केवळ आंबेडकरी समाजाच्या वर्गणीच्या माध्यमातून संपूर्ण आयोजन करण्यात आले आहे, ही बाब समाजासाठी अभिमानास्पद आणि आत्मसन्मान जागवणारी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि कार्याचा ठेवा समाजापर्यंत पोहचवण्याच्या हेतूने गेल्या अनेक वर्षांपासून पाचोरा शहरात हा उत्सव केवळ जयंती म्हणून नव्हे तर विचार महोत्सव म्हणून साजरा केला जात आहे. ‘परिवर्तन युवा फाउंडेशन’च्या माध्यमातून नव्या पिढीला इतिहासाची जाणीव आणि भविष्याच्या दिशेने वैचारिक दिशा देण्याचा प्रयत्न दरवर्षी केला जातो. यंदाचा जयंती महोत्सव खास ठरणार आहे, कारण या वर्षीच्या विशेष आकर्षणांमध्ये – आर्या ट्रस्ट सेटअप, धुळे आणि शक्ती डीजे, धुळे या दोन भव्य व दर्जेदार आयोजनांची भर पडत असून, संगीत आणि प्रकाशाच्या झगमगाटात आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एक ऐतिहासिक वातावरण तयार करण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीभोवती विशेष विद्युत रोषणाई, सुसज्ज मंच व्यवस्था, व्हिडिओ व ध्वनी प्रणाली नियोजित आहे. या महोत्सवात सामील होणारे परिसर – नागसेन नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, भारतीय नगर, निळा चौक, राजा मिलिंद नगर, संत गाडगेबाबा नगर, सम्राट अशोक नगर, मिलिंद हौसिंग सोसायटी, जनता वसाहत, भीम नगर, मित्रा टाईप, शाहू नगर, महात्मा फुले नगर, आन्ना भाऊ साठे नगर व संपूर्ण पाचोरा तालुका व शहरातील आंबेडकरी समाज – ही सर्व वस्ती, नगर, विभाग एकत्र येऊन ‘एक समाज, एक विचार, एक ध्येय – समता, बंधुता आणि न्याय’ या तत्त्वांचा भव्य दर्शन सोहळा घडवणार आहेत. या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे – कोणत्याही राजकीय किंवा बाह्य आर्थिक मदतीविना, फक्त आणि फक्त आंबेडकरी समाजातील नागरिकांच्या वर्गणीच्या माध्यमातून हा संपूर्ण उत्सव उभारण्यात येतो. या वर्गणीचे संकलन अत्यंत पारदर्शक पद्धतीने केले जाते आणि त्यातूनच व्यासपीठ, विद्युत सजावट, ध्वनी प्रणाली, साउंड सिस्टम, जनजागृतीसाठी साहित्य, पिण्याचे पाणी, सुरक्षा व्यवस्था, व स्वच्छता यासारख्या आवश्यक बाबींची व्यवस्था करण्यात येते. या उत्सवामागे असलेली डॉ. बाबासाहेब आंबेडकर परिवर्तन युवा फाउंडेशन, पाचोरा ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून आंबेडकरी चळवळीच्या मूलभूत विचारसरणीशी निष्ठा ठेवत, सामाजिक प्रबोधन, युवकांमध्ये नेतृत्व क्षमता निर्माण करणे, महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम राबवणे, आणि आंबेडकरांच्या विचारांची मुळे नव्या पिढीपर्यंत पोचवण्याचे काम करत आहे. या वर्षी देखील १३ एप्रिल रोजी सायंकाळी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ दीपप्रज्वलन, ‘जयभीम’ घोषणांनी गगन भरून टाकणारी शोभायात्रा, तरुणांची घोषणा मिरवणूक, विशेष सजावटीचे देखावे, समाजप्रबोधनपर घोषणा, झांजपथकांचे वादन, डीजेवरील वैचारिक गाणी आणि अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर होणार आहेत. १४ एप्रिल रोजी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन, विचारधारा प्रसारित करणारे सामाजिकदृष्ट्या जागर कार्यक्रम हे केवळ मनोरंजनाचे व्यासपीठ नाही, तर ते वैचारिक शिस्त, सामाजिक एकात्मता आणि नवसंघटनाचे अधिष्ठान आहे. या आयोजनात सहभागी असलेल्या प्रत्येक नगरातील कार्यकर्त्यांनी आपली भूमिका अत्यंत निष्ठेने निभावली आहे. महिला मंडळ, विद्यार्थी, युवक कार्यकर्ते, सांस्कृतिक मंडळे, वाद्यवृंद संघटना यांचा सहभाग विशेषत्वाने उल्लेखनीय आहे. जयंतीच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तके, छायाचित्रे, चित्रफीती यांचे स्टॉल उभारण्यात आले आहे. ‘ या उत्सवामध्ये भारतीय संविधानाचा अभिमान जागवला जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घडवलेले संविधान, त्याचे मूल्य, त्यात दिलेल्या मूलभूत हक्कांचे महत्त्व समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोचवले जाईल. विविध घोषणा, पोस्टर्स, बॅनर्स आणि प्रबोधनपर साहित्याद्वारे संविधानाचे भान जपले जाणार आहे. पाचोरा शहरातील सर्व वस्ती, नगर, आणि विविध सामाजिक संघटनांनी उत्सवात सहभागी होऊन सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले आहे. यातून समाजामध्ये असलेली एकजूट, परस्पर सहकार्य आणि अभिमान यांचे दर्शन घडते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार म्हणजे फक्त दलितांचा नव्हे, तर सर्व मानवतेसाठीचा मार्ग आहे, हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून अधोरेखित होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त पाचोरा शहरात ‘परिवर्तन युवा फाउंडेशन’च्या नेतृत्वात घडणारा हा समतेचा, बंधुतेचा आणि संविधाननिष्ठतेचा उत्सव निश्चितच समाजासाठी नव्या उंचीचा संदेश देणारा ठरेल. आपल्या वर्गणीच्या माध्यमातून एक ऐतिहासिक आणि सशक्त आयोजन साकार करणाऱ्या या फाउंडेशनचे अभिनंदन करावे तितके थोडेच आहे. पाचोरा शहरातील हा उत्सव म्हणजे बाबासाहेबांच्या स्वप्नातली ‘नवभारत निर्मिती’ प्रत्यक्षात अनुभवण्याचा क्षण ठरणार आहे.

