Home Blog Page 15

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा–भडगाव परिसरात बांधकाम कामगार नोंदणीच्या नावाखाली सुरू असलेले गैरप्रकार : संघटित रॅकेटची सखोल चौकशी व कठोर कारवाईची गरज

0

Loading

पचोरा – जळगाव जिल्ह्यातील आणि परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या बांधकाम कामांमुळे हजारो मजूर उपजीविकेसाठी या क्षेत्रावर अवलंबून आहेत. रस्ते, इमारती, व्यापारी संकुले तसेच शासकीय व खासगी बांधकामांमुळे विकासाचा वेग वाढलेला दिसत असला तरी या विकासामागे काम करणाऱ्या बांधकाम कामगारांचे जीवन अजूनही असुरक्षित आहे. कामगारांना सामाजिक सुरक्षा, आर्थिक सहाय्य आणि कामाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने शासनाने बांधकाम कामगार नोंदणी व विविध कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. मात्र पाचोरा–भडगाव परिसरात या योजनांचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होत असून संपूर्ण प्रक्रियेत संघटित रॅकेट कार्यरत असल्याचे गंभीर चित्र समोर येत आहे. बांधकाम कामगार नोंदणीसाठी ठरवून दिलेल्या अटी स्पष्ट असतानाही प्रत्यक्षात खोटे कामाचे दाखले, बनावट कागदपत्रे आणि ओळखींच्या जोरावर बोगस नोंदणी केल्याचे प्रकार सातत्याने उघड होत आहेत. अनेक खरे बांधकाम कामगार नोंदणीपासून वंचित राहतात, तर बांधकामाशी थेट संबंध नसलेल्या व्यक्ती नोंदणीकृत लाभार्थी म्हणून यादीत दिसतात. यामागे काही ठेकेदार, दलाल आणि मध्यस्थ सक्रिय असून दोन ते पाच हजार रुपये घेऊन बोगस नोंदणी करून दिली जात असल्याची चर्चा परिसरात उघडपणे होत आहे. नोंदणी झाल्यानंतर मिळणारे साहित्य, आर्थिक सहाय्य आणि विविध योजना कागदोपत्री मंजूर होतात, मात्र प्रत्यक्षात कामगारांच्या हाती काहीच पडत नाही किंवा निकृष्ट दर्जाचे साहित्य दिले जाते. हेल्मेट, सेफ्टी शूज, हातमोजे, रेनकोट, टूल किट यांसारखे साहित्य मंजूर होऊनही ते अपूर्ण स्वरूपात दिले जाणे, किंवा “कमिशन” दिल्याशिवाय न मिळणे, असे प्रकार दबक्या आवाजात सांगितले जात आहेत. आर्थिक सहाय्याच्या योजनांमध्येही मोठा विलंब, अपारदर्शकता आणि दलालांचा हस्तक्षेप दिसून येतो. प्रक्रिया लवकर करून देतो या नावाखाली टक्केवारी घेतली जाते आणि शासनाने दिलेली मदत पूर्णपणे कामगारापर्यंत पोहोचत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर केवळ कामगारांचीच नव्हे तर खोटे बांधकाम कामगाराचे दाखले देणाऱ्या ठेकेदारांचीही सखोल आणि सूक्ष्म पद्धतीने चौकशी होणे अत्यंत आवश्यक बनले आहे. कामगार कायद्यानुसार संबंधित ठेकेदाराने ज्या कामगाराच्या नावावर दाखले दिले आहेत, त्या कामगाराला प्रत्यक्षात पगार अथवा मजुरी अदा करण्यात आली आहे का, याची तपासणी झाली पाहिजे. संबंधित कामगार ठेकेदाराकडे काम करत असताना कामगार ॲक्टनुसार सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सुविधा, साधने आणि विमा संरक्षण देण्यात आले होते का, याचीही काटेकोर चौकशी आवश्यक आहे. तसेच जेवढ्या मजुरीचे दाखले ठेकेदाराकडून देण्यात आले आहेत, तेवढ्याच प्रमाणात संबंधित ठेकेदाराने कर, उपकर व इतर वैधानिक कर भरले आहेत का, याची आर्थिक तपासणी झाली तरच खरे वास्तव समोर येऊ शकते. अशा सूक्ष्म आणि सर्वंकष चौकशीतून पाचोरा–भडगाव परिसरात सुरू असलेले हे संपूर्ण रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण हा प्रकार एखाद-दोन प्रकरणापुरता मर्यादित नसून पद्धतशीर, संघटित आणि आर्थिक फायद्यासाठी चालवला जात असल्याचा संशय अधिकच बळावत आहे. दोन ते पाच हजार रुपये घेऊन बोगस नोंदणी करणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश होणे तितकेच महत्त्वाचे आहे, कारण अशा प्रकारांमुळे शासनाच्या कल्याणकारी योजनांवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. बांधकाम कामगार हे विकासाचे खरे शिल्पकार असून पाचोरा–भडगावसारख्या तालुक्यांमध्ये त्यांच्या कष्टावरच शहरे आणि सार्वजनिक सुविधा उभ्या राहत आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने सुरू असलेल्या योजनांचा गैरवापर थांबवणे ही केवळ प्रशासकीय नव्हे तर सामाजिक जबाबदारी आहे. सखोल चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि पारदर्शक अंमलबजावणी झाली तरच या योजनांचा खरा लाभ गरजू बांधकाम कामगारांपर्यंत पोहोचेल, अन्यथा विकासाच्या नावाखाली सुरू असलेले हे रॅकेट अधिकच बळावेल आणि कष्टकरी कामगार पुन्हा एकदा फसवला जाईल.

कुरंगीतील बनावट उतारे–बोगस कर्ज प्रकरणात तक्रार अर्ज दाखल; लेटर पॅड-शिक्का-सही बनावट की सत्य याच्या चौकशीकडे लक्ष

