Home Dhyeya News Special अजितदादा सर्वार्थाने लोकनेते – महाराष्ट्राने हरपला एक नेतृत्वाचा आधारस्तंभ

अजितदादा सर्वार्थाने लोकनेते – महाराष्ट्राने हरपला एक नेतृत्वाचा आधारस्तंभ

0
213

Loading

पाचोरा — स्वर्गीय अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वार्थाने लोकनेते होते. त्यांच्या आकस्मिक निधनाने राज्याने एक कर्तृत्ववान, दूरदृष्टी असलेला आणि सामान्य माणसाशी नाळ जुळवून ठेवणारा नेता गमावला आहे. ही उणीव महाराष्ट्रासाठी कधीही न भरून निघणारी आहे, असे भावनिक उद्गार माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी काढले. दिनांक 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी बारामती येथे विमान अपघातात स्वर्गीय अजितदादा पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. या पार्श्वभूमीवर पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेतर्फे श्री. गो. से. हायस्कूल येथील कलादालनात श्रद्धांजली व शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या शोकसभेत बोलताना माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी अजितदादांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा दिला. वाघ परिवार व संस्थेशी असलेले अजितदादांचे स्नेहपूर्ण आणि आपुलकीचे संबंध त्यांनी उपस्थितांसमोर मांडले. अजितदादांची कार्यशैली नेहमीच परिणामकारक, निर्णयक्षम आणि लोकहिताला केंद्रस्थानी ठेवणारी होती. पद, पक्ष किंवा राजकीय समीकरणांपेक्षा सामान्य माणसाचे प्रश्न सोडविणे हेच त्यांच्या राजकारणाचे मुख्य सूत्र होते, असे त्यांनी सांगितले. संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनी आपल्या मनोगतात अजितदादांच्या नेतृत्वगुणांचे विशेष कौतुक केले. पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांना अजितदादांनी वेळोवेळी उपस्थित राहून दिलेले मार्गदर्शन हे संस्थेसाठी दीपस्तंभ ठरल्याचे त्यांनी नमूद केले. पक्षीय आणि जातीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन अजितदादांनी सामान्य माणसाला आपल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी ठेवले. त्यामुळेच त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी संस्थेचे शालेय समिती चेअरमन दादासो खलील देशमुख, संचालक प्रा. भागवत महालपुरे, माजी प्राचार्य बी. एन. पाटील, भडगाव विद्यालयाचे प्राचार्य एन. एन. गायकवाड यांनी आपली मनोगते व्यक्त करत अजितदादांच्या सामाजिक व राजकीय योगदानाचा गौरव केला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे व्हाईस चेअरमन नानासो व्ही. टी. जोशी, श्री. गो. से. हायस्कूलच्या तांत्रिक विभागाचे चेअरमन अण्णासो वासुदेव महाजन उपस्थित होते. तसेच संस्थेचे संचालक सतीश आप्पा चौधरी, योगेश पाटील, डॉ. पितांबर पाटील, जगदीश सोनार, सौ. मनीषा पाटील, शाळेचे मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे, श्री. एम. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, माजी मुख्याध्यापक एस. एच. पवार, एस. एस. चौधरी, विश्वासराव साळुंखे, सुधीर पाटील, उपप्राचार्य वासुदेव वले, संस्थेतील माजी मुख्याध्यापक, विविध शाखांचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कौंडिण्य यांनी केले. एकूणच ही शोकसभा केवळ श्रद्धांजलीपुरती मर्यादित न राहता, स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या लोकाभिमुख नेतृत्वाचा, कर्तृत्वाचा आणि त्यांच्या प्रेरणादायी वारशाचा गौरव करणारी ठरली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!