Home Blog Page 85

पाचोऱ्याच्या रोहित पाटीलची ‘सहाय्यक विमान वाहतूक अधिकारी’ पदावर यशस्वी नेमणूक

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील पाहण येथील मूळ रहिवासी आणि पाचोरा न पा जीन मधील देवीमंदीरा जवळील पाटील रेडिओचे संचालक बाळकृष्ण हरी पाटील यांचे नातू, तसेच राहुल बाळकृष्ण पाटील यांचे सुपुत्र रोहित राहुल पाटील याने आपल्या अथक मेहनतीच्या जोरावर ‘सहाय्यक विमान वाहतूक अधिकारी’ (Assistant Aircraft Traffic Officer) या महत्त्वाच्या पदावर नेमणूक मिळवून पाचोरा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रामाणिकपणे पुढे जात त्याने आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमठवला असून, आज त्याची निवड ही संपूर्ण गावासाठी आणि संस्थेसाठी गौरवाची बाब ठरली आहे.
रोहितचा शिक्षण प्रवास निर्मल इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा येथे केजी पासून दहावीपर्यंत झाला. अत्यंत समजूतदार, शांत, अभ्यासू, आणि सुसंस्कृत स्वभावाच्या रोहितने बालपणापासूनच स्वतःला वेगळ्या ध्येयासाठी सज्ज केलं होतं. त्याचे वडील राहुल पाटील यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनामुळे आणि आजोबा बाळकृष्ण पाटील यांच्या प्रेरणेने त्याला खंबीरपणे वाटचाल करता आली.
दहावीच्या परीक्षेनंतर रोहितने मराठवाडा मित्र मंडळ पॉलिटेक्निक, थेरगाव, पुणे येथे प्रवेश घेतला. येथे त्याने ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग या शाखेत डिप्लोमा शिक्षण सुरू केलं. पुण्यात स्थायिक होऊन अभ्यासाच्या आणि कौशल्यवाढीच्या माध्यमातून त्याने आपली स्वतःची ओळख निर्माण केली. ‘फक्त नोकरी मिळवायची’ असा संकुचित उद्देश न ठेवता, स्वतःमध्ये निरंतर बदल घडवण्याची जिद्द त्याच्यात होती.
मराठवाडा मित्र मंडळ पॉलिटेक्निक, थेरगाव येथे भारत स्टार्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (BSSPL) यांच्या सहकार्याने डिप्लोमा अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ऑटोमोबाईल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग शाखेतील एकूण ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.या प्लेसमेंट ड्राइव्हचे संयोजन वरिष्ठ विमान वाहतूक अधिकारी अक्षय कारंजावकर आणि मानव संसाधन सहाय्यक व्यवस्थापक अन्नपूर्णा शुक्ला यांनी केले. भरती प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पडली — प्रथम तांत्रिक मुलाखत आणि त्यानंतर मानव संसाधन मुलाखत. या कठोर चाचण्यांतून रोहित याने उत्तम तयारी, आत्मविश्वास, विषयावर प्रभुत्व आणि संवाद कौशल्य यांचा प्रत्यय देत अंतिम १२ विद्यार्थ्यांमध्ये आपली जागा मिळवली.
या १२ निवड झालेल्या विद्यार्थ्यांपैकी ६ जण मराठवाडा मित्र मंडळ पॉलिटेक्निकचे असून, त्यातील ५ विद्यार्थी ऑटोमोबाईल आणि १ विद्यार्थी मेकॅनिकल शाखेतील आहे. पाचोऱ्याचा रोहित या पाच ऑटोमोबाईल शाखेतील विद्यार्थ्यांपैकी एक ठरला.
भारत स्टार्स सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (BSSPL) ही भारतातील एक नामांकित संस्था आहे, जी देशभरातील प्रमुख विमानतळांवर इंधन सेवा, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि ग्राहकसेवा क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांच्या व्यावसायिकता, गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत विशेष नावलौकिक आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक मोठ्या उत्पन्नाचे पॅकेज देऊन सहाय्यक विमान वाहतूक अधिकारी पदावर नियुक्त करण्यात आले. हा पगार फक्त आर्थिक स्थैर्यच देणारा नसून, तो भविष्यातील करिअरसाठी मजबूत पायाभूत आधार निर्माण करणारा आहे.
या संपूर्ण निवड प्रक्रियेत यश मिळवलेल्या रोहित पाटीलचा सत्कार करत मराठवाडा मित्र मंडळ पॉलिटेक्निकचे अध्यक्ष बी. जी. जाधव आणि प्राचार्या गीता जोशी यांनी रोहितला शुभेच्छा दिल्या. त्यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांनी मेहनत, सचोटी आणि स्पष्ट ध्येय ठेवून शिक्षण घेतल्यास यश नक्कीच मिळते. रोहित याचे यश संस्थेसाठी प्रेरणादायी आहे.”
रोहितच्या या यशाने पाटील कुटुंबाचा, पाहण गावाचा, तसेच पाचोरा तालुक्याचा गौरव झाला आहे. आजोबा बाळकृष्ण हरी पाटील यांना आपल्या नातवाचा अभिमान वाटतो. त्यांचे पाटील रेडिओ हे पाचोऱ्यातील एक ओळख बनलेलं दुकान असून, त्यांनी आयुष्यभर प्रामाणिक व्यवसाय केला. त्यांचा आदर्श रोहितने आत्मसात केला आहे. विशेष म्हणजे रोहितचे वडील राहुल बाळकृष्ण पाटील हे मूळतः इलेक्ट्रीकलक्सच्या कामांतून हातमजुरी करून कुटुंबाचे पालनपोषण करणारे आहेत. परंतु आपल्या सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून त्यांनी गेल्या २० वर्षांपासून पाचोरा शहरात “आधारवड” नावाचे अन्नछत्र सुरू केले आहे. त्यांच्या संगाड्यांसह ते आजही गोरगरिबांसाठी सातत्याने दररोज मोफत अन्नदान करत आहेत. याशिवाय, ते पाचोरा परिसर गुजर संघटन समाज मंडळाचे सक्रिय पदाधिकारी म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या या सेवेचा आणि परिश्रमाचा संस्कार रोहितच्या यशस्वी वाटचालीत प्रकर्षाने दिसून येतो. रोहितचे यश हे केवळ वैयक्तिक नसून, एका संघर्षशील आणि सेवाभावी कुटुंबाच्या संस्कारांचे मूर्त रूप आहे. त्याच्या कुटुंबाला आणि गावाला याचा विशेष अभिमान वाटतो.
आजच्या काळात विद्यार्थ्यांमध्ये केवळ मार्कांवर भर न राहता, समांतर कौशल्य, व्यक्तिमत्व विकास आणि व्यावसायिक सजगतेची गरज असते. रोहितने याचा प्रत्यय देत आपल्या सहकाऱ्यांमध्ये सुद्धा आदर्श निर्माण केला आहे. अशा प्रकारे ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्याने एक मार्ग दाखवला आहे की, शहरात येऊन केवळ शिकून नाही तर खऱ्या अर्थाने स्वतःला घडवता येते.
या नेमणुकीसह रोहितला देशातील प्रमुख विमानतळांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. विमान वाहतूक अधिकारी म्हणून त्याला इंधन सेवा व्यवस्थापन, वाहतूक संलग्न सुरक्षा व्यवस्था, ग्राहक संपर्क आणि यांत्रिक स्थितीचे विश्लेषण अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत. ही नेमणूक म्हणजे त्याच्या कारकीर्दीचा एक महत्त्वाचा अध्याय आहे.
शिकण्याची जिद्द, चिकाटी, योग्य मार्गदर्शन आणि योग्य वेळी संधी ओळखण्याची क्षमता असेल, तर ग्रामीण भागातील मुलांनीही शहरात जाऊन मोठ्या संधी मिळवू शकतात याचे उत्तम उदाहरण रोहित राहुल पाटीलने घालून दिले आहे. आज त्याच्या यशामुळे केवळ कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण तालुका प्रेरित झाला आहे. त्याच्या पुढील वाटचालीसाठी झुंज वृत्तपत्र & ‘ध्येय न्यूज’ संपादक संदीप महाजन यांच्या कडून मनःपूर्वक शुभेच्छा!

