![]()
एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस हा केवळ जन्मदिनाचा उत्सव नसतो; तो त्या व्यक्तीच्या जीवनमूल्यांचा, संघर्षाचा, कर्तृत्वाचा आणि माणुसकीचा गौरव करण्याचा दिवस असतो. आज माझ्या परिवारातील अत्यंत जिव्हाळ्याचा सदस्य, कष्ट, प्रामाणिकपणा, निष्ठा आणि कृतज्ञतेचा जिवंत आदर्श असलेले मिली उर्फ मिलिंद भास्कर सोनवणे (Mo. 9403018877) यांच्या वाढदिवसानिमित्त दोन शब्द लिहिताना माझे मन अक्षरशः भावनांनी भरून आले आहे. जीवनात अनेक माणसे भेटतात, अनेक नाती जुळतात, अनेकांना आपण मदतीचा हात देतो. काही जण आपल्या यशात आनंद मानतात, तर काही जण आपल्या सावलीत उभे राहूनही संधी मिळताच पाठीत खंजीर खुपसतात. आज माझ्या आयुष्याचा प्रवास मागे वळून पाहताना एक गोष्ट मनाला सतत बोचते. मिलिंदच्या आधीही आणि त्याच्यानंतरही असंख्य लोक माझ्या जीवनात आले. अनेकांना मी माझ्या परीने मार्गदर्शन केले, आधार दिला, संकटात साथ दिली, नवीन संधी उपलब्ध करून दिल्या, हात धरून उभे केले. पण त्यापैकी दोन टक्के अपवाद वगळता बहुसंख्य लोक बेईमान, कृतघ्न आणि विश्वासघात करणारेच निघाले. या अनुभवांनी मनाला असंख्य जखमा दिल्या, माणसांवरचा विश्वास डळमळीत केला आणि अनेकदा वाटले की आता कोणासाठी काहीच करू नये. मात्र अशा काळोखातही काही व्यक्ती दीपस्तंभासारख्या उभ्या राहतात. मिलिंद भास्कर सोनवणे हे त्यापैकीच एक नाव आहे.मिलिंदसोबतचा माझा परिचय हा आजचा नाही. तो उच्च माध्यमिक शिक्षण घेत असताना एका प्रकरणाच्या निमित्ताने तो आणि त्याचे काही मित्र प्रथम माझ्या संपर्कात आले. त्या एका भेटीत सुरू झालेला परिचय पुढे विश्वास, आत्मीयता आणि जिव्हाळ्याच्या नात्यात रूपांतरित झाला. काळ पुढे सरकत गेला, परिस्थिती बदलत गेली; पण आमच्यातील विश्वास, परस्पर आदर आणि कौटुंबिक जिव्हाळा मात्र दिवसेंदिवस अधिक दृढ होत गेला. आज तो केवळ परिचित किंवा सहकारी नसून माझ्या परिवाराचा अविभाज्य सदस्य आहे, याचा मला मनापासून अभिमान वाटतो. त्याच्यासारख्या ऋण मानणाऱ्या, नात्यांचा सन्मान करणाऱ्या, उपकारांची जाणीव ठेवणाऱ्या आणि आयुष्यभर माणुसकी जपणाऱ्या व्यक्तींमुळेच आजही कोणाला मदत करावी, कोणाचा हात धरावा, एखाद्याला योग्य मार्ग दाखवावा, अशी आशा माझ्या मनात जिवंत आहे. म्हणूनच, मिलिंदबद्दल लिहिताना हा लेख केवळ शुभेच्छांचा राहत नाही, तर माझ्या आयुष्याने दिलेल्या अनुभवांचा आणि माणुसकीवर अजूनही असलेल्या विश्वासाचा दस्तऐवज बनतो. आज जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांच्या भविष्याला दिशा देणारे मिलिंद यांचा जीवनप्रवास हा संघर्ष, परिश्रम आणि मूल्यांचा प्रेरणादायी इतिहास आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असतानाही त्यांनी परिस्थितीला कधीही दोष दिला नाही. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना लोडगाडीवर हमाली करून कुटुंबाला हातभार लावणारा हा युवक, पुढे पेपर विक्रेता, पत्रकार, पाचोरा पीपल्स बँकेचा पिग्मी एजंट अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडत आज शिक्षक या सन्माननीय पदापर्यंत पोहोचला आहे. या प्रत्येक टप्प्यावर त्याने श्रमाची पूजा केली. कोणतेही काम लहान नसते, प्रत्येक कष्टाला सन्मान असतो आणि प्रामाणिक परिश्रम कधीही वाया जात नाहीत, हे त्याने स्वतःच्या आयुष्यातून सिद्ध करून दाखवले. पत्रकारितेच्या क्षेत्रात त्याने केलेली वाटचालही तितकीच उल्लेखनीय