0

Loading

पाचोरा – तालुक्यातील कुरंगी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात उघडकीस आलेले बनावट उतारे व त्याआधारे उचललेले बोगस कर्ज प्रकरण हे अत्यंत गंभीर स्वरूपाचे असून, या प्रकरणात आता एक महत्त्वाची वळणदार घडामोड समोर आली आहे. कुरंगी येथील ग्रामसेवकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची योग्य ती परवानगी घेऊन आज पाचोरा पोलीस प्रशासनाकडे अधिकृत तक्रार अर्ज दाखल केला असून तो स्वीकारण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाला आता अधिकृत चौकशीची दिशा मिळाली असून, पुढील तपासात काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात गावातील काही उताऱ्यांमध्ये मूळ मालकांच्या नावात फेरफार करून बँक व विविध फायनान्स कंपन्यांकडून कर्ज उचलण्यात आल्याची माहिती समोर आली होती. हा प्रकार केवळ आर्थिक गैरव्यवहारापुरता मर्यादित नसून, थेट नागरिकांच्या मालमत्तेच्या हक्कांशी संबंधित असल्याने त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. यापूर्वी दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी यासंदर्भात तक्रार अर्ज देण्यात आला होता, मात्र प्रत्यक्ष चौकशी व पुढील प्रक्रिया सुरू होण्यास विलंब झाल्याने विविध शंका उपस्थित झाल्या होत्या. आज तक्रार अर्ज अधिकृतरीत्या स्वीकारण्यात आल्याने या प्रकरणातील तपासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ग्रामसेवकांच्या भूमिकेनुसार संबंधित बनावट उतारे ग्रामपंचायतीकडून जारी करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे कर्जासाठी वापरण्यात आलेला ग्रामपंचायतचा लेटर पॅड, त्यावरील शासकीय शिक्का आणि ग्रामसेवकांची सही ही सत्य आहे की बनावट, याची सखोल चौकशी होणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. जर हे लेटर पॅड, शिक्के व सह्या बनावट असल्याचे निष्पन्न झाले, तर हा प्रकार एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित नसून संपूर्ण रॅकेट कार्यरत असल्याचे स्पष्ट होऊ शकते. अशा परिस्थितीत केवळ कुरंगीपुरते न थांबता पाचोरा तालुक्यातील कोणकोणत्या ग्रामपंचायतींमध्ये अशा स्वरूपाचे प्रकार घडले आहेत, याचा सखोल व व्यापक तपास होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. ग्रामपंचायतीचा अधिकृत शिक्का व सही वापरण्याचा अधिकार अत्यंत मर्यादित असतो, त्यामुळे या कागदपत्रांचा गैरवापर कसा झाला, कुठून झाला आणि कोणाच्या मदतीने झाला, हे तपासाचा मुख्य केंद्रबिंदू ठरणार आहे. कुरंगीतील हा प्रकार समोर आल्यानंतर तालुक्यातील काही इतर ग्रामपंचायतींबाबतही अशाच स्वरूपाच्या तक्रारी ऐकू येऊ लागल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तपास यंत्रणांनी हे प्रकरण केवळ एका घटनेपुरते मर्यादित न ठेवता, संपूर्ण तालुक्याच्या पातळीवर तपासाची व्याप्ती वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कर्मचारी, प्रशासन तसेच सरपंच व सदस्य यांनीही या प्रकरणात पारदर्शक आणि सहकार्याची भूमिका घेणे महत्त्वाचे मानले जात आहे. आवश्यक असल्यास संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्तरावर वस्तुस्थिती मांडून योग्य ती दखल घेण्याची प्रक्रिया पुढे नेली जाऊ शकते. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्या स्तरावरही या प्रकरणाची माहिती दिली जाऊन मार्गदर्शन घेतले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. झुंज वृत्तपत्र व ध्येय न्युजचे संपादक संदीप महाजन यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करताना आता संयमित पण ठाम भूमिका घेतली असून, तक्रार अर्ज स्वीकारण्यात आल्याने पुढील तपास प्रक्रियेकडे लक्ष केंद्रित केले आहे. सत्य समोर यावे, दोषींवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि अशा प्रकारची प्रकरणे भविष्यात पुन्हा घडू नयेत, यासाठी निष्पक्ष, सखोल व वेळबद्ध चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता पोलीस प्रशासन या प्रकरणात कोणती दिशा घेतात, लेटर पॅड-शिक्का-सही याबाबत काय निष्कर्ष निघतात आणि तपासातून संपूर्ण चित्र कसे उलगडते, याकडे संपूर्ण पाचोरा तालुक्याचे लक्ष लागले आहे.

चिमुकल्यांच्या निरागस उत्साहाने रंगले निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे पाचवे स्नेहसंमेलन

0

Loading

पाचोरा : तात्यासाहेब आर. ओ. पाटील नगर येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या पूर्व प्राथमिक विभागाचे पाचवे स्नेहसंमेलन बालविश्वाच्या आनंदी गजरात आणि कलाविष्कारांच्या रंगीबेरंगी छटांत अत्यंत उत्साहात पार पडले. शाळेच्या प्रांगणात सजवलेल्या रंगमंचावर चिमुकल्यांच्या पावलांनी ताल धरला, तर त्यांच्या निरागस हास्याने उपस्थितांच्या मनात आपुलकीची ऊब पसरली. कार्यक्रमाची सुरुवात मुख्य अतिथी व मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून गणेश वंदनेने स्नेहसंमेलनाचा मंगल प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी शाळेच्या अध्यक्षा आदरणीय सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि उपस्थितीत संपूर्ण कार्यक्रम अधिकच प्रेरणादायी ठरला. लहानग्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. पंजाबी, हिंदी, मराठी तसेच कोळी भाषेतील गीतांवर सादर झालेल्या नृत्यांनी संस्कृतींचा सुरेल संगम घडवून आणला. चिमुकल्यांच्या आत्मविश्वासपूर्ण हालचाली आणि तालबद्ध पावले पाहून प्रेक्षक भारावून गेले. काळ्या मातीत राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टमय जीवनाचा आशय नृत्यातून उलगडत सादर करण्यात आला, ज्यातून श्रमाचे मोल आणि ग्रामीण जीवनाचे वास्तव प्रभावीपणे मांडले गेले. ‘यमला, पगला, दिवाना’ या गाण्यावर साकारलेला धर्मेंद्रजींच्या चित्रपटातील लोकप्रिय शैलीचा नृत्यप्रयोग प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरला. बालकलाकारांनी अभिनय आणि नृत्य यांचा सुरेख मेळ घालत सादर केलेल्या या सादरीकरणाला प्रचंड दाद मिळाली. त्याचप्रमाणे महिला क्रिकेटपटूंनी जिंकलेल्या विश्वचषकाचे प्रतीकात्मक चित्रण नृत्याच्या माध्यमातून सादर करण्यात आले. या सादरीकरणातून क्रीडा क्षेत्रातील महिलांचे यश, जिद्द आणि देशाभिमान यांचा भावनिक संदेश प्रभावीपणे पोहोचला. अध्यक्षीय मनोगतात आदरणीय सौ. वैशालीताई सुर्यवंशी यांनी सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कार्यक्रमाच्या आयोजनात सहभागी असलेल्या प्रत्येक घटकाचे मनापासून कौतुक केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, आत्मविश्वास आणि नेतृत्वगुण विकसित होतात, तसेच त्यांच्या सुप्त कलागुणांना योग्य दिशा मिळते, असे त्यांनी नमूद केले. पालकांनी आपल्या पाल्यांसोबत अधिक वेळ घालवून संवाद वाढवावा, कारण सुदृढ कौटुंबिक नाते मुलांना मोबाईल आणि सामाजिक माध्यमांपासून नैसर्गिकरित्या दूर ठेवते, असे त्यांनी स्पष्ट केले. वाचनाची आवड लहान वयातच रुजवणे ही काळाची गरज असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असा आग्रहही त्यांनी धरला. या स्नेहसंमेलनास शाळेच्या उपाध्यक्षा श्रीमती कमलताई पाटील, सचिव नरेंद्रसिंग सुर्यवंशी, भडगावच्या तहसीलदार सौ. शितल सोलट, गट शिक्षणाधिकारी विजय पवार, शाळेचे प्राचार्य गणेश राजपूत, जनसंपर्क अधिकारी आय. बी. सिंग, उपप्राचार्य प्रदिप सोनवणे, समन्वयक सौ. स्नेहल पाटील, पूर्व प्राथमिक विभागाच्या प्रमुख फरीदा भारमल व सौ. वर्षा पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला सामाजिक आणि शैक्षणिक महत्त्व प्राप्त झाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध आणि समर्पित परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. आरोही पाटील हिने प्रभावीपणे मांडले, तर आभारप्रदर्शन कु. आयुषी चौधरी हिने सुयोग्य शब्दांत केले. चिमुकल्यांच्या निरागसतेतून उमटलेले भाव, त्यांच्या सादरीकरणातील आत्मविश्वास आणि संस्कारांची झलक यामुळे हे स्नेहसंमेलन केवळ सांस्कृतिक कार्यक्रम न राहता बालकांच्या सर्वांगीण विकासाचा प्रेरणादायी उत्सव ठरला असून शाळा, पालक आणि विद्यार्थी यांच्यातील सुसंवाद अधिक दृढ करणारा हा सोहळा उपस्थितांच्या स्मरणात दीर्घकाळ राहील.