गौतम बागुल यांच्या अध्यक्षतेखाली महामानवाच्या स्मृतींचा दीप: पाचोरा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी जय्यत तयारी –

0

Loading

पाचोरा -( झुंज वृत्तपत्र & ध्येय न्युज प्रतिनिधी – धनराज पाटील, बॅनर Mo. 9922614917) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, समतेचे महान पुरस्कर्ते, सामाजिक क्रांतीचे अध्वर्यू, मानवमुक्तीसाठी आयुष्य वेचणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती पाचोरा शहरात यंदाही अभूतपूर्व उत्साहात, अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने आणि सामाजिक प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या अनेक उपक्रमांच्या माध्यमातून साजरी होणार आहे. पाचोऱ्याच्या ऐतिहासिक मातीला सामाजिक समतेचा दीपध्वज उंचावणाऱ्या महामानवाच्या स्मृतींचा साज या निमित्ताने पुन्हा एकदा नवचैतन्याने उजळून निघणार आहे.
दरवर्षीप्रमाणेच, यंदाही पाचोरा शहरातील नागसेन नगर, मिलिंद हौसिंग सोसायटी, जनता वसाहत, भिम नगर, हनुमान नगर आणि शहराच्या इतर अनेक परिसरांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त देखावे, मिरवणुका, प्रभातफेरी, व्याख्याने, रोषणाई, सांस्कृतिक कार्यक्रम व समाज प्रबोधनपर उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. लहान बालकांपासून वृद्धांपर्यंत आणि महिलांचा सहभाग हे या जयंती महोत्सवाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले आहे.
यंदा जयंती उत्सवाच्या नियोजनासाठी गठित करण्यात आलेल्या समितीमध्ये शहरातील सामाजिक कार्यकर्ते, आंबेडकरी चळवळीचे पुरस्कर्ते आणि सांघिक कर्तृत्वाने पुढे येणारे कार्यकर्ते यांचा समावेश करण्यात आला असून, या समितीच्या अध्यक्षपदी गौतम बागुल यांची निवड करण्यात आली आहे. सचिव म्हणून छन्नु सोनवणे यांची सर्वानुमते निवड झाली असून, त्यांच्यासह एक सशक्त आणि समर्पित कार्यकारिणी या उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी सज्ज झाली आहे यामध्ये
अध्यक्ष: गौतम बागुल
उपाध्यक्ष: अनिल जोगळे, रविंद्र सोनवणे, अविनाश अहिरे, अशोक गायकवाड, विकास शेजवळ, निलेश जाधव
कार्याध्यक्ष: सुनिल बाविस्कर
उपकार्याध्यक्ष: जय सपकाळे, संतोष खैरनार, भैय्या बाविस्कर, राजु दाभाडे
सचिव: छन्नु सोनवणे
सहसचिव: सागर खरे
खजिनदार: आकाश बनसोडे
