खंडणीसाठी अपहरण – पोलिसांच्या शर्थीच्या तपासामुळे १२ तासांत पिडीताची सुटका, चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Loading

चाळीसगाव – दिनांक ३० मे २०२५ या दिवशी संपूर्ण जिल्ह्याला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली. वाघले (ता. चाळीसगाव) येथील रहिवासी अनिल गणेश राठोड यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की, त्याचे वडील गणेश ताराचंद राठोड (वय ४२) यांचे काही अनोळखी व्यक्तींनी अपहरण केले असून त्यांची सुटका करण्यासाठी ४५ लाख रुपयांची खंडणी मागण्यात येत आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांसमोर एका गुंतागुंतीच्या अपहरणाच्या प्रकरणाचा वेध लागला.
फिर्यादीनंतर तत्काळ चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गु.र.नं. १३७/२०२५ भादंवि कलम ३६३ (२) प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. विशेष म्हणजे, अपहरणकर्त्यांनी फिर्यादी अनिल यांना त्यांच्या वडिलांना मारहाण करतानाचे व्हिडीओ आणि ऑडिओ कॉल्सद्वारे धमकी देत खंडणीची रक्कम मागितली होती. मात्र, गणेश राठोड यांचे नेमके कोठून अपहरण झाले, हे प्रथमदर्शनी स्पष्ट नव्हते. यामुळे पोलीस तपास अधिक गुंतागुंतीचा आणि संवेदनशील बनला होता.
या गुन्ह्याच्या गांभीर्याची दखल घेत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मा. डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तत्काळ तपासासाठी पथक तयार करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशा जळगावचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पोउपनि शेखर डोमोळे, पोह संदीप पाटील, पोह मुरलीधर धनगर, पोकों महेश पाटील, पोकों सागर पाटील, पोकों भुषण शेलार, पोकों ईश्वर पाटील, पोकों भुषण पाटील, पोकों जितेंद्र पाटील आणि चापोह दीपक चौधरी यांचा समावेश होता.
तांत्रिक विश्लेषण, मोबाइल लोकेशन ट्रॅकिंग आणि गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून या गुन्ह्याच्या तपासाला वेग मिळाला. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर पोलिसांना या अपहरणामागे जयेश दत्तात्रय शिंदे (वय २८, रा. सैनिक कॉलनी, चाळीसगाव) आणि श्रावण पुंडलिक भागोरे (रा. स्वामी विवेकानंद कॉलनी, नांदगाव, जि. नाशिक) यांचा हात असल्याचे स्पष्ट झाले. या दोघांचे लोकेशन तपासले असता ते नांदगाव तालुक्यातील मौजे मोझर्ण परिसरात असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.
पथकाने लगेच त्या दिशेने मोर्चा वळवला आणि पुढील तपासात कळले की आरोपी हे मनमाड रेल्वेस्टेशनच्या दिशेने मोटारसायकलवरून निघाले आहेत. पोलिसांनी त्यांच्या पाठलागाला सुरुवात केली. पोलिसांची गाडी पाहून आरोपींनी मोटारसायकल सोडून शेतामार्गे पळ काढला. मात्र, पोलिसांनी सुमारे पाच किलोमीटरपर्यंत त्यांचा पाठलाग केला आणि शेवटी त्यांना शेतात पकडण्यात यश आले. ही कारवाई खऱ्या अर्थाने थरारक आणि धाडसी होती.
ताब्यात घेतल्यानंतर दोघा आरोपींनी चौकशीत धक्कादायक खुलासे केले. त्यांनी कबूल केले की, गणेश राठोड यांचे अपहरण त्यांनी जनार्दन बाळु आवारे उर्फ राजु पाटील (रा. शिंदी, ता. चाळीसगाव, ह.मु. डोंबिवली, ठाणे) आणि त्याचा मित्र सोनू भाऊ (पूर्ण नाव अज्ञात, रा. मुंबई) यांच्या सांगण्यावरून केले. त्यांनी गणेश राठोड यांना जबरदस्तीने चाळीसगाव तालुक्यातील पाटणा गावाच्या शिवारातील एका शेताच्या शेडमध्ये नेले आणि तेथे त्यांना बेदम मारहाण केली. मारहाणीचे व्हिडीओ बनवून त्यांच्या मोबाईलवरूनच त्यांच्या मुलाला म्हणजे फिर्यादी अनिल राठोड याला पाठवले आणि त्यांच्याच नंबरवरून कॉल करून खंडणीची मागणी केली. तपासादरम्यान दोघा आरोपींनी सांगितले की, गणेश राठोड यांना काही वेळासाठी लासलगाव परिसरातील घनदाट जंगलात नेले आणि तिथे त्यांना सोडून दिले. उर्वरित दोन आरोपी त्याच ठिकाणाहून फरार झाले. पोलिसांनी या माहितीच्या आधारे तातडीने लासलगावच्या जंगलात शोधमोहीम सुरू केली आणि काही वेळातच एक झुडपी भागात गंभीर जखमी अवस्थेत गणेश राठोड हे सापडले. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आले.
त्यानंतर आरोपी जयेश शिंदे आणि श्रावण भागोरे यांना ताब्यात घेऊन, त्यांच्यासह अपहरणातून सुटलेले गणेश राठोड यांना चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. आरोपींविरुद्ध पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून उर्वरित दोन फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.
या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, त्यांच्या सतर्कतेने आणि धाडसाने अवघ्या १२ तासांत अपहरणग्रस्ताला सुखरूप बाहेर काढण्यात यशस्वी झाले. ही कामगिरी पोलिसांच्या वेगवान आणि प्रभावी तपास कौशल्याचे उदाहरण ठरली आहे.
सदर संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मा. डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक मा. श्रीमती कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजेंद्रसिंह चंदेल आणि स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री बबन आव्हाड यांच्या सूचक मार्गदर्शनाखाली पार पडली. या यशस्वी तपासाचे व सर्व पथकाचे परिसरातून कौतुक होत असून, पोलिसांनी केवळ एका दिवसात ही धाडसी आणि प्रभावी कारवाई करून पुन्हा एकदा जनतेच्या मनात सुरक्षा आणि विश्वासाचे प्रतिक निर्माण केले आहे.
या प्रकरणात अजून दोन आरोपी फरार असून त्यांचा तपास वेगाने सुरू आहे. पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणीही सदर आरोपींविषयी माहिती असेल तर ती तातडीने स्थानिक पोलीस ठाण्याशी शेअर करावी, जेणेकरून गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करता येईल. यापुढेही पोलिसांकडून अशा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांवर तत्काळ आणि कठोर कारवाई केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here