महिलांच्या जीवासाठी आ. किशोरआप्पा पाटील यांची ठाम आणि कृतीशील भूमिका : चेस्ट कॅन्सरवर विधानसभेत प्रश्न, तर पेटस् स्कॅन व्हॅनसाठी मंत्र्यांकडे थेट मागणी

0

Loading

मुंबई – महाराष्ट्र शासनाचे अर्थसंकल्पी अधिवेशन नुकतेच मुंबई येथे सुरू झाले असून या अधिवेशनात जनतेच्या जीवनाशी थेट निगडित असलेल्या प्रश्नांवर चर्चा होत आहे. याच अधिवेशनात पाचोरा–भडगाव विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट हॅट्रिक आमदार किशोरआप्पा पाटील यांनी ग्रामीण भागातील महिलांना मोठ्या प्रमाणावर ग्रासणाऱ्या चेस्ट कॅन्सरच्या गंभीर प्रश्नावर विधानसभेचे लक्ष वेधले. ग्रामीण महाराष्ट्रात

विशेषतः महिलांमध्ये स्तनांचा कॅन्सर मोठ्या प्रमाणावर आढळत असून सामाजिक संकोच, माहितीचा अभाव, आर्थिक अडचणी आणि महागड्या तपासण्यांमुळे अनेक महिला वेळेवर तपासणी करून घेत नाहीत, परिणामी आजार प्रगत अवस्थेत जातो आणि उपचार अधिक खर्चिक व गुंतागुंतीचे ठरतात, ही वस्तुस्थिती त्यांनी सभागृहात स्पष्टपणे मांडली. चेस्ट कॅन्सर प्राथमिक अवस्थेत ओळखला गेला तर तो मोठ्या प्रमाणावर बरा होऊ शकतो, हे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध असतानाही ग्रामीण भागात तपासणीची यंत्रणा अपुरी असल्यामुळे अनेक महिलांचे प्राण धोक्यात येत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. शहरांमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तपासण्या ग्रामीण महिलांच्या आवाक्याबाहेर असून प्रवासाचा खर्च, तपासणीसाठी लागणारा वेळ आणि उपचारांचा मोठा आर्थिक बोजा यामुळे गोरगरीब कुटुंबे उपचारापासून दूर राहतात, ही बाब त्यांनी ठाम शब्दांत मांडली. या पार्श्वभूमीवर राज्यभरात, विशेषतः ग्रामीण भागात, मोबाईल वैद्यकीय व्हॅनच्या माध्यमातून चेस्ट कॅन्सरची प्राथमिक तपासणी मोहीम राबवावी, अशी ठोस मागणी त्यांनी विधानसभेत केली. गावोगावी, वाडी-वस्तीवर या व्हॅन पोहोचल्यास महिलांची वेळेत तपासणी होऊन आजार सुरुवातीच्या टप्प्यातच सापडेल आणि तातडीने उपचार सुरू करून अनेक महिलांचे प्राण वाचवता येतील, असे त्यांनी सांगितले. यासोबतच आमदार किशोरआप्पा पाटील यांनी शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील गंभीर त्रुटींकडेही लक्ष वेधले. गोरगरीब जनतेसाठी राबवण्यात येणाऱ्या या योजनेत चेस्ट कॅन्सरसारखा गंभीर आजार बसत असतानाही अनेक ठिकाणी ‘योजनेत बसत नाही’ असे कारण देऊन रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक होत असल्याचे वास्तव त्यांनी सभागृहात मांडले. काही रुग्णालये व मध्यस्थ यंत्रणा योजनेचा गैरवापर करून गरीब कुटुंबांना मोठ्या खर्चात ढकलत असल्याने अशा प्रकरणांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली. विशेष म्हणजे, हा विषय केवळ विधानसभेतील प्रश्नापुरता मर्यादित न ठेवता आमदार किशोरआप्पा पाटील यांनी त्याच दिवशी प्रत्यक्ष लेखी पाठपुरावा करत महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री. गुलाबरावजी पाटील साहेब यांना सविस्तर पत्र दिले. या पत्रात त्यांनी पाचोरा–भडगाव मतदारसंघासाठी जिल्हा वार्षिक योजना (डि.पी.डी.सी) अंतर्गत पेटस् स्कॅन तपासणी व्हॅन मंजूर करण्याची ठोस मागणी केली आहे. सध्याच्या परिस्थितीत कर्करोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यात महिलांची संख्या लक्षणीय आहे, त्यामुळे मतदारसंघात अत्याधुनिक तपासणी सुविधेची नितांत गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. पाचोरा–भडगाव मतदारसंघासाठी पेटस् स्कॅन तपासणी व्हॅन उपलब्ध झाल्यास परिसरातील रुग्णांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार असून आज कर्करोगाच्या अचूक निदानासाठी पेटस् स्कॅनसारख्या तपासण्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत, मात्र त्या सध्या मोठ्या शहरांपुरत्याच मर्यादित असल्याने ग्रामीण रुग्णांना दूरच्या शहरांमध्ये जावे लागते आणि त्याचा मोठा आर्थिक व मानसिक ताण सहन करावा लागतो, हे वास्तव त्यांनी पत्रातून अधोरेखित केले. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजना (डि.पी.डी.सी) अंतर्गत निधी उपलब्ध करून देऊन ही पेटस् स्कॅन तपासणी व्हॅन तातडीने मंजूर करण्यात यावी, अशी स्पष्ट विनंती त्यांनी केली आहे. प्रश्न उपस्थित करणे, शासनाचे लक्ष वेधणे आणि त्याच वेळी प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी लेखी पाठपुरावा करणे, ही आमदार किशोरआप्पा पाटील यांची कार्यपद्धती असून त्यामुळेच ते केवळ लोकप्रतिनिधी न राहता जनतेच्या दुःखात सहभागी होणारे नेतृत्व म्हणून ओळखले जातात. जर शासनाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि पेटस् स्कॅन तपासणी व्हॅन मंजूर झाली, तर ग्रामीण भागातील महिलांसाठी हा मोठा दिलासा ठरेल. लवकर निदान, तातडीचे उपचार आणि कमी खर्चात आरोग्यसेवा उपलब्ध झाल्यास अनेक महिलांचे प्राण वाचू शकतील आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास गोरगरीब जनतेचा शासनावरील विश्वास अधिक दृढ होईल. अशा प्रकारे, चेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर विषयावर विधानसभेत ठाम आवाज उठवून आणि पेटस् स्कॅन व्हॅनसाठी मंत्र्यांकडे थेट मागणी सादर करून आमदार किशोरआप्पा पाटील यांनी केवळ प्रश्न मांडला नाही, तर तो सोडवण्यासाठी ठोस पावले उचलली असून हा उपक्रम तातडीने सुरू झाल्यास अनेक गोरगरिबांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आज आहेत आणि भविष्यातही राहतील, हे निश्चितपणे म्हणावे लागेल.

