पाचोरा: दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी श्री. शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या इतिहास विभागात “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आणि इतिहास विषयातील विद्यार्थ्यांसमोरील संधी आणि आव्हाने” या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. प्रमुख वक्ते म्हणून बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील इतिहास अभ्यास मंडळाचे चेअरमन प्रा. डॉ. प्रशांत सुधाकरराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. देशमुख यांनी इतिहासाची महत्त्वपूर्ण ओळख पटवून देताना सांगितले की, “इतिहास म्हणजे आपल्या अस्तित्वाची ओळख आहे, जो राष्ट्रीय अस्मिता जपतो. इतिहासाचा अभ्यास केल्याने विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रांत करिअरच्या संधी उपलब्ध होतात, जसे की पुरातत्त्व, संशोधनशास्त्र, मानववंशशास्त्र, अर्कायव्हिस्ट, न्यूमिस्मॅटिक्स, म्युझिओलॉजी, आणि पर्यटन क्षेत्रातील रोजगाराच्या संधी.” त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबरोबरच संशोधनाकडे वळण्याचा सल्ला दिला आणि ICHR, ICSSR, UGC या संस्थांकडून संशोधनासाठी आर्थिक अनुदान मिळू शकते, असे स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. बी. एन. पाटील यांनी इतिहास विषयातील संशोधनाच्या संधींवर भर दिला. ते म्हणाले, “शैक्षणिक धोरण 2020 मुळे नवसंशोधक विद्यार्थी उदयास येतील आणि देशाच्या विकासात महत्त्वाचा वाटा उचलतील. इतिहास विषयातील विद्यार्थी सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमठवत आहेत.”
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले, IQAC समन्वयक डॉ. शरद पाटील, प्रा. डॉ. के. एस. इंगळे, प्रा. अतुल पाटील, प्रा. स्वप्निल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन इतिहास विभाग प्रमुख डॉ. जे.डी. गोपाळ यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. डॉ. माणिक पाटील यांनी केले तर प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन डॉ. जे.डी. गोपाळ यांनी केले.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.