सहखजिनदार: वाल्मिक गायकवाड या कार्यकारिणीच्या माध्यमातून केवळ उत्सव साजरा करणे हे एकमेव उद्दिष्ट नसून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे नव्याने आकलन, त्यांच्या कार्याचा अभ्यास, आणि समाजातील समतेचा, शिक्षणाचा, स्वाभिमानाचा व विज्ञानवादी विचारांचा प्रसार हे या जयंती उत्सवामागील मुख्य हेतू आहे. संपूर्ण शहरामध्ये महोत्सवाचे वातावरण निर्माण होण्यासाठी जय्यत तयारी करण्यात येत असून, अनेक वस्ती विभागांमध्ये रोषणाई, सजावट, पारंपरिक व आधुनिक संगीतावर आधारित मिरवणुकींचे नियोजन, नृत्यविष्कार, घोषपथकांचे सादरीकरण, वाद्यवृंद, आणि सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे देखावे उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. ‘नारीशक्तीचे सन्मान’ हे या वर्षीच्या जयंती उत्सवाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. यंदा ‘शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा’ या महामानवाच्या त्रिसूत्रीला प्रत्यक्ष कृतीच्या पातळीवर उतरवण्याचे उद्दिष्ट समितीने ठेवले आहे. या सर्व उपक्रमांचा उद्देश केवळ उत्सव साजरा करणे नाही, तर समाजाच्या विविध स्तरांमध्ये जागरूकता निर्माण करणे, विषमतेच्या विरोधात आवाज उठवणे, आणि आधुनिकतेच्या वाटेवर बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरांचा दीप उजळवत पुढे जाणे हा आहे. सामाजिक प्रबोधनाची एक वेगळी अनुभूती देणारे भगवान गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची साजेश्या पारंपरिक व आधुनिक वेशभूषेतील मिरवणूक हे या उत्सवाचे आकर्षण असते. या मिरवणुकीत युवावर्ग, महिला, वृद्ध नागरिक, तरुण मुलं आणि मुली, शाळकरी विद्यार्थी, विविध क्षेत्रातील कार्यकर्ते सामील होतात. चैतन्य आणि शिस्त यांचे एकत्रित दर्शन या मिरवणुकीत दिसते.
केवळ सांस्कृतिक उत्सव न ठेवता, त्यास सामाजिक उपयोगिता प्राप्त करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले आहे. यंदाच्या उत्सवामध्ये पर्यावरणपूरक सजावट मिरवणुका, आणि वायुप्रदूषण टाळण्यासाठी ध्वनी मर्यादा पाळण्यावर भर दिला जाणार आहे. ‘बुद्ध विचारांचा प्रचार आणि पर्यावरणाचा सन्मान’ या दोन्ही गोष्टींचा समतोल राखण्याचा प्रयत्न समितीकडून केला जात आहे.विशेष म्हणजे, सामाजिक सलोखा व ऐक्य जपण्याच्या उद्देशाने सर्वच घटकांना या उत्सवात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे.
पाचोरा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त होणारा हा उत्सव फक्त एक औपचारिकता न राहता तो समाजात परिवर्तन घडवणारा, चळवळ पुढे नेणारा, आणि तरुण पिढीला दिशा देणारा ठरणार आहे, असा विश्वास अनेक मान्यवरांनी व्यक्त केला आहे. कार्यकारिणीच्या सदस्यांनी देखील एकमताने सांगितले की, हा जयंती महोत्सव ‘विचारांचा उत्सव’ ठरेल आणि पाचोरा शहर इतिहास घडवेल’.या संपूर्ण कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांची समर्पित मेहनत, लोकसहभाग, आणि महामानवांच्या विचारांची प्रेरणा एकत्र येऊन समाजासाठी एक नवा आदर्श निर्माण करतील, यावर शंका नाही.