वरील मजकूर आपणास योग्य वाटल्यास आपण फक्त नाव कट न करता अथवा मजकुरात बदल न करता इतरत्र Send करणेस अथवा प्रसिद्ध करणेस विनंती

कॉपीच्या बाजारात प्रामाणिक शिक्षणाचा एकाकी पण ठाम लढा – संदीप महाजनसर संचलित ध्येय करिअर अकॅडमी, पाचोरा

0

Loading

पाचोरा – “शिस्त जर शिक्षा वाटत असेल, तर आमच्या अकॅडमीत प्रवेश घेऊ नका.” या एका वाक्यातूनच ध्येय करिअर अकॅडमीची संपूर्ण शैक्षणिक भूमिका स्पष्ट होत होती. हे वाक्य जाहिरातबाजीसाठी वापरलेले घोषवाक्य नव्हते; ते शिक्षण व्यवस्थेतील साचलेपणा विरुद्ध उघडपणे घेतलेली भूमिका होती. संदीप महाजनसर संचलित ध्येय करिअर अकॅडमी, पाचोरा (जि. जळगाव) सुरू झाली तेव्हा शिक्षणाकडे पाहण्याची दृष्टी वेगळी होती. निकाल, टक्केवारी आणि सोयीस्कर मार्ग यांपेक्षा शिस्त, समज, सातत्य आणि जबाबदारी यांना येथे प्राधान्य देण्यात आले. त्या काळात अनेक ठिकाणी शिक्षण म्हणजे गुणांची स्पर्धा, कॉपीची मूक संमती आणि पालकांच्या अपेक्षांना कुरवाळण्याचा व्यवसाय बनत चालला होता. अशा वातावरणात ध्येय करिअर अकॅडमीने कॉपीमुक्त शिक्षणाचा निर्धार केला. हा निर्णय सहज स्वीकारला जाण्यासारखा नव्हता. कारण तो केवळ विद्यार्थ्यांसाठी नव्हे, तर पालकांसाठी, शिक्षकांसाठी आणि संपूर्ण व्यवस्थेसाठी अस्वस्थ करणारा होता. विशेषतः मोठे पगार घेऊनही प्रामाणिक अध्यापनाची नैतिक तयारी नसलेले, बायकोच्या नावावर शिकवण्या दाखवून प्रत्यक्ष स्वतः अध्यापन करणारे काही प्राध्यापक आणि शिक्षक या भूमिकेमुळे अस्वस्थ झाले. त्यांच्या सोयीच्या, तडजोडीच्या शिक्षणपद्धतीवर थेट बोट ठेवले गेले होते. परिणामी, शक्य त्या सर्व पातळ्यांवर विरोध झाला. गैरसमज पसरवले गेले, अपप्रचार करण्यात आला, सामाजिक दबाव निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. मात्र ध्येय करिअर अकॅडमीची भूमिका बदलली नाही. कारण येथे शिक्षण हे व्यवहार नव्हते, तर जबाबदारी होती. या अकॅडमीत शिस्त ही केवळ विद्यार्थ्यांपुरती मर्यादित नव्हती. पालकांनाही स्पष्ट भूमिका देण्यात आली होती. दररोज रात्री आपल्या पाल्याची वही उघडून पाहणे, त्या वहीवर दिनांक आणि वार आहे का ते तपासणे आणि फक्त सही करणे – एवढीच अपेक्षा होती. वहीतील मजकूर योग्य आहे का, उत्तर बरोबर आहे का, याची चौकशी पालकांनी करू नये, हे ठामपणे सांगितले गेले. पालकांनी पालकत्व निभवावे, शिक्षक होण्याचा प्रयत्न करू नये, ही भूमिका स्पष्ट होती. जोपर्यंत वहीवर सही होत नाही, तोपर्यंत पालकांनी रात्री जेवणाच्या ताटावर बसायचे नाही – हा नियम कठोर वाटत असला, तरी त्याने घराघरांत शिक्षणाला एक शिस्तबद्ध स्थान मिळाले. विद्यार्थ्यांसाठीचे नियमही तितकेच ठोस होते. मोबाईल वापरावर बंदी, शिस्तभंगाला थेट कारवाई, उशीर झाल्यास कारण सांगण्यासाठी थेट पालकांशी संपर्क. प्रत्येक विषयाचा प्रत्येक धडा आणि त्या धड्यातील प्रत्येक मुद्दा शिकवणे शिक्षकांसाठी बंधनकारक होते. गणितासारख्या विषयात तर प्रत्येक उदाहरण समजावून सांगितले जात असे. “हे येणार नाही” किंवा “हे टाळू” अशा शब्दांना येथे वाव नव्हता. प्रत्येक धड्यावर स्वतंत्र चाचणी, नियोजित कालावधीत अंतर्गत परीक्षा आणि वार्षिक मूल्यमापन ही पद्धत काटेकोरपणे राबवली जात होती. २०१० पासूनच अध्यापन व स्पेशली परीक्षा सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या देखरेखीखाली घेतल्या जात. परीक्षेदरम्यान गैरप्रकाराची शक्यता शून्यावर आणण्याचा प्रयत्न केला गेला होता. कॉपी करणे तर दूरच, साधे बोलणेही सहन केले जात नसे. अशा वेळी त्वरित कारवाई होत असे. यामुळे परीक्षेचा अर्थ मुलांच्या मनात भीती नव्हे, तर जबाबदारी म्हणून रुजत गेला. