आपत्ती ही कोणालाही पूर्वसूचना न देता येते आणि त्यावेळी सामान्य माणसाचा पहिला आणि शेवटचा आधार म्हणजे प्रशासन. जळगाव जिल्ह्यात सह पाचोरा तालुक्याला नुकत्याच आलेल्या वादळी पावसाच्या तडाख्याने संपूर्ण जनजीवन कोलमडून गेले असताना महसूल विभाग, वीज वितरण कंपनी आणि नगरपालिका प्रशासन यांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि परिश्रम हा खरोखरच अभिमानास्पद अध्याय आहे. वादळ, विजांचा कडकडाट, झाडांची व खांबांची पडझड, पाण्याने भरलेले रस्ते, शेतात उभ्या पिकांचे नुकसान, विजेचा खंडित झालेला पुरवठा आणि जनतेमध्ये असलेली अस्वस्थता अशा स्थितीत प्रशासनाने केवळ आदेशाच्या प्रतीक्षेत न राहता, स्वतः पुढे होऊन कामाचा झपाटा घेतला. ही बाब विशेषत्वाने उल्लेखनीय ठरते
संकटाची तीव्रता जाणवताच महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून तलाठी, मंडल अधिकारी, कोतवाल, पटवारी या सर्वांनी गावागावात जाऊन पाहणी सुरू केली. शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान, घरांची पडझड, जनावरांचे बळी, जमिनीवरील मातीचे नुकसान, याचा तात्काळ पंचनामा करून राज्य शासनाला अहवाल सादर करण्याचे महत्त्वाचे काम युद्धपातळीवर सुरू झाले.
विशेष म्हणजे हे काम नुसत्या आकड्यांवर आधारित न राहता, प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून सुरू आहे कुठे एखादा म्हातारा शेतकरी ओल्या धान्याच्या पोत्यांवर बसलेला होता, तर कुठे शेतात साचलेल्या पाण्यामुळे फळबागांची नासाडी झाली होती — अशा प्रत्येक ठिकाणी महसूल विभागाचे कर्मचारी हजर होत आहेत त्यांची उपस्थिती ही केवळ शासकीय कामगिरी नव्हती, ती माणुसकीची जाण होती. वादळी पावसामुळे सर्वात जास्त संकटात सापडले ते म्हणजे वीज वितरणाचे काम. विजेचे खांब कोसळणे, तारा तुटणे, ट्रान्सफॉर्मर बंद पडणे, यामुळे संपूर्ण परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. अशा परिस्थितीत जिथे सामान्य माणूस उंबरठ्याबाहेरही जाण्याचे धाडस करत नाही, तिथे वीज वितरण कंपनीचे लाइनमन, अभियंते आणि तंत्रज्ञांनी प्राणाची पर्वा न करता कामाला सुरुवात केली. रात्रीचा अंधार, वरून कोसळणारा पाऊस, गारठवणारा वारा आणि शेवटपर्यंत वीजप्रवाह सुरू होईपर्यंतचे तणावपूर्ण वातावरण — अशा प्रतिकूल परिस्थितीतही आहे त्या साधनांचा उपयोग करत या यंत्रणेतील लोकांनी कधी एक चहा घेऊन, कधी भिजत, कधी रबरी चप्पलच्या ग्रीपवर विसंबून विजेच्या तारा जोडल्या.
प्रत्येक गावात वीजपुरवठा सुरू होतोय की नाही, हे स्वतः पाहणाऱ्या अभियंत्यांनी दिलेला विश्वास — “आम्ही आहोत ना, चिंता करू नका!” — हीच खरी शासकीय सेवा.