धोनीच्या चेन्नई संघाचा सलग पाचवा पराभव; चेपॉकमध्ये केकेआरचा दबदबा कायम

0

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : चेन्नई सुपर किंग्जला पुन्हा एकदा घरच्या मैदानावर पराभवाचा सामना करावा लागला. संघाने कर्णधार बदलला पण त्याचे नशीब तसेच राहिले. आयपीएल २०२५ च्या २५ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नई सुपर किंग्जचा ८ गडी राखून पराभव केला. आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच, चेन्नई सुपर किंग्जला सलग पाच आणि घरच्या मैदानावर तिसरा पराभव पत्करावा लागला. ह्याच सामन्यापासून धोनीने चेन्नईच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर चेन्नईला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाली. चेन्नई सुपर किंग्जने २० षटकांत ९ गडी गमावून १०३ धावा केल्या. विजय शंकर (२९) आणि शिवम दुबे (नाबाद ३१) यांनी स्वतःचे स्थान राखण्याचा प्रयत्न केला. प्रत्युत्तरात, केकेआरने १०.१ षटकांत २ गडी गमावून लक्ष्य गाठले. नरेनने सर्वाधिक धावा केल्या.
ऋतुराज गायकवाड स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर धोनीला चेन्नईचे नेतृत्व देण्यात आले. सलग चार पराभवांनंतर धोनी संघाला पुन्हा विजयी मार्गावर आणेल अशी चाहत्यांना आशा होती. तथापि, फलंदाजांनी चाहत्यांना निराश केले. सलामीवीर रचिन (४), कॉनवे (१२) आणि त्रिपाठी (१६) यांनी लवकर आपले विकेट गमावले.
चेन्नई सुपर किंग्जने ७० धावांवर पाच विकेट गमावल्या आणि ७९ धावांवर त्यांचे ९ विकेट झाले. शेवटचे सहा फलंदाज दुहेरी आकडाही गाठू शकले नाहीत. यामध्ये धोनी, जडेजा, अश्विन आणि दीपक हुडा यांचा समावेश होता. केकेआरकडून सुनील नारायणने तीन, तर वरुण चक्रवर्ती आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात चांगली झाली. क्विंटन डी कॉक आणि सुनील नारायण यांनी ४.१ षटकांत पहिल्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी केली. अंशुल कंबोजने क्विंटन डी कॉकला (२३) बाद करून ही भागीदारी तोडली. नूर अहमदने सुनील नरेनला (४४) तंबूमध्ये पाठवले. तथापि, तोपर्यंत चेन्नईसाठी खूप उशीर झाला होता.
या एका पराभवाने चेन्नईचे नाव इतिहासाच्या पानांवर नोंदवले. आयपीएल हंगामात पहिल्यांदाच सलग पाच सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला. एवढेच नाही तर, चेपॉक येथे, सीएसकेने पहिल्यांदाच सलग तीन सामने गमावले.
१८ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जसाठी काहीही बरोबर चालले नाही. पहिल्या सामन्याशिवाय, सीएसकेला प्रत्येक सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. एवढेच नाही तर नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. उर्वरित सामन्यांसाठी एमएस धोनीला कर्णधार बनवण्यात आले.