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना वेगळा घरगुती अभ्यास करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण होत नसे. कारण वर्गात शिकवलेले व्यवस्थित नोंदवणे बंधनकारक होते आणि रात्री वही तपासली जाणार, याची जाणीव असल्याने वर्गात लक्ष देणे अपरिहार्य ठरत असे. परिणामी समज वाढत गेली. हुशार आणि मेहनती विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य रात्रीची अभ्यासिका ही मोठी संधी ठरली. या सर्व प्रक्रियेचे परिणाम हळूहळू दिसू लागले. केवळ गुणच नव्हे, तर आत्मविश्वास, शिस्त आणि विचार करण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये विकसित झाली. आजही अनेक माजी विद्यार्थी भेटले की ते स्वतःची ओळख “ध्‍येयचा विद्यार्थी” म्हणून अभिमानाने करून देतात. पालकही तेवढ्याच आत्मविश्वासाने सांगतात की शिस्तीच्या या शिक्षणामुळेच त्यांच्या मुलांना आयुष्यात दिशा मिळाली. हे शब्द म्हणजे पैशात मोजता न येणारी पावती होती. मात्र कोरोना काळाने संपूर्ण शिक्षणविश्व ढवळून काढले. प्रत्यक्ष अध्यापन जवळजवळ थांबले. बहुतांश विद्यार्थी शिक्षकांच्या संपर्कापासून दूर गेले. ऑनलाईन शिक्षण हे अनेकांसाठी शिकण्याचे माध्यम न राहता केवळ वेळ घालवण्याचे साधन बनले. ज्या पालकांकडे मूलभूत सुविधा नव्हत्या, त्यांनाही मुलांसाठी मोबाईल घ्यावा लागला. याचे दुष्परिणाम समाजाने अनुभवले. याच काळात संदीप महाजन संचलित ध्येय करिअर अकॅडमीसमोर एक कठीण निर्णय उभा राहिला. ज्या शिक्षणपद्धतीचा पाया प्रत्यक्ष संवाद, नियंत्रण, देखरेख आणि शिस्त यावर होता, ती पद्धत तडजोडीने ऑनलाईन चालवणे योग्य नाही, हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कोरोनापासून आजतागायत ध्येय करिअर अकॅडमीचे कार्यालय बंद आहे. हा निर्णय आर्थिक किंवा सोयीचा नव्हता; तो तत्वनिष्ठ होता. दरम्यानच्या काळात शिक्षणक्षेत्रात वेगळेच चित्र दिसू लागले. सरसकट पासची मानसिकता, निकाल वाढवण्यासाठी लवचिकता, गैरप्रकारांकडे दुर्लक्ष – या सगळ्यामुळे शिक्षणाचा दर्जा ढासळला. प्रवेश घेताना “पास करून देणार का?” हा प्रश्न विचारला जाऊ लागला. काही ठिकाणी शिक्षकांवरही अनैतिक तडजोडींचा दबाव आला. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यातील तयारीवर झाला. होय, आज प्रत्यक्षात ध्येय करिअर अकॅडमीचे कार्यालय बंद आहे. वर्गातील शांतता, रिकामे बाक, बंद अभ्यासिका हे दृश्य वास्तव आहे. मात्र ध्येय संपले आहे, असे नाही. ध्येय ही इमारत नव्हती; ती एक विचारधारा होती. ज्या विद्यार्थ्यांनी शिस्त अनुभवली, ज्या पालकांनी जबाबदारी स्वीकारली, आणि ज्या शिक्षकांनी प्रत्येक घटक प्रामाणिकपणे पार पाडला – ते सर्व आजही त्या विचारांचे प्रतिनिधी आहेत. कार्यालय बंद असले, तरी त्या शिक्षणाचे संस्कार आजही अनेक कुटुंबांत जिवंत आहेत. हा प्रश्न केवळ एका अकॅडमीपुरता मर्यादित नाही. हा प्रश्न शिक्षणाकडे पाहण्याच्या दृष्टीचा आहे. आपण निकालाला प्राधान्य देतो की गुणवत्तेला? सोयीला महत्त्व देतो की शिस्तीला? ध्येय करिअर अकॅडमीने या प्रश्नांची उत्तरे आपल्या कृतीतून दिली होती. त्यामुळे ती अस्वस्थ करणारी ठरली. कदाचित उद्या परिस्थिती बदलेल. कदाचित पुन्हा एकदा ध्येय करिअर अकॅडमी सारखे शिस्तीचे इतर दालनांची दरवाजे उघडतील. तेव्हा कदाचित ही अकॅडमी एक प्रेरणा आठवण म्हणून उरेल. पण तिचा विचार, तिची भूमिका आणि तिचा आदर्श संपणार नाही. कारण ध्येय ही संस्था नव्हती; तो एक संस्कार होता. कार्यालय बंद असणे हे वास्तव आहे. पण ध्येय जिवंत असणे ही आशा आहे. आणि जिथे आशा जिवंत असते, तिथे शिक्षण अजून संपलेले नसते.

डॉ. अंजली पाटील यांची एम.एस. (स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र) मध्ये झेप; तेरणा मेडिकल कॉलेज, नेरूळ येथे प्रवेशाने पाचोर्‍याचा मान उंचावला