मुंबईच्या समुद्रात सौर दिशानिर्देशक बसणार : विसर्जनासाठी मार्गदर्शन, सुरक्षिततेसह पर्यावरण संवर्धनाची जोड

Loading

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : गणेशोत्सव तसेच नवरात्रोत्सवात अनेकजण खोल समुद्रात मूर्ती विसर्जनासाठी जातात. यात अपघाताचा धोका असतो. शिवाय, नंतर मूर्ती पाण्यातून काढतानाही अडचणी येतात. यावर तोडगा म्हणून मुंबई महापालिकेने समुद्रातील ओहोटी रेषेजवळ मरिन नेव्हिगेशन बॉयज (दिशानिर्देशक) बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कुठपर्यंत विसर्जन करावे, हे चिन्हांकित होणार आहे. परिणामी, अगदी खोल समुद्रात विसर्जन करता येणार नाही.

मुंबई महापालिकेच्या पर्यावरण विभागाने ही यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणावर गणेशमूर्ती आणि देवीच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. मोठ्या मूर्तींच्या विसर्जनासाठी अनेकजण खोल समुद्रात जातात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. शिवाय, विसर्जनानंतर दुसऱ्या दिवशी त्या मूर्ती बाहेर काढण्यासाठीही बरीच खटपट करावी लागते. अनेक वेळा ओहोटी झाल्यावर मूर्ती चौपाट्यांवर विखुरलेल्या आढळतात, तर काही मूर्ती खोल समुद्रातच राहतात. त्यामुळे ओहोटी व भरती रेषांदरम्यान विसर्जनाचे क्षेत्र निश्चित करून त्याठिकाणी दिशानिर्देशक बसवण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरण विभागाने दिली आहे.

यामुळे एका ठराविक अंतरापर्यंतच विसर्जन करता येणार आहे. परिणामी, दुसऱ्या दिवशी समुद्रातून १०० टक्के मूर्ती सहज बाहेर काढणे शक्य होणार असल्याचे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

सदर दिशानिर्देशकांवर सौर दिवेही बसवले जाणार आहेत, जेणेकरून विसर्जन करणाऱ्यांना ते स्पष्टपणे दिसतील. या कामासाठी महापालिकेने निविदाही काढली आहे. एकूण ४३ ठिकाणी ही नवी दिशादर्शक यंत्रणा बसवण्यात येणार आहे. पर्यावरणाच्या हानीला आळा घालणे हाही यामागचा उद्देश आहे.

ही संपूर्ण यंत्रणा केंद्र शासनाच्या मान्यता असलेल्या दोन संस्थांच्या देखरेखीखाली बसवण्यात येणार आहे. मुंबईतील ओहोटी रेषा आणि भरती रेषा नेमकी कुठली, तसेच सौर दिवे असलेली दिशानिर्देशक यंत्रणा कुठपर्यंत बसवावी, हे या दोन संस्था निश्चित करणार आहेत. या कामासाठी निविदा भरण्याची अंतिम तारीख १६ जून आहे. ही यंत्रणा यंदाच्या गणेशोत्सवापूर्वीच चौपाट्यांवर कार्यान्वित करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

प्रदूषणमुक्तीसाठी एक महत्त्वाचे पाऊल

मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदीचे आदेश दिल्यानंतर, मुंबई महापालिकेकडून त्याची अंमलबजावणी यंदा काटेकोरपणे केली जात आहे. त्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. सौर दिव्यांसह दिशानिर्देशक बसवण्याची योजना याच उपयोजनांचा भाग आहे. त्यामुळे मूर्ती खोल समुद्रात विसर्जित करण्यावर नियंत्रण येईल. ठिकाण निश्चित केल्यानंतर, त्या ठिकाणाहून जास्तीत जास्त मूर्ती सहज बाहेर काढता येतील, आणि पर्यावरणाच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल.

सदर दिशानिर्देशक यंत्रणा गिरगाव चौपाटी, दादर शिवाजी पार्क, जुहू, वर्सोवा, आक्सा आणि गोराई या सहा प्रमुख चौपाट्यांवर बसवण्यात येणार आहे.

८५ वर्षीय आजीचा निघृण खून उलगडला – तिघा संशयितांची कबुली आणि पोलिसांच्या कारवाईचा थरार अवघ्या 36 तासात आरोपी जेरबंद