सीएसकेच्या नावावर नको असलेले रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत:-
१) एका हंगामात पहिल्यांदाच सलग पाच पराभव
२) चेपॉक येथे पहिल्यांदाच सलग तीन पराभव
३) चेपॉकमध्ये आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्या
४) चेंडूंच्या बाबतीत सीएसकेचा सर्वात मोठा पराभव

या सलग पाच पराभवांमुळे सीएसके पॉइंट्स टेबलमध्ये नवव्या स्थानावर पोहोचला आहे, येथून चेन्नईला प्लेऑफसाठी पात्र ठरणे कठीण झाले आहे. तथापि, संघ येथून पुनरागमन करू शकतो, परंतु त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकावे लागतील. हे शक्य होईल की नाही हे येणारा काळच सांगेल.

“तू आहेस म्हणून आम्ही आहोत – आमच्या मनातला एकमेव भगवान दादा”

0

Loading

काही नाती जन्माने मिळतात, काही नाती काळाच्या ओघात जुळतात… पण काही माणसं अशीही असतात की त्यांच्या अस्तित्वानेच आपल्या जीवनात एक वेगळीच उब, एक निराळं आश्वासन निर्माण होतं. त्यांचं असणं हेच समाधानाचं दुसरं नाव असतं. आणि आमचं नशीब इतकं भाग्यवान आहे की आमच्या 84 ग्रुपमध्ये अशाच एका माणसाचा जन्म झाला – भगवान दादा, आमचा सर्वांचा लाडका, हळवा, प्रेमळ, आणि अत्यंत माणूसकीचा झरा असलेला मित्र.आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, मनात असंख्य आठवणींचा लोट उसळतो आहे. हे फक्त शुभेच्छा देण्याचं निमित्त नाही, हे तर त्या असंख्य भावना उलगडण्याचं एक कारण आहे, ज्या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रत्येक पैलूवर झळकत राहतात.भगवान दादा – हे नाव उच्चारलं की मनात पहिली गोष्ट येते ती म्हणजे त्यांची तत्परता. पहाटे ४ वाजताही गृपवर कोणाचा वाढदिवस विसरलेला नसतो. अगदी त्या वेळेला शुभेच्छांचा पहिला मेसेज त्यांचाच असतो. केवळ शुभेच्छा नाही, तर त्यासोबत येणारी त्यांची ती विशेष ओळ, एखाद्या सुंदर कवितेसारखी, प्रेमळ आणि अंत:करणातून आलेली – जी वाचून प्रत्येकजण हसतो, भावतो, आणि गहिवरतो.कोणाच्या घरी साखरपुडा असो, लग्न असो, वा एखादा कार्यक्रम – भगवान दादाला त्याचं निमंत्रण पोहोचलं नाही आणि भगवानदादावर सोपवलेले काम होणार नाही असं होणंच शक्य नाही. आणि विशेष म्हणजे – तो फक्त हजर राहत नाही, तर त्या कार्यक्रमाला जिवंत करतो. ज्या कार्यक्रमाला कधी आपल्याला जायचं नसतं, तिथेही भगवान दादाच्या उत्साहामुळे पावलं आपोआप तिकडे वळतात. आणखी एक अद्वितीय गोष्ट म्हणजे त्यांची काळजी घेणारी वृत्ती. एखाद्या मित्राच्या घरी सुखदुःख असेल कोणाच्या घरात एखादी समस्या असेल – तर त्या गोष्टी भगवान दादा विसरत नाहीत. ‘काय झालं तिचं?’, ‘सध्या कसं आहे?’, ‘काही मदतीची गरज आहे का?’ – हे प्रश्न ते मनापासून विचारतात. त्यांच्या त्या शब्दांमध्ये औपचारिकतेचा लवलेशही नसतो. असतो तो केवळ आपुलकीचा, हक्काचा आणि प्रेमाचा स्पर्श. ८४ ग्रुपमधील प्रत्येकजण आज जर एकमेकांशी एवढा घट्ट जोडलेला असेल, तर त्यामागे एकच हात आहे – आणि तो म्हणजे भगवान दादाचा. या गृपच्या एकतेचा तो खरा शिल्पकार आहे. एखाद्या गोष्टीसाठी गृपवर चर्चा सुरू झाली की, सर्वांना एकत्र आणणं, कार्यक्रमाचं आयोजन करणं, वेळ, स्थळ, फोटो, आमंत्रण, आणि शेवटी धमाल करण्याची तयारी – या सगळ्या गोष्टी इतक्या सहज आणि प्रेमळपणे भगवान करत जातो की ते पाहून खरंच वाटतं – हा माणूस गृपमधला नसून, आमच्या आयुष्यातला एक अविभाज्य भाग आहे.