0

Loading

पाचोरा – शहरासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी शैक्षणिक कामगिरी डॉ. अंजली पाटील यांनी केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात सातत्यपूर्ण परिश्रम, जिद्द आणि शिस्तबद्ध अभ्यास यांच्या जोरावर त्यांनी एम.एस. (Obstetrics & Gynecology) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी तेरणा मेडिकल कॉलेज, नेरूळ, नवी मुंबई येथे प्रवेश मिळवला आहे. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र या अत्यंत जबाबदारीच्या आणि संवेदनशील शाखेत उच्च शिक्षणाची संधी मिळणे ही केवळ वैयक्तिक यशाची बाब नसून पाचोरा शहरासाठीही गौरवाची घटना मानली जात आहे. डॉ. अंजली पाटील या श्री.गो.से.हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.एन.आर.पाटील (ठाकरे) आणि उपशिक्षिका सौ.ज्योती नरेंद्र पाटील (ठाकरे) यांच्या कन्या आहेत. शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या कुटुंबात वाढ झाल्यामुळे लहानपणापासूनच अभ्यासाबाबत गांभीर्य, शिस्त आणि समाजाप्रती जबाबदारीचे संस्कार त्यांच्यावर झाले. आई-वडिलांच्या मार्गदर्शनामुळे शिक्षण हे केवळ पदवीपुरते मर्यादित न ठेवता समाजासाठी उपयुक्त ठरावे, ही भूमिका त्यांनी कायम जपली. शालेय व महाविद्यालयीन शिक्षणात त्यांनी विज्ञान शाखेत विशेष प्रावीण्य मिळवले. मानवी आरोग्य, आजारांचे निदान आणि उपचारपद्धती याबाबतची ओढ त्यांना वैद्यकीय शिक्षणाकडे घेऊन गेली. त्यानुसार त्यांनी एमबीबीएस पदवी लातूर येथून यशस्वीरित्या संपादन केली. एमबीबीएस शिक्षणादरम्यान त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता टिकवून ठेवत प्रत्यक्ष रुग्णसेवेचा अनुभवही आत्मसात केला. पदवी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ग्रामीण भागात सेवा देण्याचा निर्णय घेतला आणि गेल्या वर्षी पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत राहिल्या. ग्रामीण रुग्णालयातील सेवा ही अनेक अडचणींनी भरलेली असते. मर्यादित साधनसामग्री, वाढती रुग्णसंख्या आणि तातडीच्या वैद्यकीय गरजा अशा परिस्थितीत त्यांनी जबाबदारीने व संवेदनशीलतेने काम केले. विशेषतः महिलांच्या आरोग्यविषयक समस्या, गर्भवती मातांची काळजी, प्रसूतीपूर्व व प्रसूतीनंतरचे उपचार आणि महिलांमधील आजारांबाबत त्यांनी विशेष लक्ष दिले. याच अनुभवातून स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र या शाखेत उच्च शिक्षण घेण्याचा त्यांचा निर्धार अधिक पक्का झाला. एम.एस. (Obstetrics & Gynecology) ही पदवी मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा, सातत्यपूर्ण अभ्यास आणि आत्मविश्वासाची गरज असते. या सर्व कसोट्यांवर यश मिळवत डॉ. अंजली पाटील यांनी तेरणा मेडिकल कॉलेज, नेरूळ, नवी मुंबई येथे प्रवेश मिळवला आहे. महानगरातील प्रगत वैद्यकीय सुविधा, आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवी प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेण्याची संधी त्यांना मिळणार आहे. या शिक्षणाच्या माध्यमातून भविष्यात ग्रामीण व शहरी भागातील महिलांना अधिक सक्षम व दर्जेदार आरोग्यसेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, चेअरमन संजयनाना वाघ, मानद सचिव ॲड.महेशदादा देशमुख, व्हॉइस चेअरमन नानासाहेब व्ही. टी.जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलीलदादा देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव आण्णा महाजन यांच्यासह शहरातील शैक्षणिक, सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. पाचोरा शहरातील शिक्षक कुटुंबातील कन्येने वैद्यकीय क्षेत्रात अशी भरारी घेतल्याने सर्व स्तरांतून आनंद व्यक्त होत असून डॉ. अंजली पाटील यांची पुढील वाटचाल अनेक विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. तिच्या यशाबद्दल व पुढील वाटचालीस ध्येय न्यूज मधून वृत्तपत्राचे संपादक संदीप महाजन व महाजन परिवारा तर्फे हार्दिक शुभेच्छा

श्री सु. भा. पाटील प्राथमिक विद्या मंदिर, पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांच्या शौर्यपूर्ण सादरीकरणांसह विधान वाघ व लक्ष्मी वाघ यांच्या राजस वेशभूषेने वेधले सर्वांचे लक्ष

0

Loading

वरखेडी ( कु. चेतना हिरे ) पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री सु. भा. पाटील प्राथमिक विद्या मंदिर, पाचोरा येथे दिनांक १९ फेब्रुवारी २०२६, गुरुवार रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे जाणते राजे यांची जयंती अतिशय दिमाखात, उत्साहात आणि स्वराज्यभावनेत साजरी करण्यात आली. संपूर्ण शाळा परिसर भगव्या ध्वजांनी, शिवविचारांनी, स्वराज्याच्या घोषणांनी आणि प्रेरणादायी संदेशांनी सजविण्यात आला होता. विद्यार्थ्यांमध्ये जोश, शिक्षकांमध्ये अभिमान आणि पालकांमध्ये समाधान अशी सकारात्मक ऊर्जा संपूर्ण कार्यक्रमात अनुभवायला मिळाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य इमारत दुपार सत्र विभागाचे प्रमुख ईश्वर पाटील सर होते, तर शाळेच्या मुख्यध्यापिका उज्वला साळुंके मॅडम यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत नियोजनबद्ध (well planned) आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ शिक्षिका लक्ष्माबाई सोनवणे मॅडम, भडगाव रोड विभागाचे प्रमुख दिपक पाटील सर, सकाळ सत्र विभागाचे प्रमुख स्वप्नील माने सर तसेच जयश्री वाघ मॅडम आदी मान्यवर शिवभक्त उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करण्यात आली. शाळेतील चिमुकल्या मावळ्यांनी सादर केलेली शौर्यपूर्ण भाषणे, जोशपूर्ण पोवाडे, तालबद्ध नृत्य, शिवकालीन वेशभूषा आणि घणघणीत शिवगर्जना यामुळे संपूर्ण सभागृहात रणशिंगाचा नाद घुमल्याचा भास निर्माण झाला. विद्यार्थ्यांच्या confident आणि energetic सादरीकरणाला उपस्थित पालक, शिक्षक आणि मान्यवरांकडून भरभरून appreciation मिळाली. महेश लोखंडे सर यांनी तयार केलेले आकर्षक, कलात्मक आणि informative फलकलेखन विशेष लक्षवेधी ठरले असून त्यातून शिवरायांचे धोरण, स्वराज्यसंकल्पना आणि इतिहास विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावी visual माध्यमातून पोहोचला. भडगाव रोड विभागाचे प्रमुख दिपक पाटील सर यांनी प्रश्नोत्तर पद्धतीने विद्यार्थ्यांशी संवाद (interactive session) साधत आजच्या काळात विद्यार्थ्यांनी कोणत्या विकारांशी, चुकीच्या प्रवृत्तींशी आणि अन्यायाविरुद्ध लढा द्यायचा आहे, जीवनात योग्य ध्येय कसे ठरवायचे आणि सजग, जबाबदार नागरिक कसे घडायचे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात ईश्वर पाटील सर यांनी शिवरायांची युद्धनीती, गनिमी काव्याचे तंत्र, मावळ्यांचे संघटन, धाडस आणि दूरदृष्टी यावर सविस्तर प्रकाश टाकत लाल महालातील पहिल्या धाडसी कारवाईसह विविध ऐतिहासिक घटनांचे उदाहरणे दिली आणि विद्यार्थ्यांमध्ये leadership skills, आत्मविश्वास आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ केली. कार्यक्रमाचे सुसंगत, प्रभावी आणि time-managed सूत्रसंचालन संदिप वाघ यांनी केले, तर शेवटी आशिष पाटील सर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व मान्यवरांचे मनःपूर्वक आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या जयंती उत्सवाला आणखी एक विशेष आकर्षण लाभले ते म्हणजे सु. भा. पाटील पाचोरा शाळेतील विद्यार्थी विधान वाघ आणि लक्ष्मी वाघ यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात साकारलेली राजमाता जिजाऊ आणि बाल शिवरायांची राजस, तेजस्वी आणि दिमाखदार वेशभूषा. पारंपरिक शिवकालीन पोशाखातील सूक्ष्म बारकावे, डोक्यावरची पागोटे, अलंकार, शस्त्रांची प्रतिकृती आणि चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास पाहून उपस्थितांना जणू स्वराज्याचा इतिहास प्रत्यक्ष समोर उभा असल्याचा live अनुभव मिळाला. लहानग्यांच्या निरागसतेतून झळकणारी तेजस्वी छबी पाहून नागरिक भारावून गेले. या वेशभूषेची चर्चा संपूर्ण पाचोरा तालुक्यात colorfully रंगली असून दोन्ही मुलांवर कौतुकाचा अक्षरशः वर्षाव होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनेक नागरिकांनी त्यांच्यासोबत photos आणि selfies काढत आनंद व्यक्त केला. इतिहासाविषयी प्रेम, संस्कार, परंपरा आणि स्वराज्यनिष्ठा जपणाऱ्या या उपक्रमामुळे सर्वत्र अभिमानाची भावना व्यक्त होत आहे. विधान वाघ आणि लक्ष्मी वाघ हे कोमल मधुकर वाघ सर आणि प्रा. जयश्रीताई वाघ मॅडम यांची सुपुत्र–सुपुत्री असून, त्यांच्या संस्कारांचे, राष्ट्रभक्तीचे आणि प्रेरणेचे हे सुंदर reflection असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. एकूणच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित या भव्य, प्रेरणादायी आणि ऐतिहासिक कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाबद्दल आदर, स्वाभिमान, शिस्त, धैर्य, leadership आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाली असून हा सोहळा पाचोरा शहर व तालुक्यासाठी प्रेरणादायी milestone ठरला.