Loading

पाचोरा – तालुक्यातील पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या शेवाळे गावात घडलेल्या एका अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेचा अखेर उलगडा झाला आहे. दिनांक ५ जून २०२५ रोजी रात्री ९ ते ११ वाजेच्या दरम्यान शेवाळे गावातील रहिवासी आणि वयोवृद्ध महिला श्रीमती जनाबाई महारु पाटील, वय ८५ वर्ष, यांचा त्यांच्या राहत्या घरातच कोणीतरी अज्ञात इसमाने टणक हत्याराने डोक्यात वार करून निर्घृण खून केला होता. इतकेच नव्हे तर त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले होते. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली होती. मयताच्या मुलाने पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक ६ जून २०२५ रोजी गुन्हा रजिस्टर नंबर १५१/२०२५ नुसार भारतीय दंड विधानाच्या कलम १०३(१), ३११, ३३२अ अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासासाठी मा. पोलीस अधीक्षक, जळगाव, डॉ. माहेश्वर रेड्डी यांनी तातडीने स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव आणि पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशन यांना तपासाच्या समांतर सूचना देत गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. या सुचनांनुसार तपास पथकांनी शेवाळे गावात गोपनीय माहिती मिळवण्यास सुरुवात केली. तपास अधिकाऱ्यांनी गावामधील अनेक नागरिकांशी संवाद साधला, विविध संशयित हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले, आणि तांत्रिक पुरावे, संपर्क व्यवहार आणि सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला.
या सर्व तपासातून एक महत्त्वाचा धागा मिळाला आणि तीन तरुण आरोपींची नावे निष्पन्न झाली. या आरोपींची नावे साहिल मुकददर तडवी, वय २१ वर्षे, राकेश बळीराम हातागडे, वय २१ वर्षे, आणि राजेश अनिल हातागडे, वय १८ वर्षे असून हे तिघेही शेवाळे गावचे रहिवासी आहेत. पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. त्यांच्या कबुलीप्रमाणे, हे आरोपी पूर्वी जनाबाई महारु पाटील यांच्या घराजवळ बसून टवाळक्या करीत असत. त्या वेळी जनाबाई यांनी त्यांना खडसावले होते. या घटनेचा राग त्यांच्या मनात होता. त्यांनी सूड घेण्याच्या हेतूने ठरवून गुन्हा घडवून आणण्याचा कट रचला. त्यांनी जनाबाई यांच्या घरात मागच्या दरवाजाने प्रवेश केला आणि टणक हत्याराने त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओरबडून घेतले आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळून गेले. या गुन्ह्याच्या यशस्वी तपासासाठी आणि आरोपींच्या अटकेसाठी अनेक पोलिस अधिकाऱ्यांनी दिवस-रात्र मेहनत घेतली. या तपासाचे नेतृत्व मा. पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वर रेड्डी यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव परिमंडळ, श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, पाचोरा उपविभाग, श्री. धनंजय वेरुळे यांनीही सक्रिय भूमिका बजावली. या तपास कार्यवाहीचे तांत्रिक संयोजन पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, संदिप पाटील यांनी केले. सहायक पोलीस निरीक्षक, पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशन, प्रकाश काळे यांनी घटनास्थळावरील प्राथमिक तपास अवघ्या 36 तासातच यशस्वीरीत्या पार पाडला.
या तपासात सहभागी अधिकाऱ्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, शेखर डोमाळे, शरद बागल, पो. उप.निरीक्षक विठठल पवार, ग्रे. पो. उप.निरीक्षक प्रकाश पाटील, पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सफौ. अतुल वंजारी, पोहेकॉ. लक्ष्मण पाटील, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, किशोर पाटील, चा. पोहेकॉ. भरत पाटील, महेश सोमवंशी, पिंपळगांव हरेश्वर पो.स्टे. नेमणुकीचे पोहेकॉ. नरेंद्र नरवाडे, अभिजित निकम, अमोल पाटील, इमरान पठाण, मुकेश लोकरे, नामदेव इंगळे, मुकेश तडवी, चा. पो.कॉ. सागर पाटील यांचा समावेश होता. या सर्व अधिकाऱ्यांनी सामूहिकपणे अत्यंत शिस्तबद्ध आणि कष्टपूर्वक काम करत गुन्ह्याचे कोडे उलगडले.
या तिघा आरोपींनी दिलेल्या कबुलीनुसार, ते जनाबाई यांच्या वर्तनामुळे वैयक्तिक राग बाळगून होते आणि त्या रागातून त्यांनी हा गुन्हा घडवून आणला. ही बाब समाजासाठी अत्यंत धोकादायक आहे की केवळ एक वृद्ध महिला युवकांना वाईट वागणुकीसाठी झिडकारते म्हणून तिचा खून होतो. या घटनेतून समाजातील तरुण पिढीच्या नैतिक अधःपतनाचा स्पष्ट प्रत्यय येतो.या घटनेनंतर संपूर्ण शेवाळे गावात भीतीचे आणि दुःखाचे वातावरण पसरले होते. एक वयोवृद्ध महिला, जी आयुष्याच्या संध्याकाळी एकटी राहत होती, ती स्वतःच्या घरातही सुरक्षित राहू शकली नाही, ही बाब गावकऱ्यांच्या अंतःकरणाला भिडली. मात्र पोलिसांनी वेळ वाया न घालवता आपल्या कार्यक्षमतेचा परिचय देत अवघ्या काही दिवसांत गुन्हेगारांना जेरबंद केले. त्यामुळे गावकऱ्यांच्या मनात पोलिस दलाविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करून त्यांना कायदेशीर शिक्षा व्हावी यासाठी सर्व प्रक्रिया सुरू आहे. आरोपींच्या कबुलीनंतर त्यांच्याकडून हत्यारे, चोरीस गेलेले दागिने व इतर पुरावे हस्तगत करण्याचे काम चालू आहे. तसेच न्यायालयीन प्रक्रियेकरिता आवश्यक त्या सर्व साक्षी, पंचनामे, व तांत्रिक पुरावे संकलनाचा देखील वेगाने पाठपुरावा सुरू आहे.
या घटनेमुळे नागरिकांमध्ये वाढलेली असुरक्षिततेची भावना ही स्थानिक प्रशासनासाठी एक महत्त्वाचा मुद्दा बनली आहे. त्यामुळे भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी गावांमध्ये गस्त वाढविणे, तरुणांमध्ये नैतिक शिक्षण व कायद्याची भीती निर्माण करणे, आणि विशेषतः वृद्ध नागरिकांसाठी सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे बनले आहे. पोलिसांनी दाखवलेली तत्परता व तपासातील काटेकोरपणा हाच अशा गुन्ह्यांना रोखण्याचा प्रभावी मार्ग आहे. नागरिकांनीही जागरूक राहून पोलिसांना सहकार्य करणे ही काळाची गरज बनली आहे.शेवटी, या प्रकरणात पोलिसांनी दाखवलेली धाडसी आणि चिकाटीची कारवाई ही समाजासाठी प्रेरणादायी आहे. गुन्हेगार कोणताही असो, त्याचा शोध घेऊन त्याला शिक्षा मिळवून देण्याचे दायित्व पोलिस दलाने पेलले. या घटनेचा शेवट केवळ गुन्ह्याच्या उकलित नव्हे, तर वृद्ध व्यक्तींच्या सुरक्षिततेबाबत समाजातील सजगतेचा आरंभ ठरावा, हीच अपेक्षा आहे. जनाबाई पाटील यांना न्याय मिळावा आणि अशा निर्घृण प्रकारांना समाजात थारा मिळू नये, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आवश्यक आहे.

श्री गो. से. हायस्कुलमध्ये पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांचा ओढा का?