त्यांच्या प्रत्येक कृतीत एक सहजता आहे, एक ओलावा आहे, आणि एक प्रामाणिकपणा आहे. कोणाचं लग्नपत्रिका आली की ती गृपवर टाकून, ‘सगळ्यांनी नक्की यायचं बरं’ असं सांगणं, त्या मागे असलेली त्यांची तळमळ आम्हाला कधीही शब्दांत सांगता आली नाही, पण ती मनाने अनुभवली आहे.ते केवळ मैत्री करतात असं नाही, ते मैत्री जगतात. त्यांच्यासाठी मैत्री म्हणजे एक जबाबदारी आहे – आणि ती जबाबदारी त्यांनी आजवर इतक्या निष्ठेनं पार पाडली आहे की आम्हा सगळ्यांच्या जीवनात त्यांनी एक अमूल्य जागा पटकावली आहे.आणि हे केवळ औपचारिक मैत्रीतच नाही, तर तीच तळमळ त्यांच्या भावनिक नात्यांतही जाणवते. मला आजही आठवतं सवंगड्यांसह आणि माता देवी ज्यांना बोलवेल त्यांच्यासह माता वैष्णोदेवीच्या यात्रेचा फक्त एक प्रस्ताव होता, एक स्वप्न होतं, आणि एक अढळ साथ होती – ती म्हणजे भगवान दादाची. त्या क्षणापासून ते दर्शन घेऊन परत येईपर्यंत ते माझ्यासोबत सावलीसारखं राहिले. प्रत्येक जबाबदारी, प्रत्येक गोष्ट इतक्या प्रेमाने, समजून आणि हाताळून त्यांनी सांभाळली की, त्या यात्रेचं पवित्र्य अजूनही मनात घर करून आहे. हा अनुभव मला केवळ त्यांच्यामुळेच मिळाला – आणि अशा अनुभवांचं मोल कोणत्याही शब्दात मांडता येत नाही.                          भगवान दादा, तू केवळ आमचा मित्र नाहीस – तू आमचा आधार आहेस, आमच्या प्रत्येकाच्या जीवनातील एक प्रेरणा आहेस. तुझा चेहरा पाहिला की मन प्रसन्न होतं. तुझा मेसेज आला की हसू फुटतं. तुझं अस्तित्व आठवलं की डोळे पाणावतात – कारण एवढ्या प्रेमळ आणि निस्वार्थी माणसाला जीवनात मिळणं हीच एक मोठी गोष्ट आहे.                                        तू शाळा – कॉलेजमध्ये जसा होतास, तसाच आजही आहेस – हसरा, खेळकर, आणि सगळ्यांचा काळजीवाहू. वेळेचं गणित जुळवून, आपल्या धावपळीच्या आयुष्यातूनही तू प्रत्येकाला वेळ देतोस. तेव्हा प्रश्न पडतो – हे शक्य तरी कसं आहे? पण उत्तर एकच असतं – भगवान दादा आहे तो!
     तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हा सगळ्यांच्या मनात एकच इच्छा आहे – तू असाच आनंदी राहो, निरोगी राहो, आणि कायम आम्हा सर्वांच्या आयुष्यात असाच झळकत राहो. या गृपमध्ये तुझी जागा कुणीही घेऊ शकत नाही – कारण तू फक्त गृपचा सदस्य नाहीस, तू या गृपचा ‘प्राण’ आहेस.
    शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं – काही शब्दांच्या पलीकडे असतो एक भाव, काही नात्यांच्या पलीकडे असतो एक आत्मीय भाव, आणि त्या भावाचं एक सजीव रूप म्हणजे आमचा भगवान दादा.
    आज तुझ्या या खास दिवशी तुझ्यासाठी हेच शुभाशीर्वाद – “जसा आहेस, तसाच राहा… कारण तुझ्यासारखा मित्र पुन्हा होणे नाही.”
     ८४ ग्रुपकडून तुझ्या जीवनाच्या प्रत्येक वळणावर भरभरून प्रेम, साथ, आणि आशीर्वाद! वाढदिवसाच्या अगणित, अनंत आणि अंत:करणातून उमटलेल्या शुभेच्छा    “तुझ्या असामान्य मैत्रीसाठी शब्दांनी विणलेली पुढील ही कविता तुला समर्पित…”