श्री गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती प्रेरणादायी उत्साहात साजरी

0

Loading

पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे आज गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी यांची जयंती अत्यंत उत्साहात, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच विद्यालय परिसर शिवरायांच्या विचारांनी, घोषणांनी आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाने भारलेला दिसून आला. राष्ट्रनिर्मितीतील शिवरायांचे योगदान, त्यांचे दूरदृष्टीचे नेतृत्व, न्यायप्रिय प्रशासन आणि स्वराज्याची संकल्पना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी या हेतूने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक एन. आर. पाटील आणि उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याचे विधिवत पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. उपस्थित सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी महाराजांच्या प्रतिमेस वंदन करून त्यांच्या पराक्रमाला, त्यागाला आणि आदर्शांना अभिवादन केले. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. या कार्यक्रमास पर्यवेक्षिका ए. आर. गोहिल मॅडम, पर्यवेक्षक आर. बी. बांठिया, पर्यवेक्षक आर. बी. तडवी, सांस्कृतिक विभाग प्रमुख एम. टी. कौंडीण्य, क्रीडा प्रमुख एस. पी. करंदे, किमान कौशल्य प्रमुख मनीष बाविस्कर, कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर तसेच सकाळ व दुपार सत्रातील सर्व शिक्षक बंधू-भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सर्वांच्या सामूहिक उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली. मुख्याध्यापक एन. आर. पाटील यांनी आपल्या मार्गदर्शक मनोगतात छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य विद्यार्थ्यांसमोर सविस्तरपणे मांडले. शिवरायांचे यश केवळ तलवारीच्या बळावर नव्हे तर नियोजन, शिस्त, लोकसहभाग आणि न्याय्य प्रशासनावर आधारित होते, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनातील स्वाभिमान, कर्तव्यनिष्ठा, राष्ट्रप्रेम, स्त्री-सन्मान आणि सर्वधर्मसमभाव ही मूल्ये आत्मसात केली पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले. उपमुख्याध्यापक आर. एल. पाटील यांनी शिवरायांच्या नेतृत्वगुणांवर प्रकाश टाकत स्पष्ट ध्येय, कठोर परिश्रम आणि योग्य दिशा यामुळेच कोणतेही स्वप्न साकार होते, असे सांगितले तसेच विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत सामाजिक भान जपून जबाबदार नागरिक बनावे, हा शिवजयंतीचा खरा संदेश असल्याचे स्पष्ट केले. सांस्कृतिक विभागाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी शिवरायांच्या जीवनावर आधारित अभिवादन व प्रेरणादायी सादरीकरण केले. क्रीडा प्रमुख एस. पी. करंदे यांनी शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त आणि संघभावनेचे महत्त्व अधोरेखित केले. किमान कौशल्य प्रमुख मनीष बाविस्कर यांनी कौशल्याधारित शिक्षणाच्या माध्यमातून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्याचा संदेश दिला तर कार्यालयीन प्रमुख अजय सिनकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वांचे कौतुक केले. संपूर्ण कार्यक्रमात शिस्त, वेळेचे पालन आणि स्वच्छता यावर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाची तयारी करताना एकात्मतेचा आणि सहकार्याचा आदर्श निर्माण केला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुरळीत आणि यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आपल्या दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचा संकल्प केला. स्वराज्याची भावना, कर्तव्यनिष्ठा आणि समाजहिताची जाणीव मनात ठेवून वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त करत कार्यक्रमाची सांगता झाली. श्री गो. से. हायस्कूल, पाचोरा येथे साजरी झालेली ही शिवजयंती विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम, आत्मविश्वास आणि प्रेरणेची नवी ज्योत प्रज्वलित करणारी ठरली.