शहर आणि कॉलनी भागात पावसामुळे गटारे तुंबणे, पाणी रस्त्यांवरून घरात शिरणे, झाडे कोसळून वाहतूक ठप्प होणे अशी अनेक संकटे उभी राहिली होती. अशा स्थितीत नगरपालिका प्रशासनानेही तत्काळ परिस्थितीचा आढावा घेत कामगार पथक रस्त्यावर उतरवले. सफाई विभागाने तातडीने साचलेले पाणी बाजूला करण्यासाठी चेंबर उघडले, गटारे साफ केली, जेसीबीच्या साहाय्याने अडथळे दूर केले.काही भागात जलपुरवठा विस्कळीत झाला होता, तिथे तात्पुरते टँकर पाठवून नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवले गेले. अशा कामगिरीतून नगरपालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘आपत्ती व्यवस्थापन’ ही केवळ कागदावरील संकल्पना नसून, ती कृतीत उतरवता येते, हे दाखवून दिले.
कोणत्याही विभागाने “हे आमचे काम नाही” असे न म्हणता “कसाही होवो, नागरिकांचे हाल थांबवायचेच” असा निर्धार करून केलेले काम यामुळेच कौतुकास पात्र ठरते. सेवाभाव म्हणजे काय, हे या तीन यंत्रणांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवले.
अनेक वेळा आपल्याला प्रशासन म्हणजे तक्रारींचे लक्ष्य, निव्वळ आदेश देणारे मंडळ, कधी थेट फोन लागत नाही अशी प्रतिमा दिसते. मात्र, अशा संकटसमयी त्याच कार्यालयांचे दरवाजे नागरिकांसाठी उघडे असतात, यंत्रणेतील प्रत्येक हात कामात गुंतलेला असतो, आणि प्रत्येक डोळा नागरिकांची चिंता समजून घेण्यास तत्पर असतो.अनेक वेळा जो आवाज करतो त्याचे कौतुक होते. पण या संकटात जे गप्प राहून झाडाखाली वायर जोडत होते, पंचनाम्याचे फॉर्म भरत होते, जेसीबीवर झोप न घेता रस्ते मोकळे करत होते, अशा लोकांचाही एक स्वतंत्र सन्मान असायलाच हवा. ही मंडळी प्रसिद्धीपासून दूर राहून आपले कर्तव्य निभावत असतात.
पाचोऱ्यात अशा असंख्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपले घर, कुटुंब, जेवण, विश्रांती, आजारपण बाजूला ठेवून नागरिकांची सेवा केली. ही गोष्ट लोकांच्या मनात राहिली पाहिजे. प्रशासन ही एक अमूर्त संकल्पना नसून ती माणसांनी बनलेली असते आणि ती माणसे देखील आपल्या समाजाचाच भाग असतात.अशा प्रकारच्या आपत्तीमधून केवळ सेवा नव्हे, तर अनुभवही मिळतो. या प्रशासनाच्या कृतीमधून पुढे काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णयही घ्यायला हवेत. आपत्तीची पूर्वतयारी, आवश्यक साहित्याची साठवणूक, तातडीचे मदतपथक, नागरिकांच्या सूचना घेण्यासाठी हॉटलाईन सुविधा, अशा अनेक उपायांची अंमलबजावणी केली जाऊ शकते.शेवटी एवढंच…वादळ, पाऊस, अंधार, भीती, अनिश्चितता याच्या सगळ्या छायेतून प्रशासनाची ही कार्यतत्परता म्हणजे नागरिकांसाठी आश्वासक हातच आहे. ‘सरकार’ ही संकल्पना जेव्हा कामाच्या रूपात रस्त्यावर उतरते, तेव्हा ती लोकशाहीची खरी ताकद बनते.
पाचोऱ्यात महसूल, वीज वितरण आणि नगरपालिका प्रशासन यांनी आपत्तीच्या काळात केलेले कार्य हा एक आदर्श मानावा लागेल. शासन हे केवळ शासन नसून – योग्य वेळी, योग्य पद्धतीने सेवा देणारी शक्ती आहे, हे या तिन्ही यंत्रणांनी दाखवून दिले आहे.आपत्ती निघून जाईल, पाऊस थांबेल, झाडं पुन्हा उगम पावतील, रस्ते पुन्हा स्वच्छ होतील, पण या काळात प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी दिलेली माणुसकीची सेवा कायम आठवणीत राहील.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.