“तुझ्यासारखा एकच – आमचा भगवान दादा”

पहाटेच्या चारच्या वेळी जेव्हा जग शांत झोपलं असतं,
तेव्हा गृपवर तुझा पहिला शुभेच्छा मेसेज झळकतो,
मनापासून, ओघवत्या शब्दांत – प्रेमानं ओतप्रोत,
तुझ्या त्या एका ओळीमुळे दिवस उजळून निघतो.
      
सुख असो, दुःख असो, कोणाचंही घरचं काही घडो,
तू जणू सावलीसारखा प्रत्येकाच्या मागे उभा राहतोस,
कोणाचं लग्न, कोणाचा वाढदिवस – तू विसरतच नाहीस,
तुझ्या आठवणीच्या त्या जागा आमच्या हृदयात खोल झिरपत राहतात.               तुझं मन हे कुठल्याही नात्याच्या बंधनात अडकलेलं नाही,
पण तुझी नाती ही प्रेमाने, जिव्हाळ्याने जोडलेली असतात.
तू कार्यक्रम सजवतोस, लोकांना जोडतोस, वातावरण जिवंत करतोस,
तुझ्या स्पर्शानं साधा क्षणही अविस्मरणीय बनतो.                                     वैष्णोदेवीच्या दर्शनाला निघालो तेव्हा तू फक्त सोबत नव्हतास,
तर जबाबदारीच्या प्रत्येक टप्प्यावर अगदी खांद्याला खांदा लावून होतास.
तुझं ते साथ देणं म्हणजे आधार, तुझं अस्तित्व म्हणजे आश्वासक छाया,
त्या आठवणींना जेव्हा पुन्हा पुन्हा उजाळा देतो, डोळे नकळत ओलावतात .                                     दादा, तू फक्त मित्र नाहीस – तू आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेस,
तुझ्या प्रेमळ हाकेत, तुझ्या काळजीत, तुझ्या हास्यात एक निरागस आपुलकी आहे.
८४ ग्रुपचं मन, आत्मा आणि उर्जास्रोत तूच आहेस – हे आम्ही मान्य करतो,
आज तुझ्या वाढदिवशी तुला प्रेम, सन्मान, आणि मन:पूर्वक शुभेच्छा अर्पण करतो.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!