Loading

पाचोरा – शिक्षण ही अशी शाश्वत प्रक्रिया आहे जी केवळ ज्ञानार्जनापुरती मर्यादित न राहता व्यक्तिमत्त्व विकास, सामाजिक जाण, जबाबदारीची भावना, कष्टाची तयारी आणि उत्तम जीवनशैली घडवण्यासाठी मूलभूत भूमिका बजावते. हे घडते जेव्हा विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर आचरण, सृजनशीलता, कौशल्य आणि संस्कारही मिळतात. अशा सर्वांगीण विकासाची खात्री देणारी आणि गाव, तालुका, जिल्हा आणि विभाग पातळीवर स्वतःचे स्थान निर्माण करणारी संस्था म्हणजे पाचोरा येथील श्री गो. से. हायस्कूल. ही शाळा आपल्या सातत्यपूर्ण गुणवत्ता उन्नतीमुळे आणि विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याच्या कार्यामुळे अनेक पालकांची पहिली पसंती ठरली आहे. शाळेचा 2024-25 चा शैक्षणिक आराखडा हा केवळ आकड्यांचा खेळ नसून, तो विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनातून साकारलेला एक जीवंत दस्तऐवज आहे. राज्य शासनाच्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात शाळेने संपूर्ण पाचोरा तालुक्यातूनही प्रथम स्थान पटकावले आहे. ही यशस्वी घोडदौड केवळ सरकारी पुरस्कारांपुरती मर्यादित नाही, तर ती शाळेच्या व्यवस्थापन, मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांच्या समविचारी प्रयत्नांचे फलित आहे. शाळेने यावर्षी इयत्ता पाचवीपासून संगणक विषयाची सुरुवात करून ग्रामीण आणि निमशहरी भागातील विद्यार्थ्यांना माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात सुरुवातीपासूनच प्रशिक्षित करण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. आजच्या युगात संगणक ज्ञान ही मूलभूत गरज बनली आहे. त्यासाठी शाळेने संगणक प्रयोगशाळा, प्रोजेक्टर, डिजिटल सॉफ्टवेअर्स, प्रशिक्षित शिक्षक आणि समर्पित अभ्यासक्रम यांची समर्पक आखणी केली आहे. हे शिक्षण मुलांना फक्त टेक्निकल नॉलेज देत नाही, तर त्यांची विश्लेषण क्षमता, तार्किक विचारसरणी आणि सर्जनशीलता वाढवते.
सांस्कृतिक क्षेत्रातही शाळेची कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. जिल्हास्तरावरील ‘कास्ट लिस्ट इंडिया’ या पथनाट्य सादरीकरणाने सामाजिक समतेचा संदेश देत विद्यार्थ्यांमध्ये सामूहिक भावना, संवाद कौशल्य, रंगभूमीवरील आत्मविश्वास आणि सामाजिक भान यांचे बीज पेरले. अशा प्रकारच्या उपक्रमामुळे विद्यार्थी केवळ अभ्यासात नव्हे, तर एकात्मता, मानवता आणि नेतृत्वगुण यातही प्रगती करू लागतात.
शाळेच्या गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखड्याच्या अंतर्गत ‘अभ्यासक्रम रचनाबद्ध’, ‘अध्यापन सुधारित’, ‘शिक्षकांचे प्रशिक्षण नियमित’, ‘अभ्यास परिणामाचे मूल्यमापन कार्यक्षम’ आणि ‘संसाधन व्यवस्थापन प्रभावी’ असे पाच स्तंभ ठरवले गेले आहेत. प्रत्येक शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत शैक्षणिक व मानसिक प्रगतीवर लक्ष ठेवत व्यक्तिगत फॉलोअपची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी हा ‘एक युनिट’ मानून त्याचा समर्पित विकास करण्यावर भर दिला जातो.
शाळेच्या प्रशासकीय यंत्रणेत पारदर्शकता, उत्तरदायित्व, नवोपक्रमशीलता आणि संवादक्षमतेवर भर आहे. मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिक्षकवर्गातील प्रत्येक सदस्य शिक्षणाच्या सर्वोच्च उद्दिष्टासाठी एकत्रितपणे प्रयत्नशील आहे. शाळेने वेळोवेळी ‘पालक-शिक्षक संवाद मेळावे’, ‘विद्यार्थी-शिक्षक संवाद सत्रे’ आणि ‘संवाद परिषदां’चे आयोजन करून सर्व घटकांमध्ये समन्वय वाढवला आहे.
अशा व्यापक दृष्टिकोनातून आरोग्य हा देखील शिक्षणाचा घटक ठरतो. पर्यावरण संरक्षणासाठी शाळेने बहुउद्देशीय वृक्षांचे रोपण केले असून प्रत्येक वर्गाने ‘आपला एक वृक्ष’ ही संकल्पना स्वीकारून वृक्षपालनाची जबाबदारी उचलली आहे. परसबागेची निर्मिती हीदेखील या उपक्रमाचा एक भाग आहे. यातून विद्यार्थ्यांना कृषिविज्ञान, सेंद्रिय शेती, पाणी व्यवस्थापन आणि श्रमसंस्कार यांचे प्राथमिक शिक्षण मिळते. विद्यार्थ्यांच्या शरीरसौष्ठवासाठी शुक्रवारी व शनिवारी कवायतींचा विशेष तास सुरू करण्यात आला आहे. नियमित व्यायामामुळे केवळ आरोग्य सुधारत नाही, तर शिस्त, नेतृत्व, आत्मसंयम आणि सहकार्य या गुणांचाही विकास होतो. खेळांद्वारे भावनिक सुसंवाद वाढतो व सांघिक भावना दृढ होते. शाळेने विद्यांजली पोर्टलवर नोंदणी करून एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला आहे. यातून भारत भरातील स्वयंसेवक, निवृत्त अधिकारी, तज्ज्ञ मंडळी शाळेशी जोडले जातात. त्यांच्या अनुभवाचे भांडार विद्यार्थ्यांसमोर खुले होते. त्यामुळे मुलांना वेगवेगळ्या क्षेत्रातील जाणकारांशी संवाद साधण्याची संधी मिळते.
शाळेतील इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत एकूण 2605 विद्यार्थी हे या संस्थेवर पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा असलेला दृढ विश्वास अधोरेखित करणारे उदाहरण आहे. मोठ्या संख्येतील विद्यार्थ्यांवर दर्जेदार आणि प्रभावी शिकवणी ठेवणे ही मोठी जबाबदारी असून श्री गो. से. हायस्कूलने ती उत्तम प्रकारे पार पाडलेली आहे. भौतिक सुविधांच्या आघाडीवर शाळेने तिसऱ्या मजल्याचे संपूर्ण कामकाज पूर्ण करून रंगरंगोटी, टाईल्स, वीजसंपत्ती, ट्यूबलाईट्स, पंखे, वॉशरूमसारख्या मूलभूत गरजांवर भर दिला आहे. बाहेरील भिंतींवर ऐतिहासिक, भौगोलिक, वैज्ञानिक व सामाजिक दृष्टिकोन असलेल्या फलकांचे लेखन करून ‘शाळेच्या भिंती बोलक्या’ केल्या आहेत. हे फलक म्हणजे एका विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्तीचे आणि जाणिवांचे अधिवास ठरतात. शाळेत विविध शालेय स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन, निबंध लेखन, वक्तृत्व, वाचन स्पर्धा, चित्रकला, संगीत, योग व श्लोक पठण यांचे आयोजन नियमितपणे केले जाते. प्रत्येक विद्यार्थ्याला किमान एका उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. या सहभागातूनच गुण, आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि नेतृत्वगुण खुलतात.मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे हे शाळेच्या उन्नतीचा आधारस्तंभ आहेत. त्यांचा शिक्षणावर असलेला दृढ विश्वास, नियोजनशीलता, विद्यार्थीप्रियता आणि वेळेचे व्यवस्थापन यामुळे शाळेचे कामकाज शिस्तबद्ध आणि प्रभावी रितीने सुरू आहे. त्यांनी शिक्षकांमध्ये नेतृत्वगुण, उत्तरदायित्व आणि नवोपक्रमांची प्रेरणा दिली आहे. त्यांच्या नेतृत्वात शाळा केवळ संस्थाच नव्हे, तर एक शैक्षणिक चळवळ बनली आहे श्री गो. से. हायस्कूल ही अशी संस्था आहे जिथे शिक्षण, संस्कार, अनुशासन, पर्यावरण, तंत्रज्ञान, आरोग्य, कला आणि क्रीडा या सर्व घटकांचे संतुलित रूप पाहायला मिळते. येथे शिक्षण म्हणजे नुसते वर्गखोल्यांपुरते मर्यादित न राहता, ते प्रत्येक विद्यार्थी आणि पालकाच्या आयुष्याशी जोडलेले आहे. म्हणूनच आजच्या काळात आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्याची शाश्वती हवी असेल, त्याला एक सुरक्षित, प्रगतीशील, संस्कारित आणि आधुनिक शिक्षणदृष्टिकोन असलेली शाळा द्यायची असेल, तर श्री गो. से. हायस्कूल, पाचोरा हीच सर्वोत्तम निवड ठरते. आपल्या पाल्याला गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या सुवर्णसंधीकडे घेऊन जाणारी ही शाळा एक आदर्श पर्याय आहे.

आज दि. 08/06/2025 चे प्रत्येक राशीसाठी मूळ स्वरूपात राशीभविष्य, शुभ अंक आणि शुभ रंग

Loading

मेष (Aries):
आज मनात उत्साह असून नवीन कल्पनांना चालना मिळेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक व्यवहारात लाभ होईल.
शुभ अंक: ९
शुभ रंग: तांबडावृषभ (Taurus):
आजचे दिवस संयमाचे आहे. बोलताना शब्दांची निवड करा. मित्रांचा सल्ला उपयोगी पडेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
शुभ अंक: २
शुभ रंग: क्रीम

वृषभ (Taurus):
आजचे दिवस संयमाचे आहे. बोलताना शब्दांची निवड करा. मित्रांचा सल्ला उपयोगी पडेल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
शुभ अंक: २
शुभ रंग: क्रीम

मिथुन (Gemini):
व्यवसायात यश मिळेल. जुने अडथळे दूर होतील. महत्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस योग्य आहे.
शुभ अंक: ५
शुभ रंग: हिरवा

कर्क (Cancer):
कुटुंबातील वाद मिटतील. नवी ऊर्जा जाणवेल. मानसिक प्रसन्नता मिळेल.
शुभ अंक: ४
शुभ रंग: पांढरा

सिंह (Leo):
सामाजिक वर्तुळात प्रतिष्ठा वाढेल. अपेक्षित कामात प्रगती होईल. वरिष्ठांचा सल्ला उपयुक्त ठरेल.
शुभ अंक: १
शुभ रंग: सोनेरी

कन्या (Virgo):
गोंधळ व उशीर टाळा. कामात अचूकता ठेवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.
शुभ अंक: ६
शुभ रंग: राखाडी

तुला (Libra):
प्रेमसंबंधात समाधान मिळेल. नवी ओळख उपयोगी ठरेल. पैशाच्या व्यवहारात योग्य निर्णय घ्या.
शुभ अंक: ८
शुभ रंग: गुलाबी

