जळगाव जिल्हा परिषद–पंचायत समिती राजकारणात आमदार किशोर आप्पा पाटील यांची निर्णायक भूमिका केंद्रस्थानी

0

Loading

जळगाव – जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात युती होण्याची शक्यता दिवसेंदिवस अधिक बळावत चालली आहे. केंद्र आणि राज्य पातळीवर भाजप–शिवसेना शिंदे गटाचे युती सरकार असल्याने, त्याच राजकीय समन्वयाचे प्रतिबिंब जिल्हा व तालुका स्तरावरही उमटण्याची शक्यता आहे. विशेषतः जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या ग्रामीण भागातील सत्ताकेंद्रांच्या निवडणुकांमध्ये आपापसातील संघर्ष टाळून समन्वयाची भूमिका घेण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र आहे. या संपूर्ण राजकीय घडामोडींमध्ये पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत आहे. या मतदारसंघात आमदार किशोर आप्पा पाटील यांचे एकतर्फी वर्चस्व असून, जिल्ह्यातील ग्रामीण राजकारणाची दिशा ठरवण्यात त्यांचे नेतृत्व निर्णायक मानले जाते. त्यामुळे जळगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या संदर्भात होणारे महत्त्वाचे निर्णय त्यांच्या भूमिकेभोवती फिरताना दिसत आहेत. आजवरच्या जळगाव जिल्हा परिषद राजकारणाकडे पाहिले असता अध्यक्षपद भाजपाकडे तर उपाध्यक्षपद शिवसेना शिंदे गटाकडे राहिलेले आहे. हे राजकीय गणित अनेक वर्षे टिकून असून, आगामी निवडणुकांमध्येही त्यात फारसा बदल होईल असे संकेत सध्या तरी दिसत नाहीत. त्यामुळे जिल्हास्तरावर सत्तेची वाटणी ही युतीतूनच ठरेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागांबाबतचा निर्णय आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या भूमिकेनुसारच होईल, अशी राजकीय चर्चा आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांचे महत्त्व केवळ त्यांच्या मतदारसंघापुरते मर्यादित नाही. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी असलेला त्यांचा थेट संवाद, संघटनात्मक पकड आणि विकासकामांच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेली विश्वासार्हता यामुळे त्यांचे नेतृत्व अधिक मजबूत झाले आहे. त्यामुळेच भाजपकडूनही पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघात “एक घर ते पण सोडून द्यावे” अशी व्यवहार्य भूमिका घेतली जाऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. म्हणजेच, ज्या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाची ताकद आहे, तिथे भाजप अनावश्यक संघर्ष टाळेल आणि जिथे भाजप मजबूत आहे, तिथे शिवसेना शिंदे गट समन्वयाची भूमिका घेईल, असा परस्पर समजुतीचा फॉर्म्युला पुढे येऊ शकतो. निवडणूक खर्च हा या सगळ्या चर्चेतील कळीचा मुद्दा ठरत आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल झाल्याचा अनुभव सर्वांनी पाहिला आहे. मात्र आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये तशी परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी युतीचा मार्ग स्वीकारला जात असल्याचे बोलले जात आहे. आपसात लढून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यापेक्षा सोयीने युती करून निवडणूक लढवली तर जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय नेत्यांचे पैसे वाचतील, प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि पक्षालाही राज्यस्तरावर निधी व श्रम वाचवता येतील, असा व्यवहार्य विचार पुढे येत आहे. ग्रामीण भागातील भाजप कार्यकर्त्यांची पारंपरिक भूमिका या संदर्भात पुन्हा चर्चेत आहे. “आमच्याकडे मोठा पैसा नाही, जेवढे भेटतील तेवढे आमच्या हिश्याचे” अशी भूमिका अनेक ठिकाणी कार्यकर्ते घेत असल्याचे दिसते. युती झाल्यास या कार्यकर्त्यांवर आर्थिक ताण कमी होईल आणि निवडणूक ही पैशांच्या जोरावर नव्हे तर संघटनात्मक ताकदीवर आणि नेतृत्वावर आधारित राहील.विशेष म्हणजे उमेदवारी देताना आर्थिक निकष न लावता पक्षासाठी कोण निष्ठावंत व कोणी आतापर्यंत संघटनेसाठी परिश्रम घेतले यांना निश्चितच तिकिटाचा मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रक्रियेत आमदार किशोर आप्पा पाटील यांची संयमी आणि समन्वयक भूमिका महत्त्वाची ठरत आहे. जळगाव जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये नगरपालिका निवडणुकांप्रमाणे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होईल, असे सध्या तरी चित्र दिसत नाही. उलट काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका होतील, तर काही ठिकाणी पूर्वी तीन ते पाच हजार रुपयांपर्यंत गेलेली एका मताची किंमत आता थेट दोनशे ते तीनशे रुपयांच्या गणितावर येऊ शकते, असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. या बदलामागे युतीचे राजकारण आणि स्थानिक नेतृत्वाचा दबदबा कारणीभूत ठरणार आहे. एकूणच, जळगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या राजकारणात आमदार किशोर आप्पा पाटील हे केंद्रबिंदू ठरत आहेत. भाजप–शिवसेना शिंदे गट युतीची दिशा, जागावाटपाचे गणित, खर्चावर नियंत्रण आणि बिनविरोध निवडणुकांची शक्यता या सर्व बाबी त्यांच्या निर्णयांभोवती फिरताना दिसत आहेत. अंतिम निर्णय अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेला नसला, तरी जळगावच्या ग्रामीण राजकारणात आमदार किशोर आप्पा पाटील यांची वरचढ भूमिका आणि निर्णायक नेतृत्व आगामी काळात महत्त्वाची ठरणार, हे मात्र निश्चित मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here