![]()
सध्या विवाहसोहळ्यांमध्ये वाढत चाललेली दिखाऊपणा, खर्चिक विधी आणि अनाठायी परंपरा यामुळे सर्वसामान्य कुटुंबांवर आर्थिक ताण वाढताना दिसतो. विवाह हा आनंदाचा सोहळा असला तरी त्याचे रूपांतर स्पर्धा, प्रतिष्ठा आणि श्रीमंतीचे प्रदर्शन यामध्ये होत असल्याचे चित्र सर्वत्र पाहायलाही मिळते. मात्र अशा पार्श्वभूमीवर पाचोरा तालुक्यातील गाळण बुद्रुक येथील पाटील परिवाराने एक आदर्श घालून दिला असून, साधेपणा, संस्कार आणि विचारप्रधानतेचा उत्कृष्ट नमुना सादर केला आहे. गाळण बुद्रुक येथील शिवसेवक, शिवप्रचारक तसेच पाचोरा एसटी डेपोचे हेड मेकॅनिक राजेंद्र पाटील यांनी आपल्या एम फॉर्म शिक्षण पूर्ण केलेल्या कन्या पल्लवी हिचा विवाह अत्यंत साध्या आणि पारंपरिक शिवविवाह पद्धतीने पार पाडत समाजासमोर नवा मार्ग दाखवला आहे. पल्लवी हिचा विवाह माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथील उच्चशिक्षित युवक नवनाथ अनपट यांच्याशी पार पडला. या विवाह सोहळ्यात अनिष्ट रूढी, खर्चिक विधी आणि दिखाऊपणाला पूर्णपणे फाटा देण्यात आला. विवाहाची सुरुवात जिजाऊ वंदनेने करण्यात आली आणि संपूर्ण कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, छत्रपती राजे संभाजी, संत तुकोबा आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमा मंचावर स्थापित करून त्यांचे पूजन करण्यात आले. या माध्यमातून उपस्थितांना इतिहास, संस्कार आणि समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला. विवाह विधी दरम्यान पारंपरिक अक्षदांच्या ऐवजी तांदळाऐवजी फुलांच्या पाकळ्यांचा वापर करण्यात आला, ज्यामुळे पर्यावरणपूरकतेचा संदेशही देण्यात आला. या विवाह सोहळ्याचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आणि कौतुकास्पद बाब म्हणजे, कन्येचा विवाह विधी स्वतः वडील राजेंद्र पाटील यांनी पार पाडला. आजपर्यंत समाजात पुजाऱ्यांमार्फत विवाह विधी पार पडण्याची प्रथा प्रचलित असताना, एका वडिलांनी स्वतः आपल्या मुलीचा विवाह विधी पूर्ण केल्याचे हे दुर्मीळ उदाहरण ठरले आहे. यामुळे ‘स्वतःच्या मुलीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण स्वतःच्या हस्ते साकारावा’ हा भावनिक आणि संस्कारक्षम संदेश समाजात पोहोचला आहे. विवाह सोहळ्यात कुठलाही बडेजाव, आडंबर किंवा खर्चिक आयोजन नव्हते. उपस्थित पाहुण्यांचे स्वागत ‘नमस्कार’ किंवा ‘हॅलो’ऐवजी ‘जय जिजाऊ, जय शिवराय’ या घोषणांनी करण्यात आले, ज्यामुळे संपूर्ण वातावरण प्रेरणादायी आणि ऐतिहासिक भावनेने भारलेले होते. विवाहाचे सर्व विधी निवडक नातेवाईकांच्या उपस्थितीत शांत, संयमित आणि सुसंस्कृत पद्धतीने पार पडले. या सोहळ्यासाठी मराठा सेवा संघाचे महासचिव चंद्रशेखर शिखरे, पुरुषोत्तम जाधव तसेच संभाजी ब्रिगेडचे राज्यस्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी चंद्रशेखर शिखरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवविवाहाचे महत्त्व, त्यामागील सामाजिक विचार आणि संस्कार यांचे सविस्तर विवेचन केले. त्यांनी सांगितले की, शिवविवाह ही केवळ विवाह पद्धत नसून समाजात समानता, साधेपणा आणि विचारशीलता रुजवणारी चळवळ आहे. आजच्या काळात तरुण पिढी शिक्षण घेत असली तरी अनेक वेळा विवाहासारख्या प्रसंगी परंपरेच्या नावाखाली अनावश्यक खर्च आणि आडंबर स्वीकारले जाते. मात्र पाटील परिवाराने दाखवून दिले की, आर्थिक क्षमता असूनही साधेपणाने आणि विचारपूर्वक निर्णय घेतल्यास समाजात सकारात्मक बदल घडवता येतो. या विवाहातून ‘कमी खर्च, अधिक संस्कार’ हा संदेश प्रभावीपणे पोहोचला आहे. विशेष म्हणजे, या विवाहामुळे परिसरात तसेच मराठा समाजात सकारात्मक चर्चा सुरू झाली असून, अनेक कुटुंबे आता अशा प्रकारच्या साध्या आणि संस्कारपूर्ण विवाह सोहळ्याचा विचार करू लागली आहेत. शिक्षित तरुणाईमध्येही शिवविवाहाबाबत आकर्षण वाढताना दिसत असून, भविष्यात या चळवळीला अधिक बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गाळण बुद्रुक येथील पाटील परिवाराचा हा उपक्रम केवळ एक विवाह सोहळा नसून, तो एक सामाजिक परिवर्तनाचा प्रारंभ ठरत आहे. समाजातील दिखाऊपणा, आर्थिक उधळपट्टी आणि अनावश्यक परंपरांना फाटा देत साधेपणाने, संस्कारांनी आणि विचारांनी युक्त जीवन जगण्याचा मार्ग त्यांनी दाखवला आहे. त्यामुळे हा विवाह सोहळा केवळ कौतुकाचा विषय न राहता, समाजासाठी प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.
ध्येय न्यूज चॅनेलच्या बातम्या मिळवण्यासाठी येथे क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.