वृश्चिक (Scorpio):
धाडसी निर्णय यशस्वी ठरतील. मनात नवे विचार उगम पावतील. जुने मित्र भेटतील.
शुभ अंक: ३
शुभ रंग: जांभळा

धनु (Sagittarius):
विद्यार्थ्यांना यश मिळेल. सरकारी कामकाजात गती येईल. घरात शुभकार्याची चर्चा होईल.
शुभ अंक: ७
शुभ रंग: नारिंगी

मकर (Capricorn):
कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. आर्थिक लाभ संभवतो. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल.
शुभ अंक: ४
शुभ रंग: तपकिरी

कुंभ (Aquarius):
संघर्ष वाढू शकतो पण प्रयत्न थांबवू नका. जुनी थकबाकी मिळण्याची शक्यता.
शुभ अंक: २
शुभ रंग: निळा

मीन (Pisces):
सृजनशीलतेला चालना मिळेल. वैचारिक स्थैर्य लाभेल. नवीन नात्यांची सुरुवात होईल.
शुभ अंक: ६
शुभ रंग: फिकट पिवळा

बन्सीलालजी बांठीयासर का निधन

Loading

पाचोरा- शहरमे इंदिरा नगरस्थित प्रतिष्ठित श्री गो.से. हाईस्कूल के गणित विषय के शिक्षक तथा राष्ट्रभाषा हिंदी के प्रचारक, साथ ही सेवानिवृत्त वरिष्ठ शिक्षक एवं जैन संघ के वरिष्ठ श्रावक बंसीलालजी हंसराजजी बांठिया (उम्र 90 वर्ष) का आज दिनांक 7 जून को सुबह लगभग 5:30 बजे वृद्धावस्था जनित कारणों से शांतिपूर्वक निधन हो गया। उनके निधन से पाचोरा शहर के शैक्षणिक, सामाजिक और धार्मिक क्षेत्रों में शोक की लहर दौड़ गई है। वे वर्तमान में श्री गो.से. हाईस्कूल में पर्यवेक्षक के पद पर कार्यरत राजेश बांठिया और अमित प्रोविजन के संचालक अमित बांठिया के पिताजी थे।
बंसीलालजी बांठियासर ने अपने जीवन का अधिकांश हिस्सा शिक्षण सेवा को समर्पित किया। गणित जैसे जटिल विषय को सरल और रोचक तरीके से पढ़ाकर उन्होंने विद्यार्थियों के मन में न सिर्फ विषय के प्रति रुचि निर्माण की, बल्कि नैतिकता और अनुशासन का पाठ भी पढ़ाया। राष्ट्रभाषा हिंदी के प्रचारक के रूप में भी उन्होंने विद्यार्थियों में भाषिक अभिरुचि निर्माण करने में महत्त्वपूर्ण भूमिका निभाई।
वे केवल एक शिक्षक नहीं थे, बल्कि विद्यार्थियों के लिए मार्गदर्शक, पालकों के लिए विश्वासपात्र और विद्यालय परिवार के लिए प्रेरणास्रोत थे। शिक्षा क्षेत्र में उनके योगदान को कभी भुलाया नहीं जा सकेगा।
धार्मिक दृष्टि से भी बंसीलालजीसर का जीवन अत्यंत अनुकरणीय रहा। वे पाचोरा के जैन संघ के वरिष्ठ श्रावक के रूप में विशेष सम्मानित थे। उन्होंने अपने संयमित जीवन, धार्मिक कर्तव्यों और सामाजिक सहभागाने समाज में एक सशक्त व आदर्श व्यक्तिमत्व निर्माण किया था। प्रवचन, उपवास, धार्मिक क्रियाकलापों में उनकी सक्रिय भागीदारी सदैव प्रेरणादायक रही।
उनके परिवार के लिए वे एक मजबूत आधारस्तंभ थे। उनके सुपुत्र राजेश बांठिया वर्तमान में श्री गो.से. हाईस्कूल में पर्यवेक्षक पद पर कार्यरत हैं, तो वहीं अमित बांठिया अपने व्यवसाय अमित प्रोव्हिजन के माध्यम से व्यापारिक और सामाजिक क्षेत्र में सक्रिय हैं। दोनों पुत्रों ने अपने पिता से प्राप्त मूल्यों का पालन करते हुए अपने जीवन में यश व प्रतिष्ठा अर्जित की है।
बंसीलालजी बांठियासर का पार्थिव शरीर पाचोरा के इंदिरानगर स्थित उनके निवासस्थान से आज शाम 5:30 बजे अंतिम यात्रा के लिए ले जाया जाएगा। उनके अंतिम दर्शन के लिए बड़ी संख्या में नगरवासी, शैक्षणिक क्षेत्र के सहकर्मी, जैन संघ के सदस्य, व्यापारीगण और उनके पूर्व विद्यार्थी एकत्र हो रहे हैं।
श्री गो.से. हाईस्कूल के मुख्याध्यापक श्री एन.आर. पाटील और उपमुख्याध्यापक श्री आर.एल. पाटील ने उन्हें भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करते हुए कहा कि, “बांठिया सर हमारे विद्यालय की प्रेरणास्रोत विभूति थे। उनके जाने से एक युग का अंत हुआ है।” उनके जाने से शिक्षा, समाज व धर्म क्षेत्र को अपूरणीय क्षति हुई है। वे हमेशा अपने कार्यों, शिक्षणशैली, धार्मिक आचरण और सौम्य व्यक्तित्व के लिए याद किए जाएंगे। ईश्वर उनकी आत्मा को शांति दे और परिवार को इस दुःख को सहने की शक्ति प्रदान करे — यही झुंज & ध्येय न्युज परिवार की और से प्रभ्रू चरणी प्रार्थना। ॐ शांति।