श्री गो से हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी नॅशनॅलिटी व डोमिसाईल प्रमाणपत्रांचे वितरण, पुढील शिक्षणाचा मार्ग सुलभ

0

Loading

पाचोरा – पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री गो से हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या नॅशनॅलिटी व डोमिसाईल प्रमाणपत्रांचे वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शालेय परिसरात आयोजित या कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती लाभली असून विद्यार्थ्यांमध्ये विशेष आनंद आणि समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार मा. विजय बनसोडे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नॅशनॅलिटी व डोमिसाईल प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. शैक्षणिक आयुष्यातील पुढील टप्प्यांसाठी ही कागदपत्रे अत्यावश्यक असल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता. याप्रसंगी शालेय समितीचे चेअरमन मा. दादासो. खलील देशमुख, स्टेट बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर प्रदीप जाधव, उपमुख्याध्यापक आर.एल. पाटील, पर्यवेक्षिका सौ. ए.आर. गोहिल, पर्यवेक्षक आर.बी. तडवी, आर.बी. बांठिया, किमान कौशल्य प्रमुख मनीष बाविस्कर, कार्यालय प्रमुख अजय सिनकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख एम.टी. कौंडिण्य, क्रीडा प्रमुख एस.पी. करंदे, धनलक्ष्मी ई सर्व्हिसेस चे संचालक विकास सोनगिरे तसेच शिक्षक बंधू-भगिनी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रमाणपत्र वितरणाची औपचारिक सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने प्रमाणपत्र स्वीकारत आपला आनंद व्यक्त केला. शालेय समितीचे चेअरमन दादासो. खलील देशमुख यांनी आपल्या मनोगतात शाळेने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची योग्य वेळी दखल घेत आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शासकीय प्रक्रिया पूर्ण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो; अशा वेळी शाळेच्या पुढाकारामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळतो, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तहसीलदार विजय बनसोडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल प्रमाणपत्र ही केवळ औपचारिक कागदपत्रे नसून विद्यार्थ्यांच्या ओळखीचा महत्त्वाचा भाग असल्याचे सांगितले. पुढील शिक्षण, स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती योजना तसेच विविध शासकीय प्रक्रियांसाठी ही प्रमाणपत्रे आवश्यक असल्याने ती सुरक्षित जतन करावीत, असा सल्ला त्यांनी दिला. यासोबतच विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्यांची जपणूक होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले. प्रामाणिकपणा, शिस्त, परिश्रम आणि वेळेचे योग्य नियोजन या गुणांमुळेच आयुष्यात यश प्राप्त होते, असे त्यांनी अधोरेखित केले. उपमुख्याध्यापक आर.एल. पाटील यांनी शाळेच्या वतीने या उपक्रमामागील उद्दिष्ट स्पष्ट करत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रशासकीय अडचणींशिवाय पुढील शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही शाळेची जबाबदारी असल्याचे सांगितले. शिक्षक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करून ही प्रक्रिया सुरळीत पूर्ण केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.बी. बोरसे यांनी प्रभावीपणे केले, तर बी.एस. पाटील यांनी उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला असून श्री गो से हायस्कूलने विद्यार्थीकेंद्रित कार्यपद्धतीचा आदर्श पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे.

एस. एस. एम. एम. महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी; विद्यार्थ्यांतून शिवविचारांचे जतन आणि इतिहासाला उजाळा

0

Loading

वरखेडी ( कु. चेतना हिरे ) पाचोरा येथील एस. एस. एम. एम. महाविद्यालयात आज 19 फेब्रुवारी 2026 रोजी अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्या वतीने या जयंतीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी पाचोरा–भडगाव मतदारसंघाचे माजी आमदार तथा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ आणि संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याच प्रसंगी इतिहास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ले प्रदर्शनाचे उद्घाटन माजी आमदार भाऊसाहेब दिलीप वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेतून आणि अभ्यासपूर्ण मांडणीतून साकारलेले हे प्रदर्शन शिवकालीन इतिहासाचे जिवंत दर्शन घडवणारे ठरले. विविध किल्ल्यांचे भौगोलिक, ऐतिहासिक आणि लष्करी महत्त्व पोस्टर व प्रतिकृतींच्या माध्यमातून मांडण्यात आले होते. मार्गदर्शनपर भाषणात माजी आमदार दिलीपभाऊ वाघ यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील प्रेरणादायी पैलूंवर सखोल प्रकाश टाकला. लढाऊपणा, सूक्ष्म नियोजन, संकटांना न घाबरता धैर्याने सामोरे जाण्याची वृत्ती, योग्य नियोजनाच्या आधारे प्रत्येक आव्हानावर मात करण्याची क्षमता हे गुण विद्यार्थ्यांनी आत्मसात करावेत, असे त्यांनी आवर्जून सांगितले. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ ज्ञान नव्हे तर मूल्याधिष्ठित नेतृत्व आणि सामाजिक जबाबदारीची जाणीवही तितकीच महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. इतिहास विभागाच्या विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धा व गडकिल्ले प्रदर्शनाच्या माध्यमातून शिवकालीन विविध प्रसंगांचे कलात्मक रेखाटन सादर केले. रायगड, राजगड, प्रतापगड, सिंहगड यांसारख्या किल्ल्यांचे दर्शन, तसेच स्वराज्य स्थापनेतील महत्त्वाच्या घटनांचे चित्रण पाहून उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या अभ्यासू वृत्तीचे कौतुक केले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ इतिहासाची पुनरावृत्ती न करता त्यातील मूल्ये आणि राष्ट्रनिर्मितीची प्रेरणा समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला. संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ यांनीही आपल्या मनोगतातून शिवाजी महाराजांच्या विचारांची आजच्या काळातील उपयुक्तता अधोरेखित केली. शिक्षणसंस्थांनी केवळ शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यावर भर न देता विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, शिस्त, कर्तव्यभावना आणि सामाजिक संवेदनशीलता रुजवावी, असे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमास संस्थेचे ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब सतीश चौधरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. एस. पाटील, पर्यवेक्षक डॉ. जे. पी. बडगुजर, इतिहास विभाग प्रमुख डॉ. जे. डी. गोपाळ, डॉ. के. एस. इंगळे, डॉ. एस. बी. तडवी, प्रा. एस. टी. सूर्यवंशी, प्रा. पी. एम. डोंगरे, डॉ. वाय. बी. पुरी, प्रा. राजेश वळवी, डॉ. क्रांती सोनवणे, प्रा. स्वप्नील भोसले, प्रा. नितीन पाटील, प्रा. महेंद्र महाजन, डॉ. सुनीता गुंजाळ, डॉ. अतुल सूर्यवंशी, प्रा. ललित वाघ, श्री. ऋषिकेश ठाकूर, प्रा. महेश माळी, प्रा. स्वप्नील ठाकरे, प्रा. ललित पाटील, प्रा. डी. एस. पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचीही लक्षणीय उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माणिक पाटील यांनी प्रभावीपणे केले. पोस्टर व रांगोळी स्पर्धेची संकल्पना इतिहास विभागातील प्रा. डॉ. माणिक पाटील यांची होती. संपूर्ण कार्यक्रमात शिस्तबद्ध आयोजन, अभ्यासपूर्ण मांडणी आणि उत्स्फूर्त सहभाग यांचा सुंदर संगम दिसून आला. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या मनात इतिहासाबद्दल अभिमान आणि स्वराज्याच्या विचारांची प्रेरणा जागवणारा ठरला.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!