Home Dhyeya News Special विकास संतोष पाटील : शिक्षक, समाजसेवक, रणनीतीकार आणि सर्वसामान्यांचा आधारवड

विकास संतोष पाटील : शिक्षक, समाजसेवक, रणनीतीकार आणि सर्वसामान्यांचा आधारवड

0
100

Loading

पाचोरा : समाजकारण, शिक्षण, राजकारण आणि आता अर्थकारण या सर्वच क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे विकास संतोष पाटील हे नाव आज पाचोरा तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात आदराने घेतले जाते. प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत उभे राहिलेले हे व्यक्तिमत्त्व आज सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान बनले आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेताना संघर्ष, जिद्द, प्रामाणिकपणा आणि लोकसेवा यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळतो. मूळ गाव वेरुळी असलेल्या विकास संतोष पाटील यांचा जन्म पाचोरा येथे झाला. सामान्य कुटुंबात वाढताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र परिस्थितीला दोष न देता त्यांनी शिक्षणाच्या बळावर स्वतःचे भविष्य घडविण्याचा निर्धार केला. प्राथमिक शिक्षण वाडी-शेवाळे आणि पाचोरा येथे पूर्ण झाले, तर महाविद्यालयीन शिक्षणही पाचोरामध्येच झाले. विद्यार्थी जीवनापासूनच त्यांच्यामध्ये नेतृत्वगुण, सामाजिक जाण आणि लोकांप्रती असलेली संवेदनशीलता दिसून येत होती. सध्या ते पाचोरा येथील नवजीवन हायस्कूलमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकातील ज्ञान न देता सामाजिक मूल्ये, जबाबदारीची जाणीव आणि सकारात्मक जीवनदृष्टी देण्याचे कार्य ते करत आहेत. शिक्षण क्षेत्रातील ही जबाबदारी सांभाळताना त्यांनी समाजकारण आणि राजकारणातील आपली सक्रियता कधीही कमी होऊ दिली नाही. महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी सामाजिक कार्याची वाट धरली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवा संघ यांसारख्या विविध संघटनांमधून त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. युवकांचे प्रश्न, सामाजिक न्याय, शैक्षणिक अडचणी आणि विविध जनहिताच्या विषयांवर त्यांनी सातत्याने काम केले. याच काळात त्यांनी मोठा जनसंपर्क निर्माण केला आणि समाजातील विविध घटकांशी दृढ नाते जोडले. “प्रथम नोकरी आणि त्यानंतर राजकारण” या विचाराला अनुसरून त्यांनी आयुष्याची दिशा निश्चित केली. समाजातील विविध प्रश्नांवर काम करताना मिळालेला जनविश्वास त्यांना राजकीय क्षेत्रात घेऊन आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर सलग तीन वेळा तालुकाध्यक्ष म्हणून काम करत संघटन उभारणी, कार्यकर्त्यांना संधी आणि पक्षविस्तारासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही त्यांनी प्रभावी कामगिरी केली. तब्बल नऊ वर्षे नगरसेवक म्हणून कार्यरत राहून नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा केला. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वीज, शिक्षण आणि नागरी सुविधांसारख्या विषयांवर त्यांनी अनेक कामे मार्गी लावली. त्यामुळे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यावर नागरिकांचा दृढ विश्वास निर्माण झाला. घरामध्ये कोणताही राजकीय वारसा नसताना स्वतःच्या कर्तृत्वावर त्यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली. मध्यम परिस्थितीतून पुढे आलेल्या विकास पाटील यांनी मेहनत, प्रामाणिकपणा आणि लोकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यांच्या बळावर यशाचे शिखर गाठले. त्यामुळे ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. जिल्ह्यात पुरोगामी विचारसरणीचे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. सामाजिक सलोखा, संविधानिक मूल्ये, सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक न्याय यांसाठी त्यांनी सातत्याने भूमिका घेतली आहे. विविध समाजघटकांना एकत्र घेऊन विकासाचा मार्ग स्वीकारण्याची त्यांची भूमिका नेहमीच ठळक राहिली आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे प्रामाणिकपणा. राजकारणात दीर्घकाळ सक्रिय राहूनही भ्रष्टाचारापासून दूर राहणारे नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतःची स्वतंत्र प्रतिमा निर्माण केली आहे. पदापेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा समाजसेवा अधिक महत्त्वाची मानणारी त्यांची कार्यपद्धती लोकांना भावते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख रणनीतीकार म्हणूनही त्यांची ओळख आहे. संघटन कौशल्य, राजकीय घडामोडींचे अचूक विश्लेषण, निवडणूक नियोजन आणि कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याची क्षमता यामुळे पक्षात त्यांचे स्थान महत्त्वाचे मानले जाते. अनेक महत्त्वाच्या राजकीय घडामोडींमध्ये त्यांच्या अनुभवाचा लाभ पक्षाला झाला आहे. महिला, दलित, मुस्लिम तसेच समाजातील वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी ते सातत्याने संघर्ष करत आले आहेत. कुठेही अन्याय अथवा अत्याचार झाला तर पीडितांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आणि रस्त्यावर उतरून लढा देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. सामान्य नागरिकांची कामे प्रशासनामार्फत मार्गी लावण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले आहेत. गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी आधारवड ठरणारे विकास पाटील हे काम पूर्ण करून देणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. लोकांच्या अडचणी स्वतःच्या समजून त्यावर उपाय शोधण्याची त्यांची वृत्तीच त्यांना जनमानसात वेगळे स्थान मिळवून देते. समाजकारण आणि राजकारणातील कार्यानंतर त्यांनी अर्थकारणाच्या क्षेत्रातही उल्लेखनीय पाऊल टाकले आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांनी “जीवनशक्ती मायक्रो फायनान्स” या संस्थेची स्थापना केली. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आणि कुटुंबांच्या आर्थिक उन्नतीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे. आज विकास संतोष पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, निरोगी आणि दीर्घायुष्य लाभो, समाजसेवा, शिक्षण, राजकारण आणि अर्थकारणाच्या क्षेत्रात त्यांनी केलेल्या कार्याला अधिक व्यापक यश मिळो, तसेच सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांची अविरत धडपड अशीच कायम राहो, हीच संदीप दा. महाजन, संपादक – Dhyeya News & सा. झुंज, पाचोरा तर्फे ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!