पदविधानी सन्मान: शिक्षक आर. बी. बांठिया यांची पर्यवेक्षकपदी पदोन्नती

Loading

पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री. गो. से. हायस्कूल, पाचोरा या प्रख्यात विद्यालयातील जेष्ठ व कर्तव्यनिष्ठ शिक्षक आर. बी. बांठिया यांची नुकतीच पर्यवेक्षक पदावर पदोन्नती करण्यात आली असून, संस्थेने त्यांच्या प्रदीर्घ सेवाज्येष्ठतेचा आदर राखत व त्यांच्या गुणवत्तेची दखल घेत ही महत्त्वपूर्ण पदोन्नती दिली आहे. संस्थेच्या या निर्णयाचे शिक्षण क्षेत्रात व पाचोरा परिसरात सर्वत्र स्वागत होत असून, बांठिया सरांचे कार्य, त्यांची शिस्तप्रियता, विद्यार्थ्यांप्रती असलेली आत्मीयता आणि संस्थेबद्दल असलेली निष्ठा यामुळेच ही सन्माननीय संधी त्यांना मिळाल्याचे मानले जात आहे.
आर. बी. बांठियासर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून श्री. गो. से. हायस्कूलमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे, आत्मनिष्ठेने व नितिमत्तेने शिक्षक म्हणून सेवा बजावली आहे. विषय ज्ञान, अध्यापन कौशल्य, विद्यार्थ्यांसोबतची संवाद क्षमता, तंत्रशुद्ध अध्यापन व वेळप्रसंगी नेतृत्वगुण यामुळे त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या वर्गात विद्यार्थी केवळ विषय शिकत नाहीत तर जीवनाचे धडेही गिरवतात, असे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे म्हणणे आहे. त्यांनी संस्थेतील विविध उपक्रमांत सक्रीय सहभाग घेतला असून, प्रत्येक उपक्रमाला त्यांनी आपलेसे मानले आहे. सांस्कृतिक कार्यक्रम असोत, वार्षिक स्नेहसंमेलन असो वा अभ्यासवर्गांचे आयोजन — बांठिया सरांनी प्रत्येक वेळेस पुढाकार घेऊन आपले योगदान दिले आहे. त्यामुळेच त्यांची ही पदोन्नती शिक्षण क्षेत्रात एक योग्य न्याय म्हणून पाहिली जात आहे. या पदोन्नतीचा अधिकृत गौरव सोहळा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. संस्थेचे व्हाईस चेअरमन मा. नानासो श्री. व्ही. टी. जोशी यांच्या हस्ते श्री. आर. बी. बांठिया यांना पर्यवेक्षकपदी पदोन्नतीचे पत्र प्रदान करण्यात आले. या प्रसंगी मुख्याध्यापक श्री. एन. आर. पाटील, उपमुख्याध्यापक श्री. आर. एल. पाटील तसेच इतर शिक्षकवर्ग उपस्थित होता.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी बांठिया सरांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापकांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “बांठिया सर हे विद्यार्थ्यांचे खरे मार्गदर्शक आहेत. पर्यवेक्षकपदाच्या माध्यमातून ते संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता वृद्धीसाठी अधिक प्रभावी भूमिका बजावतील, याची खात्री वाटते.”
संस्थेचे अध्यक्ष मा. भाऊसो श्री. दिलीप वाघ, चेअरमन मा. नानासो श्री. संजय वाघ, व्हा. चेअरमन मा. नानासो श्री. व्ही. टी. जोशी, मानद सचिव ॲड. मा. श्री. महेश देशमुख, शालेय समिती चेअरमन मा. दादासो श्री. खलील देशमुख, तांत्रिक विभाग शालेय समिती चेअरमन मा. आण्णासो श्री. वासुदेव महाजन, तसेच संस्थेचे सर्व संचालक मंडळ यांनी त्यांच्या या पदोन्नतीचे स्वागत करत सदिच्छा व्यक्त केल्या.
या सर्व मान्यवरांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशांतून बांठिया सरांचे कार्य, त्यांचे विद्यार्थ्यांवरचे प्रेम, सहकाऱ्यांबाबतचा आदर आणि संस्थेबद्दलची निष्ठा यावर प्रकाश टाकत, “शाळेचा विकास व शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी यामध्ये त्यांचा सहभाग आता अधिक निर्णायक ठरेल”, अशी अपेक्षा व्यक्त केली.
पदविभाग, विज्ञान-विभाग, कला विभाग तसेच खेळ व संगीत विभागातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनीही या पदोन्नतीचा आनंद साजरा करत बांठिया सरांचे अभिनंदन केले. अनेक सहकाऱ्यांनी त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर करत त्यांच्याविषयी असलेला सन्मान व्यक्त केला.
“आर. बी. बांठिया सर हे नेहमीच विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, आत्मनिवेदन आणि आत्मभान जागवणारे शिक्षक आहेत. त्यांची भाषाशैली, समजावण्याची पद्धत व सौम्य स्वभाव यामुळे विद्यार्थ्यांच्याही मनात त्यांच्याबद्दल विशेष स्थान आहे”, असे शिक्षक म. र. पाटील यांनी सांगितले.
श्री. गो. से. हायस्कूल ही संस्था शिक्षण, संस्कार आणि गुणवत्ता यासाठी राज्यभर परिचित आहे. या संस्थेच्या यशस्वी वाटचालीत अनेक शिक्षकांचा मोलाचा वाटा आहे. या गौरवशाली परंपरेत बांठिया सरांचा सहभाग आता पर्यवेक्षक म्हणून अधिक व्यापक आणि निर्णायक होणार आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अनुशासन, शिक्षण व सहशालेय क्रियाकलापांचे प्रभावी पर्यवेक्षण हे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा वेळी एका अनुभवी व दृष्टीसंपन्न शिक्षकाची पर्यवेक्षकपदी निवड होणे ही संपूर्ण शाळेसाठी अभिमानाची बाब ठरते.
पद मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना बांठिया सरांनी सांगितले की, “मी ही पदोन्नती केवळ वैयक्तिक यश म्हणून पाहत नाही, तर ती माझ्या सहकाऱ्यांनी दिलेल्या साथीतून आणि विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रेमातून मिळालेली आहे. या पदाच्या माध्यमातून संस्थेच्या आणि विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन.” त्यांनी आपल्याला पाठीशी घालणाऱ्या सर्व संचालक मंडळाचे, मुख्याध्यापकांचे व सहकाऱ्यांचे आभार मानले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी नव्या योजनांची अंमलबजावणी, शिक्षकांमध्ये समन्वय, पालकांशी संवाद आणि शाळेतील शिस्त यावर अधिक भर देण्याचे संकेत दिले. शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी एक सकारात्मक पाऊल
शाळेतील विद्यार्थी, पालक व संपूर्ण शिक्षणप्रेमी समाजासाठी ही बातमी अत्यंत उत्साहवर्धक ठरली आहे. एका कार्यक्षम व सुसंस्कारित शिक्षकाची पर्यवेक्षकपदी पदोन्नती ही संस्था, विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी नवीन आशावाद घेऊन येते.
आर. बी. बांठिया सरांनी या संधीचा योग्य उपयोग करून विद्यालयाच्या गुणवत्ता वृद्धीचा व सामाजिक सहभागाचा नवीन अध्याय सुरू करावा, अशीच अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यांच्या या नवीन जबाबदारीच्या प्रवासासाठी अनेकांच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत.

आज दिनांक 07/06/2025, शनिवार – राशीनिहाय आजचे भविष्य, शुभ अंक आणि शुभ रंग

Loading

मेष
आज तुमच्यासाठी निर्णयक्षम दिवस आहे. जुनी कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल.
शुभ अंक : 3
शुभ रंग : तांबडा

वृषभ
आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरेल.
शुभ अंक : 6
शुभ रंग : आकाशी

मिथुन
नवीन कल्पना मनात येतील. व्यवसायात यश मिळेल. सामाजिक संबंध दृढ होतील.
शुभ अंक : 5
शुभ रंग : पिवळसर हिरवा

कर्क
कौटुंबिक सहकार्य मिळेल. मनात आनंद आणि समाधान राहील. तणाव टाळावा.
शुभ अंक : 2
शुभ रंग : पांढरा

सिंह
प्रत्येक कामामागे योग्य नियोजन ठेवा. मान-सन्मान मिळण्याचे संकेत. बोलण्यात नम्रता ठेवा.
शुभ अंक : 1
शुभ रंग : केशरी

कन्या
आजची सकाळ उत्साहवर्धक असेल. सृजनशील कामांना चालना मिळेल. वाद टाळा.
शुभ अंक : 4
शुभ रंग : निळा

तुला
जुन्या गोष्टींकडे सकारात्मक दृष्टीने पाहा. निर्णय घेण्याची योग्य वेळ. नवे काम सुरू करणे फायदेशीर ठरेल.
शुभ अंक : 7
शुभ रंग : गुलाबी

वृश्चिक
गोपनीय माहिती शेअर करताना सावध राहा. भावनिक गुंतवणूक टाळा. संयम ठेवा.
शुभ अंक : 8
शुभ रंग : जांभळा

धनु
मनात सकारात्मकतेचे वातावरण असेल. आज संधी ओळखून कृती करा.
शुभ अंक : 3
शुभ रंग : पिवळा

मकर
कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. वरिष्ठांचा विश्वास मिळवणे महत्त्वाचे ठरेल.
शुभ अंक : 5
शुभ रंग : तपकिरी

कुंभ
नवीन कल्पनांना चालना मिळेल. आरोग्याबाबत सतर्क राहा. आत्मविश्वास वाढेल.
शुभ अंक : 6
शुभ रंग : गडद हिरवा

मीन
मनःशांती लाभेल. चांगले विचार पुढे नेण्याची प्रेरणा मिळेल. नवे संबंध लाभदायक ठरतील.
शुभ अंक : 2
शुभ रंग : आकाशी निळा