आहे. वृत्तपत्र वितरणाच्या कामातून माध्यमविश्वाशी निर्माण झालेली नाळ पुढे निर्भीड पत्रकारितेपर्यंत पोहोचली. समाजातील अन्याय, विसंगती आणि जनतेच्या प्रश्नांना आवाज देताना त्याने कधीही वैयक्तिक प्रसिद्धीचा मोह ठेवला नाही. सत्य मांडताना संयम राखला, पण तत्त्वांशी तडजोड केली नाही. पत्रकार हा समाजाचा आरसा आहे, या विचारावर त्याची नितांत श्रद्धा आहे. मिलिंद यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांची कृतज्ञता. आजच्या काळात अनेकजण यश मिळाल्यानंतर ज्यांनी हात दिला त्यांनाच विसरतात; परंतु मिलिंद प्रत्येक ठिकाणी आपल्या आई-वडिलांचे, बहिणीचे, नातेवाईकांचे, शिक्षक काकांचे, तलाठी पदावर कार्यरत असलेल्या काकांचे, मित्रांचे आणि प्रत्येक सहकार्य करणाऱ्या व्यक्तीचे ऋण कृतज्ञतेने स्वीकारतात. विशेष म्हणजे ते नेहमी स्पष्टपणे म्हणतात, “मी आज पत्रकारितेत आणि माझ्या आयुष्यात जो काही यशस्वी आहे, त्यामागे जर कोणाचा खरा हात असेल, तर ते आहेत फक्त आणि फक्त संदीपभाऊ महाजन. त्यांनी माझ्या आयुष्यात क्षणाक्षणाला पाठबळ दिले आहे.” या एका वाक्यामध्ये त्यांच्या मनातील संस्कार, नम्रता आणि ऋण मानण्याची वृत्ती दिसून येते. आजच्या स्वार्थी काळात अशी भावना दुर्मिळ होत चालली आहे. वंदनीय भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या जीवनात स्पष्ट जाणवतो. समता, स्वाभिमान, विवेक, माणुसकी आणि समाजसेवा या मूल्यांवर त्यांनी आपले जीवन उभे केले आहे. साधेपणा, निर्व्यसनी जीवन, शिस्तबद्ध दिनचर्या आणि निष्कलंक चारित्र्य ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे. त्यांच्या आयुष्यात त्यांच्या सहचारिणी कविता यांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे. संघर्षाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी दिलेला विश्वास, धीर आणि साथ याबद्दल मिलिंद नेहमीच कृतज्ञतेने बोलतात. यशामागे केवळ एका व्यक्तीचा नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचा त्याग असतो, याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. आज ते शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाबरोबरच संस्कारांचीही पेरणी करत आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या अनेक तरुणांना त्यांनी व्यसनमुक्त, शिस्तप्रिय आणि समाजाभिमुख जीवनाची प्रेरणा दिली आहे. प्रसिद्धीच्या झगमगाटापेक्षा माणुसकीचा प्रकाश अधिक मोठा असतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनापासून एवढेच सांगावेसे वाटते की, मिलिंद भास्कर सोनवणे हे केवळ माझ्या परिवारातील सदस्य नाहीत; ते माझ्या आयुष्यातील माणुसकीवरचा विश्वास पुन्हा जिवंत करणारे व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी जपलेली निष्ठा, त्यांनी ठेवलेली कृतज्ञता आणि त्यांनी निभावलेली माणुसकी हीच त्यांची खरी ओळख आहे. ईश्वराने त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, अखंड आनंद, यश, कीर्ती आणि समाजसेवेची अधिक मोठी संधी द्यावी. त्यांच्या जीवनप्रवासातून अनेक तरुणांनी प्रेरणा घ्यावी आणि माणुसकी, कृतज्ञता व प्रामाणिकपणा हीच खरी संपत्ती आहे, हे समजावे, हीच वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक सदिच्छा.
शुभेच्छुक
Dhyeya News & झुंज वृत्तपत्र
संपादक 👉🏻 संदीप दा. महाजन व परिवार, पाचोरा, जि. जळगाव
Mo. 7385108510*





