“शारदा (पूजा) बागुल हत्येच्या निषेधार्थ भडगावकरांचा सर्वपक्षीय जनआक्रोश मोर्चा; माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचा सहभाग

Loading

भडगाव- तालुका संतप्त झाला होता. मानवी संवेदना हादरवून टाकणाऱ्या एका दुर्दैवी, अमानुष आणि क्रूर घटनेमुळे भडगावसह संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. धुळे येथील आपल्या सासरी वास्तव्यास असलेल्या भडगावच्या माहेरच्या शारदा (पूजा) बागुल (माळी) या तरुण विवाहितेवर तिच्या सासरच्यांकडून कथितरित्या अमानुषपणे मारहाण करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना ज्या पद्धतीने उघडकीस आली आहे, त्याने समाजमन सुन्न झाले असून, ह्या दु:खद घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि शारदाला न्याय मिळावा यासाठी भडगावमध्ये आज सर्व पक्षीय व धर्मीय प्रचंड जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चात माजी आमदार दिलीपभाऊ वाघ त्यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. जयश्रीताई पाटील,वैशालीताई सुर्यवंशी, योजनाताई पाटील ,साहेबराव महाजन, भाजचे अमोल शिंदे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र पाटील, प्रशांत पवार, शशिकांत येवले, गणेश परदेशी, सचिन चोरडिया, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष नरेंद्र पाटील, एकनाथ महाजन, दिपक महाजन दिपक महाजन, शिवसेना तालुकप्रमुख सुधाकर पाटील, माजी नगरसेविका योजनाताई पाटील, प्राजक्ता ताई देशमुख भाजपच्या नूतनताई पाटील, नितीन महाजन, सागर महाजन, युवराज पाटील, मनोहर चौधरी, डॉ प्रमोद पाटील, डॉ नीलेश पाटील, डॉ विलास पाटील, ऍड नीलेश तिवारी, प्रहारचे विजय भोसले, मनसेचे जिल्हाध्यक्ष अनील वाघ, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील, सेनेचे लरवीचंद पाटील, शिवदास महाजन,
अनील वाघ, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सोमनाथ पाटील, सेनेचे लरवीचंद पाटील, शिवदास महाजन, महेंद्र ततार, रवी अहिरे, अजय चौधरी, पिनु महाजन, अतुल पाटील, अमोल पाटील, माजी उपसभापती संभाजी भोसले, नीलेश मालपुरे, ठेकेदार संभाजी पाटील,यांची प्रभावी उपस्थिती होती. या मोर्चाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणत्याही एका पक्षाचे नव्हते, तर सर्वपक्षीय, सर्व धर्मीय, सर्व जाती-धर्मातील भडगावकरांनी मनापासून सहभाग नोंदवला होता. शारदावर झालेल्या अमानुष अन्यायाविरोधात आणि आरोपींना कठोर शासन व्हावे, या मागणीसाठी अखिल भडगाव शहर एकत्र आले होते. शारदा (पूजा) बागुल ही भडगावची माहेर वाशिण. तिचे लग्न धुळे जिल्ह्यातील एका ठिकाणी झाले होते. मागील काही काळापासून तिला सासरच्या मंडळींकडून मानसिक व शारीरिक छळाला सामोरे जावे लागत असल्याची चर्चा गावपातळीवर सुरु होती. मात्र अचानक तिचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत सापडल्याने आणि त्या आधी तिला मारहाण झाल्याचे स्पष्ट चिन्हे आढळल्याने, ही बाब केवळ आत्महत्या नसून, हत्या असल्याचा कळस सर्वत्र झाला आहे.
या घटनेमुळे तिच्या माहेरी आणि भडगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, अशा घटनांना पूर्णविराम देण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे. घरगुती हिंसाचाराचा बळी ठरणाऱ्या महिला ही समाजाची खोल आणि काळोखी बाजू दाखवते. शारदा हिने अशा क्रूरतेचा बळी जावा, हे कुणालाही मान्य नाही. पाचोरा – भडगावातील सामाजिक जाणिवा जागृत करणारे नेतृत्व म्हणजे माजी आमदार दिलीपभाऊ वाघ. त्यांना शारदाच्या हत्येची माहिती व मोर्चा असल्याचे समजताच तातडीने पुढाकार घेत आज भडगावमध्ये ऐतिहासिक अशा सर्वपक्षीय आणि सर्वधर्मीय लोकांचा प्रचंड जनआक्रोश मोर्चात सहभागी झाले
या मोर्चाने पोलीस स्टेशनकडे धडक देत, आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, पीडित कुटुंबीयांना सुरक्षा व कायदेशीर सहाय्य मिळावे, असा ठाम पवित्रा घेत निवेदन सादर केले. या निवेदनावर भडगावच्या नागरिकांचे शेकडो स्वाक्षरी होत्या
या संपूर्ण मोर्चात सौ. जयश्रीताई पाटील, महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा, यांनी देखील निर्णायक भूमिका घेतली. त्यांनी शारदाच्या घटनेवर प्रखर शब्दांत संताप व्यक्त करत, “महिलांवर होणारा कोणताही अन्याय आता सहन केला जाणार नाही. शारदा ही आपल्या समाजातील प्रत्येक बहिण आहे. तिच्यावर जे घडलं, ते आमच्यापैकी कुणासोबतही घडू शकतं. त्यामुळे आम्ही न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही,” अशा शब्दांत भावनांना वाट मोकळी करून दिली.
या मोर्चात शहरातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी संघटना, महिला मंडळ, सामाजिक कार्यकर्ते, युवक मंडळे, ज्येष्ठ नागरिक, शिक्षक, विद्यार्थी, पत्रकार, शेतकरी अशा विविध थरांतील लोक एकत्र आले होते. ‘शारदाला न्याय मिळालाच पाहिजे’, ‘गृही हिंसाचारविरोधात कठोर कायदा हवा’, ‘गृहोपयोगी हत्या खपवून घेतली जाणार नाही’, ‘निर्घृण हत्येच्या आरोपींना फाशी दे’, अशा घोषणा शहराच्या रस्त्यांवर घुमत होत्या
मोर्चा भडगाव पोलीस ठाण्यावर पोहोचल्यावर एका ठरावीक निवेदनाद्वारे आरोपींवर कठोर कारवाई करावी, आरोपींना तत्काळ अटक करून कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करावा, शारदाच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरवावी, पीडितांच्या बाजूने वकील आणि न्यायलयी सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली. भडगावचे पोलीस निरीक्षकांनी निवेदन स्वीकारताना संबंधित माहिती वरिष्ठांकडे पाठवली जाईल आणि यथायोग्य कारवाई होईल, असे सांगितले. या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे यात कुठल्याही एका पक्षाचा झेंडा नव्हता. सर्वपक्षीय कार्यकर्ते, अगदी प्रतिस्पर्धी राजकीय विचारांचे लोक देखील फक्त शारदासाठी एकत्र आले होते. माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांचे संयोजन, सौ. जयश्री पाटील यांचा सहभागा आणि सामान्य जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद यामुळे हा मोर्चा केवळ निषेध म्हणून नव्हता, तर एक सामाजिक शक्तीप्रदर्शन बनला.मोर्चा संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी सांगितले, “हे केवळ सुरुवात आहे. जर आरोपीवर तत्काळ कठोर कारवाई झाली नाही, तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊ, महिला आणि जनतेच्या हक्कासाठी आंदोलन तीव्र करू. आम्हाला कोणताही राजकीय लाभ नको, फक्त शारदाला न्याय मिळावा, एवढीच अपेक्षा आहे.”
भडगावसारख्या छोट्या शहरात वावरलेल्या, सर्वांना हसतमुखाने सामोऱ्या जाणाऱ्या, शिक्षण घेणाऱ्या, सासरी जाऊन नवजीवन सुरु केलेल्या शारदाचा असा अंत होईल, असे कुणीही स्वप्नातही विचार केला नसेल. तिचा चेहरा आता केवळ तिच्या आईवडिलांच्या आठवणीत, तिच्या सखींच्या डोळ्यात आणि समाजाच्या काळजात राहील शारदा (पूजा) बागुलच्या हत्येप्रकरणी जोपर्यंत सर्व आरोपींवर कठोर कारवाई होत नाही, आणि न्यायप्रक्रिया प्रभावीपणे सुरु होत नाही, तोपर्यंत भडगावचा जनतेचा आक्रोश तसाच राहणार, हे या मोर्चातून स्पष्ट झाले आहे. माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांच्यासारख्याच्या सहभागाने व सर्वपक्षीय माध्यमातून हा लढा न्यायासाठी अधिक प्रभावी होणार आहे, याची भडगावकरांना खात्री वाटते. शेवटी, हा लढा केवळ शारदासाठी नाही, तर प्रत्येक अत्याचारित महिलेसाठी आहे.

दि. पाचोरा पिपल्स को. ऑप. बँकच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर – निवडणुक बिनविरोध होण्याची दाट शक्यता?

Loading

पाचोरा – : दि. पाचोरा पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, पाचोरा या प्रगतिशील सहकारी बँकेच्या 2025 ते 2030 या पंचवार्षिक कार्यकालासाठीच्या संचालक मंडळ निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे. बँकेच्या

विकासात महत्त्वपूर्ण वाटा असलेल्या या निवडणुकीकडे सर्वसामान्य ग्राहक, सभासद आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक, सहकारी संस्था, पाचोरा आर. आर. पाटील यांनी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या मान्यतेनंतर संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. ही निवडणूक बँकेच्या आगामी पाच वर्षांच्या विकासाचा मार्ग निश्चित करणार असल्याने ही निवडणूक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या निवडणुकीत एकूण १५ जागांसाठी निवडणूक घेतली जाणार असून त्यामध्ये सर्वसाधारण, महिला राखीव, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास प्रवर्ग अशा विविध घटकांचे प्रतिनिधित्व आहे. शाखास्तरावरील एक जागाही यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. ही विभागणी सामाजिक समतोल आणि सर्वसमावेशक प्रतिनिधित्व सुनिश्चित करणारी आहे, असे सांगितले जाते.
या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र विक्री व स्वीकारण्याची प्रक्रिया 06 जून ते 12 जून 2025 या कालावधीत दररोज सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत पार पडणार आहे. इच्छुक उमेदवार निवडणूक कार्यालयात जाऊन आपले अर्ज सादर करू शकतात. 13 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता उमेदवारांनी सादर केलेल्या अर्जांची छाननी सुरू होणार असून, ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत चालू राहील. छाननीनंतर पात्र उमेदवारांची प्राथमिक यादी 16 जून 2025 रोजी सकाळी 11 वाजता कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
या यादीतील नावांनंतर इच्छुक उमेदवारांना 16 जून ते 30 जून 2025 या कालावधीत आपले अर्ज मागे घेण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी दररोज सकाळी 11.30 ते दुपारी 3 या वेळेत अर्ज मागे घेता येणार आहेत. या कालावधीत जे उमेदवार अर्ज मागे घेणार नाहीत, त्यांच्यात निवडणुकीची लढत होणार आहे.
मात्र विद्यमान संचालक मंडळाने अनपेक्षित केलेली जवळपास 3000 सभासद संख्येची वाढ सोबतच 2000 च्या जवळपास सभासदांची अर्थात मतदार यादीतील नावे कट झालेत त्यामुळे ही निवडणूक एकतर्फी किंवा बिनविरोध निवड होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
01 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता पात्र उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल. त्याच दिवशी अंतिम, विधीमान्य उमेदवारांची यादीही जाहीर केली जाणार आहे. यानंतर निवडणुकीचा अंतिम टप्पा म्हणजे मतदान आणि मतमोजणीचा कार्यक्रम पार पडणार आहे.
जर गरज भासली आणि एका जागेपेक्षा अधिक उमेदवार उभे राहिले, तर 13 जुलै 2025 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदानाची प्रक्रिया राबवली जाईल. मतदानाचे ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल. मतदानानंतर 14 जुलै 2025 रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीस सुरुवात होईल आणि ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सुरू राहील. तत्काळ निकालही जाहीर केला जाणार असल्याने उत्सुकता शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे.
या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत शासकीय किंवा सार्वजनिक सुट्ट्यांचा अडथळा येणार नाही. सर्व टप्पे सलग राबवले जाणार आहेत. निवडणूक चिन्हे ही फक्त अधिकृत यादीतीलच ग्राह्य धरली जाणार आहेत. मतदार यादी निवडणूक कार्यालयात विक्रीसाठी उपलब्ध आहे. तसेच यासंदर्भातील सर्व यादी, परिपत्रके व निर्णय कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध केले जाणार आहेत.
पाचोरा पिपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेच्या या निवडणुकीकडे परिसरातील सर्वसामान्य नागरिक, सभासद, अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. ही बँक गेल्या काही वर्षांमध्ये आर्थिक प्रगतीच्या दृष्टीने भक्कम उभी राहिलेली असून, सभासदसंख्याही लक्षणीय वाढलेली आहे. त्यामुळे संचालक मंडळाच्या निवडीला अधिकाधिक पारदर्शक आणि समावेशक ठेवण्याचा जनतेचा आग्रह आहे.
विशेष म्हणजे या निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप नको, अशी भावना सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे. भाजपचे वरिष्ठ नेते व भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले मंत्री गिरीशभाऊ महाजन, पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील, माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, तसेच उद्योजिका सौ. वैशालीताई सूर्यवंशी यांची एकत्रितपणे बँकेच्या हितासाठी निवडणुकी संबंधीची भूमिका बिनविरोध व्हावी अशी स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे त्यांनी बँकेच्या सर्वांगीण हिताचा विचार करून ही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा ठाम निर्धार केला तर गेल्या पंचवार्षिक कार्यकाळात बँकेच्या आर्थिक स्थितीत झालेली घसघशीत प्रगती, शाखा विस्तार, नव्या तंत्रज्ञानाचा वापर आणि सभासदांशी संवाद अशा विविध पैलूंमुळे बँकेची प्रतिमा अधिकच बळकट झाली आहे. अशा वेळी बिनविरोध निवड होणे म्हणजे स्थैर्य आणि सहकार मूल्यांची जपणूक होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
बँकेच्या गेल्या पाच वर्षपर्यंतच्या कारभाराकडे पाहता, कोणत्याही गट-तटाचे राजकारण न करता, एकात्मिक विचारातून सर्वांसाठी एकच नियम व निर्णय असा कारभार पार पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळातही हे सहकार्य टिकवण्यासाठी सुसंवाद आणि सामंजस्याची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. यासाठी गेल्या काही दिवसांपासून विविध बैठका, चर्चा आणि वाटाघाटी सुरू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
निवडणूक बिनविरोध व्हावी ही मागणी बँकेच्या हितासाठी आणि सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी योग्य वाटत असली, तरी काही नवे इच्छुक उमेदवार किंवा गट आपली संधी पाहत आहेत. त्यामुळे अंतिम टप्प्यात ही निवडणूक चुरशीची होणार की एकतर्फी बिनविरोध यावर अद्याप अनिश्चितता आहे. मात्र, सर्व बाजूंनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निर्णय झाला, तर पाचोरा पिपल्स बँकेची ही निवडणूक राज्यातील सहकार क्षेत्रात एक आदर्श निर्माण करू शकेल, यात शंका नाही.
या निवडणुकीच्या निमित्ताने पाचोरा शहर आणि तालुक्याचा सहकार चळवळीवरील विश्वास, नागरिकांचे सहकार क्षेत्रावरील प्रेम, आणि सामाजिक नेतृत्वाची एकजूट पुन्हा एकदा अधोरेखित होईल, अशीच अपेक्षा सर्वत्र व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!